Tuesday, February 11, 2020

राजसभाग्य : उत्कंठा वाढवणारी भावस्पर्शी कादंबरी



उत्कंठा वाढवणारी भावस्पर्शी कादंबरी

परमेश्वरानं आपल्याला दिलेलं अनमोल जीवन, सुंदर रीतीनं जगण्यासाठी सर्वसामान्यांची अविरतपणे धडपड चाललेली असते. हे आयुष्य जगताना सगळ्यांनाच विविध टप्प्यांवर काही ना काही वळणं घ्यावीच लागतात. मात्र येणार्‍या प्रत्येक वळणावर चांगली माणसं भेटतीलच असंही नाही! लौकिकार्थानं अगदी ‘सोन्याचा चमचा’ तोंडात घेऊन आलेल्या एखाद्या व्यक्तीचं आयुष्य सर्व सुखसोयींनी समृद्ध झालेलं आपल्या बघण्यात येतं. त्याला जन्मभर कुठल्याही गोष्टींची ददात नसते. याउलट एखाद्या व्यक्तीचं आयुष्य दुर्दैवाच्या फेर्‍यात अडकल्यासारखं सदैव वाटेवरील काट्याकुट्यांनी भरलेलं असतं! अशावेळी आपण नियतीला किंवा नशिबाला नावं ठेऊन मोकळे होतो. राजसच्या नशिबी आलेलं दोलायमान जीवन लेखक सुनील पवार यांनी ‘राजस भाग्य’ या आपल्या कादंबरीच्या माध्यमातून अतिशय परिणामकारकरित्या अधोरेखित केलं आहे. ही वाचनीय कादंबरी पुण्यातील ‘चपराक प्रकाशन’तर्फे नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे.
अगदी नकळत्या वयात, आई जग सोडून गेल्यावर राजसची झालेली सैरभैर अवस्था, मग काही काळ लाभलेली आजीची भक्कम साथ मात्र नंतर सावत्र आई घरात आल्यानं आणि टारगट मित्रांच्या संगतीमुळं अभ्यासाकडं होणारं दुर्लक्ष, त्यामुळं वडिलांकडून मिळणारा मार इत्यादी प्रसंग जणू आपल्या डोळ्यांसमोर घडत आहेत, असं ही कादंबरी वाचताना प्रकर्षानं जाणवतं! ‘लळा, जिव्हाळा शब्दच खोटे, माशा मासा खाई! कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही!’ या गदिमा यांच्या अविस्मरणीय गीतासारखी राजसची त्यावेळी स्थिती होते.
बालपण सरल्यानंतर घडण्या-बिघडण्याच्या वयात राजसच्या सुदैवानं शेजारी राहणार्‍या मानलेल्या आईची व बहिणीची-पूर्वाची त्याला समर्थ साथ लाभते. तसंच शाळेतील वर्गशिक्षिका असलेल्या बाईंमुळं त्याची गाडी थोडी रूळावर येते. बाईंच्या आश्वासक आधारामुळं त्याच्यात आत्मविश्वास जागृत होतो. त्याच्या जगण्याला उभारी मिळते. आठवीत दोनदा नापास झालेला राजस बाईंच्या मार्गदर्शनानं आणि पूर्वाची साथ लाभल्यानं अभ्यासात कमालीची प्रगती करतो. त्याच्या वागणुकीनं वडीलसुद्धा प्रभावित होतात आणि त्याला हवी ती मदत करतात. नंतर दहावीच्या वर्गात असताना मानसी राजसच्या आयुष्यात येते. तिची साथसंगत लाभल्यानं आणि मुळातच दोघंही अभ्यासात अत्यंत हुशार असल्यामुळं मेरीटमध्ये उत्तीर्ण होतात. मात्र वीज चमकून लुप्त व्हावी तशी मानसी राजसच्या आयुष्यातून निघून जाते! हा आघात राजस मोठ्या मुश्किलीनं पचवतो आणि स्वतःला सावरतो.
महाविद्यालयाच्या स्वप्नाळू जगात राजसच्या आयुष्यात सरिता नावाची गर्भश्रीमंत मुलगी प्रवेश करते. मग अनिश्चितेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात त्याचं आयुष्य कशाप्रकारे पुढं सरकतं? राजस आणि मानसीची भेट होते का? सरिताचं पुढे काय होतं? पूर्वा आणि त्याच्या आवडत्या बाई कोणत्या भूमिका निभावतात? या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी ‘राजस भाग्य’ ही उत्कंठा वाढवणारी वाचनीय कादंबरी वाचणंच अधिक रंजक ठरणार यात शंका नाही! सहजसोपी भाषाशैली आणि प्रभावी संवाद हेच खरं ‘राजस भाग्य’चं बलस्थान आहे.
त्याचप्रमाणे ....
जोडीन मी माणसे चार..
नाही कधी घुसमटणार..
अंत:करणी भिजलो जरी..
तरी असेल हास्याची धार!!

सुकल्या त्या गुलाबाचा
गंध श्वासात भरला आहे..
आठवणीतला तो पाऊस
मी ओंजळीत धरला आहे!!

जो नित्यनेमे वाचतो, तोच जाणतो शब्द
शब्द सौंदर्यावर मन नकळत होते लुब्ध ..
लुब्ध झाले मन सहज गुंतत जाते शब्दात
शब्दात काय वर्णावे ते, भिडतात मनास शब्द!!

अशाप्रकारच्या अतिशय समर्पक चारोळ्या अन् काव्यपंक्तींची लेखकानं अधूनमधून केलेली पखरण यामुळं कादंबरीला वेगळीच उंची प्राप्त झाली आहे.
या आकर्षक कादंबरीचं अत्यंत विलोभनीय मुखपृष्ठ चितारलं आहे चित्रकार संतोष घोंगडे यांनी! ‘राजस भाग्य’ सर्वार्थानं वाचनीय ठरल्यानं ही कादंबरी वाचकांच्या पुस्तकांच्या खजिन्यात संग्रही असायला हवी.
- विनोद श्रा.पंचभाई, वारजे, पुणे
- राजस भाग्य
लेखक - सुनील पवार
प्रकाशक - चपराक प्रकाशन, पुणे
7057292092
पाने 264 - मूल्य 250