Thursday, March 6, 2025

वाचन का आवश्यक आहे?

        वाचन का आवश्यक आहे?

 पुस्तकांचं वाचन ही अशी सवय आहे ज्यामुळे कुणालाही त्याच्यापासून त्रास होत नाही. वाचन करायला निश्चित वेळ लागत नाही किंवा खूप मोठी जागाही लागत नाही. वाचन कधीही, कुठेही मनात आलं तेव्हा आपण करू शकतो. घरात वीजपुरवठा असो किंवा नसो, पुस्तक वाचन करताना त्याची आवश्यकता भासत नाही... आणि एकटं असताना तर पुस्तकासारखा दुसरा सच्चा मित्र नाही... हा अनुभव स्वतः अनुभवल्यावरच येऊ शकतो. पुस्तक वाचताना तुम्ही कधी गंभीर होता तर कधी खळखळून हसूही शकता! तसंच काही पुस्तकातील विचार आपल्याला बरंच काही शिकवून जातात तर कधीकधी ते अचंबित करणारेही असतात. काही विचार मात्र आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतात! 

   आपल्या जवळ असणारी पुस्तकं खरंतर आपले सच्चे साथीदारच असतात. कारण अत्यंत बिकट प्रसंगी सुद्धा ते आपल्याला सोडून जात नाहीत. उलट आयुष्यातील सुखदु:खात ते एखाद्या जिवलग मित्राप्रमाणे साथ देण्यासाठी सक्षम असतात. ही साथसंगत पुस्तकं कधीही सोडत नाहीत, म्हणूनच म्हटलं आहे... ग्रंथ हेच खरे गुरू होत! उत्तम पुस्तकं हे आपल्या मनाचं एका अर्थाने पौष्टिक अन्नच असतं असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती होणार नाही. मात्र आजकाल लोकांचा ओढा पुस्तकांचं वाचन करण्यात कमी झालेला दिसतो. उलट अर्बटचर्बट खाण्यात किंवा इतर गोष्टीसाठी पैसे उधळण्यातच तो जास्त प्रमाणात दिसून येतो. आता बघा, आपण आपल्या कुटुंबीयांसह एखादा सिनेमा बघण्यासाठी जातो तेव्हा आपले कमीत कमी हजार बाराशे रूपये तरी सहज खर्च होतात. त्यापासून सर्वांना तीन तासात मनोरंजन मिळतं, कधीतरी त्यातून एखादा संदेशही मिळतो, हे ठीकच आहे. मात्र त्याच हजार पाचशे रूपयात जर वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकं घरी आणली तर आपण ती वेळ मिळेल तशी वाचू शकतो. घरातील सगळे सदस्य तसंच शेजारीही त्याचा लाभ घेऊ शकतात. गरज आहे, केवळ आपली मानसिकता बदलण्याची!

    लग्न समारंभ, वाढदिवस आणि इतर कौटुंबिक कार्यक्रमात आपण मोठ्या उत्साहाने सहभागी होतो. त्याचप्रमाणे कधीतरी साहित्य संमेलनं, ग्रंथ महोत्सव अथवा पुस्तक प्रदर्शन अशा विविध ठिकाणी भेटी देऊन तिथला अनुभव घेणं खरंतर खूपच आनंददायी असते. तेथील पुस्तकं हातात घेऊन बघणं, ती चाळून पाहणं हा सुद्धा एक प्रकारचा संस्कारच आहे. त्यासाठी फक्त आपली मानसिकता थोड्या फार प्रमाणात तरी बदलण्याची गरज आहे. फेसबुक किंवा व्हाट्सअप ग्रुपमार्फत येणाऱ्या पोस्टद्वारे मिळणारं ज्ञान हे वाचकांची दिशाभूल करणारं देखील असू शकते. काही काही पोस्टच्या माध्यमातून जाणीवपूर्वक समाजात गैरसमजही पसरवले जातात. ते सगळं मोबाईलवर डोळे फाडून वाचताना कधीकधी आपली मती कुंठीत झाल्याशिवाय राहत नाही आणि त्यात आपला अमूल्य वेळ सुद्धा खर्च होतोच! त्यामुळे अशा प्रकारच्या साहित्यापासून स्वतःला अलिप्त ठेवणं हेच श्रेयस्कर ठरतं, याबाबत दुमत नसावं. म्हणूनच आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणारी ग्रंथसंपदा, वाचनीय आणि प्रेरणादायी पुस्तकं आपल्याकडे नेहमीच संग्रही असावीत, जेणेकरून त्याचा लाभ आपल्याला कधीही घेता येऊ शकतो.

    रेफ्रीजरेटर, एअरकंडिशनर, स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन इत्यादी अत्याधुनिक साधने आपल्या घराला घरपण देत असतीलही. मात्र प्रेरणादायी पुस्तकं घराला योग्य ते शहाणपण नक्कीच देऊ शकतात... आणि आपल्या वास्तूला ज्ञानसंपन्न करणाऱ्या अशा पुस्तकांमुळेच आपल्या घराची उंची, श्रीमंती खऱ्या अर्थाने वाढण्यास कारणीभूत ठरतात यात वादच नाही! ज्ञानपीठ विजेते नामवंत साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज म्हणतात..." अज्ञानाच्या अंधाऱ्या रात्रींना उजळून टाकण्याचं विशाल सामर्थ्य ग्रंथामध्ये असतं. ग्रंथाच्या तेजातच क्रांतीची बीजे असतात. पुस्तकं आपल्याला माणुसकी आणि शांती शिकवतात. या क्रांतीचे, माणुसकीचे, शांतीचे, नवनवे वारसदार निर्माण करण्याचे काम पुस्तकंच करतात."

    यशवंतराव चव्हाण यांनी 'ग्रंथ वाचनाने माणूस मोठा झाला नाही तरी शहाणा जरूर होतो' असं म्हटलं होतं. यशवंतरावांच्या मातोश्री त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी वाचून घ्यायच्या. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या आईचं पुढील वक्तव्य शेवटपर्यंत ध्यानात ठेवलं आणि ते जणू त्यांनी स्वतःच्या मनावर कोरून घेतलं होतं ..."चांगल्या ग्रंथाने चांगुलपणाचा संस्कार नकळतपणे आपल्यावर होत असतो. त्यामुळे चांगला, वाईट यातील फरक कळतो. चांगला ग्रंथ म्हणजे मनाचे स्नान. स्नानानंतर पाणी अंगावर नाही राहिले, तरी मन प्रसन्न होते. तसेच एखादी ओवी एक वेळ नाही कळली तरी चालेल पण ओव्या वाचनाच्या अभ्यंग स्नानाने मन प्रसन्न होते. न कळलेला भाग हळूहळू समजू लागतो. त्यातूनच आपली समज वाढते."

     टीव्ही वरील मालिकेमध्ये असे कित्येक विषय दाखवले जातात, ज्यांचा आपल्या जीवनाशी काहीही संबध नसतो. सध्या बातम्यांच्या वाहिन्यावर कितीतरी फालतू विषय घेऊन चर्चा होताना दिसून येतात आणि त्या ऐकून काही लोक आपलं मन कलुषित करून घेतात... आपलं मत त्या संबंधित व्यक्तीच्या मतानुसार बनवलं तर त्यासारखं दुसरं दुर्दैव नाही! आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना चांगल्या विचारांची शिदोरी देऊ शकत नसलो तर हा सुद्धा आपला वैचारिक पराभवच म्हणावा लागेल. त्याच त्याच बातम्या ऐकायला आणि दर्जाहीन मालिका बघायला माणसं टीव्हीसमोर कसं काय चिटकून बसू शकतात... हे न उलगडणारं कोडंच म्हणता येईल. पुस्तकांच्या बाबतीत मात्र असं होऊ शकत नाही... कारण योग्य पुस्तकं आपल्याला निवडता येतात. ते निवडताना आपल्याला वैचारिक स्वातंत्र्यही असते. चांगली प्रेरणादायी पुस्तकं आपल्या विचार प्रक्रियेला, बुद्धिला चालना देण्याचं, मनावर संस्कार करण्याचं मोलाचं काम करू शकतात.

   'संसार सागरात भरकटणाऱ्या जीवन नौकेला किनारी लावण्याचे काम ग्रंथ करत असतात' असं स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटलं होतं. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी 'पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक असते' असं म्हटलं आहे. वि. स. खांडेकर यांनी 'पुस्तकांच्या जगात शिरले, की मनावरचे मळभ दूर होते' असं खात्रीशीर सांगितलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर ग्रंथांनाच आपला प्राण मानायचे.

  भगवदगीता आणि महाभारतासारख्या ग्रंथामधून आपल्या आयुष्याचं संपूर्ण सार सांगितलं आहे. आपल्या जीवनातील असा एकही प्रसंग किंवा एकही समस्या नसेल, ज्याचं उत्तर या ग्रंथात सापडणार नाही. जीवन जगण्याची एक वेगळी दिशा देण्याची शक्ती या ग्रंथामध्ये निश्चितच आहे. रामायणातील तर प्रत्येक पात्र आपल्या जीवनाचा एक एक आदर्श आहेत. ते मानवी जीवनाच्या विविध पैलूचं दर्शन घडवतात. ही आपली आदर्श भारतीय संस्कृती आहे  

       चांगल्या प्रेरणादायी पुस्तकांचं वाचन करण्यासाठी त्यांची कधीतरी खरेदी करणं मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने नितांत गरजेचं आहे, हे आजच्या सुजाण पालकांनी लक्षात ठेवायला हवं. आजकाल अनेक कुटुंब दैनंदिन धावपळीतून वेळ काढून थोडा तरी बदल म्हणून महिन्यातून एखादा दिवस बाहेरच्या ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये जेवण करायला जातात. ते सगळं स्वाभाविकच आहे, त्याला हरकत नसावी. मात्र त्यांनी एखाद्या दिवसातील काही वेळ तरी आपल्या कुटुंबीयांसमवेत पुस्तकांची खरेदी करून त्याचाही आनंद घेऊन पहावा. हॉटेलमधील खाल्लेले चमचमीत पदार्थ शरीरात रात्रभरासाठीच टिकतील पण दर्जेदार आणि वाचनीय पुस्तकं मात्र आयुष्याच्या अखेरपर्यंत आपली साथ देतील, आपल्याला जगण्याची दिशा देण्यासाठी सोबतही करतील हे निश्चित! संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात...

"आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने। 

शब्दांचीच शस्त्रे यत्न करू॥

शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन| 

शब्द वाटू धन जनलोका|| 

तुका म्हणे पहा शब्दचि हा देव| 

शब्दचि गौरव पूजा करूll"

 आपणही आपल्या जीवनात... आपण वास्तव्य करत असलेल्या वास्तुमध्ये शब्दरूपी रत्नांना, प्रेरणादायी पुस्तकांना योग्य ते मानाचं स्थान देऊन आपलं आयुष्य आनंदी, समाधानी करूया!

विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

मोबाईल क्र.9923797725






सच कहो तो...

सच कहो तो...

बड़ी देर कर देते हैं हम 

अपने आपको पहचानने में!

बहोत देर कर देते हैं हम 

अपनी कीमत समझने में ..!

जो हमसे दूर जाना चाहते हैं,

बेशक उन्हें जाने दीजिये!

 वैसे भी उन्हे रोकने से, 

जोर जबरदस्ती से, 

फिजूल की जिद करने से,

अपना अधिकार जताने से, 

कोई रिश्ता चल भी तो नहीं सकता!

सच कहो तो...

इस आपाधापी में 

इस खिचातानी मे 

क्या सही मे अपनापन होता है ?

अक्सर सभीं का दिल रखने के लिये 

 हम खुदको ही वक्त नहीं दे पाते!

फिर भी कुछ रिश्तों को रहती है

 हमेशा हमसे ही शिकायतें!

वैसे तो इतनी थोडीसी जिंदगी मे 

 मुश्किल से वक्त मिल पाता है हमे!

जिंदगी की कश्मकश मे...

इसका पता ही नहीं चलता हमे!

सच कहो तो...

बड़ी देर कर देते हैं हम 

अपने आप को पहचानने में!

शायद हम अपनी कीमत 

बहोत पहलेही समझ पाते!

बहोत पहलेही समझ पाते!!

... विनोद श्रा. पंचभाई, पुणे ९९२३७९७७२५

 

मनोगत... 'कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी'

 मनोगत... 'कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी'


       आपल्या खंडप्राय भारत देशाला संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, संत कबीर महाराज, संत तुलसीदास, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज अशा कितीतरी असंख्य संतांची परंपरा लाभली आहे. या सर्वच महान संतांनी सर्वसामान्य लोकांना जगण्याची योग्य दिशा दाखवण्याचं मोलाचं कार्य केलं आहे. त्याचप्रमाणे अतिशय प्रभावीपणे समाज प्रबोधन करून वेळोवेळी मार्गदर्शनही केलं आहे. समाजातील विविध जातिधर्माच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रसंगी अनेक हालअपेष्टांचा सामना देखील कित्येक संतांना करावा लागला.

    आपल्या समाजातील अज्ञान, अनिष्ट रूढी, बुरसटलेल्या चालीरिती, परंपरा, अंधश्रद्धा यांना दूर करण्यासाठी संतांनीच पुढाकार घेतल्याचा इतिहास आहे. याच संत परंपरेतील आधुनिक समाज सुधारक संत वैराग्यमूर्ती कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या प्रभावी वाणीने समाजात बोकाळलेल्या अंधश्रद्धेवर, अस्पृश्यतेवर तसंच जुनाट रूढी, परंपरेवर कठोर प्रहार केले आहेत. खेडेगावात पसरलेली कमालीची अस्वच्छता, निरक्षरता आणि अंधश्रद्धा या कारणांनी सामाजिक आरोग्य दूषित होत असल्याचं कर्मयोगी गाडगेबाबा यांनी ओळखलं होतं. त्यामुळे त्यांनी स्वतः हातात खराटा घेऊन लोकांना 'आपलं घरदार, परिसर स्वच्छ असेल तर मनही स्वच्छ राहतं!’ असा स्वच्छतेचा मंत्र दिला आणि विशेष परिणाम साधणाऱ्या आपल्या कीर्तनातून शिक्षणाच्या प्रसारावरही भर दिला. “शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. शिक्षणामुळे मनुष्याच्या अंगी शहाणपणा येतो, तो स्वतंत्रपणे विचार करायला शिकतो. शिक्षणामुळे त्याची प्रगती होते आणि त्यामुळे त्याची जगाच्या व्यवहारात फसवणूक होऊ शकत नाही. शिक्षणाविना माणूस म्हणजे निव्वळ धोंडा असतो!” अशाप्रकारचे विचार ते अत्यंत कळकळीनं आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर बिंबवायचे. त्याचप्रमाणे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेतील ओव्यांचा दाखला देत समाजात बोकाळलेल्या अंधश्रद्धेवर कठोर प्रहार करायलाही गाडगेबाबा डगमगले नाही.

''अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ!

त्याचे गळा माळ असो नसो!"... या तुकाराम महाराजांच्या वचनानुसार अंतःकरणानं निर्मळ असलेला आणि ज्याचं बोलणं ऐकायला छान वाटतं, त्याला गळ्यात कुठलीही माळ घालायची गरज नाही. याप्रमाणे सांगत असतानाच ... 'नवसे पुत्र होती, मग का करणे लागे पती?' असा रोकडा सवाल सुद्धा गाडगेबाबा जनसमुदायासमोर विचारायला कमी करत नव्हते. ‘देव दगडात नसून तो माणसांत आहे’ हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसवण्याचा मनापासून प्रयत्न केला. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी गाडगेबाबांनी आपलं अख्खं आयुष्य वेचलं! 

ज्याप्रमाणे कर्मयोगी गाडगेबाबा यांची समाजाला प्रबोधन करण्याची विशिष्ट पद्धत होती, तशीच आपल्या खंजरी भजनाच्या माध्यमातून जमलेल्या जनतेच्या मनावर पकड घेण्याची राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची खास शैली होती. वंदनीय राष्ट्रसंत हे वर्तमान परिस्थितीचं भान ठेवून भविष्याचा वेध घेणारे आदर्श दिशादर्शक होते. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशभक्तीनं ओतप्रोत अशा भजनांच्या माध्यमातून गावागावातील सर्वसामान्य जनतेमध्ये देशप्रेम जागवणारे आणि आपल्या देशासाठी तुरूंगवास भोगणारे ते एकमेव क्रांतिकारी संत होते.


   राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या प्रेरणादायी आणि परिणामकारक साहित्यातून सर्वसामान्य लोकांसाठी प्रभावीपणे प्रबोधन केलं आहे. इतर तथाकथित साहित्यिकांप्रमाणे उगाच कुठल्याही बोजड आणि अलंकारिक शब्दांचा वापर न करता त्यांनी त्यांच्या मराठीतील साहित्यासोबत हिंदी भाषेतील भजनातूनही सहज, साध्या शब्दांनी अत्यंत सोप्या भाषेत योग्य तो परिणाम साधला आहे. राष्ट्रसंत त्यांच्या ‘ग्रामगीता’ या अदभूत ग्रंथात म्हणतात…

''मंदिरी बैसोनि नाक दाबावे, त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे! 

दुःखितासि प्रेमे पाणी पाजावे, हे श्रेष्ठ तीर्थस्नानाहूनि!!''


राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची साहित्यसंपदा खूप मोठी आहे. त्यात असलेला मराठी आणि हिंदी भाषेतील विपुल ठेवा चिरकाल प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यांच्या अनमोल कार्याचा वारसा आणि वसा जपत आजही हजारो कार्यकर्ते समाज प्रबोधनाच्या कार्यात सहभागी होत असतात. राष्ट्रसंतांच्या साहित्यावर, त्यांच्या समाजोपयोगी कार्यावर असंख्य व्यक्तींनी पीएचडी संपादन केली आहे. 


       विदर्भातल्या या दोन महान संतांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने 'ग्राम स्वच्छता अभियान' सर्व जिल्ह्यातील गावागावात राबवून त्यांच्या कार्याचा उचित गौरव केला आहे. त्याचप्रमाणे अमरावती विद्यापीठाला वैराग्यमूर्ती गाडगेबाबांचं आणि नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव देऊन दोन्ही विद्यापीठांना शैक्षणिक कार्याची नवी दिशा देण्याचं कार्यही शासनानं केलं आहे.


*कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी* या पुस्तकासाठी डॉ. शांतिदास लुंगे दादा यांनी त्यांच्या प्रभावी शैलीत अप्रतिम प्रस्तावना लिहिली आहे. तसेच श्री.दिलीप गाडगे दादा यांनी या पुस्तकासाठी सुंदर अशी पाठराखण शब्दबद्ध केली. माझ्यासाठी हे आराध्यस्वरूप असलेलं पुस्तक लिहायला सतत प्रेरणा देणारे आदरणीय बाळकृष्ण पाचभाई दादा आणि ऍड. कृपालदादा भोयर यांनी या साहित्य कृतीसाठी ओघवत्या भाषेत त्यांचे मर्मस्पर्शी असे शुभेच्छा संदेश दिले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे आभार न मानता या सर्वांच्या ऋणातच राहू इच्छितो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राला सुपरिचित असलेले चित्रकार मित्र संतोष घोंगडे यांनी 'कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी' या साहित्य कृतीसाठी अप्रतिम असं बोलकं मुखपृष्ठ चितारलं आहे. दुर्वा एजन्सीज् प्रकाशन संस्थेचे सर्वेसर्वा शैलेंद्र कदम यांनी सतत पाठपुरावा करत हे चरित्रात्मक पुस्तक माझ्याकडून पूर्ण करून घेतलं... त्यांनी प्रकाशित केलेली ही माझी दहावी साहित्यकृती! या पुस्तकाची अप्रतिम मांडणी आणि अक्षर जुळवणी संगीताताई जावळकर यांनी केली आहे. या सर्वांचेच मनापासून आभार! धन्यवाद!

... विनोद श्रा. पंचभाई 

मोबाईल क्र.९९२३७९७७२५