Thursday, September 28, 2023

थरार चोवीस तासातला... प्रस्तावना

 

प्रस्तावना...

*थर.. थर्र...थर्रारक कथानक!*
     रहस्यमय, गुढकथा म्हटलं की, अनेक नावं ठळकपणे समोर येतात ती म्हणजे बाबुराव अर्नाळकर, रत्नाकर मतकरी,  सुहास शिरवळकर, श्रीकांत सिनकर, मुरली खैरनार, नारायण धारप, संजय सोनवणी, सदानंद भणगे इत्यादी. या यादीत एक नाव लक्षवेधीपणे समाविष्ट होते आहे ते म्हणजे विनोद श्रा. पंचभाई! 'हॉटेल हवेली' आणि 'सुगावा...The Clue' या दोन रहस्यमयी कादंबऱ्यानंतर पंचभाई यांची 'थरार चोवीस तासातला' ही नवी कोरी कादंबरी वाचकांच्या हातात येत आहे.
     विनोद श्रा. पंचभाई हे नाव साहित्य क्षेत्रात सर्वदूर परिचित आहे. ते केवळ रहस्य कथालेखक नाहीत तर ऐतिहासिक, चरित्र लेखन यासोबत त्यांनी बाल साहित्याचेही लेखन विपुल प्रमाणात केले आहे. एक अष्टपैलू साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात. साहित्याच्या प्रांगणात मुक्तपणे विहार सुरू असताना लेखक पंचभाई रहस्यमयी कथालेखनाकडे का वळले असावेत याचे रहस्य ते ज्या खात्यात नोकरीला होते त्या पोलीस बिनतारी संदेश खात्यातील त्यांच्या सखोल अनुभव आणि अभ्यासाला द्यावे लागेल.
    साहित्य लेखन हा प्रकार तसा अवघडच! भरपूर वाचन, चिंतन, मनन, अनुभवाची शिदोरी यासह अनेक रस लेखनात येत असतात पण त्यासोबतच लेखकाचा आत्मविश्वास, धाडस अशा बऱ्याच गोष्टी लेखकाजवळ असायला हव्यात. इतर लेखनापेक्षा रहस्य, गुढ लेखन बरेच अवघड, गुंतागुंतीचे असते! रहस्य कथा म्हटलं की, कुणाच्या अंगावर रोमांच थरथरतो, कैक जणांच्या शरीरावर भीतीचे शहारे येतात तर अनेकांच्या मुखातून भीतीयुक्त चित्कार बाहेर पडतात. अनेकदा वाचक पुस्तकातील भीतीदायक मजकूर वगळून इतर कथानक वाचतो किंवा हातातील पुस्तक बाजूला ठेवतो आणि सुटकेचा निःश्वास सोडतो. अशाप्रकारचे लेखन करत असताना लेखकाची अवस्था नेमकी कशी होत असेल याची कल्पनाच केलेली बरी! कारण कथानकातील प्रत्येक प्रसंग त्याला व्यक्तिशः जिवंत उभे करावे लागतात तसे करताना त्यांना भीती, हुरहूर‌ वाटत नसेल का? त्यांना प्रत्येक प्रसंग आणि शब्द अनुभवावा लागतो.
     'थरार चोवीस तासातला' ही अशीच एक विलक्षण रहस्यमय कादंबरी आहे. रहस्य कथा म्हटलं की, बहुतेक कथानकात खुनाची पार्श्वभूमी असते. या कादंबरीचा थरार अगदी कादंबरीच्या पहिल्या परिच्छेदापासून सुरू होतो... आय टी अभियंता असलेल्या तरुणीच्या खुनाने! या थरारक कादंबरीचे रहस्य केवळ चोवीस तासात उलगडले जाते हे आपल्या पोलीस खात्याचे यश, तत्परता, चातुर्य सिद्ध करणारे आहे.
    या कादंबरीत अंजली, अनुश्री, सोनम, मोनाली, सतीश, राकेश ही प्रमुख पात्रं आहेत. त्यांच्यासोबत अनुश्रीचे मामा-मामी, अंजलीचे आई-बाबा, अभिजित, राणे, वाॅचमन काशीनाथ, हरिया आणि त्याचा गुत्तेदार अशा काही पात्रांची नाममात्र उपस्थिती चंचुप्रवेश ठरते परंतु वाचकांच्या मनातील खुनी कोण यावर विचार करण्यासाठी रहस्यमय ठरते.
   अंजली -अनुश्री, सोनम-मोनाली या मैत्रिणींच्या दोन जोड्यांमध्ये स्वभाव, राहणीमान, वागणूक यात भिन्नता असली तरीही कॉलेजमधील होस्टेलच्या एका खोलीत त्या एकत्रित राहतात. अंजली -अनुश्री या दोघी बालपणापासून ते  महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकत्रच शिकतात. दोघींच्या मैत्रींची वीण इतकी घट्ट असते की, दोघी एकमेकींच्या संकटात धावून जातात. दोघींची राहणी एकदम साधी, सुसंस्कारित असते. दुसरीकडे सोनम-मोनाली यांचे वागणे एकदम विपरित असते, या दोघींचे वागणे अंजू-अनुला आवडत नाही पण चौघीही सोबत राहतात. सोनमच्या वाढदिवसाचा प्रसंग चौघी मैत्रिणींच्या स्वभावातील फरक स्पष्ट करणारा आहे.
     सतीश हा अनुश्रीचा मामेभाऊ! तोही नोकरीच्या निमित्ताने पुणे शहरात येतो. त्यावेळी अनुश्रीमुळे त्याचा अंजलीशी परिचय होतो. हा परिचय नंतर मैत्रीत बदलतो. मग मैत्रीचे सान्निध्य प्रेमात रुपांतरित व्हायला वेळ लागत नाही. मैत्रीचं बीज आणि प्रेमाचा सुकोमल अंकुर उमलत असताना पाच वर्षे लोटतात. परंतु तीव्र इच्छा असूनही पुढाकार कुणी घ्यावा या विचारात पाच वर्षे निघून जातात. वाचक ज्या गोष्टीची वाट पाहतात; सतीश शेवटी स्वतःचं मन अंजलीकडे मोकळं करतो. अंजलीही त्याला लगेच होकार देते आणि सतीश तिला भेटायला जातो तेव्हा एक अनपेक्षित वळण कथानकात येते... ते म्हणजे एक खून! कथानकाला वेळोवेळी अनपेक्षित वळण देण्यात लेखक विनोद श्रा. पंचभाई यांची लेखणी वाकबगार आहे.
     विशेष म्हणजे खून झालेल्या तरुणीला रहस्यमय कादंबरी वाचण्याची आवड असते. योगायोग म्हणावा की, दैवदुर्विलास म्हणावा की निसर्गाची करणी म्हणावी कारण तिचा खूनही रहस्यमय मार्गानेच होतो.
    या कादंबरीत मैत्रीचे वेगवेगळे पदर गुंफण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. अंजली -अनुश्री, सोनम-मोनाली, सतीश- अंजली, सतीश-राकेश आणि अंजलीच्या बाबांचे मित्रमंडळ हे सर्व जण एकमेकांना संकटसमयी जी मदत करतात तेव्हा पूर्वापार चालत आलेल्या मैत्रीची व्याख्या दृढ होते! ती म्हणजे,'संकटकाळी जो मदत करतो तोच खरा मित्र!'
    तरुणीच्या खुनानंतर पोलीसांचे चक्र वेगाने फिरत असताना ते सतीश, मोनाली, राकेश, अंजली यांच्या भोवती गरगरत असते. पोलिसांनी खुनाचा तपास करण्यासाठी वापरलेले सीसीटीव्ही फुटेजचे तंत्र आणि संशयित व्यक्तीचं लोकेशन तपासणं कौतुकास्पद आहे. तसेच लग्न करून दुबईला गेलेली मोनाली अचानक पाच वर्षांनी पुण्याला येते तीही अंजलीच्या सदनिकेत राहते. त्याचवेळी वाचकांच्या संशयाची सुईही विविध व्यक्तिरेखांकडे वळते; अगदी सतीश-अनुश्री यांच्याकडेही! कारण ही दोघे नात्याने मामेभाऊ - बहीण असतात आणि या नात्यांमध्येही विवाह होऊ शकतो.
    संशयित आरोपींची चौकशी सुरू असताना पोलिसांची चातुर्यता, कुशाग्र बुध्दी, बारीक नजर, दृढता इत्यादी गोष्टी वाचकांच्या दृष्टीसमोर आणण्यासाठी लेखक तन्मयतेने प्रसंगाचे वर्णन करतात आणि खून झालेली तरुणी कोण? तिचा खुनी कोण? या रहस्यावरचा पडदा बाजूला करतात तोही केवळ चोवीस तासात! पोलीस वर्ग... सलाम!
    कादंबरीत सतीशचा मित्र राकेश हा नोकरीसाठी कर्ज काढून लाखो रुपये देऊ करतो ही बाब खूप चिंतनशील तर आहेच परंतु एक जळजळीत सत्य उजागर करणारी आहे. सोबतच मैत्रीचे नाते निभावताना सतीश क्षणाचाही विलंब न करता होकार भरतो नि मित्राला लाखो रुपयांची मदत करतो ही बाब लक्षणीय आहे.
    या रहस्यमय कथानकाचे एक वैशिष्ट्य जाणवणारे आहे ते म्हणजे यातील संवाद! विशेषतः अंजलीचे बाबा दवाखान्यात 'आयसीयू'मध्ये असताना तिचा आईशी झालेला संवाद असेल किंवा अंजली -अनुश्री या दोघींमध्ये झालेली चर्चा असेल अत्यंत हृदयस्पर्शी आहेत.
   पोलीस आणि वाचकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी विनोद श्रा. पंचभाई यांची 'थरार चोवीस तासातला' ही कादंबरी वाचायलाच हवी. अत्यंत साध्या, सरळ, सोप्या भाषेत परंतु वेगवेगळे वळण घेत उद्दिष्टांपर्यंत पोहोचणारी ही कादंबरी वाचनीय आहे, रहस्यमय असली तरीही कंटाळवाणी नाही! मित्रवर्य विनोद श्रा. पंचभाई यांच्या सर्वंकष लेखनासाठी भरपूर शुभेच्छा! धन्यवाद!
         ००००
      नागेश सू. शेवाळकर, पुणे
     भ्रमणध्वनी...९४२३१३९०७१

संस्काराचे विचारदुर्ग...

 

संस्काराचे विचारदुर्ग...

"जाति न पुछो साधू की
पूछ लिजिए ज्ञान।
मोल करो तलवार का
पडी रहेन दो म्यान ।।"
या संत कबीर महाराजांच्या दोह्यानुसार संतांना वेगवेगळ्या जातीपातीत न अडकवता त्यांनी अखिल मानवजातीसाठी दिलेला एकात्मतेचा संदेश युवा कीर्तनकार असलेले लेखक रमेश वाघ यांनी 'महाराष्ट्राचे विचारदुर्ग' या आपल्या पहिल्यावहिल्या दर्जेदार पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवला आहे. 'ज्ञानियांचा राजा' ज्ञानोबा माउलीपासून ते समर्थ रामदास स्वामी यांच्यापर्यंत एकूण दहा थोर संतांच्या अलौकिक कार्याचा आढावा घेणारे हे पुस्तक नुकतेच पुण्यातील ख्यातनाम प्रकाशन संस्था 'चपराक' तर्फे प्रकाशित करण्यात आले आहे.
जगाच्या पाठीवर आजपावेतो कितीतरी बलशाली राजे-महाराजे, सम्राट, सुलतान, हुकूमशहा आले आणि गेले. त्यांची कायम न टिकणारी सत्ता देखील धुळीला मिळाली. अख्खं जग जिंकण्याची ईर्षा बाळगून अनेक राज्ये पादाक्रांत करत रुबाबात निघालेला सिकंदरही शेवटी त्याच्या मनसुब्यात अयशस्वी ठरल्यानंतर रिकाम्या हातानंच हे जग सोडून गेला, हा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे. मात्र या अखिल विश्वावर एकछत्री अंमल कायम टिकून राहिला तो संतांच्या अनमोल विचारांचाच... हे त्रिकालाबाधित सत्य कोणीही नाकारू शकत नाही! लौकिकार्थानं अजूनही संतांचंच राज्य या भूतलावर असल्यानं ही चराचर सृष्टी, मानवजात अस्तित्वात आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 'ग्रामगीता' या ग्रंथातील पुढील समर्पक ओव्या वाचल्यावर त्याची साक्ष पटते ...
"राजे किती आले, गेले। त्यांचे कायदे नष्ट झाले।
सत्तेचे दरबार उजाडले। परि राज्य चाले संतांचे।।
संतांचा तो प्रचार अमर। अजूनिही लोक-मनावर।
राज्य चालवोनि निरंतर। लाखो जीवां उद्धरितो।।
न लगे सत्तेचा बडगा। नको भयभीतीहि सन्मार्गा।
आपापले कर्तव्य जगा। प्रचारसूर्यचि दाखवी।।"

लेखक रमेश वाघ हे पेशाने शिक्षक असून त्यांचं विद्यार्थी घडवण्याचं निरंतर कार्य अभिमानास्पद आहेच. आता 'महाराष्ट्राचे विचारदुर्ग' या संतांची मांदियाळी असलेल्या त्यांच्या अनोख्या पुस्तकातून, त्यातील संतांच्या अमूल्य विचारांच्या माध्यमातून संस्कारक्षम 'माणूस' घडवण्याचं कार्यही निश्चितच स्वागतार्ह आणि अभिनंदनीय आहे. तरीही ते त्यांच्या मनोगतातून "आपुलिया बळे नाही मी बोलत। सखा कृपावंत वाचा त्याची।।" अशाप्रकारच्या प्रामाणिक भावना व्यक्त करतात.

या विचारदुर्गात ज्ञानोबा माउली, नामदेव महाराज, सावता महाराज, गोरोबाकाका, नरहरी सोनार, सेना महाराज, चोखामेळा, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी अशा एकूण दहा महनीय संतांच्या चरित्रांची अतिशय साध्या,सोप्या आणि ओघवत्या भाषेत मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे पुस्तकाचे प्रत्येक पान वाचताना वाचक 'भावविभोर' होऊन जातो आणि त्याचं अंत:करण हेलावल्याशिवाय राहत नाही! अनेक मार्मिक आणि भावस्पर्शी प्रसंग, त्यांना अनुसरून लिहिलेली प्रभावी संवादशैली ही 'महाराष्ट्राचे विचारदुर्ग' ची खासियतच म्हणावी लागेल. या पुस्तकातील एकच प्रसंग याठिकाणी नमूद करतो...
एकनाथ महाराज एकेदिवशी गोदावरीवरुन स्नान करून येत होते. रस्त्यामध्ये एक माडी होती. तिथे एक यवन पान खाऊन खिडकीमध्ये बसलेला होता.
तो नाथांच्या अंगावर थुंकला. नाथ पुन्हा गोदावरीवर गेले. आंघोळ करून परतले. पुन्हा तो थुंकला! असं एकशे आठ वेळा घडलं. नाथ काहीच बोलले नाहीत. त्यानंतर तो यवन नाथांना शरण आला व म्हणाला, "माझं चुकलं महाराज, मला क्षमा करा."
नाथ म्हणाले, "तुझं काहीच चुकलं नाही. उलट तुझ्यामुळे मला गोदावरीचं एकशे आठ वेळा स्नान घडलं त्यासाठी मीच तुझे आभार मानावयास हवेत."
काहीही झालं तरी कुणावर रागवायचं नाही हे नाथांचं ठरलेलं होतं. किती सहनशीलता... केवढा मोठा मनाचा संयम! हल्ली आपण बघतो, अगदी क्षुल्लक गोष्टींवरून सुध्दा आपल्याला राग येतो. मनाचा संयम, सहनशीलता जणू लुप्त होत चाललीय! या पुस्तकातील महान संतांच्या चरित्रांचे वाचन केल्यानंतर त्यांच्या अलौकिक विचारांचं निदान काही अंशी तरी आपण सामान्य जणांनी आचरण केलं तरी हे अनोखं पुस्तक लिहिण्याचं सार्थक होईल असं वाटतं.
'महाराष्ट्राचे विचारदुर्ग' हे खरंतर संस्कारांचं विचारदुर्ग आहे असंच म्हणावं लागेल. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येक पालकानं आपल्या मुलांसाठी आवर्जून संग्रही ठेवावं असं सुचवावसं वाटतं.
एक दोन नव्हे तब्बल दहा संतांच्या चरित्रांना पुस्तक रूप बहाल करणार्या अवलिया संपादक, प्रकाशकाचं, घनश्याम पाटील यांचं विशेष कौतुक आणि जोरदार अभिनंदन करायलाच हवं. तसेच विषयाला अनुसरून अप्रतिम मुखपृष्ठ साकारणारे चित्रकार संतोष घोंगडे यांचंही अभिनंदन! या 'विचारदुर्ग'चे विचारवंत लेखक रमेश वाघ यांच्याकडून आणखी बर्याच चिंतनशील, वैचारिक कलाकृतींची अपेक्षा करायला हरकत नाही. त्यांना त्यांच्या भावी लेखनकार्यास मनापासून शुभेच्छा!!

विनोद श्रा.पंचभाई, पुणे
भ्र.क्र. ९९२३७९७७२५


 

मोगरा... प्रस्तावना

 प्रस्तावना...


पु. ल. देशपांडे यांनी म्हटलं आहे... 'प्रॉब्लेम कुणाला नसतात, ते अगदी शेवटपर्यंत असतात पण प्रत्येक प्रॉब्लेमवर तोडगा हा असतोच. तो सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं हवी असतात. या तिन्ही गोष्टीपलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो !'


तसंच आपल्या आयुष्यात येणारे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स किंवा गुंते देखील प्रयत्न केल्यास सुटू शकतात. ते कधीही सुटणार नाहीत असा आपण उगाच समज करून घेतो. मात्र आयुष्यातील प्रॉब्लेम किंवा गुंता सोडवण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो, अशावेळी पेशन्स महत्वाचे ठरतात! असे हे न सुटणारे गुंते कधी नातेसंबंधातले असतात तर कधी मैत्रीमुळे निर्माण झालेल्या ऋणानुबंधामधील किंवा प्रेमसंबंधातील असतात. बरेचदा नातेसंबंधांमधील गुंता हा अगदी क्षुल्लक कारणावरून किंवा गैरसमजातून निर्माण होताना दिसून येतो. गैरसमज वाढले की जिवाभावाची घट्ट मैत्री सुद्धा क्षणात तुटताना आपण पाहतो. तसेच आपसातील निस्सीम प्रेमातही कमालीचा दुरावा वाढतो.


लेखक दत्तात्रय वायचळ यांनी त्यांच्या 'मोगरा' या कादंबरीच्या माध्यमातून अतूट मैत्रीतून निर्माण झालेले ऋणानुबंध आणि त्यानंतर त्यातून अंकुरत गेलेल्या प्रेमभावना यांचा विलक्षण आविष्कार संवादशैलीतून सादर केला आहे. कुठेही बोजड, क्लिष्ट शब्द तसंच अलंकारिक भाषा न वापरता सहजसोप्या भाषेत त्यांनी मांडणी केली आहे. त्यामुळे ही कादंबरी वाचनीयझाली आहे. या 'मोगरा' कादंबरीपूर्वी त्यांची 'गजरा' आणि 'स्वप्नातलं पुणं' ही दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. या दोन्ही पुस्तकांना रसिक वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.


कुण्यातरी विचारवंताने म्हटलंच आहे, 'अमुक एका व्यक्तीशिवाय आपण जगूच शकत नाही असे वाटणे हे उत्तुंग प्रेम नाही. स्वतःचे अस्तित्व, आपले कुटुंबातील तसेच समाजातील स्थान यांची जर निश्चित जाणीव असेल तर तुमचे कोणाशिवाय काहीही अडणार नाही. दुसऱ्यांवर प्रेम जरूर करा मात्र त्याआधी स्वतःवर प्रेम करायला शिका !' प्रेम आणि मैत्री या जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या विषयावर अनेक लेखकांनी कथा, कविता, कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. मात्र लेखक दत्तात्रय वायचळ यांनी त्यांच्या 'मोगरा' या कादंबरीत प्रेम आणि मैत्री या मानवी भावना परिणामकारकरित्या अधोरेखित केलेल्या आहेत. तसे पाहता या कादंबरीत मुख्य पात्र चारच आहेत... अनिता, विद्या, सुरेश आणि सुशांत! अनिता, विद्या आणि सुरेश हे तिघे बालपणीचे जिवाभावाचे मित्र. कालांतराने तारुण्यसुलभ वयात आल्यावर त्यांच्यात नैसर्गिकरित्या एकमेकांविषयी ओढ निर्माण होते, आपुलकी वाढते. एकमेकांप्रती वाटणारा कमालीचा जिव्हाळा, प्रेम वाढीस लागते. या वयात एकमेकांबद्दल एकप्रकारची ओढ वाटणे स्वाभाविकच असते. आणि मग एक दिवस अनिताच्या आयुष्यात अचानक सुशांतचा प्रवेश होतो. खरंतर सुशांत हा सुरेशचा जिगरी दोस्त असतो. मात्र त्याबाबत अनिता आणि विद्या पूर्णतः अनभिज्ञ असतात. मग अशा दोलायमान अवस्थेत सुरू होते अनिताच्या मनाची जीवघेणी घालमेल... बालपणीचा मित्र सुरेश की कॉलेजच्या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने अचानक भेटलेला सुशांत! त्यावर काहीतरी तोडगा काढता यावा म्हणून ती तिची जिवलग मैत्रीण विद्याजवळ आपलं मन मोकळं करण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात पुण्यात असलेला सुरेश नेहमीसाठी सुशांतकडे मुंबईला येणार असतो. त्यावेळी सुशांतला आपल्या खास मित्राला एक खास सरप्राईज द्यायचं असतं!


काय असतं सुशांतचं सरप्राईज ? सुरेश, अनिता आणि सुशांत यांच्या प्रेमाच्या ट्रॅगलमध्ये कोण जिंकतं? तसंच सुरेशवर मनापासून प्रेम करणाऱ्या विद्याचं काय होतं? सुरेश आणि सुशांत यांच्या घट्ट मैत्रीचं शेवटी कायहोतं? विलक्षण प्रेमाचा आणि अतूट मैत्रीचा गुंता शेवटी कशाप्रकारे उलगडला जातो ? अशा स्वाभाविकपणे उद्भणाऱ्या प्रश्नांची उत्तरे रसिक वाचकांना या कादंबरीतील प्रभावी संवादातून मिळतात. 'मोगरा' मधील सरळसाधी, प्रवाही भाषा आणि संवादशैली लेखक दत्तात्रय वायचळ यांची खासियत आहे हे येथे आवर्जून नमूद करावे लागेल. त्यामुळेच ही कादंबरी वाचकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. 'मोगरा' कादंबरीसाठी लेखकाचं आणि प्रकाशक मित्र विलास पायगुडे यांचं मनापासून अभिनंदन ! पुढील लेखनप्रवासाठी खूप खूप शुभेच्छा !


विनोद श्रा. पंचभाई लेखक, पुणे


९९२३७९७७२५