पुण्यातील प्रसिद्ध "एकता" मासिकाचा दिवाळी अंक काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झाला. त्यात माझ्या "विजेता" या कथेला स्थान मिळाले आहे. नक्की वाचा.... 🙏🙏😊
कथा ... विजेता
बऱ्याच दिवसांनी आज विलासची गाठ पडली. इतक्या मित्रांच्या घोळक्यात विलास वेगळाच
भासला. भरपूर गप्पा झाल्या. आधी कुणाशी सहसा न बोलणारा विलास आज भरभरून बोलत होता. हास्य विनोद करत होता. त्याचा हा बदललेला स्वभाव सकारात्मकता दर्शवत होता. मग काही वेळानं पुढच्या आठवड्यात भेटण्याचं ठरवून सर्व मित्र एक एक करून आपल्या जागेवरून उठायला लागले. रमाकांत उठला तसा मीही उठलो. कारण रमाकांतसोबत त्याच्या गाडीवर आल्यानं मला उठणं भागच होते. विलास आणि इतर मित्रांचा निरोप घेऊन आम्ही निघालो.
मला सहज आठवलं... दहावी - बारावीच्या वेळी विलास सोबतच होता. बारावीची परीक्षा संपली. तेव्हा आम्ही मित्र एकत्र जमलो. गप्पा टप्पा झाल्या. मग विषय निघाला ... बारावी नंतर पुढं काय? इतका वेळ गप्प असलेला विलास अचानक म्हणाला,
"माझं ठरलंय आधीच, भारतीय सेनेत दाखल व्हायचं! "
"काय? काय बोलतोस विलास, अरे तुझ्या घरच्यांना माहिती तरी आहे का हे?" मी त्याला मध्येच विचारलं.
"हो तर! माझे काका भारतीय सेनेत हवालदार आहेत. शिवाय एक चुलतमामाही लान्सनायक आहेत." विलास ठामपणे म्हणाला.
"अरेवा! म्हणजे आपला दोस्त देशसेवा करणार तर! वा मित्रा छानच! तुझ्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. मात्र तिकडे गेल्यावर आम्हाला विसरू नकोस म्हणजे झालं." बोलता बोलता रमाकांत हसतच पुढं म्हणाला...
"आम्ही काय, चुकून बारावी पास झालोच तर वडिलांच्या दुकानात बसणार त्यांना मदत करायला."
आज पुण्यात मिनी मॅरेथाॅनचं आयोजन करण्यात आलं होतं. आम्ही सर्व मित्र वेळेआधीच जमणार होतो. विलास सुध्दा येणार म्हणून रमाकांतचा रात्रीच फोनवर निरोप मिळाला होता. तेव्हापासून मला उत्सुकता होती... ती यंदा विलास नक्कीच बाजी मारणार याची! कारण तो भारतीय सेनेचा खंदा शिपाई होता. आम्हा सर्व मित्रांना त्याचा खूप अभिमान होता. लष्करात त्यानं पळण्याच्या शर्यतीत तसंच कितीतरी क्रीडाप्रकारातील स्पर्धांमध्ये अनेक बक्षीसं जिंकली होती. शाळेतही त्यानं खो-खो कबड्डीमध्ये नाव कमावलं होतं. त्यावेळी विलास सहसा जास्त बोलत नसे. मात्र त्याचा सहवास सगळ्यांनाच हवाहवासा वाटायचा. चारचौघात उठून दिसणाऱ्या विलासची नवीन माणसावर छाप पडायची.
रमाकांतच्या स्कूटरवरून आम्ही वेळेआधीच बालगंधर्वजवळच्या छत्रपती संभाजी उद्यानासमोर पोहोचलो. त्यावेळी तिथं अभिजीत, विजय आणि त्यांचे काही मित्र ट्रॅकसूट घालून तयारीत असलेले दिसले. त्या सर्वांनी मिनी मॅरेथॉन स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. माझी नजर विलासला शोधत होती मात्र अजूनही तो न आल्यानं मी अचंबित होऊन रमाकांतला विचारलं,
"अरे यार, विलास येणार होता ना? तू रात्री बोलला होतास मला..." पुढचं बोलणं तसंच राहिलं. बाईकवरून उतरणाऱ्या विलासकडे माझं लक्ष गेलं. तो त्याच्या भावासोबत बाईकवरून आला होता. रमाकांतही तिकडेच बघत होता. विलास त्याच्या भावासोबत किंचित लंगडत आमच्यापर्यंत येऊन पोहोचला. आम्ही आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहिलो. जवळ आल्यावर तो स्मित करत म्हणाला,
"अरे असं काय बघताय तुम्ही... आणि रम्या तू पळणार नाहीस का स्पर्धेत? खरंतर तुलाच 'चिअर अप' करायला आलोय मी! "
"यार तू पण ना! तू येणार होतास म्हणूनच आम्ही आलो रे .... पण तुझ्या पायाला काय झालं?" रमाकांतनं विचारलं. मलाही कुतूहल होतं जाणून घेण्याचं... पळण्याच्या स्पर्धेत विलास नाही म्हणजे काय!
तेवढ्यात अभिजीत, विजय आणि त्याचे मित्र आमच्याजवळ आले आम्ही सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. विलास हस्तांदोलन करत विजयला हसत म्हणाला...
"आपल्या क्लबचं नाव काढायचंय तुला. आपल्या ट्रिक्स लक्षात ठेव आणि बिनधास्त पळ. चल ऑल द बेस्ट!! "
"ओके मित्रा थँक्स! तू मात्र काळजी घे पायाची बरं का!" विलासच्या खांद्यावर हात ठेवत विजय म्हणाला आणि सगळ्यांना बाय करत तो मित्रांसह स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निघाला.
न राहवून रमाकांतनं परत एकदा विलासला विचारलं... "विल्या सांगणार नाहीस का तू आम्हाला? तो विजू पण जाताना तुला सांगून गेला पायाची काळजी घ्यायला. नेमकं काय झालं रे ?"
"अरे काही विशेष नाही. तू नकोस काळजी करू जास्त. मी एवढा धडधाकट उभा आहे तुझ्यासमोर! " बिनधास्तपणे विलास म्हणाला. तेवढ्यात इतका वेळ गप्प असलेला त्याचा भाऊ अचानक म्हणाला...
"दादाला गुडघ्यापासून नकली पाय बसवला आहे! "
"क..काय? " माझ्या तोंडून एवढाच शब्द बाहेर पडला. आम्हाला धक्काच बसला. आता विलास काय बोलतो याची उत्सुकता होती. रमाकांत अविश्वासानं कधी विलासच्या चेहऱ्याकडे तर कधी त्याच्या पायाकडे बघत होता.
तिकडे मिनी मॅरेथॉन स्पर्धा सुरू झाली होती. बरेच स्पर्धक पळतपळत दूरवर निघून गेले होते. मग थोडा गंभीर होत विलासनं बोलायला सुरुवात केली...
"तुम्हाला माहितीच आहे काश्मीरच्या सीमेवर शत्रूसोबत सतत चकमकी झडत असतात. असंच चार महिन्यापूर्वी आमची गस्त चालू असताना सीमेच्या पलीकडून अचानक गोळीबार सुरू झाला! त्यामुळे आम्ही त्यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं. अनेक फैरी झडल्या. जवळपास दीड-दोन तास धुमश्चक्री सुरू होती. शत्रूला पिटाळून लावल्यानं मग सगळं शांत झालं होतं. मात्र तणावग्रस्त वातावरणात वाढ झाली होती. आमचा एक जवान शहीद झाला आणि आमच्या मेजरला खांद्यावर आणि माझ्या पायाला गोळी लागल्यानं आम्ही जखमी झालो झालो होतो! "
"ओह गॉड! म्हणजे अगदीच जीवावर बेतलं होतं तर..!" मध्येच रमाकांत बोलला.
"हो ना ! सीमेवर असे प्रसंग नेहमीच घडत असतात. कुठून शत्रूची गोळी येईल आणि कधी कुणाचा वेध घेईल हे सांगता येत नाही. शेवटी 'जान है तो जहान है' हेच खरं! मग डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले माझा पाय वाचवण्याचे. पण जास्त रक्तस्त्राव झाल्यानं अन् गोळी रुतून बसल्यानं इन्फेक्शन होऊ नये म्हणून गुडघ्यापासून पाय कापून काढावा लागला. तरीही आताच्या अत्याधुनिक साधनांमुळेच, हा नकली पाय असूनही त्याचा मला सराव झालाय मित्रांनो! काळजी करण्यासारखं काहीच नाही. "
एखादी किरकोळ दुखापत व्हावी आणि ते हसण्यावारी न्यावं अशा अविर्भावात विलास बोलत होता. त्याच्या देहबोलीतून कमालीचा आत्मविश्वास झळकत होता.
"यार विल्या, खरंच खूप अभिमान वाटतो तुझा! तुझ्यासारखे जीवावर उदार होणारे मातृभूमीचे रक्षक आज सीमेवर आहेत म्हणूनच आम्ही इकडे निश्चिंतपणे जगतो आहोत. अख्खा देश सुरक्षित आहे तो केवळ तुमच्यामुळेच! हॅट्स ऑफ मित्रा! "
मिनी मॅरेथॉन स्पर्धेतील काही स्पर्धक दुरून येताना दिसत होते. आमचं लक्ष मुसंडी मारून झेप घेत असलेल्या विजय कडे गेलं. अचानक विलास दोन्ही हात वर करून मोठ्याने ओरडला...
"कीप इट अप विजू ... कीप इट अप!"
आणि अपेक्षेप्रमाणे घामाघूम झालेल्या विजयने नियोजित आडव्या दोरीला स्पर्श करुन ती ओलांडली. नावाप्रमाणे विजयनं स्पर्धेत विजय मिळवला होता. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. विलास आपल्या पायाची पर्वा न करता उत्स्फूर्तपणे पुढे सरसावला आणि विजय जवळ पोहोचला. त्याला बघताच विजयनं जवळ जाऊन विलासला मिठी मारली. आम्ही सगळे त्यांच्याकडेच कौतुकानं बघत होतो. विजयनं स्पर्धेत बाजी मारली होती मात्र खऱ्या अर्थानं आज विलास विजयी झाला होता!
... विनोद श्रा. पंचभाई
तपोवन सोसायटी, वारजे, पुणे.
भ्र. क्र. 9923797725