Sunday, July 9, 2023

एका समर्पित आणि प्रेरणादायी जीवनाची अखेर!

 


एका समर्पित आणि प्रेरणादायी जीवनाची अखेर!

               आई वडील यांच्यानंतर नतमस्तक व्हावं असं जिव्हाळ्याचं, आपुलकी वाटावं असं श्रद्धास्थान म्हणजे प्रत्येकाला माया लावणारी, आदरणीय जिजाबाई! एक हक्काचं ठिकाण... मुक्काम पोस्ट नांदुरा (पुलाचा) तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ. लहानपणी शाळेत शिकत असताना नागपूर येथून नांदुऱ्याला नेहमी जाणं व्हायचं. कधी आईच्या मागे लागून तर कधी आमच्या दादांसोबत! त्यावेळी मला आठवतं जिजाबाईच्या घरी समोरच दर्शनी भागात एक छोटंसं किराणा दुकान होतं... ते श्यामदादांना आणि जिगरी दोस्त शिवाजी राजेंना ( तात्याला ) चांगलंच आठवत असणार! त्यावेळी त्या बालवयात दुकानातून गोळ्या, बिस्किटे खायला मिळणं म्हणजे पर्वणीच असल्यामुळे आमची मस्त चंगळ असायची. जवळपास सारख्याच वयाचे असल्यामुळे माझी शिवाजीसोबत सुरुवातीपासूनच मस्त गट्टी जमली होती. मग शेजारी राहत असलेले तानाजी, गुणाजी आणि इतर दोस्त मंडळी जमली की बेंबळा नदीच्या पात्राच्या परिसरात हुंदडायला मजा वाटायची. त्यावेळी बेंबळा नदीला भरपूर पाणी असल्यामुळे आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर आल्हाददायक वाटायचा!
                  मनासारखं हुंदडून झाल्यावर मग मनसोक्त खेळून घरी परतलो की कधीकधी काका शिवाजीवर ओरडायचे. तेव्हा आम्ही सर्व जण खूप घाबरून जायचो. मात्र त्यावेळी जिजाबाई लगेच मध्ये पडून आमची बाजू घ्यायची. सर्वांना प्रेमानं समजावून सांगायची,
"बाळांनो नदीचं पाणी वाहतं असते, त्यापासून दूर राहायचं! तिकडे उन्हातान्हात जास्त वेळ भटकत जाऊ नका... वाटल्यास इकडे आपल्या घराजवळ दिवसभर खेळा... भूक लागली की मला सांगा!"
नंतर आम्हाला भूक लागली की गाईच्या दुधासोबत गरम भाकरी खायला द्यायची. त्या दुधात कुस्करून खाल्लेल्या भाकरीची चव विसरणं शक्यच नाही. आपल्या गालावरून हात फिरवून प्रेमानं, अतिशय आत्मीयतेनं बोलण्याची, समजावून सांगण्याची त्या माऊलीची तऱ्हा खरंच जगावेगळी होती! मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, बालपणीचा काही काळ तरी जिजाबाईच्या प्रेमळ आणि निर्मळ सहवासात गेला. तिनं कधी कुणाला रागावलेलं, मारलेलं मी तरी बघितलं नाही. उलट घरातील मुलं रुसून बसली की, ती अत्यंत मायेनं त्यांना जवळ घ्यायची... त्याची किंवा तिची समजूत काढायची... खरंच तिच्यासारखी आई होणे नाही! कधी कोणी नाराज झालं किंवा कोणामध्ये अगदी क्षुल्लक कारणावरून काही धुसफूस झाली तर ती कशी निस्तरायची हे तिला चांगलं ठाऊक होतं. अतिशय शांततेनं कुठलंही प्रकरण मिटवून टाकण्यात तिचा हातखंडा होता!
           त्या काळचा एक प्रसंग आठवतो... त्या वेळी मी आणि शिवाजी बहुतेक सातवीत किंवा आठव्या वर्गात होतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे आमच्या दादांसोबत मी नागपूरहून नांदुऱ्याला आलो होतो. दुसऱ्या दिवशी दादा नागपूरला परत गेले पण मी हट्ट करून तिथंच राहिलो. मग जिजाबाई आणि शिवाजीसोबत कधी शेतात जायला मिळायचं तर कधी नदीवर... त्यावेळचा तिथल्या प्रसन्न वातावरणाचा तो अनुभव माझ्यासाठी खूप विलक्षण होता! असाच एक दिवस घरातील बैलांना आंघोळ घालण्यासाठी म्हणून बैलजोडी घेऊन नदीवर जायला शिवाजी आणि मी निघालो होतो. त्यावेळी जिजाबाईनं मला बजावलं होतं, "जास्त पाण्याकडे अजिबात जायचं नाही, काठावरच थांबून राहायचं!" सोबत शेजारचा गुणाजी पण होता.  नदीच्या पात्राजवळ पोहचल्यावर बैलांना पाण्यात सोडून त्यांच्या पाठोपाठ शिवाजीही गेला. गुडघाभर पाण्यात थांबून त्यानं बैलांना धुणं सुरू केलं. मी काठावर उभा राहून मजा पाहत होतो आणि आमच्या गोष्टी पण सुरू होत्या. तेवढ्यात शिवाजीनं मला पाण्यात येण्याचा इशारा केला. मात्र त्या वेळी मला पोहता येत नसल्याने पाण्यात उतरण्याचं धाडस होत नव्हतं!
           शेवटी एका बैलाला घेऊन शिवाजी काठाजवळ आला आणि मला म्हणाला, "या बैलाची शेपटी घट्ट धरून ठेव आणि हळूहळू सोबत पाण्यात ये... घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहेच!" मग मी त्या बैलाची शेपटी धरली आणि सर्व धैर्य एकवटून त्याच्या मागोमाग पाण्यात उतरलो. सुरुवातीला खूप मजा वाटली. मात्र जसजसा त्या बैलासोबत पाण्यात पुढे पुढे सरकू लागलो, तसतसा पाण्याची लेव्हल वाढल्याचं जाणवत होतं. लवकरच पाणी चांगलं कंबरेच्या वर आलं होतं. आणखी पुढे गेल्यावर मात्र घाबरलो आणि मग मी बैलाच्या शेपटीच्या वरच्या बाजूला घट्ट पकडलं. त्यामुळे बैल अचानक बिथरला, त्यानं मागं वळून पाहिलं आणि मागचा पाय झाडून शेपटीला जोरात हिसका दिला. त्यामुळे माझे हात सुटले आणि मी पलीकडे पाण्यात फेकला गेलो. त्यावेळी प्रचंड घाबरल्यामुळे मी जोरात ओरडलो! मागं असलेला शिवाजी ओरडून सांगत होता...
"अरे दोन्ही हात पाय हालव... घाबरू नकोस. मी आलोच."
माझ्या चांगलं गळ्यापर्यंत पाणी आलं असल्यामुळे मला भानच नव्हतं. अचानक ते नाकातोंडांत पण जाऊ लागलं मात्र नेमक्या त्याचवेळी जवळ आलेल्या शिवाजीनं माझा दंड धरला आणि पोहत पोहत मला काठावर आणलं. त्यावेळी मी खूप घाबरलो होतो आणि पूर्ण भिजलोही होतो! त्या दिवशी केवळ शिवाजीमुळेच मी त्या संकटातून वाचलो... त्याचा मी जन्मभर ऋणी राहील हे वेगळं सांगायला नकोच!
        घरी परतल्यावर माझा भिजलेला अवतार पाहून जिजाबाई काय समजायचं ते समजली. त्या दिवशी माझ्यामुळे माझ्या जिगरी दोस्ताला, शिवाजीला खूप बोलणी खावी लागली... मला खूप वाईट वाटलं. सारखं रडायला येत होतं! त्या काळात मोबाईल तर नव्हतेच शिवाय टेलिफोन सुद्धा फारसे कुणाकडे नव्हते. त्यामुळे नागपूरला संपर्क करणं शक्य नव्हतं. मग सतत कामात असलेल्या काकांनी ( शिवाजीचे वडिलांनी ) नाईलाजाने मला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायला सांगितलं आणि आम्ही सरळ नागपूर गाठलं. घरी पोहचल्यावर मला खूप भीती वाटत होती, आता आपली नदीवरची करामत काका माझ्या आई दादांना सांगणार! मात्र त्यांनी तो विषय देखील काढला नाही... खरंच आपल्या पूर्वीची पिढी खऱ्या अर्थाने किती समजदार आणि दूरदृष्टीची असणारी होती हे आज पटते! त्यानंतर काका त्याच दिवशी संध्याकाळी नांदुऱ्याला परतले. पुन्हा वरील विषय कोणी मुद्दामहून काढला नाही. मात्र हा मनावर कोरलेला प्रसंग आठवला की अजूनही अंगावर काटा येतो!
            वरील प्रसंगानंतर बरेच दिवस कोणाचंही एकमेकांकडे जाणं येणं झालं नाही. कोणाचं तरी लग्न कार्य असलं तरच ते शक्य व्हायचं. मला आठवतं, माझ्या चुलत बहिणीचं, छबूताईचं लग्न नागपूरला होतं त्यावेळी जिजाबाईसह सर्वजण नागपूरला आले होते. तिच्यासोबत श्यामदादा, शिवाजी, तानाजी, कोकिळाताई (राजूची आई ), मालाताई आणि बहुतेक तानाजीच्या बहिणी असल्याचंही आठवते. तेव्हा आम्ही बच्चे कंपनीनं खूप धमाल केली होती. जिजाबाईसोबत महालवरच्या भारत फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढल्याचंही आठवलं. त्यावेळी गांधीसागर तलावाच्या मध्यभागी असलेल्या बगिच्यात सकाळ संध्याकाळी जाणं आणि मनसोक्त खेळणं, मग उशीर झाल्यावर आईने सगळ्यांना बोलवायला येणं हे ठरलेलंच असायचं. त्या दिवसांच्या आता फक्त आठवणी शिल्लक आहेत... बाकी काही नाही! ते दिवस आठवले की आजही गहिवरून येते, आपण खूप काही मिस करतोय याची प्रकर्षाने जाणीव होते!

नंतर जिजाबाईचं नागपूरला कधीतरी येणं व्हायचं पण ते अगदी थोड्या दिवसासाठी! कारण तिला साऱ्या जगाची चिंता असायची असंच म्हणावं लागेल. माझी आई जिजाबाईविषयी नेहमी म्हणायची... "ती नागपूरला असली तरी तिचं मन मात्र तिकडे नांदुऱ्यात असतं!" खूपच संवेदनशील मन होतं तिचं, जणू सिनेमातली श्यामची आईच! श्यामची आई (श्यामदादाची आई )तर ती होतीच पण शिवाजीची आई असल्यामुळे मी तिला गमतीने म्हणायचो, तू शिवाजी राजेंची खरीखुरी आईच जास्त शोभतेस, रायगडावरची जिजाबाई! कारण ती जशी मनानं संवेदनशील होती, हळवी होती तितकीच खंबीर आणि धाडसी, निर्भयी होती. त्या काळात नांदुऱ्याला रात्र झाली की सर्वत्र काळाकुट्ट अंधार पसरायचा.  गावातील पोलवर आजच्यासारखे लाईट नव्हते. अंधारात समोरच्या हॉलमध्ये किंवा घराच्या मागच्या बाजूला जायची भीती वाटायची! जिजाबाई मात्र न घाबरता तिकडे दिवा, कंदील घेऊन जायची. घराच्या मागच्या बाजूला गायी, बैल इत्यादी बांधलेले असायचे... त्यांचीही काळजी जिजाबाईला असायची. कारण तिकडे साप पण निघायचे! त्या मुक्या प्राण्यांना चारा खाऊ घालायला अंधार असला तरी ती स्वतः जायची. कंटाळा करताना मी तिला कधी बघितलं नाही. तिचं अख्ख जीवनच संघर्षमय होतं. तिनं आपल्या कुटुंबासाठी अतोनात कष्ट घेतले! कुठलंही काम ती अगदी समर्पित भावनेनं करताना दिसायची! अगदी पहाटेपासून तिच्या कामांना सुरुवात व्हायची. सगळं घर ती एकटीच सारवून लख्ख करायची. देवावर तिची अपार श्रद्धा होती. मला वाटतं ती आठवड्यातून तब्बल चार उपवास करायची. कधी तिला बरं वाटत नसलं तरी आपल्या भावना व्यक्त करायला ती टाळायची. तिनं कधीही कोणाबद्दल वाईटसाईट किंवा उलटसुलट बोललेलं मी ऐकलं नाही. तिच्या ते स्वभावातच नव्हतं म्हणा!
          माझी बदली नेमकी यवतमाळ येथे झाल्यावर सर्वात आधी आम्ही सर्वजण अपूर्वा, रुधीर लहान असल्यामुळे व्हेस्पा गाडीवर बसून नांदुऱ्याला गेलो. त्यावेळी जिजाबाईच्या डोळ्यात दिसलेला असीम आनंद मला आजही आठवतो. तेव्हा मला तिनं दिलेला कानमंत्र चांगलाच लक्षात आहे... "तुम्ही आपल्या गावापासून, घरापासून इकडे दूर आल्यामुळे नेहमी सावध रहा. एकमेकांशी भांडू नका. सुखाने संसार करा!" एवढं बोलल्यानंतर चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवून मनापासून आशीर्वाद देणं हे फक्त आणि फक्त जिजाबाईच करू शकते हा अनुभव तिच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनाच आला असणार यात शंका नाही! त्यानंतर तिचं आमच्या यवतमाळच्या घरी येणं, आमचं तिच्याकडे जाणं हे नित्याचंच झालं होतं. नांदुऱ्याच्या घरी गेल्यावर जिजाबाई आमच्यासाठी मनापासून स्वयंपाक करायची... तिथं तिच्या हातची चवदार पुरणपोळी ठरलेलीच असायची! मग चार वर्षानंतर माझी नागपूरला बदली झाल्याची बातमी तिला समजली. आम्ही यवतमाळ सोडून जाणार हे समजताच ती राजूसोबत आमच्याकडे आली होती. भेटल्यावर नेहमी हसतमुख दिसणारी जिजाबाई त्या दिवशी खूप उदास होती! तिला सारखं भरून येत होतं! आम्हालाही यवतमाळ सोडून जाणं, जिजाबाईपासून दूर जाणं खूप जड गेलं... सगळ्यांनाच गहिवरून आलं होतं! त्या दिवशी तिला सोडून जाताना बघितलेला तिचा रडवेला, उदास चेहरा काळजात घर करून गेला होता. यवतमाळमध्ये व्यतित केलेल्या चार वर्षात तिनं मुलांना, आम्हा सर्वानाच खूप माया लावली होती! नंतर नागपूरला पोहचल्यावर सुद्धा तिचा चेहरा डोळ्यासमोर येत होता.
       मात्र काही महिन्यातच आमच्या भेटीचा योग जुळून येणार होता. राजूचं लग्न ठरल्याचं कळलं. मला वाटतं राजूच्या लग्न सोहळ्याचा समारंभ आर्णी येथे पार पडला होता. त्यावेळी नागपूरहून आम्ही दोघं आणि बरीच मंडळी आली होती. सगळ्यांच्याच जिजाबाईसोबत भेटीगाठी झाल्या. नातवाचं लग्न असल्यामुळे ती खूप आनंदात होती. राजूला अगदी तान्हा बाळ असल्यापासून जिजाबाईनं सांभाळलं होतं. हे काम खचितच सोपं नव्हतं. त्यावेळी मनावर दगड ठेवून तिनं आपलं कर्तव्य पार पाडलं होतं! त्यानंतर अकोला येथे वसंतराव पाटील सर आणि वंदूताई यांनी केलेल्या संस्कारामुळे राजूच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली हे सर्वांना माहितीच आहे. परमेश्वरानं दिलेल्या एकाच आयुष्यात जिजाबाईनं, आपण कल्पना करू शकणार नाही एवढ्या विविध भूमिका पार पाडल्या. त्यामुळे तिचं अवघे जीवन आजच्या नवीन पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे असं म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही!
     2004 साली पुण्यात बदली झाल्याने म्हणा अथवा रुधीर, अपूर्वाच्या शिक्षणामुळे आम्ही इकडेच स्थिरावलो. मग क्वचितच यवतमाळला जाणं व्हायचं. त्यामुळे जिजाबाईची भेटही दुर्मीळ झाली! इच्छा असूनही काही ना काही कारणामुळे जाणं होत नव्हतं.
      2019 साल उजाडलं! यवतमाळ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असल्यामुळे मी तिथं सहभागी होण्यासाठी पुण्याहून यवतमाळला राजूकडे गेलो. त्यानंतर तेथे भेटलेले पाटील सर आणि गजानन मस्के सर यांच्यासोबत साहित्य संमेलनाचा आनंद लुटता आला. राजू, शिल्पा यांनी केलेल्या आदरातिथ्याने आणि पाहुणचाराने अक्षरश: भारावून गेलो. मग दुसऱ्या दिवशी पाटील सरांच्या सानिध्यातच नांदुऱ्याला जाण्याचा योग जुळून आला. त्यावेळी तिथं पोहचल्यावर जिजाबाईला बघितलं आणि मन उचंबळून आलं. मनात अनेक शंका-कुशंका गर्दी करू लागल्या! ती खूप थकली असल्याचं जाणवलं! शरीरानं थकली असली तरी ती मनानं खचली नव्हती हे विशेष... कारण तिच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य अजूनही कायम होतं. मग बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या... वय झालं तरी तिची स्मरणशक्ती कमालीची होती. ऐकायला सुद्धा त्रास होत नव्हता. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यावेळी सगळे खळखळून हसलो, जिजाबाईला असं हसताना पाहून खूप बरं वाटलं!
         आणि आता अगदी काल परवाचीच गोष्ट असल्यासारखी घटना... राजूशी तसं नेहमीच मोबाईलवर बोलणं व्हायचं. मात्र त्या दिवशी आलेल्या फोनमुळे वेगळीच बातमी ऐकायला मिळाली...  जिजाबाई पलंगावरून पडली असल्याचं कळलं. ते ऐकून मन अस्वस्थ झालं,  क्षणार्धात तिचा चेहरा नजरेसमोर तरळला! मग लगेच ठरवलं, आपण आता जाऊन जिजाबाईला भेटायलाच हवं. त्यासाठी नागपूर गाठलं. मग दुसऱ्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव असल्यामुळे ऑक्टोबर 2022च्या शेवटच्या आठवड्यात धाकटा भाऊ सुनिलसोबत गुरुकुंज मोझरी येथे पोहचलो. तिथं दरवर्षीप्रमाणे चार वाजून अठ्ठावन मिनिटांनी तीन साडेतीन लाख लोकांच्या समुदायाच्या उपस्थितीत अगदी शिस्तीत मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला! त्यानंतर त्या अलोट गर्दीतून वाट काढत सुनिलसह रात्री नागपूरला पोहचलो... मग भल्या सकाळीच एसटीनं यवतमाळसाठी रवाना झालो.
       यवतमाळला राजू वाट पाहतच होता. त्याच्यासह आर्णी रोडवर असलेल्या त्याच्या घरी गेलो... सोबतच जेवण आटोपलं आणि मग ठरल्याप्रमाणे राजू आणि मी नांदुऱ्याच्या रस्त्याला लागलो. तिथं पोहचल्यावर अचानक आम्हाला पाहून जिजाबाईला भरून आलं. तिची ती असहाय अवस्था बघून मलाही गलबलून आलं! पलंगावर पडलेल्या जिजाबाईची अगतिकता खरंच पाहवत नव्हती. नकळत डोळ्यात अश्रू तरळले! ते प्रयत्नपूर्वक थांबवत तिच्या शेजारी पलंगावर बसलो आणि तिचा हात आपल्या हातात घेत गुरुकुंज मोझरीला जाऊन आल्याचं सांगितलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर तिची अपार श्रद्धा होती. त्यामुळे तिला खूप बरं वाटलं. मग तिनं आमच्या दादांची आठवण काढली आणि थरथरत म्हणाली, "तुझे दादा महाराजांचे भजन ऐकायला मला न्यायचे रे विनू... खूप भक्ती होती त्यायची महाराजांवर... तू पण भक्ती सोडू नको!"
नंतर तिनं तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे चेहऱ्यावरून हात फिरवत सगळ्यांची विचारपूसही केली आणि म्हणाली, "येत जा मा असाच भेटायले... लई बरं वाटते!"
त्यावेळी मला ठाऊक नव्हतं, ही आपली जिजाबाईसोबतची शेवटचीच भेट ठरणार म्हणून..! गेल्या 20 तारखेला (20 मे ) अनिकेतचा नांदुऱ्याहून फोन आला, सकाळी आठ साडेआठ वाजले असणार त्यावेळी... तो म्हणाला, आजी गेली!  कानावर विश्वास बसला नाही. म्हणून मी त्याला विचारलं, आपली जिजाबाई गेली का? तर तो हो म्हणाला आणि त्यानं सांगितलं, संध्याकाळी चार वाजता नेणार आहेत!
पुण्यात असल्यामुळे तीव्र इच्छा असूनही नांदुऱ्याला जाता आलं नाही ही रुखरुख आयुष्यभर सलत राहील! नागपूरला असलेल्या सुनिलला फोन करून दुःखद बातमी कळवली. त्यानं लगेच नांदुऱ्याला जाण्याची तयारी दर्शवली आणि त्यानं तिथं वेळेच्या आत जाऊन जिजाबाईचं अंतिम दर्शन घेतलं! आता राहिल्या केवळ जिजाबाईच्या आठवणी... त्या आठवणींना उजाळा देण्याचं काम आपण करू शकतो आणि त्यापासून प्रेरणा घेऊन काहीतरी चांगलं कार्य आपल्या हातून घडवू शकतो एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.
         या भूतलावरील सर्वांना जिजाबाईसारखी प्रेमळ, मायाळू आई मिळो अशी त्या आकाशातल्या परमेश्वराला प्रार्थना करूया... आणि भेटूया येत्या 2 तारखेला जिजाबाईच्या चौदावीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने... आपल्या जिजाबाईला भावपूर्ण आदरांजली वाहूया!
सर्वांना नमस्कार!!🙏🙏

विनोद श्रा. पंचभाई, पुणे
मो.9923797725

सुगावा... मनोगत

 


सुगावा... The Clue!
                         मनोगत
        सर्वसामान्य माणसाला रोजच कुठल्या ना कुठल्या बऱ्यावाईट  प्रसंगांना सामोरं जावं लागतं. कधी ते प्रसंग खाजगी आयुष्यातले असतात तर कधी ते नोकरी करत असताना किंवा कामधंदा करताना येत असतात. सार्वजनिक ठिकाणी वावरताना एखादा असा प्रसंग आयुष्यात येतो, ज्याने मती गुंग होऊन जाते! मग नकळतपणे तो त्यात गुंतत जातो. अगदी अनपेक्षितपणे त्याच्या डोळ्यासमोर एखादी अशी घटना घडते, ज्यात तो बेमालूमपणे गुरफटला जातो आणि होत्याचं नव्हतं होण्याची पाळीही त्याच्यावर येऊन ठेपते. कितीही प्रयत्न केले तरी त्यातून त्याची सुटका होत नाही. मग नाईलाजाने या सामान्य माणसावर कमालीचा मनस्ताप सहन करण्याची वेळ येते!
        आणि नंतर सुरू होतो पोलिसांच्या तपासाचा ससेमिरा, कोर्टाच्या तारखांच्या फेऱ्या! काहीही संबंध नसताना विनाकारण आलेल्या अशा प्रसंगाला सामोरं जाताना त्याच्यासोबतच त्याच्या कुटुंबीयांना देखील त्रास सहन करावा लागतो. एखाद्या वेळी कुठल्यातरी अज्ञात वाहनाची धडक लागून या सामान्य माणसाचा जीव सुद्धा संकटात सापडतो. तर त्याची कुठलीही चूक नसताना, सर्व नियम धाब्यावर बसवून अचानक त्याच्या अंगावर आलेल्या एखाद्या वाहनामुळे कायमचे अपंगत्वही येऊ शकते.
         आपण कितीही सावध असलो तरी अशाप्रकारचे प्रसंग आपल्या डोळ्यासमोर घडत असतात आणि 'हुश्श ... थोडक्यात बचावलो' असं म्हणण्याची पाळीही आपल्यावर येते! अशावेळी अज्ञात गुन्हेगार राजरोसपणे मोकाट फिरत असतात. मात्र सर्वसामान्य माणसं सतत तणावात जगत असतात. कधीकधी सामान्य माणसाला अशाप्रकारच्या आकस्मिक प्रसंगाची जबर किंमतही चुकवावी लागते!
        "सुगावा... The Clue!" या माझ्या दुसऱ्या रहस्यमय कादंबरीत रोजचे जीवन जगत असताना आयुष्यात येणाऱ्या अनपेक्षित प्रसंगांना सामान्य माणसाला कुठल्या दिव्यांना सामोरं जावं लागतं? अचानक उदभवलेल्या संकटांना तो कशाप्रकारे तोंड देतो? त्यातून सुटका करून घेण्यासाठी त्याची जीवघेणी धडपड यशस्वी होते का? अज्ञात आरोपीचा माग घेण्यासाठी आणि त्याच्यापर्यंत पोहचण्यासाठी पोलीस कशाप्रकारे शक्कल लढवतात? त्यांना कोणाची मदत होते? ते काय काय योजना आखतात? शेवटी गुन्हेगार हुलकावणी देण्यात यशस्वी होतात की ते पोलिसांच्या जाळ्यात अडकतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे, रहस्यांचा उलगडा सहज सोप्या संवादशैलीत या कादंबरीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गुन्हेगारांच्या निरनिराळ्या क्लृप्त्या, त्यावर मात करणारे पोलिसांचे अफलातून तपासकार्य, त्यातून निर्माण होणारी कमालीची गुंतागुंत आणि मग हळूहळू उलगडत जाणारे अचंबित करणारे रहस्य हे सगळं वाचताना उत्कंठा शिगेला पोहचल्याशिवाय राहत नाही. या कादंबरीतील क्षणाक्षणाला धक्के देणारे अनेक प्रसंग वाचकांना खिळवून ठेवण्यास भाग पाडतात. त्यामुळे 'सुगावा... The Clue!' निश्चितच वाचकप्रिय ठरणार याची खात्री आहे.
          यापूर्वी प्रकाशित झालेल्या 'हॉटेल हवेली' या माझ्या पहिल्याच रहस्यमय कादंबरीला रसिक वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. त्यासाठी वाचकांना मनापासून धन्यवाद देतो. तसेच याठिकाणी मी नम्रतापूर्वक नमूद करतो, विख्यात साहित्यिक आणि संशोधक, प्राकृत भाषा अभ्यासक संजय सोनवणी यांनी 'हॉटेल हवेली'साठी लिहिलेल्या प्रस्तावनेमुळेच मला 'सुगावा... The Clue' ही रहस्यमय कादंबरी लिहिण्याची प्रेरणा मिळाली आणि मग झपाटल्यासारखा लिहित गेलो.
           नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या काळात विविध मागण्यासाठी  निघालेले मोर्चे, मग जोरदार घोषणाबाजी सुरू असतानाच अचानक अनियंत्रित झालेल्या एका मोर्चावर होणारा पोलिसांचा लाठीमार आणि त्या मोर्चाच्या धामधूमीचा फायदा घेऊन गुन्हेगारांनी बेमालुमपणे  पाडलेला भीषण खून! त्यानंतर घडणारे निरपराध माणसांचे अपहरण नाट्य, अनेक वेगवान घटना, गुन्हेगांराच्या कल्पना करू शकणार नाही अशा नवनवीन नामी युक्त्या मग त्यावर कुरघोडी करण्यासाठी पोलिसांच्या अफलातून तपासाचा थरार आणि उत्कंठा शिगेला पोहचल्यावर शेवटी उलगडत जाणारे खुनाचे रहस्य अशी एकंदरीत पार्श्वभूमी या कादंबरीला लाभली आहे.
          आता या शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या 'सुगावा... The Clue' कादंबरीला पुण्यातील 'प्राजक्त प्रकाशन' या नामवंत संस्थेचे प्रकाशक जालिंदर चांदगुडे यांनी अत्यंत आकर्षक रीतीने पुस्तकरूप बहाल केले आहे.  'सुगावा... The Clue!'साठी प्रसिद्ध चित्रकार संतोष घोंगडे यांनी साजेसे मुखपृष्ठ रेखाटले आहे. तसेच आर्टिस्ट विलास भंडारी यांनी या कादंबरीसाठी सुंदर लेआऊट करून दिले आहे. या सर्वांचेच मन:पूर्वक आभार !

...विनोद श्रा. पंचभाई
भ्र. क्र.९९२३७९७७२५

        

वाईट सवय...

 

                वाईट सवय... (बोधकथा)

         पिंटू तसा बालपणापासूनच खोडकर होता. अभ्यासात मात्र तो हुशार होता. थोडा मोठा झाल्यावर पिंटूला जिथं तिथं थुंकण्याची वाईट सवय जडली. घरात असला तरी तो वॉश बेसिनमध्ये थुंकायचा नाही... तर तो घराच्या खिडकीतून, दरवाजातून कुठंही थुंकायचा. त्यामुळे पिंटूच्या या वाईट सवयीवरून त्याचे आईबाबा त्याला सतत ओरडायचे. तरी सुद्धा त्याची ही खोड काही केल्या जात नव्हती.
कुणाला अशी शंका यायची, हा पिंटू गुटखा, सुपारी तर खात नसेल! मात्र तसलं काही नव्हतं. त्याला कुठलंही व्यसन नव्हतं. का कुणास ठाऊक पण कुठंही थुंकण्याची वाईट सवय त्याला लागली होती.  रस्त्यानं येता - जाताना किंवा शाळेत वर्गातल्या खिडकीतून पिंटू थुंकला नाही असं कधीही घडलं नाही.
       एकदा पिंटूच्या शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होणार होती. त्यासाठी शाळेत वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे पथक आले होते. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली आणि शेवटी त्यांनी सार्वजनिक स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता या विषयावर भाषण दिले. त्यांनी बोलताना रस्त्यावर कचरा, घाण टाकणे, थुंकणे या विषयावरही माहिती दिली. ते म्हणाले, “आपल्यापैकी अनेकांना रस्त्यावर केरकचरा टाकण्याची किंवा थुंकण्याची सवय असते."
डॉक्टरांचे बोलणे ऐकून सगळेच पिंटूकडे बघत खो खो हसू लागले. तेव्हा त्याला मेल्याहून मेल्यासारखं झालं.
नंतर सर्वांना शांत करत डॉक्टर म्हणाले, “अनेकांना सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची वाईट सवय असते. रस्त्यावर थुंकल्यामुळे परिसरात घाण, दुर्गंधी पसरते. थुंकीवर माशा बसून रोगराई पसरण्याचा धोका संभवतो. पावसाळ्याच्या दिवसांत थुंकीच्या घाणीपासून साथीचे रोग पसरण्याचाही धोका असतो. तेव्हा तुम्ही प्रत्येकाने आपल्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे."
डॉक्टर पुढे म्हणाले, “आता तर आपल्या राज्यात शासनाने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार कुणी रस्त्यावर थुंकताना आढळल्यास एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षाही निश्चित केली आहे.''
डॉक्टरांचे भाषण ऐकून पिंटूला थुंकणे किती घातक असते ते समजले. मात्र त्याची थुंकण्याची सवय सुटता सुटत नव्हती. त्यामुळे तो खूप उदास राहू लागला.
         दिवस असेच जात होते. बघता बघता
दसऱ्याचा सण आला. पिंटूच्या बाबांनी  त्याच्यासाठी भारीमधला ड्रेस आणला होता. त्यामुळे साहजिकच पिंटू खूप खूश होता. मग
नवीन ड्रेस घालून सायंकाळी तो बाबांच्या दुचाकीवरून बाबांच्या मित्रांकडे सोने वाटायला निघाला. थोडं पुढे गेल्यावर चौकात वाहतूक खोळंबली होती. तसंच रस्त्यावरही लोकांची गर्दी जमली होती.
    पिंटूच्या बाबांनी  गाडी हळूहळू चालवत कसातरी रस्ता पार केला. पलीकडे गेल्यावर काही वेळाने सुरळीत वाहतूक सुरू असताना शेजारून एक पीएमटी बस गेली. बसच्या खिडकीत बसलेला पान खाणारा माणूस अचानक खिडकीतून बाहेर थुंकला. ती थुंकीची पिचकारी नेमकी पिंटूच्या अंगावर पडली आणि त्याच्या नव्याकोऱ्या कपड्यांची वाट लागली. पिंटू जोरात ओरडला. त्याच्या आवाजानं बाबा गडबडले आणि त्यांनी वेग कमी करत गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. तेव्हा कुठं काय घडलं हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी कपाळावर हात मारून घेतला! पिंटू तर रडायलाच लागला. दसरा साजरा करण्याचा त्याचा मूड गेला.
        त्यानंतर बाबांनी गाडी घराकडे वळवली. दोघंही घरी पोहोचले मात्र पिंटूचं रडणं थांबलं नव्हतं. त्याच्या आईनं त्याची समजूत घातली आणि त्याला कपडे बदलायला दिले. आता परत जाण्यात अर्थ नाही असा विचार करून पिंटूला जवळ घेऊन बाबा म्हणाले, “पिंटू, आता समजलं का सार्वजनिक स्वच्छतेचं महत्त्व? अरे, इतके दिवस आम्ही तुला सांगत तुला होतो. घराच्या खिडकीतून, दारातून  रस्त्यावर किंवा इकडे तिकडे थुंकू नकोस! तुझ्या थुंकण्यामुळे किती लोकांना त्रास झाला, किती लोक घरी भांडायला आले ? ते कशासाठी आता समजलं ना! थुंकीमुळे आज तुझे कपडे घाण झाले तर तुला रडायला आलं. तुझा मूड खराब झाला. आपल्यामुळे दुसऱ्यांना देखील त्रास होऊ शकतो हे कळलं ना तुला आता! "
      बाबांचं बोलणं ऐकून पिंटूचे डोळे उघडले. त्यानं खाली मान घातली. त्याला खूप वाईट वाटलं. त्या दिवसापासून पिंटूनं निर्धार केला... वाटेल तिथं, सार्वजनिक ठिकाणी अजिबात थुंकायचं नाही म्हणजे नाहीच!

विनोद श्रा. पंचभाई, पुणे
९९२३७९७७२५

Amazing video

 https://youtu.be/ra0EkbViWwo


नक्की बघा विस्मयकारक व्हिडिओ👆