Saturday, August 29, 2020

यांच्याकडे कोणी लक्ष देणार का??

 यांच्याकडे कोणी लक्ष देणार का??


"आजकल सब खामोश है कोई आवाज नही करता,
 शायद सच बोलकर कोई किसीको नाराज नही करता! "
 आज उद् भवलेली परिस्थिती याहून वेगळी नाही असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. कारण हातावर पोट असणाऱ्यांवर आज तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ आली आहे. कधी अर्धपोटी तर कधी उपाशी राहण्याची भयंकर वेळ येऊन ठेपली आहे! आज काम मिळण्याची मारामार असल्यानं, जे काय मिळालं ते काम मुकाटपणे करायचं आणि येणारा दिवस कसातरी ढकलायचा... जेवढी मजुरी मिळते ती काही न बोलता घ्यायची अन् निघायचं हेच आज मजुरांच्या नशिबी आलं आहे! कामाच्या ठिकाणी त्यांनी मिळणाऱ्या मजुरीवरून साधा 'ब्र' जरी काढला तरी मुकादमाचं वाक्य ठरलेलंच असते, "तुम्हारे जैसे हमको छप्पन मिलते है, काम नही करना है तो जा सकते हो!" 
एकंदरीतच पोटासाठी, आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांसाठी सगळं सहन करण्याचं त्यांच्या नशिबी आलं आहे. आज ही परिस्थिती यांच्यावर का आली?

  मार्च महिन्यात संपूर्ण देशभर लाॅकडाऊन सुरू झाल्यानं लहानमोठे हाॅटेल्स, मोठाले माॅल, विविध क्षेत्रातील कंपन्या, अनेक प्रकारच्या फॅक्टरीज् अचानक बंद पडल्या! त्यामुळे  या सर्वांशी संबंधित असणारे असंख्य मजूर एका झटक्यात बेरोजगार झालेत. काही कंपन्यांनी त्यांना एक दोन महिन्याचा पगार दिलाही असेल मात्र मोठ्या प्रमाणावर असलेले बांधकाम क्षेत्रातील मजूर, रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानकांवर फिरून गरजेच्या वस्तू विकणारे, शाळा - महाविद्यालयांबाहेर बसून किरकोळ चीजवस्तू विकणारे, मंदिराबाहेर हार, फुलं तसंच पूजेच्या वस्तूंची विक्री करणारे असे सगळेच हवालदिल झाले आहेत! असं काहीतरी अचानक घडेल याची कोणीही कल्पना केली नसणार. कोरोनाच्या या अनोख्या संकटामुळे कित्येक जण 'डिप्रेशन'मध्येही गेल्याची अनेक उदाहरणं आहेत! 

अशावेळी हातावर पोट असणाऱ्यांना हातपाय गाळून बसण्यापेक्षा काहीतरी करण्यावाचून गत्यंतरच नव्हतं. त्यामुळे मिळेल ते काम करायला त्यांचा आटापिटा सुरू झाला! त्याचा परिणाम असा झाला... आज अनेक शहरातील मजूर अड्डयावर कधी कुणी पाहिली नसेल एवढी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमू लागली आहे. त्यावेळी 'सोशल डिस्टन्स' बाबतचे नियम पाळणं त्यांच्या ध्यानीमनीही नसतं. त्याबद्दल मजूर अड्ड्यावर जमलेल्या मजुरांना हटकले असता त्यांच्या तोंडी 'कोरोना गेला खड्ड्यात' हीच भावना व्यक्त होताना दिसून येते. पोटाची भूक त्यांना स्वस्थ बसू देत नाही! कारण त्यांच्यावर त्यांचं अख्खं कुटुंब अवलंबून असतं. स्वतः मात्र अर्धपोटी राहून आपल्या कुटुंबासाठी, त्यांची पोटं भरण्यासाठी त्यांची सतत तारेवरची कसरत सुरू असते. त्याकरिता कसंही करून मजुरी मिळावी म्हणून हे मजूर भल्या सकाळीच मजूरअड्डा गाठताना दिसतात. त्यात मग बंद पडलेल्या हाॅटेलमध्ये कधीकाळी काम करणारी तरणीताठी पोरं,  विविध क्षेत्रातील कामावरून काढून टाकण्यात आलेले दुर्दैवी मजूर, जीवनोपयोगी  किरकोळ वस्तू रोज विकून आपला चरितार्थ चालवणारे असे असंख्य नवशिके मजूर या मजूरअड्ड्यावर गर्दी करताना दिसतात. रोज सगळ्यांनाच काम मिळतं असं मात्र होत नाही. तिथंही जीवघेणी स्पर्धा असतेच असते! त्यावेळी नेमका याच गोष्टींचा फायदा तिथले बेरकी मुकादम घेताना दिसतात. कमी मोबदला देऊनही त्यांना मजूर सहज उपलब्ध होत असल्यानं या मुकादमांची तिथं मनमानी सुरू असते. त्यांच्यावर कुणाचाच अंकुश नसतो. त्यामुळे कमजोर लोकांना आपल्या दबावाखाली ठेवण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा दुर्दैवानं आजही आपल्या समाजात बघायला मिळत आहे!

अचानक उद् भवलेल्या या कोरोना संकटामुळे अनेक शहरांसोबतच ग्रामीण भागातही बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. बेरोजगारी, कोरोनाची टांगती तलवार असतानाच शाळा - महाविद्यालये बंद असल्यानं विद्यार्थ्यांना सध्या आॅन लाईन शिक्षण देणं सुरू आहे. त्यामुळेच जवळपास प्रत्येक पालकाजवळ अँड्राॅईड मोबाईल असणं आवश्यक झालं आहे. मात्र आर्थिक दृष्टीनं निम्न स्तरांवरील सामान्य पालकांजवळ तसंच ग्रामीण भागातील बऱ्याच जणांकडे अशाप्रकारचा अँड्राॅईड मोबाईल उपलब्ध नसतो! आधीच घरात खायची मारामार मग तिथं आपल्या मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी अशाप्रकारच्या मोबाईलची सुविधा उपलब्ध करून देणं शक्य तरी कसं होणार?   ग्रामीण भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असल्यानं त्यांच्या मुलांचा बराचसा वेळ शेतातच जात असतो. त्यातून कसातरी वेळ काढून शाळेत हजेरी लावण्यासाठी त्यांना कसरत करावी लागते! मात्र आताच्या आँनलाईन शिक्षणामुळे त्यांच्यासमोर वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. त्यासाठी विशिष्ट वेळ काढून शिक्षणावर आपलं लक्ष केंद्रित करणं त्यांना शक्य होत नाही. त्याचप्रमाणे अतिदुर्गम भागातील खेडेगावातील विद्यार्थी  शिक्षणाच्या ओढीमुळे कित्येक किलोमीटर पायपीट करत मोठ्या गावातील किंवा तालुक्याच्या शाळांमध्ये हजेरी लावताना दिसायचे. मात्र आता या कोरोना महामारीच्या संकटामुळे शाळा , महाविद्यालये ओस पडली आहेत. त्यामुळे अशा अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांचं भवितव्य सुद्धा अंधकारमय झालं आहे! समजा या भागातील विद्यार्थ्यांना अँड्राॅईड मोबाईल कोणी देऊ केला तरी इंटरनेटची सुविधा मिळेलच याची खात्री नसते. अशावेळी त्यांच्या या गंभीर समस्यांचं निराकरण करण्यासाठी पाच वर्षातून एकदा प्रामाणिकपणे हजेरी लावणारे पुढारी मदतीला धावून जाणार का? हा मोठा यक्षप्रश्न आहे.

महामारीच्या अभूतपूर्व संकटामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व चित्रपटगृह, नाट्यगृह, विविध कार्यक्रमांचे आयोजन करणारे सभागृह, मंगल कार्यालयं अजूनही बंद आहेत. त्यावर सर्वस्वी अवलंबून असणारे अनेक पडद्यामागचे कलाकार, गेटकिपर, सफाई कामगार, सुरक्षा कर्मचारी, किरकोळ खाद्यपदार्थ विकणारे असे कितीतरी आजही बेरोजगार आहेत. तसंच गावागावात जाऊन लोकनाट्य, तमाशा सादर करून गुजराण करणारे, रस्त्यावर डोंबाऱ्याचा खेळ करणारे किंवा पोतराज यांचं भवितव्यही दावणीला लागलं आहे! त्यांच्यावर आज कशाप्रकारचा प्रसंग ओढवला असणार याची कल्पना न केलेलीच बरी! त्यावर आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. आजकाल आपली बहुतेक प्रसारमाध्यमं 'हाय प्रोफाईल' नेते, अभिनेते यांच्याकडेच जास्त लक्ष देण्यात मश्गूल असतात. त्यात त्यांचंही काही चुकत नाही म्हणा... त्यांना महत्त्वाच्या 'ब्रेकिंग न्यूज' गोळा करण्यासाठी किती श्रम पडत असणार ना! मग उपरोक्त नमूद केलेल्या वंचित, पीडित लोकांकडे त्यांचंच काय कुणाचंही कसं काय लक्ष जाणार? आज आपण बघतो, नेहमी रस्त्याच्या कडेला पाणीपुरी, भेळपुरी इत्यादी विकणारे तसंच पानटपरी चालवणारे आज पदपथावर किरकोळ भाजीपाला किंवा  मक्याची कणसं विकताना आढळतात. त्यांनाही शेवटी पोटासाठी काहीतरी करावंच लागणार ना! मात्र पदपथावर दुकान लावणं हे नियमबाह्य असल्यानं त्यांचं साहित्य उचलून नेण्यासाठी महानगरपालिकेची गाडी कधी येईल याचा काही नेम नसतो. अशा तणावाच्या परिस्थितीत जीव मुठीत धरून चार पैसे कमावण्यासाठी ते रोजच आटापिटा करताना दिसतात. शेवटी पोटाची भूक कोणालाच स्वस्थ बसू देत नाही हेच खरं!
"भूख है मजहब इस दुनिया का और हकीकत कोई नही!
बचके निकल जा इस बस्तीसे करता मोहब्बत कोई नही!!"

विनोद श्रा. पंचभाई, वारजे, पुणे 
भ्र.क्र. ९९२३७९७७२५

Tuesday, August 18, 2020

जागतिक लेफ्ट हँन्डर्स डे!

 आज १३ आॅगस्ट !

जागतिक लेफ्ट हँन्डर्स डे!

त्या निमित्ताने लिहिलेला हा लेख जरूर वाचा 

आणि आपल्या बहुमोल प्रतिक्रिया द्या! 😊 


डावखुऱ्यांच्या वेदना कुणाला कळणार का?


प्रसंग पहिला ...

         मोठ्या उत्साहानं सहलीला निघालेली बस नियोजित ठिकाण आल्यावर एका झाडाखाली थांबली. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक बसमधून उतरले. आता सगळ्यांनाच कडकडून भूक लागली होती! त्यामुळे शिक्षकांच्या सूचनेनुसार सर्व विद्यार्थी गोलाकार बसले. मग त्यांनी आपापले डबे उघडले. शिक्षकही त्यांच्या सोबतच बसले. सर्वांनी जेवायला सुरूवात केली. अचानक शिक्षकांचं लक्ष अविकडे गेलं अन् ते त्याच्यावर ओरडलेच, "अरे अवि तू डाव्या हाताने का जेवतोस? असा कसा रे तू? तुझ्या आईबाबांनी घरी काही शिकवलं नाही का?"

इतर विद्यार्थी त्याच्याकडे उपहासानं बघत होते. बिचारा अवि काही न बोलता खाली मान घालून बसला होता! मान वर करून शिक्षकांकडे बघण्याचं धैर्य त्याच्यात नव्हतं!


प्रसंग दुसरा ...

          मंदिरातील आरती नुकतीच संपली होती. मंत्रपुष्पांजली झाल्यावर पूजाऱ्यांनी प्रसाद वाटप करण्यास सुरूवात केली. भाविक मंडळी दर्शन घेण्यासाठी रांगेत उभी होती. काही वेळातच प्रसाद वाटप करत पुजारी विक्कीपर्यंत येऊन पोहचले. विक्कीनं आपला डावा हात पुढं केला. तोच पुजारी त्याच्यावर खेकसले, "अरे प्रसाद उजव्या हातात घ्यायचा असतो, एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का? आईबाबांनी काही संस्कार केले की नाही का तुझ्यावर?"

विक्की जन्मतःच डावखुरा असल्यामुळे त्यानं प्रसाद घेण्यासाठी नैसर्गिकरित्या आपला डावा हात पुढं केला यात त्याचा काय दोष? 

           आपल्याकडे डाव्या हातानं काम करणाऱ्या मुलांना पालक नेहमीच टोकताना दिसतात. शाळेतही अशा मुलांना शिक्षकांची बोलणी खावी लागते. इतर विद्यार्थी मित्रांचे टोमणे सुद्धा त्यांना सहन करावे लागतात! आपल्या समाजात काही ठिकाणी अजूनही डाव्या हातानं काम करणं हे अशुभ मानलं जातं! तसंच बऱ्याच वेळा डावखुऱ्या विद्यार्थ्यांना पालकांच्या किंवा शिक्षकांच्या दबावामुळे नाईलाजानं उजव्या हातानं काम करावं लागतं. पूर्वीच्या काळी डावखुऱ्या लोकांना ते सामान्य नाहीत म्हणून हिणवलं जायचं, कमी लेखलं जायचं. दुर्दैवानं याची सुरूवात शाळेपासूनच व्हायची! 

            लहान असताना जेव्हा आपण हातात खडू घेऊन पाटीवर रेषा ओढायला सुरूवात करतो तेव्हाच स्पष्ट होतं, आपण डावखुरे होणार की उजवे होणार! आपला कुठलातरी एक हात जास्त प्रभावीपणे काम करतो हेही लक्षात येतं. डावखुरं असणे किंवा उजवं असणे हे आपल्या जनुकांशी संबंधित आहे पण नेमक्या कुठल्या जनुकांवर ते अवलंबून आहे हे मात्र अद्यापही समजलेलं नाही. डावखुरं असण्याचा मेंदूशी काय संबंध आहे यावर संशोधन सुरू आहे आणि त्याबाबत बरेच वादही सुरू असल्याचं आपल्या वाचनात येतं. मेंदूचा उजवा भाग शरीराची डावी बाजू नियंत्रित करतो तर डावा भाग आपल्या शरीराची उजवी बाजू नियंत्रित करतो. म्हणजेच डावखुरं असणं म्हणजे मेंदूच्या रचनेवर मोठा परिणाम करणारं असतं! युनिव्हर्सिटी काॅलेज आॅफ लंडन येथील मानसशास्त्रज्ञ ख्रिस मॅकमॅनस यांनी 'राईट हँन्ड, लेफ्ट हँन्ड' हे पुस्तक लिहलं आहे. त्यात ते म्हणतात... "ज्या पद्धतीने डावखुऱ्या व्यक्तीच्या मेंदूची मांडणी असते, ती फारच वैविध्यपूर्ण असते. माझं वैयक्तिक मत असं आहे की, डावखुरे लोक जास्त बुध्दिमान असतात आणि त्यांच्यात उणिवांना तोंड देण्याचं सामर्थ्य जास्त असते. जर तुम्ही डावखुरे असाल तर तुमच्या मेंदूच्या रचनेत किंचित बदल असल्याचं तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे इतरांकडे नसणारी कौशल्यं तुमच्याकडे असतात!"    

               डावखुऱ्या लोकांना समाजात वावरताना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं! डावखुरा माणूस डावीकडून उजवीकडे कागदावर शाईच्या पेनानं लिहिताना त्याच्या बोटांना शाई तर लागतेच शिवाय लिहिलेलं पुसलं जाण्याचीही शक्यता असते. तसंच 'शेक हँन्ड' करताना डावखुऱ्या माणसाचा डावा हातच नैसर्गिकरित्या पुढं जातो. त्यावेळी उजव्या माणसानं त्याचा उजवा हात पुढं केलेला असतो. महत्त्वाचं म्हणजे पोलीस किंवा सैन्यदलात कार्य करणाऱ्यांना डाव्या  हातानं सॅल्यूट करता येत नाही, तो नियमानुसार उजव्या हातानंच करावा लागतो! त्यासाठी डावखुऱ्यांना मात्र उजव्या हातानंच सारखा सराव करावा लागतो. शेवटी नोकरी करायची म्हटल्यावर असा सराव करणं हेही ओघानं आलंच! दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, आपल्या नेहमीच्या वापरातील बऱ्याचशा वस्तू उजव्या हाताचा विचार करूनच तयार केलेल्या असतात. जसे-- कॅमेऱ्याचं क्लिक बटन, काॅम्प्युटरचा माऊस, शिलाई मशीन, बाईकची किक, दरवाज्याचं हँन्डल, गिटारच्या तारा या आणि अशाप्रकारच्या कितीतरी गोष्टी फक्त उजव्यांच्या सोयीनुसार निर्माण केलेल्या असतात. त्यामुळे डावखुऱ्यांना वेळोवेळी गैरसोयीचा सामना करावा लागतो!

              डावखुऱ्या लोकांबाबत पूर्वीपासून चालत आलेल्या काही अंधश्रध्दा पण आहेत. एस्किमो लोकांमध्ये असा समज आहे की डावखुरा माणूस हा मंत्र,तंत्र जाणणारा किंवा जादू करणारा असतो. पूर्वीच्या काळी जपानी माणसाला लग्नानंतर जर त्याची बायको डावखुरी आहे असं समजलं तर तो तिला चक्क घटस्फोट द्यायचा. त्याकाळात 'डावखुरा माणूस नरकात जातो' अशीही समजूत प्रचलित होती! आपल्याकडे अजूनही डाव्या हातानं ठराविक कामं करणं अशुभ मानलं जातं. डाव्या हातानं पैसे देणं किंवा घेणं, डाव्या हातानं प्रसाद घेणं किंवा वाटप करणं निषिद्ध मानलं जातं! अजूनही काही लोक आपलं मूल डावखुरं आहे हे लक्षात येताच त्याच्या डाव्या हाताला चटके देणं किंवा त्याचा डावा हात बांधून ठेवणं असे प्रकार करताना दिसतात. असले अजब प्रकार करणं चुकीचं तर आहेच शिवाय त्या मुलावर अन्याय करण्यासारखं आहे. कारण अशा वागणूकीमुळे डावखुऱ्या मुलांची नैसर्गिक वाढ खुंटू शकते पर्यायानं त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात मोठा अडथळा येऊ शकतो!

            याउलट आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात डावखुरी माणसं इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आणि सरस काम करू शकतात. त्यामुळे ते भविष्यात टिकाव धरू शकतील असे मत तज्ज्ञांकडून वर्तवले जात आहे. एका जागतिक सर्वेक्षणात असं आढळून आलं आहे की, डावखुरे लोक बुध्दिमान, संवेदनशील अन् सर्जनशील असतात! त्यामुळे हल्लीच्या अर्थव्यवस्थेनुसार उत्पादकांनी मनावर घेतलं तर डावखुऱ्या लोकांना उपयुक्त वस्तूंची मोठी बाजारपेठ ते उपलब्ध करून देऊ शकतात. कारण आजघडीला संपूर्ण जगात सुमारे बारा टक्क्यांपेक्षा जास्त लोक हे डावखुरे आहेत. एकट्या ब्रिटनमध्ये जवळपास सत्तर लाख लोक डावखुरे आहेत. तेथे त्यांच्या सोयीसाठी बऱ्याच उपयोगी वस्तू बाजारात उपलब्ध होत आहेत. लंडनमध्ये खास डावखुऱ्या लोकांसाठी 'एनीथिंग लेफ्ट हँन्डेड' नावाचं दुकान कार्यरत आहे. तेथे काम करणारे कर्मचारी सुद्धा डावखुरेच आहेत. त्यामुळे त्यांना येणाऱ्या ग्राहकांशी आपुलकीनं संवाद साधता येतो. कात्रीपासून ते काॅम्प्युटर पर्यंत सर्व उपयुक्त वस्तू डावखुऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. अशाप्रकारची दुकानं जगात सर्वत्र उघडणे अपेक्षित आहे!

          उपलब्ध आकडेवारीवरून संपूर्ण जगात साधारणपणे जवळजवळ दहा ते बारा टक्के लोक हे डावखुरे आहेत. पुरूषांमध्ये हे प्रमाण बारा टक्क्यांपेक्षा जास्त असून स्त्रियांमध्ये ते नऊ ते दहा टक्के इतके आहे. उजव्यांचं प्रमाण अधिक असलेल्या या दुनियेत डावखुऱ्या लोकांनी स्वत:चा एक क्लब

 स्थापन केला आहे. संपूर्ण जगात त्याच्या शाखा अस्तित्वात आहेत. १३ आँगस्ट हा दिवस संपूर्ण जगभरात 'लेफ्ट हँन्डर्स डे' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा १३ आँगस्ट १९७६ रोजी अमेरिकतील कँपबेल कंपनीच्या वतीने साजरा करण्यात आला. नंतर १९९० साली इंग्लंडमध्ये 'लेफ्ट हँन्डर्स क्लब'ची स्थापना झाली. तर भारतात औरंगाबाद येथील संदीप विश्नोई यांनी 'इंडियन लेफ्ट हँन्डर्स क्लब'ची स्थापना केली. उजव्या हातानं काम करणं कधीही सोयीचं असतं असा समज आपल्या समाजात अगदी पूर्वापार चालत आलेला आहे. हाच समज दूर करण्यासाठी आणि समाजातील डावखुऱ्या लोकांबाबत जागरूकता आणण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा करण्यात येतो. खरंतर डावखुरे असल्याचे फायदे किंवा तोटे याबाबत जाणीव व्हावी हीच या दिवसामागची भूमिका असते. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या बारा टक्के लोक डावखुरे असल्याने ते डाव्या हातानंच आपली कामे करत असतात. तसंच काही डावखुरे त्यांच्या उजव्या हातानं सुद्धा तेवढ्याच क्षमतेनं काम करू शकतात. हेच डावखुरे लोक आपल्या कुशलतेमुळे आणि काही विशिष्ट गुणांमुळे आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतात हेही वेळोवेळी सिद्ध झालं आहे. अगदी प्राचीन इतिहासापासून त्याची अनेक उदाहरणं देता येतील. अख्खं जग जिंकायला निघालेला सिकंदर उर्फ अलेक्झांडर तसंच फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट हे डावखुरे होते. त्याचप्रमाणे महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन अन् ज्यानं जगभरातील रसिकांना आपल्या अफलातून अभिनयानं हसवता हसवता रडवलं असा श्रेष्ठ विनोद सम्राट म्हणून गणलेला अभिनेता चार्ली चॅप्लिन हेही डावखुरे असल्याची नोंद आहे. खेळांची मैदानं गाजवलेले गॅरी सोबर्स, अँलन बाॅर्डर, ब्रायन लारा तसंच आपल्याकडील सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, युवराज सिंग इत्यादी डावखुऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रात इतिहास रचलेला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जाॅर्ज बुश, बिल क्लिंटन, बराक ओबामा त्याचप्रमाणे आपल्याकडील  महात्मा गांधी, रतन टाटा, अमिताभ बच्चन या सर्व डावखुऱ्यांचं महान कार्य आपण जाणतोच! अतिशय महत्त्वाचं म्हणजे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा डावखुरेच आहेत. हे सर्व डावखुरे त्यांच्या अतुलनीय कार्यामुळे उजव्यांपेक्षाही बऱ्याच अंशी निश्चितच उजवे आहेत असंच म्हणावं लागेल.

         त्यामुळे १३ आँगस्टला कोणी डावखुरा माणूस भेटला तर त्याच्याशी डाव्या हातानंच 'शेक हँन्ड' करून 'लेफ्ट हँन्डर्स डे'च्या निमित्तानं त्याचं अभिनंदन करायला उजव्यांनी विसरू नये हीच रास्त अपेक्षा! !


                     आपलाच एक डावखुरा मित्र ...

                    विनोद श्रा. पंचभाई, वारजे, पुणे.

तुम्हाला नकार देणे जमते का?

 तुम्हाला नकार देणे जमते का?


"माझं थोडं ऐकता का श्यामराव? मला थोडे पैसे पाहिजे होते. आपल्या कंपनीच्या फंडातून मिळाले की लगेच परत करणार तुम्हाला! बघा नाही म्हणू नका, एक महत्त्वाचं काम निघालं वेळेवर म्हणून गरज भासली पैशांची!"

"तुमचं सगळं बरोबर आहे विलासराव पण काय आहे, आता या एक तारखेलाच मुलीच्या शिकवणीचे पैसे भरले मी. नाहीतर नक्की दिले असते. प्लीज समजून घ्या हं!"

  अशाप्रकारचे संवाद दैनंदिन जीवनात आपल्या कानावर नेहमी पडत असतात. वेळप्रसंगी पैशाची गरज प्रत्येकालाच भासत असते हे वास्तव आहे! तरीही काही लोकांना मात्र कुठल्या ना कुठल्या कारणासाठी सतत पैसे मागण्याची जणू सवयच जडलेली असते. अशावेळी त्याची शहानिशा न करता आपण बिनधोकपणे पैशाची मदत केली तर ते परत मिळवणे सगळ्यांनाच जमते असं नाही! उदाहरणार्थ आपण एखाद्या गरजवंत मित्राला मदत म्हणून लगेच पैसे काढून दिले आणि त्यानं संध्याकाळी बीयरबारमध्ये जाऊन उडवले तर त्या मदतीला काय अर्थ? तेव्हा अशाप्रकारच्या महाभागांना नकार देणं जमलं पाहिजे!


          आपल्या शेजारचे किंवा परिचितांपैकी कोणी दवाखान्यात रूग्णशय्येवर असल्याचं कळलं अन् त्याला त्यावेळी रक्ताची गरज आहे तर अशावेळी मात्र आडेवेढे न घेता, वेळ न दवडता आपण स्वतःहून पुढाकार घेऊन मदत करायलाच हवी! तसंच शेजारी राहणारे काही कामानिमित्त परगावी गेले असतील आणि नेमकं त्याचवेळी अचानक त्यांच्या घरच्या आजी- आजोबांनी तातडीच्या मदतीसाठी बोलावलं असेल तर त्यांना नकार देणं कृतघ्नपणाचं ठरेल! अशावेळी वेळात वेळ काढून सर्व प्रकारची मदत करणं हे आपलं कर्तव्यच आहे आणि या गोष्टीचं आपल्याला भानही ठेवायला हवं. काही काही प्रसंग असे असतात की त्याप्रसंगी आपल्याला नकार देणं अगदी जिवावर येतं. तरीही मनाविरूद्ध काही घडत असल्यास त्यावेळी प्रयत्नपूर्वक नकार देणं पण जमलं पाहिजे. आता एक हा प्रसंग बघा... रुपालीचं लग्न ठरणार होतं. तिच्या घरचे सगळेच आनंदात होते. कारण मनासारखं जवळचं स्थळ सांगून आलं होतं. एकुलता एक देखणा मुलगा. मोठ्या पगाराची नोकरी. घरची परिस्थितीही उत्तम! एवढं सगळं व्यवस्थित असूनही रूपाली मात्र प्रचंड तणावात होती! का तर तिला नेमकं कारण माहिती होतं, मुलगा व्यसनी होता! अशावेळी रूपालीनं संकोच न करता घरातील आई, बाबा, भाऊ, आजी, आजोबांसमोर आपलं मन मोकळं करून स्पष्ट नकार कळवणं आवश्यक ठरतं! लग्नानंतर मुलगा सुधारणार अशा खोट्या आशा बाळगणं इथं  मूर्खपणाचं ठरतं!


            कधीकधी आपण आपल्या अगदी जवळच्या मित्राला कुठल्यातरी कार्यक्रमाला सोबत जाण्याबाबत, त्याला वाईट वाटू नये म्हणून नाईलाजानं शब्द देऊन बसतो. मग जेव्हा त्याच्यासोबत त्या संबंधित कार्यक्रमाला जाण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपल्या घरगुती अडचणीमुळे किंवा अन्य कारणांमुळे जाणं शक्य होत नाही. त्यावेळी मित्राला नकार कळवणं आपल्याला जिवावर येतं! सरळ नकार देणं जमत नसल्यानं तेव्हा मित्राचा आलेला फोन न उचलणं किंवा स्वतःचा फोन बंद करून ठेवणं असे प्रकार घडतात. मग आपसात गैरसमज वाढत जातात. तेव्हा असे प्रकार टाळण्यासाठी स्वतःहूनच फोन करून नकार कळवणं हे कधीही चांगलं!


           एक महत्त्वाचा मुद्दा असा की, ऊठसूट अगदी किरकोळ कारणासाठी लगेच नकार देणंही योग्य नाही. समजा तुम्ही तुमच्या मित्र परिवारातले किंवा नातेवाईक मंडळीत लोकप्रिय व्यक्ती आहात, तुमचा सहवास त्यांना हवाहवासा वाटतो. तेव्हा अशावेळी एखाद्या कार्यक्रमासाठी तुमचा नकार त्यांच्यासाठी भ्रमनिरास होण्यास कारणीभूत ठरू शकतो! याप्रसंगी थोडं सामंजस्य दाखवून आपल्या माणसांसाठी होकार देणंच श्रेयस्कर! तसंच समजा तुमचं समाजात बऱ्यापैकी वजन आहे आणि एखाद्या कार्यक्रमासाठी तुम्हाला प्रमुख पाहुणे किंवा अध्यक्ष म्हणून आमंत्रित केलंय. तशाप्रकारच्या पत्रिका छापून वाटपही करण्यात आलं आहे. तेव्हा मात्र त्या कार्यक्रमाला न जाणं किंवा वेळेवर नकार कळवणं कृतघ्नपणाचं ठरणार याची जाणीव असायला हवी!


         आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला दैनंदिन जीवनात बरेच चांगले वाईट अनुभव येत असतात. कधीकधी कुठल्या तरी वस्तूची खरेदी करताना फसवणूकही होते. कारण काय तर आपण त्या वस्तूंच्या मोहात अडकतो. दुकानदार सुद्धा त्या विशिष्ट वस्तूंचे अवास्तव वर्णन करण्यात पटाईत असतात. त्यांना त्यांचा माल विकायचा असतो. मग एकदा का आपण त्या वस्तूंच्या मोहात अडकलो की काही केल्या आपल्या तोंडून 'आता घेऊ शकत नाही' असा नकार तर निघत नाहीच शिवाय 'आज नको नंतर बघतो' असंही त्यावेळी बोलणं जमत नाही! अशाप्रकारचे अनुभव इतरांकडून आपल्याला  पदोपदी ऐकायला मिळतात. एवढंच काय यापुढचं पाऊल म्हणजे आपण दारात येणाऱ्या विक्रेत्याला किंवा फेरीवाल्याला स्पष्ट नकार न देता काहीतरी किरकोळ वस्तू खरेदी करतोच! नंतर मात्र ती वस्तू खराब निघाली की त्या विक्रेत्याच्या नावानं मग बोटं मोडत बसतो. कधीकधी काही किरकोळ विक्रेते ( फेरीवाले ) त्यांचा माल खपवण्यासाठी सतत मागे लागतात. तेव्हा त्यांना स्पष्ट नकार देणं अवघड होऊन जातं. अशावेळी थोडं कठोर होऊन खंबीरपणे त्याला स्पष्ट शब्दात 'नाही' किंवा 'नको' म्हणता आलं पाहिजे!


             काही प्रसंगी स्पष्ट नकार न दिल्यास आपल्यावर नामुष्कीही ओढवू शकते. आता हे एकच उदाहरण बघा... संदीप हा धडाडीचा युवक त्याच्या कामात निष्णात आणि प्रामाणिक असल्यानं त्याच्या कंपनीत नेमून दिलेलं काम तो मन लावून करायचा. वेळेच्या आधीच आपलं टार्गेट पूर्ण करायचा. मग आपल्या इतर सहकाऱ्यांनाही मदत करायचा. नेमक्या याच अतिकामसू वृत्तीमुळे त्याला काही ठराविक मित्र आपलं पेंडींग काम सोपवू लागले. संदीपच्या चांगूलपणाचा फायदा घेऊ लागले. एकदा कामावर असताना त्याला अचानक नातेवाईकाचा फोन आला... कुणाचा तरी अपघात झाला होता! संदीपला तातडीनं निघणं आवश्यक होतं पण नेहमीप्रमाणे त्यानं आपल्या एका सहकारी मित्राचं काम हाती घेतल्यानं त्यातच तो व्यग्र होता. त्यामुळे त्याला तिथून लवकर निघताही येत नव्हतं आणि आपल्या मित्राला कामही सोपवता येत नव्हतं. त्याची अवस्था 'इकडे आड तिकडे विहीर' अशी झाली होती..! अशाप्रसंगी तरी स्पष्ट नकार देता यायला हवा जेणेकरून नामुष्कीची अवस्था ओढवणार नाही! 


कधीकधी आपल्याला असेही अनुभव येतात ... एखाद्या मित्राला अथवा नातेवाईकास आपण मोठ्या विश्वासानं मदत मागतो. मात्र त्यावेळी तो लवकर होकार तर देत नाहीच अन् स्पष्ट नकार सुद्धा त्याच्या तोंडून बाहेर पडत नाही. तो नुसता मूग गिळून मख्खासारखा आपल्याकडे पाहत असतो! कधी कुणावर कुठल्या प्रकारचा प्रसंग ओढवणार हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे 'वेळ' बघून किंवा परिस्थिती पाहून नकार देणंही जमलं पाहिजे. नाहीतर 'आ बैल मुझे मार!' अशाप्रकारचा बिकट प्रसंग अापल्यावर  ओढवण्यास वेळ लागणार नाही! बाकी सुज्ञास सांगणे न लगे!!


विनोद श्रा. पंचभाई, वारजे, पुणे

भ्र. क्र. ९९२३७९७७२५

Thursday, August 13, 2020

डावखुर्यांच्या वेदना कुणाला कळणार का?

 आज १३ आॅगस्ट !

जागतिक लेफ्ट हँन्डर्स डे!

त्या निमित्ताने लिहिलेला हा लेख जरूर वाचा 

आणि आपल्या बहुमोल प्रतिक्रिया द्या! 😊 


डावखुऱ्यांच्या वेदना कुणाला कळणार का?


प्रसंग पहिला ...

         मोठ्या उत्साहानं सहलीला निघालेली बस नियोजित ठिकाण आल्यावर एका झाडाखाली थांबली. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक बसमधून उतरले. आता सगळ्यांनाच कडकडून भूक लागली होती! त्यामुळे शिक्षकांच्या सूचनेनुसार सर्व विद्यार्थी गोलाकार बसले. मग त्यांनी आपापले डबे उघडले. शिक्षकही त्यांच्या सोबतच बसले. सर्वांनी जेवायला सुरूवात केली. अचानक शिक्षकांचं लक्ष अविकडे गेलं अन् ते त्याच्यावर ओरडलेच, "अरे अवि तू डाव्या हाताने का जेवतोस? असा कसा रे तू? तुझ्या आईबाबांनी घरी काही शिकवलं नाही का?"

इतर विद्यार्थी त्याच्याकडे उपहासानं बघत होते. बिचारा अवि काही न बोलता खाली मान घालून बसला होता! मान वर करून शिक्षकांकडे बघण्याचं धैर्य त्याच्यात नव्हतं!


प्रसंग दुसरा ...

          मंदिरातील आरती नुकतीच संपली होती. मंत्रपुष्पांजली झाल्यावर पूजाऱ्यांनी प्रसाद वाटप करण्यास सुरूवात केली. भाविक मंडळी दर्शन घेण्यासाठी रांगेत उभी होती. काही वेळातच प्रसाद वाटप करत पुजारी विक्कीपर्यंत येऊन पोहचले. विक्कीनं आपला डावा हात पुढं केला. तोच पुजारी त्याच्यावर खेकसले, "अरे प्रसाद उजव्या हातात घ्यायचा असतो, एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का? आईबाबांनी काही संस्कार केले की नाही का तुझ्यावर?"

विक्की जन्मतःच डावखुरा असल्यामुळे त्यानं प्रसाद घेण्यासाठी नैसर्गिकरित्या आपला डावा हात पुढं केला यात त्याचा काय दोष? 

           आपल्याकडे डाव्या हातानं काम करणाऱ्या मुलांना पालक नेहमीच टोकताना दिसतात. शाळेतही अशा मुलांना शिक्षकांची बोलणी खावी लागते. इतर विद्यार्थी मित्रांचे टोमणे सुद्धा त्यांना सहन करावे लागतात! आपल्या समाजात काही ठिकाणी अजूनही डाव्या हातानं काम करणं हे अशुभ मानलं जातं! तसंच बऱ्याच वेळा डावखुऱ्या विद्यार्थ्यांना पालकांच्या किंवा शिक्षकांच्या दबावामुळे नाईलाजानं उजव्या हातानं काम करावं लागतं. पूर्वीच्या काळी डावखुऱ्या लोकांना ते सामान्य नाहीत म्हणून हिणवलं जायचं, कमी लेखलं जायचं. दुर्दैवानं याची सुरूवात शाळेपासूनच व्हायची! 

            लहान असताना जेव्हा आपण हातात खडू घेऊन पाटीवर रेषा ओढायला सुरूवात करतो तेव्हाच स्पष्ट होतं, आपण डावखुरे होणार की उजवे होणार! आपला कुठलातरी एक हात जास्त प्रभावीपणे काम करतो हेही लक्षात येतं. डावखुरं असणे किंवा उजवं असणे हे आपल्या जनुकांशी संबंधित आहे पण नेमक्या कुठल्या जनुकांवर ते अवलंबून आहे हे मात्र अद्यापही समजलेलं नाही. डावखुरं असण्याचा मेंदूशी काय संबंध आहे यावर संशोधन सुरू आहे आणि त्याबाबत बरेच वादही सुरू असल्याचं आपल्या वाचनात येतं. मेंदूचा उजवा भाग शरीराची डावी बाजू नियंत्रित करतो तर डावा भाग आपल्या शरीराची उजवी बाजू नियंत्रित करतो. म्हणजेच डावखुरं असणं म्हणजे मेंदूच्या रचनेवर मोठा परिणाम करणारं असतं! युनिव्हर्सिटी काॅलेज आॅफ लंडन येथील मानसशास्त्रज्ञ ख्रिस मॅकमॅनस यांनी 'राईट हँन्ड, लेफ्ट हँन्ड' हे पुस्तक लिहलं आहे. त्यात ते म्हणतात... "ज्या पद्धतीने डावखुऱ्या व्यक्तीच्या मेंदूची मांडणी असते, ती फारच वैविध्यपूर्ण असते. माझं वैयक्तिक मत असं आहे की, डावखुरे लोक जास्त बुध्दिमान असतात आणि त्यांच्यात उणिवांना तोंड देण्याचं सामर्थ्य जास्त असते. जर तुम्ही डावखुरे असाल तर तुमच्या मेंदूच्या रचनेत किंचित बदल असल्याचं तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे इतरांकडे नसणारी कौशल्यं तुमच्याकडे असतात!"    

               डावखुऱ्या लोकांना समाजात वावरताना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं! डावखुरा माणूस डावीकडून उजवीकडे कागदावर शाईच्या पेनानं लिहिताना त्याच्या बोटांना शाई तर लागतेच शिवाय लिहिलेलं पुसलं जाण्याचीही शक्यता असते. तसंच 'शेक हँन्ड' करताना डावखुऱ्या माणसाचा डावा हातच नैसर्गिकरित्या पुढं जातो. त्यावेळी उजव्या माणसानं त्याचा उजवा हात पुढं केलेला असतो. महत्त्वाचं म्हणजे पोलीस किंवा सैन्यदलात कार्य करणाऱ्यांना डाव्या  हातानं सॅल्यूट करता येत नाही, तो नियमानुसार उजव्या हातानंच करावा लागतो! त्यासाठी डावखुऱ्यांना मात्र उजव्या हातानंच सारखा सराव करावा लागतो. शेवटी नोकरी करायची म्हटल्यावर असा सराव करणं हेही ओघानं आलंच! दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, आपल्या नेहमीच्या वापरातील बऱ्याचशा वस्तू उजव्या हाताचा विचार करूनच तयार केलेल्या असतात. जसे-- कॅमेऱ्याचं क्लिक बटन, काॅम्प्युटरचा माऊस, शिलाई मशीन, बाईकची किक, दरवाज्याचं हँन्डल, गिटारच्या तारा या आणि अशाप्रकारच्या कितीतरी गोष्टी फक्त उजव्यांच्या सोयीनुसार निर्माण केलेल्या असतात. त्यामुळे डावखुऱ्यांना वेळोवेळी गैरसोयीचा सामना करावा लागतो!

              डावखुऱ्या लोकांबाबत पूर्वीपासून चालत आलेल्या काही अंधश्रध्दा पण आहेत. एस्किमो लोकांमध्ये असा समज आहे की डावखुरा माणूस हा मंत्र,तंत्र जाणणारा किंवा जादू करणारा असतो. पूर्वीच्या काळी जपानी माणसाला लग्नानंतर जर त्याची बायको डावखुरी आहे असं समजलं तर तो तिला चक्क घटस्फोट द्यायचा. त्याकाळात 'डावखुरा माणूस नरकात जातो' अशीही समजूत प्रचलित होती! आपल्याकडे अजूनही डाव्या हातानं ठराविक कामं करणं अशुभ मानलं जातं. डाव्या हातानं पैसे देणं किंवा घेणं, डाव्या हातानं प्रसाद घेणं किंवा वाटप करणं निषिद्ध मानलं जातं! अजूनही काही लोक आपलं मूल डावखुरं आहे हे लक्षात येताच त्याच्या डाव्या हाताला चटके देणं किंवा त्याचा डावा हात बांधून ठेवणं असे प्रकार करताना दिसतात. असले अजब प्रकार करणं चुकीचं तर आहेच शिवाय त्या मुलावर अन्याय करण्यासारखं आहे. कारण अशा वागणूकीमुळे डावखुऱ्या मुलांची नैसर्गिक वाढ खुंटू शकते पर्यायानं त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात मोठा अडथळा येऊ शकतो!

            याउलट आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात डावखुरी माणसं इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आणि सरस काम करू शकतात. त्यामुळे ते भविष्यात टिकाव धरू शकतील असे मत तज्ज्ञांकडून वर्तवले जात आहे. एका जागतिक सर्वेक्षणात असं आढळून आलं आहे की, डावखुरे लोक बुध्दिमान, संवेदनशील अन् सर्जनशील असतात! त्यामुळे हल्लीच्या अर्थव्यवस्थेनुसार उत्पादकांनी मनावर घेतलं तर डावखुऱ्या लोकांना उपयुक्त वस्तूंची मोठी बाजारपेठ ते उपलब्ध करून देऊ शकतात. कारण आजघडीला संपूर्ण जगात सुमारे बारा टक्क्यांपेक्षा जास्त लोक हे डावखुरे आहेत. एकट्या ब्रिटनमध्ये जवळपास सत्तर लाख लोक डावखुरे आहेत. तेथे त्यांच्या सोयीसाठी बऱ्याच उपयोगी वस्तू बाजारात उपलब्ध होत आहेत. लंडनमध्ये खास डावखुऱ्या लोकांसाठी 'एनीथिंग लेफ्ट हँन्डेड' नावाचं दुकान कार्यरत आहे. तेथे काम करणारे कर्मचारी सुद्धा डावखुरेच आहेत. त्यामुळे त्यांना येणाऱ्या ग्राहकांशी आपुलकीनं संवाद साधता येतो. कात्रीपासून ते काॅम्प्युटर पर्यंत सर्व उपयुक्त वस्तू डावखुऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. अशाप्रकारची दुकानं जगात सर्वत्र उघडणे अपेक्षित आहे!

          उपलब्ध आकडेवारीवरून संपूर्ण जगात साधारणपणे जवळजवळ दहा ते बारा टक्के लोक हे डावखुरे आहेत. पुरूषांमध्ये हे प्रमाण बारा टक्क्यांपेक्षा जास्त असून स्त्रियांमध्ये ते नऊ ते दहा टक्के इतके आहे. उजव्यांचं प्रमाण अधिक असलेल्या या दुनियेत डावखुऱ्या लोकांनी स्वत:चा एक क्लब

 स्थापन केला आहे. संपूर्ण जगात त्याच्या शाखा अस्तित्वात आहेत. १३ आँगस्ट हा दिवस संपूर्ण जगभरात 'लेफ्ट हँन्डर्स डे' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा १३ आँगस्ट १९७६ रोजी अमेरिकतील कँपबेल कंपनीच्या वतीने साजरा करण्यात आला. नंतर १९९० साली इंग्लंडमध्ये 'लेफ्ट हँन्डर्स क्लब'ची स्थापना झाली. तर भारतात औरंगाबाद येथील संदीप विश्नोई यांनी 'इंडियन लेफ्ट हँन्डर्स क्लब'ची स्थापना केली. उजव्या हातानं काम करणं कधीही सोयीचं असतं असा समज आपल्या समाजात अगदी पूर्वापार चालत आलेला आहे. हाच समज दूर करण्यासाठी आणि समाजातील डावखुऱ्या लोकांबाबत जागरूकता आणण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा करण्यात येतो. खरंतर डावखुरे असल्याचे फायदे किंवा तोटे याबाबत जाणीव व्हावी हीच या दिवसामागची भूमिका असते. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या बारा टक्के लोक डावखुरे असल्याने ते डाव्या हातानंच आपली कामे करत असतात. तसंच काही डावखुरे त्यांच्या उजव्या हातानं सुद्धा तेवढ्याच क्षमतेनं काम करू शकतात. हेच डावखुरे लोक आपल्या कुशलतेमुळे आणि काही विशिष्ट गुणांमुळे आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतात हेही वेळोवेळी सिद्ध झालं आहे. अगदी प्राचीन इतिहासापासून त्याची अनेक उदाहरणं देता येतील. अख्खं जग जिंकायला निघालेला सिकंदर उर्फ अलेक्झांडर तसंच फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट हे डावखुरे होते. त्याचप्रमाणे महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन अन् ज्यानं जगभरातील रसिकांना आपल्या अफलातून अभिनयानं हसवता हसवता रडवलं असा श्रेष्ठ विनोद सम्राट म्हणून गणलेला अभिनेता चार्ली चॅप्लिन हेही डावखुरे असल्याची नोंद आहे. खेळांची मैदानं गाजवलेले गॅरी सोबर्स, अँलन बाॅर्डर, ब्रायन लारा तसंच आपल्याकडील सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, युवराज सिंग इत्यादी डावखुऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रात इतिहास रचलेला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जाॅर्ज बुश, बिल क्लिंटन, बराक ओबामा त्याचप्रमाणे आपल्याकडील  महात्मा गांधी, रतन टाटा, अमिताभ बच्चन या सर्व डावखुऱ्यांचं महान कार्य आपण जाणतोच! अतिशय महत्त्वाचं म्हणजे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा डावखुरेच आहेत. हे सर्व डावखुरे त्यांच्या अतुलनीय कार्यामुळे उजव्यांपेक्षाही बऱ्याच अंशी निश्चितच उजवे आहेत असंच म्हणावं लागेल.

         त्यामुळे १३ आँगस्टला कोणी डावखुरा माणूस भेटला तर त्याच्याशी डाव्या हातानंच 'शेक हँन्ड' करून 'लेफ्ट हँन्डर्स डे'च्या निमित्तानं त्याचं अभिनंदन करायला उजव्यांनी विसरू नये हीच रास्त अपेक्षा! !


                     आपलाच एक डावखुरा मित्र ...

                    विनोद श्रा. पंचभाई, वारजे, पुणे.