Sunday, December 15, 2019

आजचे शिक्षण... विद्यार्थी आणि पालकांची मानसिकता


आजचे शिक्षण ... विद्यार्थी आणि पालकांची मानसिकता

आपल्या मानसिक गुणांचे संवर्धन आणि आपणामधील दोषांचे उच्चाटन जे करते ते खरे शिक्षण! जगात सर्वत्र वावरण्यासाठी, स्वत:चा सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान म्हणजेच शिक्षण... यात शाळेतील मिळणाऱ्या शिक्षणासोबतच समाजातील निरनिराळ्या व्यक्त्तींकडून मिळणारे व्यवहार
ज्ञान सुद्धा अपेक्षित आहे.

एक काळ असा होता, म्हणजे इंग्रजांच्या काळात आपल्याकडे शाळा खूपच कमी प्रमाणात होत्या. आणि ज्या मिशनरी शाळा अस्तित्वात होत्या त्या सुद्धा इंग्रजी सत्तेच्या अंमलाखाली होत्या. कालांतराने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली. त्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. मात्र त्यासाठी त्यांना कमालीचा संघर्ष करावा लागला. अनेक हालअपेष्टांचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी मागासवर्गीयांसाठी सुद्धा विनामूल्य शाळा सुरू केल्या. अशाप्रकारे त्यांनी सर्वसामान्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. 

मग स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या देशातील अगदी खेड्यापाड्यातही मोफत शाळा सुरू झाल्या. त्यामुळे  सर्वांसाठीच शिक्षणाची दारे खुली झाली. आपले विद्यार्थी चांगले घडावे, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी त्याकाळातील शिक्षक प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे. शिक्षणाचा जणू ध्यास घेऊन ते आपले दायित्व उत्तमप्रकारे पार पाडायचे.शाळेतील
शिक्षणासोबतच मूल्यशिशिक्षणाचे धडेही विद्यार्थ्यांना द्यायचे. मात्र आज परिस्थिती अशी आहे की, आता शाळा, महाविद्यालयांची कमतरता नाही. अगदी छोट्या छोट्या शहरात सुद्धा इंग्रजीत शिक्षण देणाऱ्या काँन्व्हेन्टच्या सोयी झाल्या आहेत. पण आजचे शिक्षण तुलनेने खूपच महागडे झाले आहे. आज शाळा किंवा महाविद्यालयात प्रवेशासाठी अव्वाच्या सव्वा फीस आकारली जाते. त्याचप्रमाणे शाळेत शिकवायला शिक्षक असूनही वेगळे शिकवणी वर्ग लावणे जणू अत्यावश्यक झाले आहे!

आजच्या काळात आपल्याला सर्व शाखेतील तसेच संगणकीय, वैद्यकीय आणि इतर प्रकारचे शिक्षण घेणे सहजतेने उपलब्ध आहे . मात्र त्यासाठी आपली आर्थिक बाजू कशी आहे यावरच सगळं काही अवलंबून असते! साने गुरूजींसारखे मोफत शिक्षण देणारे आणि अत्यंत तळमळीने शिकवणारे आदर्श शिक्षक आज शोधूनही सापडणार नाही हीच आपल्या समाजाची खरी शोकांतिका आहे! त्यामुळे आर्थिक बाजूने कमजोर पण अतिशय तल्लख बुद्धीची हुशार मुले शिक्षणापासून वंचित राहणार की काय, अशी आजची दयनीय स्थिती आहे. 

तसेच आजचे शिक्षण हे पूर्ण पुस्तकी स्वरूपाचे आहे. पुस्तकातील ठराविक माहिती काही  ठराविक वेळेत पुन्हा उतरवून काढणे याला आजकाल परीक्षा म्हटले जाते. पुस्तकाच्या बाहेरील कुठल्याही गोष्टीचा विचार करण्याची मुभा आजकाल विद्यार्थ्याला आणि शिक्षकालाही नसते. त्यामुळे विद्यार्थ्याची स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वत:च्या बुद्धीचा वापर करण्याची संधी न मिळाल्याने विद्यार्थ्याची खरी गुणवत्ता कळू शकत नाही. आज पदव्यांना अवास्तव महत्व प्राप्त होवून त्या मिळवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरु असल्याचे जाणवते आहे. त्यामुळे वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच इतर शैक्षणिक क्षेत्रांमध्ये प्रवेश मिळवणे ही गोष्ट आज दुर्लभ झाली आहे. दिवसेंदिवस महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या पदवीधरांची संख्या वाढत आहे. परंतु त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा दर्जा मात्र  वेगाने घसरत आहे. आज वाढत्या औद्योगिकीकरणाच्या परिस्थितीत व्यवसायाभिमुख आणि प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षणाची खरी गरज आहे. परंतु ते न करता आज पुस्तकी शिक्षणावरच जास्त भर दिलेला आढळतो. व्यक्तीविकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवल्यास नृत्य, गायन, चित्रकला, शिल्पकला इत्यादी कलाविभागांचाही शिक्षणात अंतर्भाव करायला हवा असे वाटते. मात्र या विषयांकडे अजूनही आपल्याकडे उपेक्षेने पाहिल्या जाते हे दुर्दैवच! 
 आजच्या शिक्षणामुळे मनुष्य सुशिक्षित होतो, उच्च विद्याविभुषित होईल पण तो सुसंस्कृत होईलच असे नाही. वास्तविक पाहता  शिक्षण हा पवित्र संस्कार आहे. शिक्षण घेतलेली व्यक्ती सुसंस्कृत असायला हवी. दुर्दैवाने तसे चित्र आज फारसे दिसत नाही. उलट आजकाल शिक्षित माणसे आत्मकेंद्रित, स्वार्थी व संकुचित वृत्तीची झालेली आढळतात. हुंड्याची राक्षसी प्रथा सुशिक्षितांमध्येच आज मोठ्या प्रमाणात आढळून येते. अशिक्षित शेतकऱ्याच्या घरी त्याची पत्नी ही गृहलक्ष्मी मानली जाते. काही सुशिक्षितांमध्ये घरी येणारी नववधू ही केवळ माहेराहून खूप मोठा हुंडा घेवून येणारी व्यक्ती असेच समजले जाते. कोणताही मोठा त्याग करण्याची वेळ आली तर अडाणी, अशिक्षित माणूस मागचा- पुढचा विचार न करता कर्तव्य भावनेने त्याग करतो. उलट अशा प्रत्येक गोष्टीचे स्वार्थासाठी भांडवल करण्याची वृत्ती सुशिक्षितातच आढळते. आर्थिक गुन्हेगारीचे प्रकार व प्रमाण सुशिक्षितांतच अधिक आढळतात. आजच्या शिक्षणपद्धतीची ही शोकांतिकाच आहे!
 शिक्षणाच्या बाबतीत अशीच परिस्थिती राहिली तर उद्याच्या काळात आपल्याला भयंकर समस्यांचा सामना लागणार हेे निश्चित! कुणी सांगावे... येत्या काही वर्षात आपल्याकडे शाळा आणि महाविद्यालयांची संख्या कमी झालेली दिसू शकते. कारण आज परदेशात आहे  त्याप्रमाणे आपल्याकडे सुद्धा संगणकीय पद्धतीने घरी बसून शिक्षण घेणे सहज शक्य होऊ शकते. मात्र अशाप्रकारच्या शिक्षण पद्धतीत एक मोठा धोका संभवतो. तो हा की, ज्याची आर्थिक स्थिती हलाखीची आहे त्याला हे खर्चिक  शिक्षण घेणे परवडणार नाही! त्यामुळे गोरगरीबांची मुले, मग ती हुशार असली तरी अत्याधुनिक शिक्षणापासून भविष्यात दुर्दैवाने वंचित राहणार ही भीती आहेच! 
आजच्या अत्यंत खर्चिक शिक्षणामुळे आणि कधी नव्हे इतक्या प्रचंड स्पर्धेमुळे पालकसुद्धा द्विधा मन:स्थितीत असल्याचे आढळून येतात. त्यामुळे होतं काय की, ज्यांची मुलं अभ्यासात "सो सो" असतात असे पालक अतिशय तणावग्रस्त अवस्थेत वावरताना दिसतात. तरीही हल्ली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला बरे दिवस आल्याने एक आशेचा किरण आहे. मात्र त्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. शिक्षक वर्गात शिकवताना नेहमी म्हणतात, 'आजचे विद्यार्थीच उद्याचे राष्ट्र प्रणेते होऊ शकतात' .... पण त्यासाठी आवश्यकता आहे आपल्या शिक्षणपद्धतीत आमुलाग्र बदल करण्याचा! तसेच  देशातील निरनिराळ्या शाळा, महाविद्यालयात आकारण्यात येणारे अव्वाच्या सव्वा शिक्षण शुल्क कमी करून ते एकसमान पातळीवर कसं आणता येईल याचाही गंभीरपणे विचार करून त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची आज खरी गरज आहे! आपण आशा करूया ते दिवस लवकरच बघायला मिळतील ... वो सुबह जरूर आयेगी!!
विनोद श्रा. पंचभाई, वारजे, पुणे


स्वावलंबन आणि शिस्त

स्वावलंबन आणि शिस्त

 एक कथा आहे... एक मानवी शरीर असतं. त्या शरीराला डोळे, कान, हात, पाय असे विविध अवयव असतात. काही दिवसांनी या अवयवाचा अहंकार जागृत होतो. त्यांना वाटतं, आपल्यामुळेच हे अख्खं शरीर काम करतं. डोळ्यांना वाटतं, माझ्यामुळेच हे शरीर बघू शकतं. मी नसलो तर शरीर काम करणार नाही. कानांना वाटतं... माझ्यामुळेच शरीर ऐकू शकतं, मी ऐकणं बंद केलं तर शरीर काम करणार नाही. हातांना वाटतं, मीच सगळी कामे करतो. माझ्यामुळेच शरीराचं कामकाज चालतं. तसेच पायांना वाटतं, मीच सगळ्या शरीराचा भार सोसतो. त्यामुळे माझ्याशिवाय शरीर काम करूच शकत नाही. अहंकाराने पीडित झालेले सगळे अवयव काही दिवसातच आपापली कामे करणं बंद करतात. शरीर अगदी निपचित पडून राहतं. शेवटी शरीरात उरतो, तो फक्त प्राण ! मग प्राणालाही वाटतं, आता या निपचित पडलेल्या शरीरात आपला काय उपयोग? क्षणार्धात प्राण सुद्धा शरीराचा त्याग करून निघून जातो, आणि शरीर मृतप्राय होतं !

उपनिषदातील या कथेप्रमाणेच आपल्याला मिळालेले हे सुंदर जीवन जगण्यासाठी स्वावलंबन आणि शिस्त जणू 'प्राण'च आहेत. आपल्या रोजच्या जगण्यात स्वावलंबन नसेल तर आळसामुळे आपले जगणे निरस झाल्याशिवाय राहणार नाही. तसंच आपल्या वागण्यात शिस्त नसेल तर या सुंदर जीवनाचा आपण पुरेपूर आनंद उपभोगू शकणार नाही! त्यामुळे स्वावलंबन आणि शिस्तीला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे याबाबत कुणाचंही दुमत नसावं. 

आधीच्या काळात म्हणजे आधुनिक सुखसोयी सहजतेनं  उपलब्ध होण्यापूर्वी आपल्याकडे बहुतेकांचा स्वावलंबनाकडे ओढा होता. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपापलं काम अगदी मन लावून करायची. घरातील पाणी भरणं, दूध आणणं, बाजारातून रोज लागणाऱ्या गरजेच्या वस्तू आणणं आणि इतर किरकोळ कामे स्वतः करण्यावर भर होता. परंतु आज परिस्थिती अशी आहे की माणूस नको इतका परावलंबी झाला आहे. त्यामुळे पालकच आळसपणा करत असतील तर त्यांची मुलंसुद्धा परावलंबी होणारच! आजकाल घरोघरी आपण बघतो, मुलांना सगळं कसं हातात हवं असतं. घरून अगदी चार पावलांवर जायचं असलं तरी त्यांना गाडी हवी असते. काही घरात तर स्वतः पालकच आपल्या मुलांचे 'होमवर्क' करून देताना दिसतात. हे कुठंतरी थांबायला हवं. आजच्या पिढीला पालकांनी तसंच शिक्षकांनी स्वावलंबनाचे धडे देणं हे कधी नव्हे इतकं आज नितांत गरजेचं झालं आहे.

"आधी केले मग सांगितले!" किंवा "केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे! " या उक्तीनुसार पालकांनी स्वतःच्या कृतीतून स्वावलंबनाचा आदर्श आपल्या मुलांसमोर ठेवणं आजघडीला अत्यंत गरजेचं आहे. कारण मुलं ही अनुकरणप्रिय असतात. घरातील आईवडिल जसे वागतील,  त्याप्रमाणेच त्यांची मुलंही आचरण करणार हे निश्चित! आजची परिस्थिती जर बदलली नाही तर येणाऱ्या काळात आपल्याला खूप भयंकर समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे जास्त उशीर न करता आजच्या सुजाण पालकांनी आपल्या मुलांना स्वावलंबनाचं महत्त्व पटवून देणं, त्याचे फायदे त्यांच्या लक्षात आणून देणं हे आपलं आद्य कर्तव्यच समजायला हवं. तसंच त्याबाबतचं गांभीर्य ध्यानात घेऊन सतत पाठपुरावा करणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी पालकांनी घरी असताना मुलांसमोर तरी आपला मोबाईल प्रयत्नपूर्वक स्वतःपासून दूर ठेवणं गरजेचं आहे. तसेच मुलांसमोर जास्त वेळ टीव्ही न बघता एखादं पुस्तक किंवा मासिक, वर्तमानपत्र वाचनात वेळ घालवला तर मुलंही उत्सुकतेनं तुमचं अनुकरण करतील. यासाठी निश्चितच पालकांना आपला वेळ द्यावा लागणार आहे पण आपल्या मुलांकरीता तसा प्रयत्न करायला तरी हरकत नसावी!

एकदा का मुलांना स्वावलंबनाची सवय जडली की मग जगण्याला शिस्त लागायला वेळ लागणार नाही. पर्यायानं त्यांच्यात सकारात्मक वृत्ती वाढणार हे वेगळं सांगायला नको. त्यासाठी अगदी लहानपणापासूनच मुलांना योग्य वळण लावणं, निदान पालकांनी तसा प्रयत्न करणं आजच्या परिस्थितीत खूपच आवश्यक आहे. आपण बघतो, आजकाल घराघरात मुलं त्यांच्या अभ्यासासाठी रात्री उशिरापर्यंत जागतात आणि मग सकाळी उठायला त्यांना नऊ दहा वाजतात. उलट रात्री लवकर झोपून पहाटे उठणं कधीही चांगलं! कारण पहाटे केलेला अभ्यास जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहतो हा अनेकांचा अनुभव आहे. त्यासाठी मुलांना अगदी लहानपणीच सकाळी लवकर उठण्याची सवय ( शिस्त ) लावणं तसेच उठल्यावर स्वतःच्या पांघरूणाची घडी घालायला लावणं हे शिस्त लावण्याच्या दृष्टीने गरजेचं वाटतं. सुरूवातीला मुलांना थोडा कंटाळा येणार, नाही असं नाही मात्र हळूहळू मुलं मोठी झाली की त्यांच्या अंगी नीटनेटकेपणा आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपली अभ्यासाची पुस्तकं, वह्या आणि इतर वस्तू नीटनेटकेपणानं जागच्या जागी ठेवणं, सकाळी शाळा असल्यास स्वतःच तयारी करणं, शाळेतून परत आल्यावर दप्तर, बूट वगैरे ठराविक जागीच ठेवणं अशा चांगल्या सवयींची शिस्त मुलांना क्रमाक्रमाने तरी लागणारच.  शिवाय त्यांना सकाळचा नाश्ता अन् दूध पिणं झाल्यावर स्वतःची कपबशी विसळणं, एखादा हातरूमाल धुणं, थोडं वय वाढल्यावर कपड्यांची इस्त्री करणं ही कामे सुद्धा त्यांना त्यांच्या कलाने करायला लावली तर ती स्वावलंबी होणारच आणि मग त्यांना शिस्त लागायला वेळ लागणार नाही! 

आजकाल बर्याच घरात एकुलतं एकच मूल असल्याचं बघण्यात येतं. त्यामुळे त्याची आवडनिवडही प्रमाणाबाहेर जपली जाते. त्याचे नको तेवढे लाड पुरवले जातात. जेवण किंवा काही खाण्याच्या बाबतीत 'मूल म्हणेल तीच पूर्व दिशा' असंही घराघरात आढळून येतं. मग हतबल झालेले पालक मूल मोठं झाल्यावर सुद्धा, ते हट्टी झाल्यानं त्याचे लाड पुरवतात. अशाप्रकारे त्या लाडोबाचेच ऐकत गेल्यास पालकांची अवस्था दयनीय व्हायला वेळ लागत नाही. हे सर्व थांबावं असं वाटणं साहजिकच आहे. मात्र त्यासाठी पालक स्वतः सद् वर्तनी असणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच तो आपल्या मुलांना अगदी लहानपणापासून सुसंस्कारित होण्याच्या दृष्टीने त्यांना छोट्याछोट्या गोष्टीतून शिस्त लावू शकतो. चांगल्या सवयी लावू शकतो. 'आळस हा आपला पहिल्या नंबरचा शत्रु आहे' हे मुलांच्या मनावर बिंबवू शकतो!

अशाप्रकारे मुलांना त्यांच्या लहानपणापासूनच योग्य वळण लागले तर त्यांना एकप्रकारची शिस्तही आपसूकच लागणार. मुलं स्वावलंबी झाल्यामुळे त्यांच्यात सकारात्मकताही वाढेल. पर्यायाने त्यांच्यात आत्मविश्वास जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळेच त्यांना जगण्याची योग्य दिशा लाभणार हे नक्की! मग सर्व दृष्टीने 'मॅच्यूअर्ड' झालेली ही मुलं आपल्या आईवडिलांसोबतच इतर थोरामोठ्यांचाही आदर राखतील हे वेगळं सांगायला नको. त्यांना आपल्या गुरूजनांबद्दल, समाजाबद्दल तसेच आपल्या देशाबद्दल प्रेम, जिव्हाळा वृद्धिंगत होत राहणार हेही ओघाने आलंच. त्याकरीता पालकांना आवश्यकता आहे ... हे जीवन सुंदर बनवण्यासाठी मुलांना स्वावलंबन आणि शिस्त लावण्याची ... आणि त्यासाठी स्वतःपासून सुरूवात करण्याची!!

..... विनोद श्रा.पंचभाई, वारजे, पुणे
       भ्र.क्र.९९२३७९७७२५

Friday, December 13, 2019

आपण आरोग्याबाबत जागरूक आहोत का?


आपण आरोग्याबाबत जागरूक आहोत का? 


आपल्या देशात इंग्रजांच्या काळात एखाद्या भयंकर रोगाची साथ आली की लोक पटापट मृत्यूमुखी पडायचे! पुरेशा वैद्यकीय उपाययोजना नसल्यामुळे सर्वसामान्य जनता  अगदी हतबल व्हायची. त्याकाळात प्लेग रोगाची साथ आल्याने लोकांना जगण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला होता!  कारण त्यावेळी आजच्यासारख्या आरोग्यसेवा उपलब्ध नव्हत्या, आणि ज्या काही परंपरागत उपचार पध्दती होत्या, त्या सुद्धा तोकड्या पडायच्या. कधीकधी कुचकामी ठरायच्या. नाही म्हणायला इंग्रजी राजवटीच्या अमलाखालील मिशनरी दवाखाने अस्तित्वात होते पण त्यात जायला लोक घाबरायचे!

आज मात्र आपल्या देशात सर्वप्रकारच्या आरोग्यसेवा सहज उपलब्ध आहेत. साथीच्या रोगांवरही प्रभावी उपाययोजना आहेत. मात्र एखाद्या अगदी सामान्य व्यक्तीला कर्करोग, क्षयरोग, ह्रदयविकार यासारखा अतिशय गंभीर आजार अचानक उद् भवला तर तो हवालदिल होतो. कारण अशाप्रकारच्या आजारांवरची उपचारपद्धती अत्यंत खर्चिक आहे. त्यामुळे आधुनिक सोयीसुविधा असलेल्या खासगी रूग्णालयात उपचार घेण्यापासून सर्वसामान्य माणूस वंचित राहतो! काही सरकारी रूग्णालयात सुद्धा आधुनिक आरोग्यसेवा सुरू झाल्या आहेत. मात्र दुर्दैवाने या रूग्णालयातील बर्याचशा यंत्रसामग्री (उदाहरणार्थ एक्स रे, सिटीस्कॅन मशीन इत्यादी) बंद पडलेल्या असतात आणि ही वस्तुस्थिती आहे! तरीही आपल्या समाजात काही आदर्श डाॅक्टर असेही आहेत, जे अत्यल्प दरात आरोग्यसेवा देण्यासाठी तत्पर असतात. परंतु त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी नगण्य आहे!  

   मध्यंतरी पुण्यात एका कार्यक्रमात आरोग्य विषयक व्याख्यान ऐकण्याचा योग आला. तेथे एका तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी धक्कादायक माहिती दिली.... जागतिक आरोग्य संघटनेच्या ( World Health Organization ) एका सर्वेक्षणानुसार येत्या काही वर्षात भारतीय उपखंडात तब्बल ८३ टक्के लोकांना कर्करोगाची लागण झालेली असणार अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. एवढ्या झपाट्याने या कर्करोगाचा भस्मासूर आपल्या देशात पसरतो आहे. हा खरोखरच अतिशय काळजी करण्याचा विषय आहे. त्यावेळी त्यांनी याचे कारण स्पष्ट करताना म्हटले, 'भारतीय नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आमची आजची अत्याधुनिक जीवन शैली!' हे अगदी खरं आहे आणि या बदललेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आज सर्वत्र दिसून येत आहेत. 

आज आपण बघतो, आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांची जीवनशैली त्यांच्या कामाच्या वेळापत्रकानुसार सतत बदलत असते. एवढंच कशाला सामान्य लोक सुद्धा आजकाल रात्री उशिरापर्यंत जागणे, सकाळी उशिरा उठणे यातच धन्यता मानतात. त्यामुळे दिवसभराचे नियमित वेळापत्रक कोलमडून जाते. हे सर्व आजारी पडल्यावरच आपल्या लक्षात येते. मग डाॅक्टर औषध देताना बजावून सांगतातही... औषधं वेळच्या वेळी घ्या, भरपूर पाणी प्या. झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा पाळा. सकाळी लवकर उठून फिरायला जा. योगासने, व्यायाम करा वगैरे वगैरे! मात्र आपण याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. काही न खाता औषध घेणे, थोडं बरं वाटलं की परत औषध न घेणे म्हणजेच औषधाचा डोस पूर्ण न करणे, घरचे सात्विक जेवण न करता बाहेरचे अर्बटचर्बट खाणे असले प्रकार आपल्याला आजकाल घरोघरी बघायला मिळतात. अशा प्रकारामुळे परत उलटून ताप येतो! म्हणजेच काय आपणच आजाराला निमंत्रण देण्यासारखा हा प्रकार असतो. कधीकधी तर हा साधारण वाटणारा ताप डेंग्यू सारख्या एखाद्या गंभीर आजारात सुद्धा रूपांतरित होण्याचा धोका असतो. मग सुरू होते एक जीवघेणी धावपळ, आर्थिक अंदाजपत्रक कोलमडल्यामुळे त्यासाठी करावा लागणारा आटापिटा, आजारी माणसासोबतच स्वतःच्या तब्येतीची काळजी! या सर्व घाईगडबडीत होतं काय की घरातील कर्त्या माणसाला अतिशय खंबीर राहावं लागतं. स्वतःची मानसिक स्थिती, मनाचा तोल ढासळू न देता धैर्याने एकंदर परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्याला सज्ज राहावं लागतं. त्यात तो कमी पडला आणि समजा त्यावेळी दुर्दैवाने मृत्यू सारखी अप्रिय घटना घडली तर घरातील हा कर्ता माणूसच मानसिक रूग्ण होऊ शकतो! त्यासाठी आपण आपल्या आरोग्याबाबत सदैव जागरूक राहणे आज नितांत गरजेचं आहे.

आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवणे अनिवार्य झालेलं आहे. त्यासाठी पुरेसा व्यायाम करणे, जेवणाच्या वेळा पाळणे, बर्गर - पिझ्झा सारखे फास्ट फूड टाळणे, सकाळी लवकर उठणे, रात्री जागरण न करता वेळेवर झोपणे अत्यंत गरजेचं आहे. आजकाल आपण बघतो, व्यायामासाठी जिकडेतिकडे  'जिम' चे पेव फुटलेले आहे. अशा या जिममध्ये तुम्ही दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी जाऊ शकता. समजा सकाळी जमलं नाही तर सायंकाळी तेथे जायचा पर्याय खुला असतो. एका मर्यादेपर्यंत ते ठीक आहे पण आपल्या शरीरासाठी व्यायाम हा नियमितपणे करायला हवा आणि तोही आरोग्याच्या दृष्टीने सकाळच्या वेळी करणे जास्त हितावह आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र आजकाल जो तो आपल्या मनाला येईल तसेच वागताना दिसतो. आता हेच बघा ना, अनेक जण सकाळी लवकर उठून फिरायला जाताना दिसतात. मात्र बहुतेक लोक मोबाईल जवळ बाळगतात. कित्येक जण तर अगदी कानाला हेडफोन लावून फिरताना दिसतात. कमीत कमी फिरायला जाताना, व्यायाम करताना तरी मोबाईलचा मोह टाळायला हवा असं वाटतं, जेणेकरून त्यावेळी एकाग्रता साधणे शक्य होऊ शकते. कारण योगासने, प्राणायाम करताना एकाग्रता साधणे खूप महत्त्वाचे असते. त्याचा आपल्या आरोग्यावर अनुकूल परिणाम होण्यासही मदत होते. 

सतत वाढणारी दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची संख्या, निरनिराळ्या कारखान्यांचा धूर व दूषित पाणी तसेच प्लॅस्टिकचा बेसुमार वापर यामुळे वायुप्रदुषण व ध्वनिप्रदुषण कमालीचे वाढले आहे. त्याचप्रमाणे 'ग्लोबल वाॅर्मिंग'च्या धोक्याची टांगती तलवार आपल्या डोक्यावर आहेच! या कारणांमुळेही आज सर्वसामान्य माणसाची प्रतिकार शक्ती कमी कमी होत चालली आहे यात शंका नाही. म्हणूनच कधी नव्हे इतकी आज आपल्या आरोग्याची काळजी घेणे, त्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आजघडीला अतिशय गरजेचं आहे. कोणातरी तज्ज्ञाने म्हटलेच आहे..."आरोग्यदायी शरीरातच चांगले मन वास करते! " त्याप्रमाणे आपणही त्यादृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करूया आणि आपल्या आरोग्याबाबत सदैव जागरूक राहूया!!

आवो कदम से कदम मिलायेंगे सभी!
कल की राह ना देखो, आज और अभी!!

...विनोद श्रा. पंचभाई , पुणे
   भ्र.क्र. ९९२३७९७७२५




रामदासी संप्रदाय : एक अनुभूती


रामदासी संप्रदाय ... एक अनुभूती

आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. अनेक जातींचे, धर्मांचे लोक येथे गुण्यागोविदानं वावरताना दिसतात. तसेच विविध प्रकारचे संप्रदाय एकमेकांचा आदर राखून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आपापली मार्गक्रमणा करताना आढळतात. आपल्या देशात गणेशोत्सवासारखे हिंदूंचे सण साजरे करत असताना मुस्लिम धर्मबांधव तसेच इतर जातिधर्माचे लोक सुद्धा त्यात हिरीरीने भाग घेतात. त्याचप्रमाणे मुस्लिम धर्माची रमजान ईद असो किंवा ख्रिस्ती लोकांचा सण ख्रिसमस असो, त्याच असंख्य हिंदू बांधवही सम्मिलीत होताना दिसतात. निरनिराळ्या ईफ्तार पार्ट्यांच्या आयोजनाच्या वेळी अगदी सामान्य माणसापासून ते अनेक नेते अभिनेते त्यात हजेरी लावतात. त्यावेळी तेथे विविध जातीधर्माचे लोक आढळतात. या विविधतेचे कारण म्हणजे संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ ठरलेली आपली भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचे उत्तमप्रकारे जतन करण्यासाठी आपल्याला लाभलेली थोर संत परंपरा !   

'जगाच्या कल्याणा संताच्या विभूती। देह कष्टविती परोपकारे॥' तसेच  'आधी केले मग सांगितले' या उक्तीनुसार समर्थ श्री रामदास स्वामी यांचा रामदासी संप्रदाय आपल्याकडे सर्वश्रुत आहे. या संप्रदायाचे नेमके स्वरूप काय, संप्रदायाचे कार्य आणि वैशिष्ट्ये कोणती त्याचप्रमाणे संप्रदायाची पुढील यशस्वी वाटचाल कशी झाली याबाबतची इत्यंभूत माहिती "रामदासी संप्रदाय : एक अनुभूती " या पुस्तकात सविस्तरपणे दिलेली आहे. हे पुस्तक म्हणजे स.भ. डाॅ. भास्कर गिरिधारी यांनी मार्गदर्शित केलेला प्रबंध असून विलक्षण पुस्तकाचे लेखन डाॅ. कु. साधना दिगंबर कुलकर्णी यांनी केले आहे. 

या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिकेने समर्थ रामदास स्वामी यांच्या भव्यदिव्य कार्याची सामान्य वाचकांना खरी ओळख करून दिली आहे. तत्कालीन रूढींचा त्याग करून रामदासी संप्रदायाने उच्चवर्णीयांनाच नव्हे तर समाजातील निरनिराळ्या जातीतील स्त्री पुरूषांना सुद्धा प्रवेश दिला. इतकेच नव्हे तर या विशाल संप्रदायात मध्यमवर्गीय लोकांबरोबरच समाजातील श्रमिक व दलितांना सुद्धा समाविष्ट करून घेतले. ही एक सामाजिक क्रांती असल्याने रामदासी संप्रदायाने आपल्या समाजमनाची जागृतीच केली असं म्हणावं लागेल. पूर्वीच्या काळात अनेक संप्रदाय अस्तित्वात होते पण त्या त्या संप्रदायाची व्याप्ती मर्यादित होती असं आपल्या लक्षात येते. मात्र लेखिकेच्या संशोधनानुसार आजही जोमाने कार्य करणारे समर्थांचे एकूण ६२ मठ अस्तित्वात आहेत. तसेच अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवणार्या एकूण २० संस्था कार्यरत आहेत. या संस्थांच्या मार्फत सामाजिक कार्यासाठी आर्थिक पाठबळ सुद्धा पुरवले जाते. एकूणच विधायक, सेवाभावी कार्यासाठी मठ आणि संस्था सतत  कार्यरत असतात!

 ''रामदासी संप्रदाय : एक अनुभूती'' या पुस्तकात समर्थांच्या पूर्वी असलेल्या महाराष्ट्रात प्रचलित असलेले विविध संप्रदाय व त्यांचे स्वरूप, रामदासकालीन समाज जीवनाचे स्वरूप, रामदासी संप्रदायाची निर्मिती - प्रेरणा व स्वरूप, संप्रदायाची आचारसंहिता , तत्त्वज्ञान आणि साहित्यसंपदा, रामदासी संप्रदायकृत लोकशिक्षण व जनसंघटन, संप्रदायाची वाटचाल अशाप्रकारची सविस्तर  माहिती एकूण सहा प्रकरणात वाचायला मिळते. यात आपल्या देशाची समर्थकालीन धार्मिक स्थिती, महाराष्ट्राची सामाजिक आणि राजकीय स्थिती तसेच त्याकाळातील एकंदरीत आर्थिक स्थिती प्रकर्षाने नमूद केलेली आहे. तसेच समर्थ रामदास स्वामी यांच्या थोडक्यात चरित्राचाही वाचकांना लाभ घेता येऊ शकतो. 

' वारकरी पंथ हा एक वैदिक धर्मांतर्गत पंथ आहे. तो वैदिक धर्माविरुध्द बंड न पुकारता मूळच्या भागवत धर्माला उजाळा देण्यासाठी जन्माला आलेला आहे. या संप्रदायातील संतांनी वेदांचे प्रामाण्य मान्य केले आहे. केवळ वैदिक धर्माला उजाळा देणारा हा पंथ नव्हे तर श्रद्धा, निखळ नामस्मरण स्वरूप भक्ती या पायावर उभारलेला हा धर्म आहे' अशाप्रकारचे 'वारकरी संप्रदाया'बाबतचे विचार लेखिकेने या पुस्तकात मांडले आहे. वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक म्हणून भक्त पुंडलिक यांना ओळखले जाते. संत निवृत्तीनाथांनी आपल्या पुढील अभंगात पुंडलिकाच्या परंपरेचा उल्लेख करताना म्हटलं आहे...
"प्राणिया उध्दार सर्व हा श्रीधर। ब्रह्य हे साचार कृष्णमूर्ती।
ते रुप भीवरे पांडुरंग खरे। पुंडलिक सौरस पुरवीत.।
युगे अठ्ठावीस उभा ऋषिकेश। पुंडलिक सौरस पुरवीत।
निवृत्तीचे गुज पांडुरंग बीज। विश्वजन काज पुरे कोडे।। "

तसेच संत जनाबाईंनी आपल्या अभंगात पांडुरंगाचं वर्णन करताना म्हटलं आहे...
"भक्तामाजी अग्रगणी। पुंडलिक महामुनी.।
त्याच्या प्रसादे तरले। साधुसंत उध्दरिले.।।
तेचि प्रसाद आम्हासि। विटेवरी ऋषिकेशी।
पुंडलिक मायबाप.। दासी जनी वंदीपाय।।"

'ग्यानबा - तुकाराम' आणि 'जयजय राम कृष्ण हरी' हे वारकरी संप्रदायाच्या नित्य उपासनेचे मूलमंत्र आहेत. यात 'राम कृष्ण हरी' हा मंत्र विशेष आहे. या मंत्राचा अर्थ ...
राम म्हणजे ह्रदयात रमविणारा, कृष्ण आकर्षित करणारा व हरी म्हणजे ऐक्य रुप असणारा परमात्मा असा 'रामकृष्णहरी' 
अशाप्रकारे वारकरी संप्रदायाबद्दलची विस्तृत माहिती आणि वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान, आचारधर्म, सांप्रदायिक भूषणे,वाङमय, कीर्तन परंपरा इत्यादींचं वर्णन लेखिकेने या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसाठी उपलब्ध करून दिलं आहे. यात
ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज, संत नामदेव, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संत जनाबाई या संतांच्या अभंगातील ओव्यांचा आनंद वाचकांना मिळतो. तसेच दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, सिद्ध संप्रदाय, महानुभाव संप्रदायाची माहिती सुद्धा या अभूतपूर्व पुस्तकात विशद केलेली आहे.


श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या घराण्याचा पूर्व इतिहास, समर्थ चरित्राची रूपरेषा, समर्थांची बाललीला व शिक्षण, त्यांचे लग्न मंडपातून पलायन, समर्थांचे तीर्थाटन व समाज अवलोकन तसेच त्यांच्या दिव्य कार्याचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. समर्थांनी एकटयासाठी नव्हे तर देशासाठी व धर्मासाठी आपला देह झिजवला. तीर्थाटनाचा आनंद म्हणजे ठायी ठायी संत सज्जनांना भेटून कष्टाचा व श्रमाचा परिहार होतो, दृष्टीत व्यापकता येते. मेरुस्वामी यांनी समर्थांच्या तीर्थाटनातील प्रवासाचं वर्णन पुढील प्रमाणे केलं आहे....
"प्रारब्धयोगे वनांतर.। विरक्तीदशेने दुर्धर।
नाना स्थलांतरे दुस्तर.। संचरती तेथे.।।
विरक्तीचे आंगी वारे। उदास वृत्तीने वावरे।
वस्तीने गिरीकंदरे। वसविली बहू॥
नाही क्षुधेतृषेचे देही भान। नाही विश्रांती निद्रा जाणं
वायूसारिखे संचरण.। होत असे स्वइच्छा ॥
शरीर उपजीविकाजीवन। सदोदित रघुनंदन।
निजप्राणाचाही प्राणमय नित्य तृप्तीने असे.॥"

 समर्थांचे तीर्थाटन हे देशाटनच होय . यात्रेत आलेला अनुभव म्हणजे सर्व समाजाची अवस्था! समर्थांनी हर तीर्थाटन 'पायी तीर्थयात्रा मुखी हरीनाम' अशा केल्या नाहीत तर सर्व देवाच्या ठिकाणी माझा रामच आहे या हेतूने केल्या.
"कर्ता राम मी नव्हे आपण। ऐसे सगुण निवेदन.।
निर्गुणी ते अनन्य। निर्गुणचि होईजे.॥"

या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिकेने रामदासी संप्रदायात समर्थांनी जी चतु:सूत्री सांगितली आहे, ती म्हणजे हरिकथा निरुपण, राजकारण, सावधपणा, साक्षेप याबरोबरच संप्रदायाच्या शिकवणूकीतून प्रपंच व परमार्थ, अध्यात्म व व्यवहार, धर्मकारण व राजकारण या सर्व विषयांवर प्रकाश टाकला आहे. त्यामुळे हे पुस्तक ज्ञानप्रेमी उपासकांसाठी तसेच सर्व सामान्य वाचकांना सुद्धा अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. त्यादृष्टीने 'रामदासी संप्रदाय : एक अनुभूती' सगळ्यांकडेच संग्रही असावे असे वाटते. एवढे उपयोगी आणि सुंदर पुस्तक उपलब्ध करून दिल्याबद्दल लेखिकेचे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!!

.....विनोद श्रा. पंचभाई 










 




संताजी जगनाडे महाराज आणि अभंगगाथा



संताजी जगनाडे महाराज आणि अभंगगाथा 

आपल्या देशात असे अनेक दिव्य महापुरूष होऊन गेलेत, ज्यांनी अनमोल कर्तृत्वाने जगाच्या इतिहासात आपले नाव कोरलेले आहे. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राला थोर संत महंतांची परंपरा लाभली आहे. संताना जात नसते. संतांचे कार्य मानवजातीच्या कल्याणासाठीच असते. श्ज्ञानोबा माऊली, तुकोबाराय, समर्थ रामदास स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, सावता माळी, गोरा कुंभार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा अशाप्रकारे अनेक संतांनी त्यांच्या काळात सर्वसामान्य जनतेला मोलाचे प्रबोधन करून वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. याच परंपरेतील एक संत आहेत संताजी जगनाडे महाराज! संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या खांद्याला खांदा लावून त्याकाळात त्यांनी समाज सुधारणेचे काम केले आहे. 

 संताजी महाराजांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी पुणे जिल्ह्यातील चाकण जवळच्या सुदुंबरे या छोट्याशा गावी  झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठोबाशेठ जगनाडे  तर आई सुदुंबरे येथील काळे घराण्यातील मथुबाई! त्याकाळी  संताजीचे शिक्षण लिहीता वाचता येणे व हिशोब ठेवणे यापुरतेच होते. घरची परिस्थिती तशी चांगली होती. त्यामुळे संताजीला कमतरता कसलीच भासली नाही. वयाच्या १० व्या वर्षीच वडिलांनी संताजीला तेलाच्या धंद्याचा परिचय करून दिला, कारण त्यांचा मुख्य व्यवसाय होता घाण्याचे तेल काढणे. त्यांचे लग्नही ११ व्या वर्षीच खेड येथील कहाणे घराण्यातील यमुनाबाई बरोबर झाले. यमुना वयाने फारच लहान होती. संसार म्हणजे काय ? याचे दोघांनाही ज्ञान नव्हते. त्या काळात बालविवाह पद्धत समाजात रूढ होती. 

संताजींची व तुकाराम महाराजांची भेट शके १५६२ मध्ये म्हणजेच जानेवारी १६४० मध्ये झाली. तुकोबांच्या पहिल्या पत्नीला म्हणजेच रखमाबाईला संतु नावाचा मुलगा झाला. तो दिडदोन वर्षातच वारला. रखमाबाई सुद्धा दम्याच्या दीर्घ आजाराने वारल्या. संताजींना  किर्तनात पाहताच तुकाराम महाराजांना आपल्या पुत्राची आठवण झाली. त्यांच्या मुलाचे नावही संतु असल्याकारणाने त्यांना संताजीबद्दल प्रेम, आपुलकी वाटू लागली. त्यामुळे तुकोबांनी संताजींना आपल्या सानिध्यात ठेवले. तुकाराम महाराजांचे लेखक म्हणुन संताजी महाराजांच्या ओव्या व भजने लिहिलेली आढळुन येतात. वास्तविक पाहता तुकाराम महाराजांना अशा प्रकारच्या लेखनिकाची गरज होती असे नाही. ते स्वत: उत्तम प्रकारे लिहू व वाचु शकत होते. परंतु किर्तनाच्या प्रसंगी तुकोबांच्या तोंडुन निघणारे शिघ्रकाव्य व नवीन अभंग संताजी लिहून ठेवत असत, ही वस्तुस्थिती आहे!

     संताजींनी तुकाराम महाराजांना मनोमन गुरूस्थानी मानले होते. आणि खरंतर त्यांच्यामुळेच तुकाराम महाराजांचा अनमोल साहित्याचा ठेवा आज आपल्याला मिळाला आहे. संताजींचे अक्षर फारच सुंदर होते. तुकोबांचे नवनवीन अभंग ते आपल्या वहीत लिहुन ठेवत असत. हजारो अभंग त्यांनी संग्रहीत करून ठेवले होते. संताजींची  स्मरण शक्ती खरोखरच वाखणण्यासारखी होती. त्यांनी स्वत: रचलेले घाण्याचे अभंग आजही बर्‍याच ठिकाणी विशेषत: ग्रामीण भागातून ऐकायला मिळतात. अगदी तरूण असताना पासूनच संताजी महाराजांना तुकाराम महाराजांचे किर्तन एैकण्यास मिळाले. आणि तेव्हापासूनच त्यांना किर्तनाची ओढ निर्माण झाली व त्यातून ते तुकाराम महाराजांकडे आकर्षित झाले जणू तुकाराम महाराजांशी त्यांचे पूर्वजन्मीचे ऋणानुबंधच होते!

    तुकाराम महाराजांचा नियमित सहवास व मार्गदर्शनामुळे संताजींची जडणघडण अगदी व्यवस्थितपणे झाली. विशेष म्हणजे  मोगली आक्रमणाच्या वेळेला तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या, किर्तनाच्या आणि कवितांच्या वह्यांचे रक्षण संताजी महाराजांनी जिवाची पर्वा न करता केले.  चाकणच्या किर्तनानंतर संताजी नेहमी सतत तुकाराम महाराजांच्या सहवासात राहू लागले. त्यांचा   सहवास सतत मिळत गेल्यामुळे तुकारामांच्या अभंगांचे लेखनही रोज होऊ| लागले. महाराजांच्या सहवासाचा आणि किर्तनाचा संताजींच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. त्यामुळे घराकडे व संसाराकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ लागले. 

रोज होणार्‍या तुुुकोबांच्या किर्तनातून आणि अभंगातून सामान्य माणसांच्या समस्यांचे निवारण होत होते. त्यामुळे आपल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी जाणत्या पंडितांकडे सामान्यजन जाईनासे झाले. परिणामी त्यांचे नुकसान होऊ लागले. त्यांना दक्षिणा मिळणे बंद झाले. आणि मग सरतेशेवटी त्याचा सर्व राग तुकाराम महाराजांवर निघाला. त्यांच्या विरोधात धर्मसभा घेऊन धार्मिक न्यायालयात खटला दाखल करण्यात आला.  त्याठिकाणी रामेश्वर भट हे स्वत: न्यायाधीश म्हणून काम पाहत होते. त्यांनी आपला निर्णय जाहीर केला...  "तुकारामाला गाथा लिहिण्याचा अधिकार नाही. कारण तो शुद्र आहे. कीर्तन सांगणे व पाया पडून घेण्याचा अधिकार त्याला नाही. त्याची संपत्ती जप्त करून गावातून हाकलून द्यावे आणि त्याच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकाव्या." अशाप्रकारचा निकाल स्वत: रामेश्वर भटांनी दिला. त्यावेळी  तुकाराम महाराजांना  मारहाणही झाली. त्याचे संताजी महाराज साक्षीदार आहेत. त्याकाळात त्यांनी तुकाराम महाराजांना एकटे कधी सोडले नाही. त्यामुळे संताजी महाराजांना सुद्धा बर्‍याच वेळा धमक्या देण्यात येत होत्या. त्यांच्यावर अनेक वेळा हल्लेही झालेले आहेत. तरीही संताजी महाराज घाबरले नाहीत. रामेश्वर भटांनी तुकोबारायांच्या गाथा इंद्रायणीत बुडविण्याचा निकाल तर दिलाच होता. परिणामी आयुष्यभर कष्ट करून अभंगांचे लिखाण केलेल्या सर्व वह्या धार्मिक दबावामुळे पाण्यात बुडविण्यात आल्या!

     संताजी महाराजांची पुढील तेरा दिवसात तहान भूक हरपून आपल्या प्रबळ स्मरणशक्तीच्या जोरावर पुन्हा अभंग लिहायला सुरूवात केली. सर्व अभंग, कीर्तन पुन्हा जसेच्या तसे लिहुन काढले. त्याकाळी  'गाथा इंद्रायणी नदीतून कोरड्या वर आल्या... पांडुरंग प्रसन्न झाला, चमत्कार झाला!' अशा प्रकारचा प्रचार सर्वत्र करण्यात आला. परंतु स्थानिक सामान्यजनांना वस्तुस्थिती माहिती होती. तुकाराम महाराजांच्या गाथेचे रक्षण संताजी महाराजांनी केल्यामुळे त्याकाळात त्यांच्याबद्दल लोकांना फार कौतुक वाटले आणि त्यांच्याविषयी आदर, प्रेम, श्रद्धा निर्माण झाली. संताजी महाराजांनी दिलेले योगदान हे आपल्या समाजासाठी फार कौतुकास्पद आहे. त्यांचे मार्गदर्शन अभंगांच्या माध्यमातून केलेले उपदेश आजही आपल्याला त्यांची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. ते सांगायचे, "किर्ती शिल्लक राहील असे काम करा. त्यासाठी आपल्याला मनुष्यजन्म मिळाला आहे. त्याचा उपयोग करा ! सावध व्हा, मृत्यू अटळ आहे. तो कोणत्याही क्षणी येईल. त्याला सामोरे जा ! या जीवनाचा सदुपयोग करा. एकदा मनुष्य जन्म संपला की तो पुन्हा येणार नाही!" असा विचार संताजी महाराजांनी मांडला.

     त्यानंतर वयाच्या ७६ व्या वर्षी १७०० साली मार्गशिर्ष वद्य १३ ला संताजी महाराजांचे निधन झाले!  निधनानंतरच्या निघालेल्या अंत्ययात्रेत भजनांच्या दिंड्या चालत होत्या. त्यांच्या देहावर हार, फुले, गुलाल, व पैशाची उधळण होत होती. विठ्ठल नामाच्या जयघोषात त्यांना निरोप देण्यात येत होता.

             संताजी महाराज समाधिस्त झाल्यापासून सुदुंबरे येथे चाकण, खेड, कडुस, पुणे शहर व महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातुन मार्गशिर्ष वद्य १३ ला. अनेक भाविक तेथे जातात. सर्व ग्रामस्थांच्या मदतीने उत्सव साजरा करतात. त्यावेळी भजन कीर्तन व प्रसादाच्या माध्यमातुन भोजनाचा कार्यक्रम ठेवला जातो.

    तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकर्‍यांपैकी संताजी महाराज हे एक असले तरी तुकारामाच्या खांद्याला खांदा लावून बरेच कार्य संताजी महाराजांनी केलेले आहे. अनेक प्रकारच्या अभंगाची रचना त्यांनी केलेली आहे. संताजी हे भक्तीमार्गी होते हे यावरून सिद्ध होते. संताजी महाराज हे तुकाराम महाराजांच्या सानिध्यात सतत राहत असल्यामुळे त्यांनाही पांडुरंगाचा साक्षात्कार झाला होता!

     त्यांच्या कार्याची जाण ठेवून जय संताजी फक्त ओठातुन न बोलता ते पोटातुन निघावे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!

  जय संताजी... जय जय रघुवीर समर्थ !!

... विनोद श्रा. पंचभाई.  वारजे, पुणे 
     भ्र. क्र.९९२३७९७७२५

Monday, October 28, 2019

संपन्नतेचे प्रतीक ... धनत्रयोदशी

संपन्नतेचे प्रतीक... धनत्रयोदशी

दिवाळी हा सण अतिशय मांगल्याचा आणि संपन्नतेचा सण म्हणून आपल्या देशात सर्वत्र साजरा केला जातो. धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस! धनत्रयोदशी ही अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी असते. म्हणूनच अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी हा सण साजरा करतात. या दिवशी धन म्हणजे पैसा, सोने-चांदी यांची पूजा करून आपली व आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत रहावी अशी प्रार्थना केली जाते. धनत्रयोदशीला आपल्या देशातील
काही भागात धनतेरस असेही म्हणतात. या मंगलमय दिवसापासूनच दिवाळीची खरी सुरूवात होते.

धनत्रयोदशी या सणामागे मनाचा वेध घेणारी एक विलक्षण कथा सांगितली जाते..... राजजोतिष्याने सांगितलेल्या भविष्यवाणीनुसार हेम राजाचा पुत्र आपल्या ऐन तारूण्यावस्थेत मृत्यूमुखी पडणार असतो! त्यामुळे राजा, राणी सतत उदास आणि तणावात राहतात. तरीही ते आपल्या राजपुत्राचे जीवन सुखी व्हावे या आशेने त्याचे लग्न लावून देतात. मात्र लग्नानंतर चौथ्या दिवशीच तो मृत्यूमुखी पडणार असे भविष्य वर्तविलेले असल्याने तो दिवस त्याच्यासाठी अत्यंत कसोटीचा असतो. त्यादिवशी त्याची पत्नी त्याला रात्री झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. तसेच राजमहालाचे प्रवेशद्वार सुद्धा सोन्या-चांदीने भरून रोखण्यात येते. सर्व महालात मोठमोठे दिवे प्रज्वलित करून सगळीकडे लखलखीत प्रकाश केला जातो. राजपुत्राची पत्नी त्याला रंजक गोष्टी सांगून जागे ठेवण्यात यशस्वी होते. त्यानंतर जेव्हा यम राजपुत्राच्या खोलीत सर्परूपाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीच्या प्रखरतेने आणि तेथील प्रकाशाच्या लखलखाटाने दिपून जातात! त्यामुळे यम आपल्या यमलोकात परत निघून जातो. अशाप्रकारे राजपुत्राचे प्राण वाचतात. म्हणून या दिवसाला 'यमदीपदान' असेही म्हणतात. यादिवशी सायंकाळी घराबाहेर दिवे लावून त्यांच्या वातीचे टोक दक्षिण दिशेकडे ठेवतात आणि दिव्याला मनोभावे नमस्कार करतात. असे केल्याने अपमृत्यू टळतो असा समज आहे!

धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा प्रचलित आहे. ती म्हणजे ‘समुद्र मंथन’! जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेवांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणासाठी समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. या दिवसाला 'धन्वंतरी जयंती' असेही म्हणतात.

आयुर्वेदाच्या दृष्टीने धनत्रयोदशी या दिवसाला धन्वंतरी जयंतीचे अतिशय महत्त्व आहे. वैद्य मंडळी यादिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. नंतर कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर प्रसाद म्हणून लोकांना वाटला जातो. आयुर्वेदात यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे अशी मान्यता आहे. धन्वंतरी हा अमृतत्त्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. म्हणून या दिवशी कडूनिंब आणि साखर धन्वंतरीचा प्रसाद म्हणून वाटण्यात येतो.

व्यापारी वर्गात सुद्धा धनत्रयोदशीच्या पूजेला विशेष महत्त्व असते. यादिवशी सायंकाळी व्यापारी लोक आपल्या दुकानातील पेढीची मनोभावे पूजा करतात. त्यांच्या हिशेबांच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आपल्याकडे फार आधीपासूनच आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशातील काही ग्रामीण भागात धनत्रयोदशीला घरातील कानाकोपऱ्यात धने पसरून ठेवण्याची परंपराही आहे. यामुळे घराघरात धनधान्याची वृद्धी होते असा दृढ समज आहे.

तसेच धनत्रयोदशी सणाचे निमित्त साधून मोठ्या प्रमाणावर सामान्यजन सोने खरेदी करतात. या दिवशी सोने खरेदी केल्याने आर्थिक संपन्नता येते असा लोकांचा विश्वास आहे. जर कुणी सोने खरेदी नाही करू शकले तर ते कुठलीही एखादी नवीन वस्तू यादिवशी खरेदी करतात! असा हा
धनत्रयोदशी हा दिवाळी सणाचा पहिला मंगलमय दिवस लौकिकार्थाने संपन्नतेचे प्रतीकच आहे.

...विनोद श्रा.पंचभाई
भ्र.क्र. ९९२३७९७७२५

Sunday, October 20, 2019

मंगलमय दिवाळी पाडवा

मंगलमय दिवाळी पाडवा

आपल्या भारतीय लोकांमध्ये निरनिराळे सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात कमालीचा उत्साह आढळून येतो. असाच दिवाळी हा आपला एक अतिशय जिव्हाळ्याचा प्रमुख सण! अश्विन महिन्यात येणाऱ्या या सणात थंडीची चाहूल लागली असते. हवेत सुखद गारवा जाणवतो. अशा या आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरणात दिवाळी सण साजरा करण्यास प्रत्येक जण उत्सुक असतो. तसं पाहिलं तर 'वसुबारसे'च्या दिवसापासून या सणाची सुरूवात होते, मात्र दिवाळीचा सण धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत पाच दिवसांचा! पहिल्या दिवशी धनत्रयोदशी त्यानंतर नरक चतुर्दशी आणि तिसऱ्या दिवशी अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते. मग दिवाळीच्या चौथ्या दिवशी येणाऱ्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला दिवाळी पाडवा साजरा केला जातो. साडेतीन शुभ मुहूर्तापैकी असलेल्या दिवाळी पाडवा या दिवसाला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

विक्रम संवत् कालगणनेचा प्रारंभही याच पाडव्याच्या  दिवसापासून होतो. उज्जैनीचा महापराक्रमी राजा असलेला विक्रमादित्य याने परकीय शकांचे आक्रमण परतवून लावत त्यांचा पराभव केला. त्या रोमहर्षक विजयाचं प्रतीक म्हणून राजा विक्रमादित्य याने 'विक्रम संवत्' ही कालगणना सुरू केली. इसवी सन पूर्व ५७ पासून ही कालगणना अजूनही प्रचलित आहे. इसवी सन पूर्व काळातील संस्कृतीच्या वैभवाचं, सभ्यतेचं आणि न्यायप्रिय एकछत्री राज्य व्यवस्थेचं हे गौरवशाली उदाहरण आहे.

दिवाळी पाडवा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणूनही ओळखला जातो. बळीराजासारख्या प्रजाहितदक्ष, पराक्रमी आणि दानशूर असलेल्या मात्र नंतर अहंकारी बनलेल्या राजाला बटु वामनाचं रूप घेतलेल्या श्रीविष्णूने तीन पावलांचं दान मागून भानावर आणलं अशी पौराणिक कथा आहे. या बळीराजाचाच बलिप्रतिपदा हा दिवस मानला जातो.
 त्याचप्रमाणे गोकुळातील सर्वसामान्य गोपगोपियांचं रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता अशी आख्यायिका आहे. या घटनेचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेऊन आपल्या देशाच्या काही भागात दिवाळी पाडव्याच्या दिवशी गोवर्धन पूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दुर्वा आणि फुले वाहिली जातात. तसेच श्रीकृष्णाची प्रतिमा किंवा मूर्ती मांडून त्याची मनोभावे पूजा केली जाते. त्यानंतर गावातील गोधन म्हणजे गायी, वासरांना सुशोभित करून, त्यांची पूजा करून उत्साहात मिरवणूकही या दिवशी काढली जाते. गोवर्धन पर्वतामध्ये श्रीकृष्णाचा अंश आहे. त्यामुळे पूजा करणाऱ्यांना श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. गोवर्धन पूजनामुळे सद् गुणांचे संवर्धन होते अशा प्रकारची भावना श्रध्दावान लोक व्यक्त करतात.

पौराणिक महत्त्व असलेला आणि कृषिप्रधान संस्कृतीचं प्रतीक असणारा कार्तिक महिन्याचा पहिला दिवस   असलेला हा दिवाळी पाडवा आणखी एका दृष्टीनं अत्यंत  महत्त्वाचा आहे. आपल्याकडील परंपरेने पती आणि पत्नी यांनी परस्परांविषयीची कृतज्ञता व्यक्त करून आपल्या नात्याला एक नवं, अर्थपूर्ण वळण देण्याचा हा दिवस आहे.
आपल्या मनात दिवाळीच्या पाडव्याविषयीचे एक पारंपरिक चित्र रेखाटलं गेलं आहे...नवीन पेहराव आणि आभुषणं परिधान केलेली पत्नी हातात तबक घेऊन आपल्या पतीला ओवाळते आहे. निरांजनातल्या ज्योतींचा मंद प्रकाश दोघांच्याही चेहऱ्यांवर पडतो आणि त्यात परस्परांविषयीचा विश्वास, प्रेम आणि आदर प्रकर्षाने जाणवतो. आजही हे चित्र बदललेलं नाही!

 आज आपण बघतो, आपल्या देशात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. स्वतंत्रपणे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग व व्यवसाय आत्मविश्वासाने सांभाळताना त्या दिसतात. अगदी मोलकरणीपासून वैमानिकापर्यंत स्त्री समर्थपणे कार्य करताना आपण बघतो. नोकरी करणाऱ्यांना तर अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. तरीही आपलं घर प्रेमानं आणि जबाबदारीनं सांभाळणारी, आपल्या मुलांचं संगोपन करणारी, आपल्या कुटुंबात सामंजस्य राखण्यासाठी सदैव झटणारी तसेच सासर आणि माहेरच्या नात्यातला स्नेह जोपासला जावा यासाठी सजग असणारी अशी भारतीय स्त्रीची कितीतरी रूपे आपल्या समाजात बघायला मिळतात. मात्र आपल्या संस्कारांना प्राधान्य देऊन तसेच  परंपरांचा मान राखून आपल्याकडील स्त्रिया अतिशय उत्साहानं दिवाळी पाडवा साजरा करताना दिसतात.

 अतुट विश्वास आणि प्रेम यावर आधारलेलं पती-पत्नीचं नातं निभवायला तसं सर्वात कठीण! एक उत्तम सहजीवन साकारणे ही एक कौशल्याची गोष्ट आहे. त्यासाठी दोघांनाही अनेक कसोट्यांना सामोरं जावं लागतं! निरनिराळ्या जबाबदाऱ्या सतत पार पाडाव्या लागतात.  एकमेकांचे स्वभाव, आजूबाजूची बदलती परिस्थिती, सतत बदलणारा काळ, वाढत जाणारं वय, जीवनात येणारे कटु- गोड अनुभव यामुळे पती - पत्नीचं  नातं अधिकाधिक प्रगल्भ होत गेलं पाहिजे अशी दोघांचीही अपेक्षा असते.  मात्र हे नातं आयुष्यभराच्या एकमेकांच्या सततच्या सहवासाचं असल्याने काहीवेळा ते अधिक गुंतागुंतीचं आणि अवघड बनून जातं. परस्परांविषयीचे समज-गैरसमज, संशय, एकमेकांना गृहीत धरण्याची सवय, एककल्ली वृत्ती अशा अनेक गोष्टींचं गालबोट या नात्याला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.कधीतरी झालेल्या या गैरसमजुती विसरूनच नव्याने या नात्याला उजाळा देण्याचा प्रयत्न पाडव्याच्या या मंगलमय दिवशी मनापासून केला जातो.

कधीकधी पती-पत्नीमध्ये आपसात गैरसमज झाल्याने सुरुवातीला हे जमत नाही. दोन्ही बाजूंनी तीव्र शाब्दिक चकमक झाल्याने वाद, भांडणं होऊ शकतात. दुरावाही निर्माण होण्याची शक्यता असते ; पण जसजसे सहजीवन परिपक्व होत जाते तसतशी एकमेकांच्या स्वभावाची अन्  उणिवांची खरी ओळख पटत जाते आणि त्याप्रमाणे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्व प्रवासात पती आणि पत्नी हे नातं बरोबरीचं आहे याची जाणीव मात्र  दोघांना आणि कुटुंबातील इतरांनाही होणे अतिशय आवश्यक ठरते. आपसातील विश्वास, सामंजस्य कायम राखल्यास मग घराला घरपण आल्याशिवाय राहणार नाही. पर्यायाने नात्यातला जिव्हाळा, आपुलकी वृद्धिंगत होणार हे निश्चितच आणि त्याचंच प्रतीक म्हणून पाडवा साजरा केला जावा. तो केवळ फादर्स डे किंवा मदर्स डे सारखा पती-पत्नी डे असा एकच दिवस न राहता कायम रोज स्मरणात राहण्यासारखा असावा. एकमेकांसाठी म्हणून काही गोष्टी आनंदाने करण्याचा असावा. पती-पत्नीतल्या नात्याला दृढ करणारा, एकमेकांच्या साथसंगतीने वाढण्याचा, परस्परांविषयीचं प्रेम, विश्वास आणि आदर वृद्धिंगत करणारा असावा! म्हणूनच म्हणावेसे वाटते .....
जपण्यासाठी आपसातील नात्यातला गोडवा!
साजरा करूया आनंदाने हा मंगलमय पाडवा!!

...विनोद श्रा. पंचभाई, वारजे पुणे
    भ्र.क्र. ९९२३७९७७२५

Thursday, October 17, 2019

गुरूपुष्यामृत ... विशेषता आणि महत्त्व

गुरुपुष्यामृत योग ---- विशेषता आणि महत्त्व


आपली भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. प्रत्येक राज्यासाठी करण्यात आलेल्या प्रांतवार भाषा रचना तसेच तेथील वेगवगळ्या रूढी परंपरा या त्या-त्या राज्यांचं वैशिष्ट्य मानलं गेलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये निरनिराळ्या सणांना तसेच विविध प्रकारची व्रतवैकल्ये,  नक्षत्रे, मुहूर्त यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आपल्याकडील ज्योतिष शास्त्रामध्ये विशिष्ट ग्रह, नक्षत्र, तिथी, महिना आणि सोमवारपासून रविवारपर्यंतचे वार या महत्त्वाच्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. "या घटकांचा प्रभाव आणि युती यांच्यामुळे मानवी जीवनात शुभ व अशुभ काळ निर्माण होत असतो. तसेच ग्रह, नक्षत्र, तिथी इत्यादी घटकांच्या मदतीनेच मानवाला इच्छित कार्यात यश प्राप्त होऊ शकते" असे ज्योतिष शास्त्रातील तज्ज्ञांचे मत आहे. 

जर गुरूवारी पुष्य नक्षत्राचा दिवस आला, तर तो अत्यंत शुभ मानला जातो. हा दिवस व नक्षत्र यांच्या संयोगातून गुरूपुष्यामृत योग निर्माण होतो. कुठल्याही चांगल्या कार्यात जवळजवळ नव्व्यान्नव टक्के यशस्वी होण्यासाठी, त्या कार्याची सुरूवात या गुरुपुष्यामृताच्या दिवशी केली जाते. कारण सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गणल्या गेलेला "गुरू" हा ग्रह आपल्याकडे ज्ञान आणि यश प्राप्त करण्याचं प्रतीक मानल्या गेलं आहे! 

म्हणूनच गुरूपुष्यामृत योग असलेल्या दिवशी उच्च शिक्षण किंवा तंत्रज्ञानाचं शिक्षण सुरू करणे अत्यंत लाभदायक ठरते.  त्याचप्रमाणे  विविध कला प्रकार, साहित्य, नाट्य, वाद्य तसेच निरनिराळ्या विषयातील संशोधनाचा प्रारंभ करणे या दिवशी शुभ मानले जाते. शैक्षणिक किंवा आध्यात्मिक गुरू यांच्याकडून मंत्र वा दीक्षा घेणे, विदेशवारी करणे, नवीन व्यवसायाची सुरूवात, धार्मिक कार्याचा प्रारंभ, नवीन वास्तू किंवा निवासस्थानात प्रवेश करणे गुरुपुष्यामृताच्या दिवशी आपल्या भारतीय संस्कृतीत अत्यंत शुभ मानले गेले आहे. गुरूपुष्यामृत योगाच्या काळात सोने, चांदी किंवा नवीन वाहन खरेदी केल्यास त्यापासून लाभ तर होतोच आणि ते चिरकाल टिकून राहते, असाही बरेच तज्ज्ञ सल्ला देतात. तसेच या दिवशी पिवळा पुष्कराज बोटाच्या अंगठीमध्ये धारण करणे हे सुध्दा अत्यंत फलदायी मानले गेले आहे. 

सध्या सुरु असलेल्या २०१९ या सालात गुरूवार
 दिनांक ६ जून रोजी गुरुपुष्यामृत योग नुकताच येऊन गेला. तसेच पुढील आठवड्यात दिनांक ४ जुलैच्या गुरूवारी या वर्षातील दुसरा गुरुपुष्यामृत योग येत आहे. त्याचा  कालावधी ४ जुलैच्या सकाळी सहा वाजून आठ मिनिटांपासून ते ५ जुलैच्या पहाटे दोन वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत आहे. त्यामुळे या शुभ काळात आपण वर नमूद केल्याप्रमाणे गुरूपुष्यामृताचा नक्कीच लाभ घेऊ शकतो! तेव्हा शुभस्य शीघ्रम्!!

                                           विनोद श्रा. पंचभाई
                                                       वारजे, पुणे 
                                           भ्र.९९२३७९७७२५

नवरात्र ...

नवरात्र ---- महात्म्य आणि उद्देश 

नवरात्र हा आपल्या हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे. नऊ दिवस देवीची - आदिशक्तीची आराधना करण्याचा हा सण आहे. त्यासाठी नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करण्यात येते. घटामध्ये देवीची स्थापना करून, दीप प्रज्वलित करून आदिशक्तीची नऊ दिवस मनोभावे पूजा करणं म्हणजे घट स्थापना! या नऊ दिवसांत रात्रंदिवस अखंडपणे दीप तेवत ठेवला जातो. 

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शरद ऋतुचं आगमन होतं. त्यामुळे या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरा केल्या जाणाऱ्या या उत्सवाला शारदीय नवरात्र असं म्हणतात. एकूण नऊ दिवस सलग उत्सव चालत असल्यानं हा नवरात्रोत्सव होय! नंतर दहाव्या दिवशी येणारा विजयादशमी म्हणजेच दसरा सण. या दसऱ्याच्या आदल्या रात्री नवरात्र उत्सवाची सांगता होते. स्थापन केलेल्या घटांचं विसर्जन केलं जातं !

आपण दररोज घरी पूजा करतो. तेव्हा आपल्या देवघरात असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावं, तिचं आपल्या राहत्या घरावर तसंच कुटुंबियांवर कृपाछत्र असावं या शुद्ध व निर्मळ हेतूनं नवरात्र केलं जातं. त्याचप्रमाणे कुठल्याही अदृश्य शक्तीपासून कुलदेवतेचं आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावं या उद्देशानं शास्त्रात नवरात्र व्रत सांगितलं आहे. हे नवरात्र व्रत अगदी मनापासून आणि भक्तिभावानं केल्यास घरात सुख, शांती तर नांदणारच शिवाय आगळंवेगळं समाधानही आपल्याला प्राप्त होईल!

देवीची रूपे ---

१) शैलपुत्री ... देवीचं पहिलं रूप शैलपुत्री! शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे मुलगी. देवीच्या या रूपाची आराधना केल्यास आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ निश्चयता येण्यास मदत होते. भटकणारं मन देवीच्या या रूपाच्या स्मरणामुळे खंबीर, निडर अन् शांत होतं!
२) ब्रह्यचारिणी ... ब्रह्यचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होतं. आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्यचर्याचे गुण जागृत होण्यास मदत होते. अशावेळी आपली चेतना अनंताचा अनोखा अनुभव घेणे सुरू करते! त्यामुळे आपल्याला तणावमुक्त झाल्याची आगळीवेगळी अनुभूती मिळते.
३) चंद्रघंटा ... नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते. चंद्राचा संबंध मानवी मनाशी जोडला गेला आहे आणि घंटेचा नाद आपल्या मनाला वर्तमान क्षणात घेऊन येण्यास कारणीभूत ठरतो. चंद्राच्या कलांप्रमाणे आपलं मन सुद्धा सतत बदलत असतं. मात्र देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केल्यास आपलं मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात राहण्यास मदत होते.
४) कुष्मांडा ... कुष्मांड म्हणजे कोहळं! कोहळ्यामध्ये भरपूर बिया असतात आणि प्रत्येक बी मध्ये असंख्य कोहळे उत्पन्न करण्याची क्षमता असते.म्हणूनच कोहळं हे निर्मितीचं प्रतिक आहे.कोहळ्याप्रमाणेच देवीमध्ये सगळं विश्व सामावलं आहे. ही कुष्मांडा देवी आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते.
५) स्कंदमाता ... स्कंदमाता ही कार्तिकेयाची माता! बाल कार्तिकेयासोबत सिंहावर विराजमान असं तिचं रूप आहे. हे रूप शौर्य आणि करूणेचं प्रतिक आहे. स्कंदचा अर्थ निष्णात किंवा निपुण असणं! मात्र सर्वसाधारणपणे जे निष्णात किंवा तज्ज्ञ असतात ते थोडे अहंकारी असतात. परंतु येथे निरागसता वाढवणारी निपुणता आहे. देवीच्या या रूपाची आराधना केल्यास आपल्याला कौशल्यासह निरागसता आणि शौर्यासोबत करूणा हे गुण प्राप्त होतात.
६) कात्यायनी ... देवीच्या मातृत्वाचं वैशिष्ट्य दर्शवणारं हे रूप आहे. उत्तम वरप्राप्तीसाठी अविवाहित मुली देवीच्या या रूपाची आराधना करतात. विवाह म्हणजे संरक्षण, वचनबध्दता, सहजीवन अन् आपलेपणा! ही देवी नातेसंबंधांमध्ये आवश्यक असलेल्या या गुणांची प्रतिक आहे.
७) कालरात्री  ... काल म्हणजे वेळ!  काळामध्ये या जगातील सारं काही सामावलं आहे आणि हा काल सर्वांचा साक्षी आहे. रात्री म्हणजे गाढ विश्रांती... शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती! विश्रांती मिळाल्याशिवाय आपण परत ताजंतवानं होऊ शकत नाही. कालरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती. म्हणून देवीच्या या रूपाची आराधना केल्यास आपल्याला अशाप्रकारची विश्रांती लाभू शकते!
८) महागौरी  ... गौर म्हणजे गोरा, सफेद! सफेद, पांढरा रंग शुध्दतेचं प्रतिक आहे. शुध्दता निरागसतेतून येत असते. महागौरी हे देवीचं रूप म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाफ आहे. महागौरीची आराधना केल्यास ती आपल्याला जीवनाबाबतचं उच्च ज्ञान प्रदान करते!
९) सिद्धिदात्री  ... जी सर्व सिद्धी देते ती सिद्धिदात्री! जे हवं आहे ते इच्छित मागण्यापूर्वी अपेक्षेपेक्षा जास्त मिळणं म्हणजे सिद्धी. साधकाला आध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात. गुरूपरंपरेला येथे खूप महत्त्व आहे. साधकानं गुरूपरंपरेच्या ज्ञानमार्गावर वाटचाल केल्यास सिद्धिदात्री सर्व इच्छापूर्ती करून सिद्धींची प्राप्ती करून देते. देवीच्या या रूपाची आराधना केल्यास गुरूकृपेमुळे अपेक्षापूर्ती होऊ शकते.

स्त्री ही आपल्या समाजातील उपेक्षित, वंचित घटक नाही हे तिनं आजच्या काळात स्वतःच्या कार्यकर्तृत्वानं सिद्ध केलं आहे. मात्र काही तथाकथित समाजधुरिण हे मान्य करत नाही. स्त्री आपल्यापेक्षा वरचढ कशी काय होऊ शकते, ही त्यांची समस्या अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना स्वस्थ बसू देत नाही! त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांकडून समाजातील स्त्रीचा अनादर केला जातो. तिला अपमानित केले जाते. मात्र ही स्त्रीशक्ती जेव्हा अन्यायाविरूद्ध पेटून उठते तेव्हा ती महिषासूरासारख्या बलाढ्य राक्षसाचा संहार करते! त्याच्यावर अभूतपूर्व असा विजय प्राप्त करते. हेच नवरात्र सणाचं महात्म्य आहे!

आजच्या काळातील स्त्रीने स्वतःच्या स्त्रीत्वाची जपणूक करण्यासाठी उग्ररूप धारण करणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे या सणाचा उदात्त हेतू लक्षात घेऊन तो साजरा करण्यावर भर देणं संयुक्तिक ठरेल. नवरात्राच्या नऊ दिवसांत नऊ रंगांची विविध वस्त्रं परिधान करून मिरवणं तसंच नटूनथटून मौज म्हणून दांडिया खेळणं म्हणजे नवरात्र साजरा करणं असं जे चित्र आजकाल सर्वत्र बघायला मिळतं, त्यावर विचार होणं गरजेचं आहे. या नवरात्र उत्सवाचं पावित्र्य आणि गांभीर्य समजून घेऊन त्यादृष्टीने पालन करणं तसंच घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत चालणाऱ्या या उत्सवाचा मूळ उद्देश लक्षात घेऊन त्याप्रमाणे आचरण केल्यास आपल्याला एकप्रकारचे मानसिक समाधान प्राप्त करून घेता येईल हे निश्चित!!

... विनोद श्रा. पंचभाई
भ्र.क्र.९९२३७९७७२५

वाचाल तरच वाचाल

वाचाल तरच वाचाल...

असं म्हणतात... "अजून काही वर्षानंतर आपण कुठं असणार हे आपण आज सांगू शकत नाही. मात्र त्यावेळी आपल्या सहवासात येणाऱ्या चांगल्या व्यक्ती आणि हातात पडणारं योग्य पुस्तक या दोनच गोष्टी आपली योग्य दिशा ठरवण्यास पुरेशा असतात." या धकाधकीच्या जीवनात बरेचदा आपल्याला मनाच्या द्विधा अवस्थेचा सामना करावा लागतो. आपल्या अडचणी, मनाची व्यथा कुणाजवळ सांगू शकत नाही. या जगात कुणीही आपल्याला समजून घेणारं नाही असंही त्यावेळी प्रकर्षानं जाणवतं! अशावेळी कधीकधी नैराश्यही येतं. निर्णयक्षमता जणू कुंठित झाली की काय अशी वेळ आपल्यावर येते. मनाच्या या दोलायमान अवस्थेत एखादं पुस्तक हाती पडलं तर ते निश्चितच मार्गदर्शक ठरू शकतं. आपण कुठल्या प्रकारचं वाचन करतो यावरही बरंच काही अवलंबून असतं. तसं पाहता प्रत्येक पुस्तकात काही ना काही तरी संदेश दडलेला असतोच. असंच एखादं पुस्तक आपल्याला बरंच काही शिकवून जातं, ज्याची आपण कधी कल्पना सुद्धा केलेली नसते. 

 डाॅ. अब्दुल कलामांसारख्या आदर्श व्यक्तीचं चरित्र  आपल्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतं. अशा प्रेरणादायी पुस्तकामुळे एखाद्याचं पुढील आयुष्य बदलू शकतं एवढं सामर्थ्य पुस्तक वाचनात निश्चितच असतं. आपल्या मराठी भाषेत वेगवेगळ्या विषयांवरील विपुल साहित्यसंपदा उपलब्ध आहेत. युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव पेशवे, महाराणा प्रतापसिंह यांंच्यासारख्यांचं अचंबित करणारं थोर कार्य, त्याचप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले असंख्य क्रांतिकारक आणि महापुरूषांचं अपूर्व योगदान वाचताना पुस्तक हातातून सुटत नाही हेच वाचनाचं खरं सामर्थ्य आहे. तसेच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अशा अनेक थोर संतमहंतांची परंपरा लाभलेल्या आपल्या देशाला त्यांच्या समाज प्रबोधनानं एक प्रकारची संजीवनी प्राप्त झाली आहे. त्यांच्या विपुल प्रमाणात उपलब्ध असलेल्या संतसाहित्यात सर्वसामान्यांचं आयुष्य बदलण्याची, योग्य दिशा देण्याची शक्ती नक्कीच आहे. आपल्याला गरज आहे फक्त ते मनापासून वाचण्याची!

वाचन ही अशी सवय आहे ज्यामुळे कुणालाही तिच्यापासून त्रास होत नाही. वाचन करायला निश्चित वेळ लागत नाही, जागा लागत नाही. वाचन कधीही, कुठेही मनात आलं तेव्हा आपण करू शकतो. घरात वीज पुरवठा असो किंवा नसो, पुस्तक वाचन करताना त्याची आवश्यकता भासत नाही. आणि एकटं असताना तर पुस्तकासारखा दुसरा सच्चा मित्र नाही, हा अनुभव अनुभवल्यावरच येऊ शकतो. पुस्तक वाचताना तुम्ही कधी गंभीर होता तर कधी खळखळून हसूही शकता! तसंच काही पुस्तकातील विचार कधीकधी अचंबित करणारे असतात तर कधी ते आपल्याला अंतर्मुख पण करतात! 

आपण आपल्या कुटुंबियांसह एखादा सिनेमा बघण्यासाठी जातो तेव्हा आपले कमीत कमी हजार रूपये तरी सहज खर्च होतात. त्यापासून सर्वांना तीन तासात मनोरंजन मिळतं, काही अंशी प्रबोधन होतं. एखादा संदेशही मिळतो हे ठीकच आहे. मात्र त्याच हजार रूपयात जर वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके घरी आणली तर आपण ती वेळ मिळेल तशी वाचू शकतो. घरातील सगळे सदस्य तसंच शेजारीही त्याचा लाभ घेऊ शकतात. गरज आहे केवळ आपली मानसिकता बदलण्याची!

पुस्तकासाठी खर्च करणे ही संकल्पनाच कित्येक लोकांना मान्य नसते. काही व्यक्ती  ऊठसूट कुठल्याही गोष्टीवर पैसे खर्च करतील मात्र साधं वर्तमानपत्र वाचायचा शेजारी मित्राकडे जातील, ही वस्तुस्थिती आहे. पैसे देऊन वर्तमानपत्र किंवा एखादं छोटं पुस्तक विकत घेणं यांच्या पचनीच पडत नाही. याला अपवाद असणारे मित्रही असतात, नाही असं नाही! आवडलेल्या एकाच पुस्तकाच्या पाच-दहा प्रती घेऊन आपल्या मित्र, नातेवाईकांना भेट देणारेही सच्चे वाचनप्रेमी कधीकधी आपल्याला भेटतात. याठिकाणी सांगायचा मुद्दा असा की, अशाप्रकारच्या पुस्तकप्रेमी मित्राकडून भेट स्वरूपात पुस्तक हस्तगत करण्याची वाट न बघता स्वतःजवळचे पैसे स्वतः खर्च करून पुस्तक खरेदी करावं आणि आपली वाचनाची हौस वृद्धिंगत करावी असं वाटतं. बघा पटतंय का??😊 

...विनोद श्रा.पंचभाई, पुणे 

Thursday, August 15, 2019

स्वातंत्र्य आणि आपण...

स्वातंत्र्य आणि आपण...

"अरे रम्या, तुला काय गरज होती आता पुढच्या शिक्षणाची?
घरी वडिलांचा मस्त बिझनेस आहे आणि तू तर त्यांचा एकुलता एक मुलगा! अगदी थाटात शेठ बनून राहायचं ना."
"मला माझ्या मताप्रमाणे जगायचंय रे! कसलंही बंधन नकोय मला, म्हणूनच मी आलोय इकडे शिकायला."
"बंधन? कसलं रे बंधन! तुला गावी राहायला एवढं मोठं घर आहे. सर्व सुखसोयी, नोकर चाकर आहेत. ते सगळं सोडून या खोलीत राहतोस आमच्यासोबत. हे काही पटत नाही राव!"
"अरे यार अज्या, तुला आता कसं सांगू.... घरी असलो ना की माझ्या मागे सतत भूणभूण सुरू असते आईबाबांची... तू आता आपल्या बिझनेसमध्ये लक्ष घालायला हवं, दोन तीन वर्षात तुझ्या लग्नाचंही बघावं लागणार ..!"
"असं होय, म्हणजे थोडक्यात तुला स्वातंत्र्य हवंय असंच ना?" अजय मिश्किलपणे बोलला.
"करेक्ट! आता कसं माझ्या मनातलं बोललास! " रमेश त्याला टाळी देत म्हणाला.
वरील प्रसंगावरुन आपल्याला असं लक्षात येईल, आजकाल बहुतेकांना जीवन जगताना स्वातंत्र्य हवं असतं. मात्र स्वातंत्र्य ही कुणाकडून घेण्याची एखादी वस्तू नाही. तर ती प्रत्येकाच्या मनाची एक अवस्था आहे याची आपल्याला जाणीव असायला हवी. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ म्हणजे आपल्याला हवं तसं बोलण्याचा, विचार करण्याचा किंवा वागण्याचा असाही होऊ शकतो. याचाच अर्थ दुसर्याच्या नियंत्रणातून मुक्ती मिळविणे म्हणजे स्वातंत्र्य किंवा इतरांच्या ताब्यातून आपली सुटका करून घेणे यालाही स्वातंत्र्य म्हणता येईल.

आपल्या देशात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक रणसंग्राम लढले गेलेत. निरनिराळ्या प्रकारच्या चळवळी झाल्या, सत्याग्रह झाले. अनेक लढवय्ये क्रांतिकारक हसत हसत फासावर लटकले! कित्येक ज्ञात अज्ञात क्रांतिवीरांनी तसेच स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असंख्य महापुरूषांनी कठोर कारावास भोगला, हाल अपेष्टा सहन केल्या. इंग्रजांची जुलमी सत्ता उलथवून टाकण्यासाठी सर्वसामान्य लोकांनीही लाखोच्या संख्येने स्वातंत्र्य चळवळीत हिरिरीने भाग घेतला. प्रसंगी गोर्या सैनिकांच्या लाठ्यांचा सामना केला. आपल्या छातीवर निडरपणे गोळ्या झेलल्या! अशाप्रकारे अनेक महापुरूषांच्या, क्रांतिवीरांच्या आणि स्वातंत्र्यप्रेमी देशवासियांच्या कठोर त्यागातून अन् परिश्रमानंतर १५ आँगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला! 

ब्रिटिश सरकारचे भारतीयांवरचे नियंत्रण अधिकृतपणे संपुष्टात येऊन आपण खर्या अर्थाने स्वतंत्र झालो. त्यानंतर आपल्या देशात स्वतःची राज्यघटना तयार करण्यात आली. त्यानुसार सर्व देशवासियांना बरीचशी मूलभूत स्वातंत्र्ये बहाल करण्यात आली. विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्माशी निगडीत असलेले स्वातंत्र्य, वागणूकीचे स्वातंत्र्य असे अनेक प्रकारचे स्वातंत्र्य प्राप्त झाल्याने भारतीय नागरिकांना स्वतःचा विकास स्वतंत्रपणे साधण्यासाठी मुभा मिळाली. त्यामुळे आपण आज आपल्या मतानुसार, आपल्या मनाप्रमाणे आपले विचार अगदी निर्भीडपणे व्यक्त करू शकतो. तसेच कुणाच्याही बंधनात किंवा गुलामगिरीत न राहता स्वतंत्रपणे राहू शकतो, वागू शकतो.

आपला भारत देश हा पूर्वीपासूनच विविधतेने नटलेला आहे. येथे निरनिराळ्या जातीधर्माचे लोक एकमेकांविषयी आदर बाळगत, सलोखा जपत गुण्यागोविदानं राहतात, याचे कारण म्हणजे आपल्याला मिळालेले धार्मिक स्वातंत्र्य!  आपल्या देशातील प्रत्येकाला स्वतःचे धार्मिक सण निर्भयपणे साजरे करण्याचे स्वातंत्र्य मिळालेले आहे. त्यामुळेच एकमेकांविषयीचे प्रेम, आदर जपण्याची उदात्त भावना आपल्याकडे बघायला मिळते. येथे जातीय सलोखा सुद्धा मनापासून जपला जातो. ईद असो किंवा दिवाळी असो, बुद्धपोर्णिमा असो वा ख्रिसमस आपल्या देशात सर्वत्र उत्साहाने साजरे केले जातात. विशेष म्हणजे बहुतेक देशबांधव एकमेकांच्या सणोत्सवात भाग घेण्यात धन्यता मानतात.

आपण बघतो, आजकाल मूल जन्माला आल्यानंतर त्याचे उच्च विद्याविभूषित पालक लगेच 'नर्सरी' मध्ये त्याला  प्रवेश मिळविण्यासाठी धडपडताना दिसतात. काही दिवसांनी थोडे मोठे झाल्यावर त्याचे आईबाबा त्याला 'हे करू नकोस, तिकडे जाऊ नकोस' अशाप्रकारचे सतत उपदेशाचे डोस पाजत असतात. त्यामुळे कालांतराने हा मुलगा स्वतःचे स्वतंत्र निर्णय घेण्यास असमर्थ ठरतो. आणि मग महाविद्यालयात जाताना किंवा पुढील 'करिअर'ची दिशा ठरवताना त्याची अवस्था गोंधळल्यासारखी होते. पालकांच्या दबावामुळे तो स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाही. अशाप्रकारे त्याचं स्वातंत्र्यच हरवल्यामुळे तो कधीकधी 'डिप्रेशन'मध्ये जाण्याची शक्यता असते! त्याच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मग अशावेळी कधीतरी त्याचं मन बंड करण्याचं धाडस करतं! प्रसंगी तो अगदी टोकाची भूमिका घेण्यासही मागेपुढे पाहत नाही.आईबाबांच्या हस्तक्षेपाचा अतिरेक, सततचा दबाव, सतत कानावर आदळणारे उपदेशाचे डोस या कारणांमुळे त्याचं मन पेटून उठतं. मग तो मन मानेल तसं वागणं सुरू करतो. सगळी बंधने झुगारून स्वातंत्र्याचा पुरेपूर उपभोग घ्यायला लागतो. अशाप्रकारची बरीच उदाहरणे आजघडीला समाजात आपल्या बघण्यात येतात. म्हणजेच स्वातंत्र्याचा अतिरेक सुद्धा मारक ठरू शकतो.

स्वाभाविकपणे अनुभवता येणारे स्वातंत्र्य प्रत्येकालाच हवे असते. तसेच आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपली प्रगती साधण्यासाठीही स्वातंत्र्याची आवश्यकता भासते. कधीकधी एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असले की, त्यावेळी तो कसोटीचा क्षणही ठरू शकतो. उदाहरणार्थ... स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या तरूणीने घेतलेला लग्नाचा निर्णय! आपल्या देशात अशाप्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला राज्यघटनेने बहाल केले आहे. मात्र दुर्दैवाने लग्नाचा निर्णय चुकला तर घटस्फोट घेण्यापर्यंत पाळी येऊ शकते. अशावेळी मग मनस्तापाशिवाय पर्याय नसतो! त्यामुळे लग्नासंबंधीचे किंवा इतर महत्त्वपूर्ण निर्णय घेताना मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरूपयोग न करता आपल्या जीवनमूल्यांचा विचार करून, आपल्या जवळच्या आप्तस्वकियांचा विचार करूनच जबाबदारीने पाऊल उचलणे येथे योग्य ठरते.

"माझ्या मनाचा मीच राजा आहे किंवा माझा मी स्वतंत्र आहे"असा एकतर्फी विचार करणाऱ्यांची आपल्या समाजात कमतरता नाही. अशा लोकांना कौटुंबिक अथवा सामाजिक बंधनात अडकण्याची इच्छा नसते. अशाप्रकारचे युवक, युवती हल्ली मुख्य प्रवाहापासून दूर जाताना दिसतात. मग त्यांना लवकरच नैराश्य प्राप्त होते! परिणामी उदासीनता, अति विचार करणे, व्यसनांच्या आहारी जाणे अशाप्रकारचे मानसिक आजार होऊ शकतात. कधीकधी ही मंडळी आत्महत्येसही प्रवृत्त होतात. त्यामुळे स्वातंत्र्य हे मानसिक आरोग्याशी निगडीत आहे याची प्रत्येकाला जाणीव असायला हवी. कारण स्वतंत्र व्यक्ती मानसिक दृष्टीने सक्षम असल्यास अधिक जोमाने कार्य करू शकते.

सुदैवाने आज आपल्या देशात चांगले आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे. त्याचा पुरेपूर आणि योग्य पद्धतीने वापर करणे आपल्याच हातात आहे. त्यामुळे इतरांवर विनाकारण टीका न करता आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा निखळ आनंद आपण घेऊ शकतो. तसेच विचार स्वातंत्र्याचा सकारात्मक दृष्टीने उपयोग केल्यास आपल्या समाजाचे आरोग्य अबाधित राखण्यास मदतच होईल. पर्यायाने देशाचे सामाजिक आरोग्य आणि स्वातंत्र्यही नेहमीसाठी अबाधित राहणार यात शंका नाही. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते ...
 " हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
        माणसाने माणसाशी माणसासम वागणे !! "

विनोद श्रा. पंचभाई
वारजे, पुणे 
भ्र.क्र.९९२३७९७७२५

Tuesday, July 16, 2019

सद् गुरू ... सौख्याचा सागरू

सद् गुरू ... सौख्याचा सागरू

एखादं बाळ जन्माला आल्यावर जेव्हा त्याच्या पाठीत बळ येतं, तेव्हा ते पालथं पडतं. मग काही दिवसांनी त्याच्या हातात बळ आलं की ते रांगायला लागतं...आणि कालांतराने त्या बाळाच्या पायात बळ येतं तेव्हा ते चालायला शिकतं. त्यावेळी ते बाळ आपलं पहिलं पाऊल आपल्या आईच्या साक्षीनं टाकतं! मग जसजसं बाळ मोठं होतं, तसतसं ते जास्तीत जास्त वेळ आपल्या आईच्या सानिध्यातच आपलं बालपण उपभोगत असतं. त्यावेळी त्या नकळत्या वयात त्याच्यावर संस्कार रुजले जातात. नंतर काही वर्षाने तो जगाच्या पाठीवर कुठंही गेला तरी आपल्या आईला विसरू शकत नाही. कारण जीवनातील पहिला गुरू त्याच्यासाठी त्याची प्रिय आईच असते.

आयुष्य जगताना प्रत्येकालाच अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. कधी कधी आपलं जीवन विलक्षण गुंतागुंतीचं होऊन जातं. अशावेळी मग आपल्या आईवडिलांची आपल्याला प्रकर्षानं आठवण येते. त्यांनी वेळोवेळी केलेले मोलाचे मार्गदर्शन, आपल्यावर रूजवलेले संस्कार आपल्याला आठवतात. कारण तेच आपले 'खरे गुरू ' असतात. आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या आईवडिलांनी केलेले मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ठरत असते. आपल्या एकंदरीत आयुष्यातील त्यांचे योगदान हे इतरांपेक्षा खूपच मोठे असते. म्हणूनच त्यांची तुलना आपण इतर क्षेत्रातील गुरूंसोबत कधीही करू शकत नाही.


काही लोक म्हणतात, शाळेत शिकवणारे शिक्षक हेच आपले पहिले गुरू असतात. मात्र मला तरी वैयक्तिकरित्या हे मान्य नाही, हे मी येथे नम्रपणे नमूद करतो. कारण कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता शिकवणारे 'गुरू' आजतरी या भूतलावर सापडणार नाही. याउलट आपले आईवडिल अगदी निस्वार्थ भावनेनं आपल्याला आयुष्याचे प्राथमिक धडे देत असतात. आपल्यावर योग्य ते संस्कार करताना, वाढत्या वयानुसार मार्गदर्शन करताना आपल्या मुलांचा उत्कर्ष व्हावा हेच आईवडिलांना अभिप्रेत असते. आपल्या मुलांनी त्यांचे ध्येय साध्य करावे म्हणून आईबाबा अतोनात कष्ट घेत असतात, मुलांच्या जडणघडणीसाठीच त्यांचा सगळा आटापिटा असतो. एकप्रकारचा ध्यास घेऊनच ते आपलं दायित्व पार पाडत असतात. आपण जरी कमी शिकलो तरी आपल्या मुलांनी शिक्षणाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करावी हीच आईवडिलांची आंतरिक इच्छा असते. त्यासाठी, कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी ते आपला फाटका संसार कमालीचा नेटका करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. आई आपल्या मुलांना प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा सकारात्मकतेनं सामोरं जाऊन, वेळप्रसंगी काटकसर करत, येणारी परिस्थिती अनुकूल कशी करता येईल हे शिकवते. तर वडील आपल्या मुलांना व्यवहारश्ज्ञानाचे धडे देतात, येणाऱ्या प्रसंगांना धीटपणे, निर्भयपणे कसं सामोरं जावं हे शिकवतात.

दादा! आमचे आदरणीय वडील, आमचे पूजनीय सद् गुरू!  अत्यंत बिकट परिस्थितीत जीवनाच्या सारीपाटावरील वेगवेगळ्या सोंगट्या यशस्वीपणे आणि धिरोदात्तपणे शुन्यातून निर्माण केलेलं विश्व त्यांनी समृद्ध केलं! दुर्दैवानं  अगदी नकळत्या वयातच ते पितृछत्राला पारखे झाले! त्यामुळे बालवयापासून त्यांनी आपल्या आईसोबत छोटीमोठी कामे केली. प्रसंगी हमाली करत आईच्या संसारात मदत केली. 'हातावरचं पोट' अशी अवस्था असल्याने काबाडकष्ट म्हणजेच जीवन हेच जणू त्यांच्या जगण्याचं समीकरण होऊन गेलं. त्यामुळे दुर्दैवानं त्यांचं शिक्षण अपुरं राहिलं! काही दिवसांनी मात्र त्यांच्या सुदैवानं किशोरवयापासूनच त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अनमोल सहवास लाभला. "अरे कशाला रिकामा फिरतं, तुझं गावच नाही का तीर्थ! " आणि "मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे!" या राष्ट्रसंतांच्या भजनांनी त्यावेळी दादांवर मोहिनी घातली आणि ते त्यांचेच होऊन गेले, राष्ट्रसंतांना मनोमनी आपल्या  ह्रदयात गुरुस्थानी बसवलं!  मग दिवसभर काबाडकष्ट करून आईला मदत करणे आणि रात्री महाराजांच्या भजन, प्रवचनाला आवर्जून हजेरी लावणे असा त्यांचा दिनक्रमच ठरुन गेला.

ज्यावेळी राष्ट्रसंतांचा बाहेर गावी दौरा असायचा, तेव्हा अतिशय आतूर होऊन दादा त्यांची वाट बघायचे. त्यांची भजने ऐकण्यासाठी त्यांचे कान आसुसलेले असायचे. अशातच एकदा अमरावती जिल्ह्याचा दौरा आटोपून राष्ट्रसंत नागपूरला परत येत असल्याची बातमी दादांना मिळाली. मग केव्हा एकदा महाराजांचं दर्शन घेतो अशी त्यांची अवस्था झाली! त्यादिवशी रात्री नागपूरच्या महाल विभागातील अयाचित मंदिराजवळच्या पटांगणात राष्ट्रसंतांचे भजन, कीर्तन होणार होते. मात्र बातमी ऐकल्यापासून दादांना धीर धरवेना. त्यांना वाटलं, आपण दुपारीच जावं ... महाराज प्रवास करून थकले असणार, त्यांची अनुमती घेऊन त्यांचे पाय चेपून द्यावे असंही दादांना मनोमन वाटलं! मग काय, कानात वारु शिरल्याप्रमाणे त्यांनी धूम ठोकली आणि पोहोचले थेट अयाचित वाड्याजवळ! तेथे पोहचताच राष्ट्रसंतांची प्रतीक्षा करत असलेले काही लोक त्यांना दिसले. थोड्या वेळातच मोजक्या
सहका-यांसह राष्ट्रसंत वाड्याच्या प्रवेशद्वाराकडे येताना सगळ्यांना दिसले. शेजारीच उभे असलेले दादा लगेच प्रवेशद्वाराजवळ गेले. त्यांची अन् राष्ट्रसंतांची नजरानजर झाली. चालता चालता वाड्यात शिरताना त्यांनी  दादांच्या खांद्यावर अचानक हात ठेवला आणि म्हणाले, "अरे तुला माझे पाय चेपायचे होते ना! मग चल लवकर ..."
महाराजांचं बोलणं कानावर पडताच दादा आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे बघतच राहिले अन् डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले. मग त्यादिवशी दादांची आंतरिक इच्छा पूर्ण झाली, त्यांना कृतकत्य झाल्याचं मनस्वी समाधान लाभलं! ( हा प्रसंग स्वतः दादा तल्लीन होऊन सांगायचे)

अयाचित मंदिराशेजारच्या चौकात एक नवीनच दारूचा गुत्ता सुरू झाला होता. तेथे दिवसभर गर्दी व्हायला लागली. सरळसाध्या लोकांना सुद्धा दारुचं आकर्षण वाटायला लागलं. एकंदरीत जनजीवन विस्कळीत होऊ लागलं. त्यामुळे तो गुत्ता बंद व्हावा म्हणून समाज प्रबोधनाच्या भावनेतून आयोजकांनी रात्री राष्ट्रसंतांचं भजन- कीर्तन आयोजित केलं होतं. अंधार पडू लागताच अयाचित मंदिरालगतच्या पटांगणात श्रोते व प्रेक्षकांची गर्दी जमू लागली. दादा आणि त्यांचे मित्रांनी वेळेआधीच पुढील जागा पटकावली होती. अगदी वेळेवर राष्ट्रसंत आपल्या
सहका-यासह मंचावर स्थानापन्न झाले अन् इतका वेळ गोंधळ करत असलेले श्रोते एकदम शांत झाले. आता महाराजांच्या मुखातून निघणारे शब्द कधी एकदा कानावर पडतात अशी त्यांची अवस्था झाली होती! मग आपल्या प्रिय खंजेरीवर थाप देऊन राष्ट्रसंतांनी भजनाला सुरूवात केली... "घडी घडी मनी तुझे नाम जपावे रे..." तेथे उपस्थित श्रोते शब्द न् शब्द आपल्या कानात साठवत डोलू लागले. दादा आणि त्यांचे मित्र सुद्धा तल्लीन होऊन भजन ऐकत होते. भजन संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

आपल्या खड्या आवाजात अत्यंत मौलिक समाज प्रबोधन करून राष्ट्रसंतांनी पुढील भजनाला सुरूवात केली,
" व्यसने सगळी सोडून द्या ना... सरळपणाचे जीवन जगा ना..!" मंत्रमुग्ध होऊन श्रोते डोलू लागले. काहींच्या डोळ्यांतून अविरत अश्रू वाहू लागले, दादांचीही अवस्था वेगळी नव्हती! या भजनाचा समाजमनावर असा काही परिणाम झाला... दारूच्या गुत्त्यावर जाणाऱ्यांपैकी बरेचसे राष्ट्रसंतांच्या पाया पडायला मंचाजवळ गर्दी करु लागले. तेव्हा त्यांना हाताच्या इशा-यानेच महाराजांनी थांबवले. मग सर्वांना तेथे प्रतिज्ञा घ्यायला लावली, "आजपासून कधीही दारूला शिवणार नाही. कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही! " त्यानंतर त्यांनी उपस्थित श्रोत्यांना उद्देशून निक्षून सांगितलं,  "पाया त्यांनीच पडावे, ज्यांनी आपल्या कर्माला चुकावे. बंधूंनो, आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे केले तर कुणाच्याही पाया पडायची गरज भासणार नाही! "

आपल्या कर्मावर, मेहनतीवर असलेला विश्वास आणि राष्ट्रसंतांवरील अढळ श्रध्दा असल्याने दादांच्या लग्न समारंभाला शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद द्यायला राष्ट्रसंत आवर्जून उपस्थित होते असं दादा मोठ्या अभिमानानं सांगायचे. महाराजांच्या गुरू परंपरेचा वारसा लाभल्यानं दादांनी राष्ट्रसंतांचं लेखन साहित्य गावागावात जाऊन वाटप करणं सुरू केलं. वेळ प्रसंगी स्वतःजवळची रोखरक्कम खर्च करून उत्साहानं त्यांनी हे मोलाचं कार्य केलं. 'ग्रामगीता' या राष्ट्रसंतांच्या अतिशय प्रेरक व अमूल्य ग्रंथाच्या असंख्य प्रती दादांनी स्वखर्चाने छापून महाराजांच्या ग्रामजयंती आणि पुण्यतिथी महोत्सवात भाविकांना भेट स्वरूपात वाटल्या. पुण्यतिथी महोत्सव हिवाळ्यात येत असल्याने गुरूकुंज मोझरी येथे जाऊन दादांनी अनेक गरजूंना वूलनचे स्वेटरही पुरवले. त्याचप्रमाणे सामुदायिक प्रार्थनेची पत्रके छापून, लॅमिनेशन करून असंख्य लोकांना ते सहर्ष देत असत. घरी आलेली कुठलीही व्यक्ती, मग ती ओळखीची असो की अनोळखी असो, कधीही रिकाम्या हाताने परत गेली नाही ... अगदी प्राणी, पक्षी सुद्धा! दादा म्हणजे आमच्यासाठी संस्काराचं चालतं बोलतं विद्यापीठच... अजूनही ते सदैव आमच्या आसपास असल्याचंच जाणवतं! कितीतरी वेळा याची अनुभूती आणि प्रचिती आलेली आहे. जीवनात कुठल्याही प्रकारचा बिकट प्रसंग आला तरी तो सहज निभावून जाणारच हा दृढ विश्वास आहे...तो दादांच्या अमूल्य मार्गदर्शनामुळे आणि बहुमोल संस्कारामुळेच!

आज इतक्या दिवसानंतर, वर्षांनंतर सुद्धा दादांची आठवण स्मृतिपटलावर कायमच ताजी आहे. त्यांनी आमच्यासाठी घेतलेले अपार कष्ट, प्रतिकूल परिस्थितीत तसेच आजारी अवस्थेतही कुटुंबासाठी सोसलेल्या हालअपेष्टांना खरंतर  तोडच नाही. त्यांचं एक अतिशय आवडतं गाणं होतं, मदर इंडिया या सिनेमातलं... "दुनियामे हम आये है तो जीना ही पडेगा, जीवन है अगर जहर पीना ही पडेगा।"
दादांचं कर्ममय आदर्श जीवन, सतत हसतमुख असणं, सदा शांत, निर्मळ स्वभाव आम्हा सगळ्यांसाठी नित्य प्रेरणादायी ठरत आहे यात तिळमात्र शंका नाही. राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील 'जीवन शिक्षण' या अध्यायातून आम्ही विद्यार्थी जीवनात काही ना काहीतरी आत्मसात करावं हीच त्यांची सुरूवातीपासूनची तळमळ होती! या 'जीवन शिक्षण' मधील .....
"मुलात एखादा तरी असावा गुण,ज्याने पोट भरेल त्यात निपुण। न ये संसारामाजी अडचण। कोणत्याही परी।।"

"मुलगी बहु शिकली शाळेमाझारी,परि स्वयंपाक करता न ये घरी। काय करावी विद्याचातुरी। कामाविण लंगडी ती।।"

"जीवनाचे प्रत्येक अंग। शिकवावा महत्त्वपूर्ण उद्योग।
काम करावयाची चांग। लाज नसावी विद्यार्थ्या।।" यासारख्या स्वावलंबनाचा पुरस्कार करणाऱ्या आणि सदैव प्रेरित करणाऱ्या ओव्या आपल्या सर्वांसाठीच अनुकरणीय आहेत.

आमच्या दादांनी आयुष्यभर ख-या अर्थाने कर्मयोगाला प्राधान्य दिले. कधीही ते स्वस्थ बसले नाहीत. सतत कुठल्या ना कुठल्या कामात ते व्यग्र असायचे. वयाची पंच्याहत्तरी ओलांडली तरी त्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता. त्यांनी केलेल्या अनुपम कार्याची, त्यांच्या दातृत्वाची, त्यांच्या त्यागाची, त्यांच्या निर्मोही जीवनाची कुणीही बरोबरी करू शकणार नाही. मात्र त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सतत कार्यरत राहण्याचा मनापासून संकल्प केलेला आहे. हा संकल्प पूर्णत्वास नेण्याचा निस्वार्थ आणि प्रामाणिक प्रयत्न करणे हीच या गुरू पौर्णिमेच्या पवित्र पर्वात दादांसाठी खरी आदरांजली ठरेल!
दादांच्या निर्मळ आणि पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
वंदनीय राष्ट्रसंतांच्या प्रेरणादायी स्मृतीस विनम्र अभिवादन!
       
             ॥ सद् गुरू नाथ महाराज की जय।।

...विनोद श्रा. पंचभाई
    वारजे,  पुणे.
   ९९२३७९७७२५

Tuesday, July 9, 2019

समर्पण

समर्पण

एकदा संत कबीर महाराजांकडे एक यूवक आला. त्यानं कबीरांना विचारलं, "महाराज विवाह करणं योग्य आहे की अयोग्य? " ते ऐकून न ऐकल्यासारखं करत कबीरांनी प्रथम त्या यूवकाकडे दुर्लक्षच केलं! काही वेळाने यूवकाने अधीर होऊन परत तोच प्रश्न विचारला. मात्र त्यावेळीही कबीरांनी काही उत्तर न देता आपल्या पत्नीला हाक मारली व म्हणाले, "अगं आतून जरा कंदील घेऊन ये."
तेव्हा यूवकाला मोठं आश्चर्य वाटलं. न राहवून तो म्हणाला, "महाराज आता दिवसाढवळ्या कंदिलाची काय गरज आहे? एवढ्या उजेडात तर सगळं काही स्वच्छ दिसतंय ना!"

त्यावर कबीरांनी हसतच उत्तर दिलं,
"बेटा हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. विवाह करताना पूर्ण समर्पणाच्या भाव असणं आवश्यक आहे. तेथे तर्क वितर्क अशा प्रकारच्या क्षुल्लक गोष्टींना अजिबात जागा नकोच. मी माझ्या पत्नीला आतून कंदील आणायला सांगितला, तिनं तो लगेच आणला सुद्धा!  'कशाला पाहिजे?' , 'दिवसा कंदिलाची काय गरज?' अशाप्रकारचे प्रश्न विचारुन तिनं शंका उपस्थित केली नाही. मला कंदील तात्काळ आणून दिला. अशाप्रकारचा समर्पण भाव संसार करताना दोघातही असायला हवा. हा समर्पण भाव तुझ्यात आणि तुझ्या होणाऱ्या अर्धांगिनीत असल्यास तू निश्चितच विवाह करू शकतोस!"

या प्रसंगावरुन आपल्या असं लक्षात येईल की, संसार करताना समर्पण अन् विश्वास किती गरजेचा आहे. आजच्या अत्यंत धकाधकीच्या जीवनात एकमेकांवरील विश्वासाची भावना कमी होताना दिसत आहे. त्याऐवजी आजकाल निरनिराळ्या शंकाकुशंका विचारून एक दुसर्याला भंडावून सोडणे, क्षुल्लक कारणांवरुन भांडणे असे प्रकार सर्रास होताना दिसू लागले आहेत. याला कारणंही तशीच आहेत... आपल्या आजूबाजूला नित्यनेमाने घडणार्या दुर्दैवी घटना, माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या अतिरंजित बातम्या तसेच दुरदर्शन संचाच्या विविध वाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या ताणतणाव वाढवणार्या मालिका यामुळे नाही म्हटलं तरी सर्वसामान्य जनतेच्या भावना विचलीत होतातच. त्यामुळे मग काही प्रमाणात का होईना आपले विचार कुंठित होण्यास वाव मिळतो. एकदा का आपली सारासार विचार करण्याची शक्ती आणि बुद्धी भ्रमित झाली तरी तेथे निरनिराळ्या शंकाकुशंका उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. हेच आजचं कटू वास्तव आहे यात शंकाच नाही!

दुसरं असं की, सध्याच्या अत्याधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे अतिसुशिक्षित माणूस एकप्रकारे आत्मकेंद्रित होऊ लागला आहे. कधी नव्हे इतका तो आपमतलबी सुद्धा होत चालला आहे अन् त्यामुळे जवळच्या नात्यातील दुरावा वाढत आहे असंही आपल्याला हल्ली निदर्शनास येईल. कधीकाळी आपल्या मित्रपरिवारात किंवा आपल्या नातेवाईक मंडळीत सुद्धा आनंदानं रमणारा हा माणूस आज मात्र भलताच आत्मकेंद्रित झालेला दिसून येतो! हा झालेला बदल अचानक एका रात्रीत घडणे शक्य नाही. त्याची निरनिराळी कारणं असल्याचं आपल्या लक्षात येईल. आजूबाजूची परिस्थिती , आयुष्यात अचानक घडलेल्या अप्रिय घटना, जवळच्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा मृत्यू तसेच ऐकीव माहितीच्या आधारे इतरांविषयी झालेले गैरसमज या गोष्टीही कारणीभूत ठरु शकतात. त्याचप्रमाणे दूरदर्शनवरील विविध मालिकांच्या भडिमारामुळे, त्यातून दाखवल्या जाणाऱ्या परिणामकारक दृश्यांची हा शिकला सवरलेला माणूस आपल्या खासगी आयुष्याशी तुलना करू लागतो. अशावेळी मात्र तो आपली सद्सद्विवेकबुद्धी गहाण ठेवतो. तसंच माध्यमांमार्फत सतत कानावर पडणाऱ्या बातम्या, वृत्तपत्रांतून वाचण्यात आलेले प्रसंग याचाही त्याच्या मनावर परिणाम झाल्याशिवाय राहत नाही.

आज आपणा सर्वांनाच माहिती आहे, महिन्याला लाख दीड लाख रूपये उत्पन्न असणारी व्यक्ती सुद्धा सुखासमाधानात जगताना दिसत नाही. सारखी अस्वस्थता, निद्रानाश, ताणतणाव, साशंकता, भीती इत्यादी कारणांमुळे त्याच्या स्वभावात एकप्रकारचा चिडचिडपणा निर्माण होतो. कालांतराने मग अशी व्यक्ती नैराश्याच्या आहारी जाते. याउलट अगदी हातावर पोट असणारा मजूर वर्ग मात्र आपल्याला शांतपणे जगताना दिसतो. दिवसभर शारिरीक श्रमाची कामे करुन तो रात्री शांतपणे झोपी जातो. त्याला ना चोरांचं भय असतं ना कुठली चिंता असते . रात्री त्याला ना चॅटिंग करण्यात स्वारस्य असते ना तो कुठला क्रिकेटचा सामना बघत जागतो. तर जमिनीवरच मस्तपैकी ताणून देतो. कारण हातावर पोट असलेल्या त्याला सकाळी लवकर कामावर जाण्याची घाई असते. जेवढं आपण जास्त श्रम करू तेवढे जास्त प्रमाणात पैसे मिळणार हे त्याला ठाऊक असतं. म्हणूनच त्याला त्याच्या कामाप्रती एकप्रकारचा समर्पण भाव असतो. त्यामुळे तो अगदी जीव ओतून काम करतो! मग संध्याकाळी आपल्या श्रमाचा मोबदला घेऊन तो समाधानाने घरी जातो.

आधीच्या काळात शाळेतील शिक्षक आजच्यासारख्या शिकवण्या न घेता विद्यार्थ्यांना मनापासून शिकवायचे. त्यांना घडवायचे. त्यावेळी ते शिकवताना तल्लीन व्हायचे, स्वतःला झोकून द्यायचे. अशाप्रकारची समर्पित वृत्ती आजच्या शिक्षकांमध्ये अभावानेच आढळून येते. पूर्ण समर्पित भावनेनं शिकवणारे शिक्षक म्हणून याठिकाणी साने गुरुजींचं उदाहरण देता येईल. त्यांना मुलांचं मानसशास्त्र उत्तमप्रकारे अवगत होतं. त्यामुळेच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. तसेच आचार्य अत्रे ज्यावेळी शिक्षकीपेशात होते तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून त्यांच्यासाठी त्यावेळी 'नवयुग वाचनमाला' सुरू केली होती...ती विद्यार्थी घडवण्याच्या त्यांच्या तळमळीमुळेच! त्याचा परिणाम असा झाला... विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने तर फायदा झालाच, शिवाय त्यांना वाचनाची सुद्धा गोडी लागली. अशाप्रकारचे विद्यार्थ्यांची "नस" ओळखणारे शिक्षक आज मात्र खरंच शोधावे लागतात , ही वस्तुस्थिती आहे! 

आज आपण सर्वत्र बघतो, कुठलंही क्षेत्र घ्या... आपलं काम करताना 'शाॅर्टकट मेथड' वापरण्याची वृत्ती फोफावताना दिसून येते. त्यामुळे त्या केलेल्या कार्यात 'क्वालिटी' आढळण्याची शक्यता फारच कमी असते.( उदाहरणार्थ... नवीन इमारतींचे बांधकाम ) मात्र काही प्रमाणात याला अपवादही असतात, नाही असं नाही. सरसकट सर्वच लोक 'टाईमपास' प्रकारचे काम न करता अगदी मनापासून आपलं काम करणारे पण आपल्या बघण्यात येतातच! तरीसुद्धा आपल्या कामाप्रती आधीसारखी असलेली समर्पित वृत्ती आजकाल कुठंतरी लुप्त झाली की काय अशी आज एकंदर परिस्थिती आहे. कारण कसंतरी चालढकल करून आपलं काम करायचं अन् महिनाअखेर जास्त मोबदल्याची अपेक्षा ठेवण्याची वृत्ती आज सर्वच क्षेत्रात वाढली आहे... आणि यामुळेच कामाप्रती असलेला समर्पण भाव लुप्त होताना दिसतो आहे.  

येणाऱ्या पिढीसमोर एक नवा आदर्श ठेवण्यासाठी, आपला समाज समृद्ध व सुदृढ करण्यासाठी आपणच ध्यास घ्यायला हवा. त्यासाठी आपण समर्पित भावनेनं कार्य करण्याची आपल्यापासूनच सुरूवात करण्याचा संकल्प करुया. आपल्या आदरणीय पूर्वजांपासून प्रेरणा घेऊन आपलं सामाजिक दायित्व पार पाडण्याचा आपण आजच निर्धार करूया!!

विनोद श्रा. पंचभाई
वारजे, पुणे.
भ्र.क्र.९९२३७९७७२५


पर्यावरण ...गंभीर समस्या


पर्यावरण ...गंभीर समस्या 
उपनिषदात एक कथा आहे... एक मानवी शरीर असतं. त्या शरीराला डोळे, कान, हात, पाय असे विविध अवयव असतात. काही दिवसांनी या अवयवाचा अहंकार जागृत होतो. त्यांना वाटतं, आपल्यामुळेच हे अख्खं शरीर काम करतं. डोळ्यांना वाटतं, माझ्यामुळेच हे शरीर बघू शकतं. मी नसलो तर शरीर काम करणार नाही. कानांना वाटतं... माझ्यामुळेच शरीर ऐकू शकतं, मी ऐकणं बंद केलं तर शरीर काम करणार नाही. हातांना वाटतं, मीच सगळी कामे करतो. माझ्यामुळेच शरीराचं कामकाज चालतं. तसेच पायांना वाटतं, मीच सगळ्या शरीराचा भार सोसतो. त्यामुळे माझ्याशिवाय शरीर काम करूच शकत नाही. अहंकाराने पीडित सगळे अवयव काही दिवसातच आपापली कामे करणं बंद करतात. शरीर अगदी निपचित पडून राहतं. शेवटी शरीरात उरतो, तो फक्त प्राण ! मग प्राणालाही वाटतं, आता या निपचित पडलेल्या शरीरात आपला काय उपयोग? क्षणार्धात प्राण सुद्धा शरीराचा त्याग करून निघून जातो, आणि शरीर मृतप्राय होतं !

उपनिषदातील या कथेप्रमाणेच आपल्या या सुंदर निसर्गाचा, जीवसृष्टीचा "प्राण" पर्यावरण आहे! एक काळ होता, सम्पूर्ण जगात नैसर्गिकरीत्या पर्यावरणाचा समतोल राखला  जायचा. त्यावेळेस भरपूर वनसंपदा, मुबलक पाणी, आरोग्यसंपन्न हवा हे  सर्वत्र उपलब्ध असायचे. त्यामुळे शेती करणारा बळीराजा सुखी, समाधानी होता. कारण त्याला त्यावेळी आपली शेती मनाप्रमाणे करता येत होती. सगळीकडे सुजलाम् सुफलाम् असं आल्हाददायक वातावरण होतं ! एकंदरीतच सर्वसामान्य माणूस तणावविरहित आणि आनंदी होता. मात्र आज परिस्थिती अशी आहे की, शहरीकरणामुळे आणि झपाट्याने वाढलेल्या औद्यौगिकरणामुळे पर्यावरणाचा समतोल खूपच ढासळला आहे. छोट्यामोठ्या सर्वच शहरात तसेच अगदी खेडेगावात सुद्धा वाहनांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे वायुप्रदुषण, ध्वनीप्रदूषण कमालीचे वाढले आहे. आज ग्रामीण क्षेत्रातील परिस्थिती पण फारशी आल्हाददायक नाही. कारण पावसाच्या अभावामुळे म्हणा किंवा जलस्रोत खूप कमी झाल्याने आजकाल शेतकर्यांच्या मनासारखी शेती होताना दिसत नाही. सर्वत्र चिंतेचं वातावरण पसरलेलं दिसून येते. त्यामुळेच खेड्यातील लोकांचा ओढा शहराकडे धाव घेत आहे. आजची ही भिषण परिस्थिती पर्यावरणाचा समतोल ढासळल्यानेच उद्भवली आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

बेसुमार जंगलतोड, अनेक शहरांतील रस्त्यावरील मोठमोठी झाडे तोडणे तसेच शहराच्या आसपासच्या डोंगरावरील वनसंपदा नष्ट करून सिमेंटचे जंगल वाढवणे  म्हणजेच मोठया इमारती उभारणे हीच पर्यावरणाचा -हास होण्याची प्रमुख कारणे सांगता येतील. या गंभीर परिस्थितीमुळेच पाऊस पडण्याचं प्रमाण सुद्धा  खूपच कमी झालं आहे. पर्यायाने तापमान वाढीचा धोका निर्माण झाला आहे. हे सगळं कुठंतरी थांबवण्याचा आपण आज ध्यास घ्यायला हवा. आपण सर्वसामान्य लोकांनी सर्वत्र जास्तीत जास्त झाडे लावून ती जगवण्यासाठी संघर्ष करायला पाहिजे. हीच काळाची गरज असल्याचं लक्षात घेऊन पर्यावरणाच्या दृष्टिने आपलं दायित्व आपणच पार पाडणं आवश्यक आहे

 येणार्या काळात आपल्याला पर्यावरणाच्या बिकट समस्यांना सामोरं जाण्याचा मोठा धोका संभवतो आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला शुध्द प्राणवायू मिळणार की नाही ही शंकाच आहे. कुणी सांगावं, कदाचित उद्याच्या काळात आम्हाला 'आक्सिजन मास्क' सुद्धा वापरावे लागणार असं वाटतं! दुर्दैवानं अशाप्रकारची समस्या उद्भवली तर हे आक्सिजन मास्क सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नसणार हे मात्र नक्की. कारण आक्सिजन मास्क वापरणे ही बाब अत्यंत खर्चिक असणार आहे. त्यामुळे भविष्यातील येणारे धोके ओळखून आपण आजपासूनच आपल्या समाजापुढे आपल्या कृतीतून एक आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपल्याला जागोजागी वृक्षारोपण करत असतानाच पर्यावरणपूरक वस्तू वापरण्याची सवय लावण्याचा संकल्प पण करावा लागणार आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण सामान्य नागरिक स्वयंस्फूर्तीने बर्याच गोष्टी करु शकतो. जसे ... आपल्याला कुठं जवळपास जायचं असल्यास स्कूटर अथवा बाइकचा वापर न करता चालत जाण्याची सवय लावायला पाहिजे. ऊठसूट गाडी किंवा चारचाकीचा वापर टाळायला हवा, जेणेकरून प्रदूषण कमी होण्यास मदतच होईल. त्याचप्रमाणे प्लॅस्टिकच्या पिशव्या, पालिथीनचा वापर न करता आपण  कापडी पिशव्या वापरण्याचा ध्यास घेणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्यच समजायला हवे ! यासाठी सर्वत्र जनजागृती करता येऊ शकते. आपल्या जीवनातून प्लॅस्टिकला हद्दपार करण्याचा ध्यास प्रत्येकानं घेण्यासाठी आपण कसोशीनं प्रयत्न करायला हवे. त्याची सुरुवात आपल्यापासूनच करणे गरजेचे आहे. आपण फक्त स्वतःपुरता विचार करणे सोडून देण्याची वेळ आज आपल्यावर येऊन ठेपली आहे, याचाही गंभीरपणे विचार व्हायला हवा!

आपले तसेच या सृष्टीतील तमाम प्राणीमात्रांचे अस्तित्व टिकवण्यासाठी, आपल्याला सुदैवाने मिळालेले हे अमूल्य जीवन जगण्यासाठी आपण सर्वच पर्यावरणावर अवलंबून असतो. आपल्याला श्वास घेण्यासाठी हवेची गरज असते. पोटासाठी अन्नपाणी लागते. राहण्यासाठी घर लागते, वस्त्र लागते. या सर्व गोष्टी आपल्याला पर्यावरणापासूनच मिळतात. त्यामुळे पर्यावरणाला होणारा धोका वेळीच ओळखून आपण आपापल्या परीनं प्रयत्न करण्याची आज नितांत गरज आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे, याचे भान ठेवून, तसा ध्यास घेऊन आपण आपले दायित्व पार पाडण्याचा पक्का निर्धार करूया!

   विनोद श्रा. पंचभाई
  तपोवन सोसायटी,वारजे, पुणे 
  भ्र.क्र. ९९२३७९७७२५
 

Tuesday, April 30, 2019

वाचनाने मला काय दिले...

वाचनाने मला काय दिले...

असं म्हणतात...एखादे पुस्तक  एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते. अन मला वाटतं हे अगदी खरंय !
कारण लहानपणापासून आतापर्यंत माझ्या वाचनात बरीच पुस्तकं आली आहेत. मात्र थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे "अग्नीपंख" हे पुस्तक जेव्हा मी वाचले त्यावेळी एक प्रकारची ऊर्जाच  मिळाली. जगण्याला जणू चालना मिळाली. आगळी वेगळी उर्मी, उत्साह अंगात संचारल्यासारखं वाटलं ! नैराश्य कुठल्या कुठे पळून गेलं !

अग्नीपंख " हे खरंतर डॉ. कलाम यांच आत्मचरित्र आहे. हे पुस्तक वाचताना  त्यांनी अगदी बालपणापासून केलेला जीवनसंघर्ष,  शिक्षणासाठीची त्यांची प्रामाणिक धडपड आपल्याला एक नवी दिशा देते. एस. एल. व्ही.  या भारतीय बनावटीच्या पहिल्या प्रक्षेपणास्त्र  वाहकाच्या अत्यंत अवघड निर्मितीच्या वेळी  डॉ. कलाम यांना सुरुवातीला अपयश आले. मात्र खचून न जाता त्यांनी त्या संबंधीच्या संशोधनात स्वतःला  झोकून दिले. आणि आपल्या सहकाऱ्यासह अतिशय परिश्रम घेऊन एस. एल. व्ही.ची निर्मिती केली. यावरून आपल्याला जीवनाकडे
बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळतो हे नक्की !

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना हिंदीचे प्रसिद्ध साहित्यिक "मु°शी प्रेमचंद" यांचे 'गोदान' हे  त्यावेळेसचे लोकप्रिय पुस्तक वाचण्यात आले. अतिशय गरीब परिस्थितीत रोजचा जगण्याचा जीवघेणा संघर्ष, दोन
वेळच्या जेवणासाठी करावा लागणारा आटापिटा तर कधीकधी मजबूरीने  उपाशी राहण्यासाठी केलेली मानसिकता हे प्रसंग वाचताना त्यावेळेस विद्यार्थीदशेत 'गोदान' मधून बरेच काही शिकायला मिळाले. कुठल्याही परिस्थितीशी दोन हात कसे करायचे याबाबत जणू मार्गदर्शन लाभले. नंतरही  'प्रेमचंद' यांच्या बऱ्याच कथा वाचण्यात आल्या. त्यातून सुद्धा प्रतिकूल परिस्थितीत खंबीर कसे राहायला हवे याचे अमूल्य असे धडे मिळाले.

साने गुरुजी यांचे "श्यामची आई" म्हणजे अखिल विश्वातील आईसाठी आदर्श उदाहरणच! जे कोणी हे पुस्तक वाचतील  ते नक्कीच अंतर्मुख झाल्याशिवाय राहणार नाही. "एक होता कार्वर" हेही असेच खूप प्रेरणादायी पुस्तक आहे. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा  "ग्रामगीता" ग्रंथ तर सर्वसामान्यांना संपूर्ण जीवनाचे सोप्या भाषेत तत्वज्ञान सांगते एवढं त्यात सामर्थ्य आहे. राष्ट्रसंतानी ग्रामगीतेतून  अगदी छोट्या छोट्या ओव्यामधून अतिशय प्रेरणादायी उपदेश देऊन कर्मयोगाला प्राधान्य दिले आहे. "ग्रामगीता नाही पारायणासि...वाचता वाट दावी जनासि!!" हे सांगताना राष्ट्रसंतानी निरर्थक कर्मकांड कुचकामी ठरविले आहे.

  "एक तरी अंगी असू दे कला!
नाही तर काय फुका जल्मला!!" असा इशारा देतानाच राष्ट्रसंतानी....
 "मुलात एखादा तरी असावा गुण!
 ज्यात पोट भरेल त्यात निपुण!
न ये संसारामाजी अडचण! कोणत्याही परि!!" आणि
"मुलगी बहु शिकली शाळेमाझारी!
परि स्वयंपाक करता न ये घरी !
काय करावी विद्या चातुरी? कामाविण लंगडी ती!!
अशाप्रकारे विद्यार्थी दशेपासून अनमोल संस्कार दिलेले आहेत. म्हणूनच ग्रामगीतेचा माझ्यावर विशेष प्रभाव आहे.

मला वाचनाची आवड असल्याने कुठल्याही व्यसनापासून दूर राहण्याचा जीवनात खूप मोठा फायदा झाला आहे. कारण कोणत्या ना कोणत्या कारणाने माणूस जेव्हा नैराश्यच्या आहारी जातो, तेव्हा त्याला कुठले तरी व्यसन सहज जडते. मात्र तुम्हाला जर वाचनाची आवड असेल तर व्यसनापासून तुम्ही निश्चितच दूर राहू शकता हे मी स्वानुभवाने सांगतो. वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडण्यास मदतच होते हे मुद्दाम आवर्जून सांगावेसे वाटते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे याविषयी एक खूपच मार्मिक वाक्य आहे... "वाचन हे आपल्याला एकांतात सांगोपांग  विचार करण्याचा निखळ आनंद देते !"

                     ......  विनोद श्रा. पंचभाई
                              तपोवन,  वारजे, पुणे
                           मो. 9923797725