Saturday, December 23, 2023

दिशा...

"दिशा"

रोज-रोज असे मरण्यापेक्षा एकदा कायमचे मेलेले बरे असा विचार करत रमेश तडक रेल्वे स्टेशनकडे निघाला. चालताना निरनिराळ्या विचारांनी त्याच्या डोक्यात गर्दी केली आपल्यापासून कोणालाच काही सुख  नाही, उलट  आपला प्रत्येकाला त्रासच होतो हे त्याला पदोपदी जाणवत होते. सगळे कसे हिडीस फिडिस करायचे. आपल्या जाण्याने कुणाला काहीच फरक पडणार नव्हता. उलट नस्ती ब्याद गेली म्हणून सगळेच सुस्कारा सोडतील. विचार करता करता रमेशला 'त्या' रात्रीची आठवण आली... त्या मदनच्या संगतीने आपल्याना हे न सुटणारं व्यसन जडलं! मात्र   आता पश्चाताप करुन काय उपयोग होणार ?

  रात्रीच्या किर्र अंधारात रमेश स्टेशनच्या मागील बाजूने चालू लागला. आजू बाजूला कोणी बघणारे नव्हतेच. तरीही सावध नजरेने तो दूर असलेल्या रुळाकडे जाण्यासाठी प्लॅटफॉर्म क्र. ६ कडे जाण्यासाठी वळला.  मध्यरात्र उलटून गेली होती. त्यामुळे प्लॅट फॉर्मवर गर्दी अशी नव्हतीच. पलीकडे असलेल्या जवळच्या वस्तीतील काही टवाळखोर पोरं गप्पात रंगून गेलेली त्याला दिसली. मग मागे वळून न बघता तो झपझप पावले टाकत दूरपर्यंत जाऊन पोहचला. नंतर पुढच पाऊल टाकणार तोच कुत्र्याचं भुंकणे त्याच्या कानावर पडलं. त्याने चमकून शेजारच्या झुडूपात बघितलं. तर कुत्र्यांचे अख्खे कुटूंब त्याच्याकडे बघून गुरगुरत होते. घामाघुम अवस्थत रमेश माघारी फिरला. मग कसलासा विचार करून त्याची पावलं प्लेटफॉर्मकडे चालू लागली. गाडी येण्याची सुचना (उद्घोषणा होईपर्यंत) मिळेपर्यंत प्लॅटफॉर्मवरच थांबावे असा विचार करून तो चालू लागला.

" गाडी नं. ३१३३ निर्धारित वेळेपेक्षा साडेतीन तास उशीराने येणार" असे कळल्याने रमेश रेल्वे स्टेशनच्या प्रतिक्षालयात घुसला. तेथे त्याला एक मोठी सुटकेस आणि एअरबॅग दिसली. त्याशिवाय तिथं त्याला कुणीही आढळून आले नाही. कोणाचे सामान असेल हे ? असा विचार करत असतानाच त्याला बाथरूममधून एक व्यक्ती येताना दिसली. त्या व्यक्तीकडे बघताच रमेशचा चेहरा पांढराफटक पडला!

 "अरे तू रमेशन ना? एवढ्या रात्री इथे काय काम करतोस ? अन् काय ही तुझी अवस्था; बरं नाही का है तुला?"

रमेश गडबडून बोलून गेला...

" सर, सर तुम्ही कुठे निघालात ? मी आपला सहजच.... "

काय बोलावे त्याला काहीच सुचलं नव्हतं. अचानक एवढ्या दिवसांनी देसाई सरांशी त्याचा सामना झाला होता. मग रमेशच्या जवळ जाऊन त्याला धीर देत सरांनी बोलतं केलं. त्यानंतर सगळं खरं खरं बोलून रमेशनं एकदाचं आपलं मन मोकळं केलं आणि तो हमसून हमसून रडू लागला.

"हे बघ रमेश, मी आता बडो‌द्याला जाण्यास निघणार होतो. पण गाडी साडेतीन तास लेट असल्यामुळे तिकडे जाण्याचा प्लॅन रद्द केलाय. आता तू असं कर माझ्यासोबत घरी चल. उद्या आपण माझ्या एका मित्राच्या केंद्रात जाऊ. सगळं ठीक होईल. अरे बाबा, हे जीवन फार अमूल्य आहे, ते संपवायचा आपल्याला काहीच अधिकार नाही, जीवन सुंदर कसं करता येईल त्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत!" सरांचे आश्वासक बोल ऐकून रमेशला खूपच हायसं वाटलं. त्यानं गमावलेला आत्मविश्वास सरांच्या प्रेमळ शब्दांमुळे परत मिळायला मदत झाली.

'आनंद व्यसनमुक्ती केंद्र' प्रवेशद्वाराच्या कमानीवर लागलेला मोठा फलक बघत रमेश सरांसोबत आत गेला. तिथल्या फादर डेव्हीड यांनी त्यांचे हसत मुखाने स्वागत केले. रमेश आता बराच सावरला होता, त्याच्या चेहऱ्यावर आता तणावाचा लवलेशही नव्हता. एकमेकांशी ओळख करून घेण्याची औपचारिकता पूर्ण झाल्यावर फादर डेव्हीड यांनी अतिशय आपुलकीने आणि मायेने रमेशची विचारपूस केली. त्यानंही मग न संकोचता चुकीच्या मित्रांच्या संगतीने आपण कसे वाहवत गेलो आणि नकळत कशी आपल्या जीवनाची दिशाच हरवून बसलो हे फादर डेव्हीड यांना कुठलाही आडपडदा न ठेवता सांगितलं. त्यांनीही आस्थेनं सगळं ऐकून घेतलं.

        त्यानंतर थोडा विचार करत शांतपणे फादर डेव्हीड म्हणाले...

"तुला येथे आमच्यासोबत कमीत कमी तीन महिने काढावे लागतील. या तीन महिन्यात येथील दररोजच्या वेळापत्रकाव्यतिरिक्त एक रोजगाराभिमुख कोर्स सुद्धा तुला पूर्ण करावा लागेल. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्याची तुला निश्चितच मदत होईल!"

रमेश आता बराच सावरला होता, त्याच्या चेहऱ्यावर तणावाचा लवलेशही नव्हता.

तो फादर डेव्हीड यांना दोन्ही हात जोडून नम्रपणे एवढंच म्हणाला...

"फादर तुम्ही जे सांगाल, जसं ठरवाल अगदी तसंच मी वागण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार!"

     देसाई सर जागेवरून उठले. त्यांनी फादर डेव्हीडसोबत हसतांदोलन केलं. नंतर ते रमेशचा निरोप घेण्यासाठी त्याच्याकडे वळले. तोच रमेश सरांचा पाया पडण्यासाठी झुकला. त्याला खूप गलबलून आलं होतं! त्याचे डोळे आसवांनी डबडबले होते!

"सर... सर! तुमच्यामुळेच आज मला जगण्याची एक नवी दिशा लाभली आहे. तुमचे उपकार कसे फेडायचे तेच कळत नाही. सर मी... मला..!" त्याला पुढे बोलू न देता देसाई सरांनी रमेशचे दोन्ही खांदे धरून आपल्या हृदयाशी लावलं आणि मग त्याच्या पाठीवर थोपटत हसतच म्हणाले...

"अरे वेड्या, करता-करविता तो वरून सगळे बघतो आहे. त्याच्यावर विश्वास ठेव. तो तुला काहीही कमी पडू देणार नाही. आता आपलं पुढील आयुष्य भरभरून जग, माझा तुला कायम आशीर्वाद आहे, माझ्या सदिच्छाही सदैव तुझ्या पाठीशी आहेतच आणि हो कधी काही मदत लागली तर मला नि:संकोच कॉल कर!"

"खूप खूप आभारी आहे सर तुमचा! आता मी काय बोलू तेच कळत नाही!" रमेश दोन्ही हात जोडून सरांपुढे नम्रपणे उभा होता.

... विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

   मो. 9923797725


Monday, December 18, 2023

तेरी हंसी की किमत क्या है!

    तेरी हंसी की किमत क्या है 

      शेजारी राहणाऱ्या चौधरींचा मकरंद, दहा वर्षाचा गोड चुणचुणीत मुलगा. सदा हसतमुख. मित्रांशी गप्पा करताना खळखळून हसायचा. शाळेत कुठल्याही सरांच्या प्रश्नाचं हसूनच उत्तर देणं त्याच्या स्वभावाचा एक भाग बनला होता.

एक दिवस अचानक त्याच्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडली! शाळेच्या जिन्यावरून उतरताना मकरंद पाय घसरून पडला व घरंगळत सरळ खाली आला. त्याच्या डोक्याला, कपाळाला खूप मार लागला! जीव वाचला पण दृष्टी मात्र गेली. बरेच उपचार केले. एकाहून एक निष्णात डॉक्टरांना दाखवून झालं पण प्रतिसाद शून्यच! दृष्टी नसतानाही मकरंद लवकरच सावरला. नेहमीसारखाच सगळ्यांशी तो हसत बोलू लागला.

जवळपास नऊ वर्षांनी मकरंदच्या आयुष्यात चमत्कार घडला! त्याला अंधुकसं दिसायला लागलं. मग काही दिवसांच्या औषधोपचारांनी व एका छोट्या ऑपरेशनने त्याची दृष्टी पूर्ववत आली. डोळ्यावरची पट्टी काढताना त्याला वाटलं... 'आता सगळेच आपलं हसूनच स्वागत करणार!' मग हसऱ्या चेहऱ्यानं, उत्सुकतेनं, हळूहळू त्यांनं डोळे उघडले पण कसचं काय! प्रत्येकाच्या मुखकमलावर त्याला कमालीचा तणावच दिसला !

'रूसूबाई रूसू, कोपऱ्यात बसू! येऊ दे ना गाली तुझ्या खुदकन हसू!' हे गाणं बहुतेकांनी आपल्या बालपणी नक्कीच ऐकलं असणार. तसंच काहींनी ते अनुभवलंही असणार! म्हणजेच बालपणीचं हसू किती निर्मळ, निर्व्याज असतं, नाही? त्यात एकप्रकारचा प्रांजळपणा, सच्चेपणा असतो. म्हणूनच म्हणतात ना... 'मुलं म्हणजे देवाघरची फुलं!' नुकत्याच उमललेल्या, बहरलेल्या फुलांसारखं असतं छोट्या मुलांचं हसू... त्यात खोटेपणाचा लवलेशही नसतो!

मग जसजसं आपण मोठं होत जातो, तसतसं ओठावरचं हसू हळूहळू लुप्त व्हायला लागतं! शाळेत कुणा मित्राची फजिती झाली तर किंवा कुणी जिन्याच्या पायऱ्यांवरून चालताना पडला तर लगेच मोठ्यानं निलाजरं हसायचं असे प्रकार सुरू होतात. या अशा प्रकारातूनच मग कधीकधी आपापसात एकप्रकारची खुन्नस  निर्माण होते! त्यातूनच एकमेकांवर कुरघोडी करत 'कशी जिरवली' असा आव आणत खोटं खूनशी हसू काहींच्या चेहऱ्यांवर दिसू लागतं. शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देताना एखाद्या विद्यार्थ्यांची उडालेली भंबेरी बघूनही कित्येकांना आपलं हसू आवरत नाही!

     कालांतराने शाळेनंतर मग महाविद्यालयीन जीवनाची सुरूवात होते. तेव्हा मोठ्या शहरातील धनिकांची मुलं, छोट्या गावातून किंवा ग्रामीण भागातून आलेल्या नवख्या विद्यार्थ्यांच्या राहणीमानावरून, त्यांच्या भाषेवरून हमखासपणे हसताना दिसतात.... हे हसू निश्चितच कुत्सित किंवा छद्मी प्रकारातलं असतं! तसंच महाविद्यालयात नवीनच शिकवायला आलेल्या एखाद्या प्राध्यापकावर काही विद्यार्थी नको त्या प्रश्नांची सरबत्ती सुरू करतात. वर्गातील काही टारगट मुलं त्या प्राध्यापकालाच 'टार्गेट' करून पूर्णपणे 'हसी का पात्र' बनवून टाकतात! तसंच काही महाविद्यालयात 'रॅगिंग'चे प्रकारही बघायला मिळतात. तेव्हा तर प्रथमच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पार रडकुंडीला आणताना... 'आपण खूप मोठा पराक्रम गाजवला' अशा आवेशात कित्येक महाभाग दात काढत जल्लोष करताना दिसतात. असे प्रकार इतक्यात खूपच गंभीर स्वरूप धारण करत असल्याचं दृश्य दुर्दैवानं बघण्यात येतं!


कुणाच्या व्यंगावर, लाचारीवर, फजितीवर हसू नये! तसेच कुणाच्या गरीबीवर अन् संकटात असलेल्यांवर तर अजिबात हसू नये. उलट त्यांना काही मदत करता आली तर उत्तमच! आता बघा, आपल्या एखाद्या मित्राने हलकाफुलका विनोद केला तर त्यावेळी त्याला मनमुराद हसून दाद नक्कीच द्यावी, मात्र कुणाच्या व्यंगावरून पाणचट विनोद करायची काही गरज आहे का ? कुणाची भावना न दुखावता निखळ विनोदनिर्मिती करणं आजकाल फारच दुर्मीळ होत चाललंय हे इथं खेदानं नमूद करावं लागतं!

    'जिंदगी हसने गाने के लिए है' हे गाणं म्हणत सतत फिदीफिदी हसत राहणंही बरं नाही, तर या गाण्याचा मतितार्थ जाणून त्याप्रमाणे वागणंच खरं शहाणपणाचं! आपण आपल्या रोजच्या धावपळीत हल्ली सहजतेनं हसणंच विसरून गेलो आहे म्हणा ना... नाही म्हणायला सकाळी अनेक हास्य क्लबांमधून हसण्याचे विविध आवाज आपल्या कानी पडतात. मात्र त्या हसण्याला निर्व्याज, निखळ हसू म्हणू शकतो का आपण? बरं, एखादा विनोदी चित्रपट बघायला जायचं म्हटलं तर त्याची किंमत मोजूनच तो बघता येणार, नाही का...? म्हणजेच आता हसायलाही पैसे मोजावे लागतात असंच ना! कधीकधी अशाप्रकारचा विनोदी चित्रपट एकदम रटाळ, ज्यात ओढून ताणून तयार केलेले विनोद असतील तर मग काही विचारूच नका. त्यावेळी असा चित्रपट बघून, चित्रपटगृहातून बाहेर पडताना आपण स्वतःचंच हसू करून घेतो अगदी नाईलाजास्तव..!

     हसण्याने आपले आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते, हसण्यामुळे ताणतणाव कमी होतो हे सगळं ठीक आहे. मात्र त्यासाठी हसणंही नैसर्गिक हवं ना! ओढून ताणून चेहऱ्यावर हसू आणणं, आपल्या आजूबाजूचे हसतात म्हणून आपणही विनाकारण हसणं याला काय अर्थ? निर्भेळ, नैसर्गिक हसू सध्या लोप पावत चाललंय की काय अशी परिस्थिती सर्वत्र दिसत आहे! अशा गंभीर परिस्थितीला आपले आपणच कारणीभूत आहोत याबाबत कुणाचं दुमत नसावं. आता बघा ना... मूल अडीच तीन वर्षाचं झालं की त्याला शिक्षणाच्या नावाखाली नर्सरीच्या वर्गाला जुंपतो ते आपण सुजाण पालकच ना..! आपण पालक तर आपलं हसू हल्ली विसरतच चाललोय म्हणा...  मात्र आपल्या चिमुकल्या बाळाचंही नैसर्गिक, निर्व्याज, बालसुलभ हसू नकळत आपण हिरावत तर नाही ना? याची जाणीव ठेवण्याची आज खरी गरज आहे!

       हसा, अगदी खळखळून मनसोक्त हसा... कसलंही 'टेंशन' न घेता हसा. मात्र काळाचं, वेळेचं भान ठेवूनच आपण हसायला हवं. सर्कसमधील विदुषकाच्या निरनिराळ्या करामती बघून हसायला हवं. अस्सल व दर्जेदार विनोद निर्मितीला दाद देऊन दिलखुलासपणे हसायलाच हवं! नाहीतर आपल्या बघण्यात काही महाभाग असेही येतात... ज्यांच्या नाकावरची साधी माशीही उडत नाही. अगदी गुदगुल्या केल्या तरी यांना हसू येणार नाही! म्हणूनच आपल्यावर दुर्दैवानं कधीही अशी वेळ न येवो, की लोक नाईलाजाने विचारतील... "बता तेरी हँसी की किमत क्या है?"

किसी को दिल मे बसाकर तो देखो!कि

सी को थोडा हसाकर तो देखो!!

विनोद श्रा. पंचभाई

9923797725

Wednesday, December 13, 2023

माणूस म्हणून जगताना...

 


*माणूस म्हणून जगताना...* 

एक छोटासाच प्रसंग! दोन छोटी मुलं,असतील आठ दहा वर्षे वयोगटातील. शाळा सुटल्यावर आपापले दप्तर सांभाळत, बसची वाट बघत, आपापसात गप्पा मारत झाडाखाली उभी होती. त्यांचं संभाषण ओघानेच माझ्या कानावर पडलं...
"अरे चिन्या, म्हटलं आज माझा वाढदिवस आहे".
"मग तुझे बाबा तुझ्यासाठी केक आणणार का..?" चिन्याचा भाबडा प्रश्न.
" नाही रे राजा... माझी आई मस्त पैकी पुरणपोळी करणार आहे आज. मग मी बाबांची टोपी घालून पाटावर बसणार. आई मला ओवाळणार आणि हो बाबा माझ्यासाठी दहा रूपयेवाला मोठ्ठा चाँकलेट पण आणणार आहेत.त्यातला तुला मी उद्या नक्की देणार बरं का चिन्या!"
"हो...बस आली बघ माझी, भेटूया उद्या , चल" असं ओरडतच चिन्या बसमध्ये चढला. त्याच्या पाठोपाठ मीही चढलो.
  खरंच माणूस जन्माला आला की खरं निखळ आयुष्य हे बालपणीच उपभोगायला मिळतं. किती निरागसता अन् भाबडेपणा असतो तेव्हाच्या त्या वागण्यात!तेव्हा स्वार्थाचा व खोटेपणाचा  लवलेशही नसतो बोलण्यात, कारण त्या वयात विचार करून काहीच बोलावं लागत नाही ना... ना अहंकार, ना मत्सर! कुणाशी हेवेदावे नको की कुणावर कुरघोडी नको. एकमेकांवर रागावणं तेही काही मिनिटांपुरतं, मग गळ्यात गळे घालून पुन्हा जैसे थे! म्हणूनच संतांनी म्हटलं आहे,"लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा।"
कालांतराने जसजसे वय वाढत जाते, माणूस मग षडरिपूंच्या चक्रव्यूहात अडकला जातो. तेव्हा तो आपली सद्सद्विवेक बुध्दी गहाण ठेवून चुकीचे निर्णय घेण्यास अनेक वेळा बाध्य होतो.मग 'जोरोका झटका' लागला की त्याचे पाय जमिनीवर येतात पण तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. आपण ज्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो, मनापासून त्यांच्या वर प्रेम करतो, तेच कधी कधी असे वागतात की आपल्यालाच अपरिचित वाटू लागतात! आपलं नेमकं काय चुकलं ते आपलं आपल्यालाच कळत नाही. अशावेळी अपेक्षाभंगाचे जीवघेणे क्षण आपल्या अगदी जवळच्या माणसांकडून आपल्या वाट्याला येत असतात. अन् एक मात्र खरं, हे अपेक्षाभंगाचं दु:ख परक्या व्यक्ती कडून होणं शक्य नसतं. कारण अपेक्षा या केवळ आपल्याच माणसांकडून केल्या जातात... त्यांना आपले जवळचे समजून! आयुष्यभर आपण आपल्या माणसांसाठी जिवाचं रान करतो मात्र त्या प्रामाणिक प्रयत्नांचं योग्य चीज झालं नाही तर अपेक्षाभंगाचं दु:ख होणारच!कधी कधी असं वाटतं माणसांपेक्षा प्राणी परवडले...एखाद्या कुत्र्याला तुम्ही रोज साधं बिस्कीट खायला द्या, तुमची साथ द्यायला मग तो रात्रंदिवस तयार असतो.
  परमेश्वरानं दिलेलं बहुमुल्य जीवन जगत असताना आपलं शरीर हे नाशवंत आहे हेच नेमकं आपण विसरायला लागलो आहे. तरीसुध्दा त्याचा आपल्याला ताठा, अभिमान तरी किती..! क्रांतिकारी संत कबीरांचं वचन आहे...
"यह तन काचा कुंभ है,लिया फिरै थे साथ।
टपका लागा फुटि गया, कछू न आया हाथ।"
माणसाचं शरीर म्हणजे मातीचा कच्चा घडा आहे आणि ते खरंही आहे. या शरीराचा कुठल्याही क्षुल्लक कारणानं कधी नाश होईल हे कुणी सांगू शकतं का? कबीरजी पुढे म्हणतात...
"माटी कहे कुम्हारसे क्या तू रोंदे मोहे।
एक दिन ऐसा आवेगा मै रोंदूगी तोहे।"
अर्थात, कुंभारानं मातीला पायाखाली कितीही तुडवलं तरी त्याचंही शरीर एक दिवस त्या मातीतच जाणार असतं हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. त्यामुळे दुसऱ्यांचे दोष न बघता त्यांच्यातील केवळ गुण बघून त्याकडे आपण लक्ष दिलं तरच माणूस परक्यावरही, अगदी आपल्या शत्रुवरही प्रेम करू शकतो. नेमकं हेच वास्तव संत कबीरांनी पुढील दोह्यात प्रकट केलं आहे...
"बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलिया कोय।
जो दिल खोजा आपना,मुझसा बुरा न कोय।"
 इतरांचे दोष न बघता स्वतःमधीलच दोष शोधून ते नाहीसे करण्याचा प्रत्येक माणसाने प्रयत्न केला तर हे जग किती सुंदर होणार नाही का! रूढी, परंपरा, मानपान असल्या तद्दन फालतू गोष्टींसाठी आज माणूस, आपल्या माणसांपासून दूर होताना दिसतो. किरकोळ स्वार्थापोटी त्यांचा अहंभाव जागृत होताना दिसतो. काही दिवसांपूर्वीचा एका परिचिताकडील एका पारंपरिक सोहळ्यातील प्रसंग येथे नमूद करतो... बरीच आप्तेष्ट मंडळी आपल्या कुटुंबियासह सोहळ्याला जमलेली. काही सधन घराण्यातील, काही उच्च विद्याविभूषित तर काही आपले सर्वसाधारण मध्यमवर्गीय!तर अशा या भव्य सोहळ्यासाठी कोण कोण, काय काय कपडे परिधान करून आलं...कोण कुठली साडी नेसून आली याकडेच बहुतेकांचं जास्त लक्ष. बरं आजकाल "रिटर्न गिफ्ट्स"ची पध्दत असल्याने ते गिफ्ट तोडीस तोड मिळालं नाही तर पुन्हा रुसवे फुगवे, अबोला हेही ओघाने आलंच.अशावेळी "तुमचं फंक्शन गेलं खड्ड्यात, आमचा काही मानपान आहे की नाही" अशी टोकाची वाक्यं बोलायलाही माणसं कमी करत नाहीत.अन् अशाप्रकारच्या सोहळ्यात थोडी 'टाकून' आलेल्या व्यक्ती सामील झाल्या तर मग विचारायलाच नको. मग त्यांची उतरेपर्यंत गप्प बसण्याशिवाय पर्याय नसतो. यावेळी सामोपचाराने न घेता वाद वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले तर माणसं कायमस्वरूपी दुरावली जातात. मग त्यात "सुक्याबरोबर ओलंही जळतं" या न्यायाने ज्यांचा अशा प्रकारच्या घटनेस काडीचाही संबंध आलेला नसतो, त्यांनाही भुर्दंड सोसावा लागतो.
   असं म्हणतात, माणसं तोडायला एक क्षुल्लक क्षण पुरेसा ठरतो, पण माणसं जोडायला कित्येक वर्षे, तपं उलटतात!कधी कधी तर पिढ्यानपिढ्या अबोला, खुन्नस कायम 'टिकवलेली' असल्याची काही खानदानी कुटुंबाची परंपरा आपल्या बघण्यात येते. कारण काय तर घराण्याची इज्जत... वा रे इज्जत..! एकमेकांशी प्रेमाने बोलल्याने, मधुर व्यवहार केल्याने 'यांची' इज्जत जाते. त्यापेक्षा गरीब बिचारे मुके प्राणी गुण्यागोविंदाने गावागावात बागडताना दिसतात.
      "कोण दिवस येईल कसा कोण जाणतो?" या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या उक्तीप्रमाणे येणारा काळ खरंच खूप कठीण आहे. 'माणूस' म्हणून जगताना आपल्या समोरचाही 'माणूसच' आहे याचे आपण सदैव भान ठेवायला हवे. आणि एक दिवस कधीतरी अचानक आपल्याला शेवटच्या प्रवासाला "जाणे" आहे याची जाण सुद्धा ठेवायला हवी. भिन्न भिन्न परिस्थिती, संकटे ही थोड्याफार फरकाने प्रत्येकावरच येत असतात. त्यावर मात करण्यासाठी आज माणसातील "ईन्सानियत"ची खरी गरज आहे.

"माणसाने माणसाशी
 माणसासारखे वागावे।
स्वार्थासाठी नाही तर
 परोपकारासाठी जगावे।

           .....विनोद श्रा.पंचभाई, पुणे
                 मो.क्र.९९२३७९७७२५

अंतिम सत्य

  अंतीम सत्य..

 काही दिवसांपूर्वी एक विलक्षण बातमी वाचण्यात आली... आँस्ट्रेलिया देशाचे एक मोठे शास्त्रज्ञ डॉ. डेव्हिड गुडाल वय वर्षे अवघे १०४ नाबाद! त्यांना इच्छामरण हवं होतं. मात्र तिथलं सरकार त्यांच्या कायद्याप्रमाणे इच्छामरणासाठी त्यांना परवानगी द्यायला तयार नव्हतं! मग त्यांनी एक शक्कल लढवली आणि स्वित्झर्लंड देश गाठला. तेथील कायद्यानुसार आपल्या इच्छामरणाची परवानगी मिळवली आणि आपलं आवडतं संगीत "बिथोवन" ऐकत त्यांनी धीरोदात्तपणे मृत्यूला कवटाळलं ! म्हणजेच डॉ. डेव्हिड गुडाल अगदी कसलंही भय न बाळगता या जगातील अंतीम सत्याला सामोरे गेले..!

        आज जगाच्या पाठीवर अशी एकही व्यक्ती नसेल, ज्याला मृत्यूचं भय वाटत नाही. अपवाद म्हणून एखादा सिद्धी प्राप्त असलेला महापुरुष किंवा ज्याला आपण 'विदेही संत' ही उपाधी देतो त्यालाच फक्त जीवन आणि मृत्यू सारखेच! मात्र आज तरी अशी शक्यता फारच कमी आहे. कारण एवढ्यात अनेक प्रकारचे बाबा तसेच देवासोबत 'डायरेक्ट' बोलण्याचा आव आणणारे साधू अन् संधीसाधू बरेच दिसतात. नंतर त्यांच्यामधला ढोंगीपणा उघडकीस आला की हे बाबा अचानक अंतर्धान पावतात!

"मृत्यू हे अंतीम सत्य आहे" असं कुणातरी महापुरुषाने म्हटलं आहे, अन् हे त्रिकालाबाधित सत्य कुणीही नाकारु शकत नाही. कारण मृत्यूनंतर माणूस नेमका कुठे जातो ? याचा शोध सध्यातरी लागलेला नाही ! शेवटच्या घटका मोजणाऱ्यालाही मृत्यूचं भय असतंच... तसंच लहानमोठा, गरीबश्रीमंत, दुबळा बलवान कोणीही असो, एखादं जीवघेणं संकट समोर आलं की तो मृत्यूच्या भयानं एकदम गर्भगळीत होतो ! अगदी स्वतःला नास्तिक म्हणवणाराही अशावेळी त्या परमेश्वराची प्रार्थना करताना दिसतो. काही जण तर 'देवा, मला या जीवघेण्या संकटातून वाचव रे बाबा... मी तुझ्या नावानं सगळ्यांंना पाच किलोचे पेढे वाटणार' अशी लालूच प्रत्यक्ष ईश्वरालाच दाखवतात!

  आजकाल रोजच्या धावपळीत सर्वसामान्य माणसाला कितीतरी समस्यांना तोंड द्यावं लागतं. मग त्या समस्यांना वैतागून कधीकधी 'नको हे जीवघेणं जगणं' असंही वाटतं. अशा जगण्याला कंटाळून एखादा विहिरीत उडी मारतो. नंतर नाकातोंडात पाणी गेलं की प्राणभयानं 'वाचवा कोणी तरी मला' म्हणून मोठ्या आवाजात आरडाओरडा पण करतो ! असं म्हणतात, माकडीण जेव्हा पाण्यात बुडू लागते तेव्हा आपल्या पोटच्या पिलाला सुद्धा पायाखाली घ्यायला कमी करत नाही..! म्हणजेच मृत्यूचं भय हे जगातील प्रत्येक प्राणीमात्राला असतेच, ते कोणी नाकारु शकत नाही.

    दैनंदिन जीवनात कधी हसत खेळत तर कधी काहीशा तणावात सगळ्यांंचा रोजचा संसार सुरू असतो. एक दिवस अचानक फोन येतो. आपला जवळचा नातेवाईक किंवा मित्र आपल्याला 'सोडून गेल्याची' बातमी मिळते. मग आपण आपली कामं सोडून तिकडे जातो. तेथे पोहचल्यावर तेथील वार्तालाप तसंच विलाप आपल्या कानावर पडतो. त्याचं 'जाण्याचं' वय नसताना मित्र अचानक गेल्यामुळे आपल्याला सुद्धा वाईट वाटतं ! तेव्हा आता यानंतर आपलाच 'नंबर' आहे की काय... अशी एक अनामिक भीती पण आपल्याला वाटायला लागते! जे आपण कधीही टाळू शकत नाही असं हे कधीतरी अचानक घडतं. अगदी क्षणभरातच होत्याचं नव्हतं होऊन जातं , अन् आपण नुसतं बघत बसण्याशिवाय काहीही करु शकत नाही. खरंच किती सामर्थ्य असतं ना या मृत्यूमध्ये ... या अंतीम सत्यात !

  " देही नित्यमवध्यो$यं देहे सर्वस्य भारत। 

     तस्मात्स अर्वाणि भूतानी न त्वं शोचितुमर्हसि।।"

अर्थात...'सर्वांच्या देहातील आत्मा हा सर्वदा अवध्य आहे. म्हणूनच कोणाच्याही मृत्यूविषयी शोक करणे योग्य नाही!' या भगवद्गीतेतील श्लोकाचा मतितार्थ लक्षात घेतला तरी आपल्या जवळची, लोकप्रिय किंवा अगदी जिवाभावाची व्यक्ती अचानक 'निघून' गेल्यावर जाणत्या लोकांनाही आपला शोक आवरणं कठीण होऊन जातं ! मात्र मृत्यूबद्दल संतांनी "मृत्यूसारखा सखा नाही!" असंही संबोधलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत म्हटलं आहे...

"मृत्यूसंस्काराचा ऐका खुलासा। लोक मृत्यूशी समजती भलतिसा। मी म्हणतो मृत्यूजैसा। उत्तम नाही कोणी।।

जैसी नदी सागरासि मिळे। सोडोनि भेदभाव कष्टबळे।तिचे कार्यचि होते सगळे। मिळण्यासाठी सागरी।।"

      म्हणूनच संतांनी सांगितल्याप्रमाणे सरळपणाचं जीवन जगण्यातच खरा आनंद आहे. त्यातच खरे समाधान आहे. आपल्या इतिहासाची प्रत्यक्ष साक्ष आहे... आजपर्यंत अनेक धुरंधर राजेमहाराजे, रथीमहारथी येथे होऊन गेलेत. त्यांनी अनेक लढाया लढल्या. कोणी कपटाने तर कोणी कुटनीतीचा वापर करून कित्येक राज्यं पादाक्रांत केली. पण शेवटी सगळे धुळीलाच मिळाले ! सम्राट अशोकासारखा एखादा कलिंगच्या युध्दानंतर थोडा 'सावरला'. मग त्यानं भगवान बुद्धांंनी सांगितलेल्या मार्गाचं जन्मभर आचरण केलं. म्हणूनच त्याचं नाव संपूर्ण भारतात आदरानं घेतलं जातं. म्हणजेच काय तर शेवटी या भूतलावर कोणी तरी अदृश्य पण पवित्र शक्तिची अबाधित सत्ता अस्तित्वात आहे. कोणी तिला राम म्हणतो तर कोणी रहीम म्हणतो. कोणी स्वामी समर्थ तर कोणी साईबाबा म्हणत असतो ! तरीही आज समाजात आपल्याला सर्वत्र भोंदूबाबांचे किंवा महाराजांचे जाळे अन् त्यात आयतेच फसत गेलेले साधेभोळे भाविक दिसून येतात. दिवसाआड आपण वर्तमानपत्रात बातम्या वाचतो... 'आज या बाबाचे पितळ उघडे पडले' ... 'त्या महाराजाचा पर्दाफाश झाला!' एवढे घडून सुद्धा  त्यांच्या भूलथापांना बळी पडणाऱ्या भक्तांची संख्या काही कमी होताना दिसत नाही, हे दुर्दैवच..!

           अशा प्रकारच्या या बाबांना शरण जाणाऱ्या भाविकांना त्यांच्या मार्फत 'मोक्ष'ही हवा असतो अन् 'मोह'ही सुटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ज्यांच्या तनमनातच रावण भरलेला असताना, असे भक्त राम दर्शनासाठी अशा प्रकारच्या भोंदूबाबांच्या मागे लागतात. किती ही अगतिकता..! आपल्या महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील किती तरी संतांनी त्यांच्या पवित्र ग्रंथसंपदेतून आपल्यासाठी ज्ञानाचे, मोक्षप्राप्तीचे भांडार खुले करून ठेवले आहे. त्याचा लाभ घेण्याचं सोडून भोळे भाविक नको त्या मोहात अडकले जातात , अन् 'लोभापायी दरिद्री' या उक्तीप्रमाणे आपलं सर्वस्व गमावून बसतात!

        सांगायचा मुद्दा असा की, आजच्या धावपळीच्या जीवनात, आपल्याला नको त्या ताणतणावाला सामोरं जावं लागतं. मग हा तणाव हलका करण्यासाठी आपण निरनिराळे मार्ग शोधत असतो. कोणी दारू किंवा गांजा जवळ करतात, तर कोणी इतर दुसऱ्या व्यसनांना बळी पडतात. मात्र सरळ साधी माणसं निर्मोही अध्यात्माकडे वळताना दिसतात! त्यांनी जर थोडं सावधपणे पाऊल टाकलं तर या गल्लाभरू बाबांचं अजिबात फावणार नाही हे निश्चित! खरंतर अगदी निर्भयपणे मनापासून तुम्ही त्या जगन्नियंत्याचं केवळ नामस्मरण जरी केलं तरी तुम्हाला ती अद्भूत शक्ती नक्कीच मदत करणार यात शंका नाही. आणि मग कुणा बाबा, महाराज यांच्यामागे जाण्याची गरज उरणार नाही... म्हणजेच पर्यायाने सारखं मृत्यूचं भय वाटणार नाही..! 

   ........  विनोद श्रा. पंचभाई , 9923797725