Sunday, August 29, 2021

माझी नोकरी माझा अभिमान

 माझी नोकरी माझा अभिमान... 


सूर्य पश्चिमेकडे कलला होता. पुण्याला जाणारी सर्वसाधारण बस लोणावळा एस. टी. बस स्थानकावरून नुकतीच सुटली होती. कोरोनाच्या संसर्गामुळे बसमधील प्रवाशांची संख्या तशी नगण्यच होती. थोड्याच वेळात मळवली गावाच्या थांब्यावर बस थांबली. दोन स्त्रिया बसमध्ये चढल्या आणि महिला कंडक्टर असलेल्या पल्लवी पाटील हिनं डबलबेल वाजवताच बस मार्गस्थ झाली. दोन्ही स्त्रिया तिच्याकडे बघतच राहिल्या त्यातील एकीनं न राहवून विचारलं... 

"ताई तुम्ही या बाळाला सोबत घेऊन ड्यूटी करताय, कमाल आहे तुमची... याला सांभाळायला घरी नाही का कुणी?"

"त्याचं काय आहे काकू, आता सवयच झालीय, आणि बाळ त्याच्या आईसोबतच हवं ना! बरं तुम्हाला कुठं जायचंय अन् मास्क कुठंय तुमचा? "

"दोन तळेगावची तिकीटं द्या. मास्क गडबडीत विसरले बघा ताई!"

"बरं हा घ्या मास्क माझ्याकडून... आधी व्यवस्थित लावून घ्या अन् ही तिकीटं धरा." तिकीटं दिल्यावर पल्लवी पैसे मोजत म्हणाली. 


कामशेत बोगदा ओलांडल्यानंतर बस पुन्हा थांबली. चार पाच मजूर बसमध्ये चढण्याच्या तयारीत होते. विशेष म्हणजे कुणाच्याही चेहर्यावर मास्क नव्हते. ते लक्षात येताच पल्लवी म्हणाली... 

"काका, तुम्ही दिवसभर इथं मजूरी करता... कुणासाठी? आपल्या कुटुंबासाठीच ना! मग त्यांच्या जिवाची काळजी नाही का तुम्हाला? तुम्ही स्वतः मास्क लावत नाहीत, त्यामुळे तुम्हाला तर धोका आहेच शिवाय तुमच्यापासून इतरांना सुध्दा तुम्ही संकटात टाकणार. हे घ्या, तुम्ही सगळे आधी हे मास्क चेहर्यावर लावून घ्या आणि नंतरच बसमध्ये चढा."

पल्लवीनं दिलेले मास्क हाती घेऊन त्यांच्यातील एक मजूर म्हणाला, "थॅंक्यू दीदी! हम लोग पत्थर फोडने की मजदूरी करते है ना... तब बहोत पसीना आता है और सांस भी फुलती है... इसीलिए हम मास्क उतारकर रख देते है! "

"हां दीदी, सुबह हम सब मास्क लगाकरही आये थे यहां ... अभी ये बस पकडने के चक्कर मे जल्दीमे वहीं छुट गये!" दुसरा मजूर चेहर्यावर मास्क लावत म्हणाला. 

"ठीक आहे, बसून घ्या आत. कुठं जाणार तुम्ही सगळे? पुणे स्टेशन ना?" पल्लवीनं आपल्या बाळाला थोपटत विचारलं. 

"नही दीदी, देहू रोड दिजीये पांच टिकट.. " पाचशेची नोट पल्लवीकडे देत एक मजूर पुढं म्हणाला, "वो आपके मास्क का पैसा भी इसीसे काट लिजीये।"

"ओ काका! मास्क मी माझ्यातर्फे दिलेय... मला माझ्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची काळजी आहे म्हणून... आणि तुम्ही सुट्टे द्या की!" पल्लवी आवाज वाढवत म्हणाली. एव्हाना बसने वेग धरला होता. मग सर्व मजूरांनी आपापले पैसे काढून मोजले अन् नेमके तिकीटांचे पैसे पल्लवीकडे सुपुर्द केले. तिनं लगेच त्यांना तिकीटं दिली आणि एकदा पाठीमागे नजर टाकली. बाहेर पूर्ण काळोख असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचे हेडलाईट्स तेवढे चमकताना दिसत होते. 


काही वेळानं भरधाव वेगाने धावणाऱ्या बसचा वेग अचानक कमी झाला. ते लक्षात येताच पल्लवीनं मान उंचावून समोर बघितलं. समोर थोड्या अंतरावर थांबलेली वाहनं तिला दिसली. तिचं बाळ मांडीवर झोपलं होतं. त्यामुळे जागेवरून न उठताच तिनं बसचालकाला मोठ्या आवाजात विचारलं... 

"शिंदे काका काय झालं असणार हो पुढं? "

"आत्ताच काही सांगता येणार नाही! " रस्त्यावरची आपली नजर न हटवता बसचालक शिंदे म्हणाले आणि त्यांनी समोरच्या वाहनाचा अंदाज घेत हळूहळू बस थांबवली. समोर थांबलेल्या ट्रक्स, मोटारींची रांग दिसत असल्याने ते बाजूचा दरवाजा उघडून बसखाली उतरले. बस थांबल्याचं लक्षात येताच काही प्रवासी सुध्दा त्यांच्या जागेवरून उठले अन् दरवाज्याकडे निघाले. ते बघून पल्लवीनं त्यांना बजावलं... 

"आपापले मास्क न काढता सावकाश उतरा, बाहेर अंधार पसरला आहे... आणि आपल्या या बसकडे लक्ष असू द्या. पुढची वाहनं निघाली की कधीही आपली बस सुटणार!"


काही वेळाने बसचालक शिंदे परत येऊन आपल्या जागेवर बसले आणि मागे वळून म्हणाले... 

"बरं का पल्लवी, पुढं मोठा अपघात झाला आहे... लक्झरी बस अन् कंटेनर ट्रकमध्ये! उभ्या असलेल्या कंटेनरवर लक्झरी जाऊन धडकली असणार, कारण बसच्या पुढील भागाची पार वाट लागलीय."

"क्.. काय... बापरे! खूपच भयंकर अपघात झालेला दिसतो." घाबरतच पल्लवी बोलली. 

"हो ना... आता दोन्ही वाहनं बाजूला काढेपर्यंत आपण अडकलो की! पोलीस आणि अॅंब्युलन्स त्याठिकाणी पोहोचले आहेत म्हणा मदतीला... त्यामुळे लवकर सगळं सुरळीत होईल अशी आशा करूया..." बसचालक शिंदे बरंच काही बोलत होते मात्र पल्लवीचं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. तिनं आपले डोळे मिटून घेतले अन् विचार करू लागली. मग तिच्या डोळ्यासमोर भूतकाळ तरळला...

 ... ऐन सांजवातीच्या वेळेला तिचा मोबाईल वाजला होता. मोबाईल उचलताच त्यावर तिला निरोप मिळाला, 

"पल्लवीताई लवकरात लवकर ससूनला पोहोचा. तुमच्या नवर्याच्या बसला अपघात झालाय. त्यांना आय.सी.यू. मध्ये दाखल केलंय."


ससून रूग्णालयातील संध्याकाळची जीवघेणी वेळ! पल्लवी घाईघाईनं छोट्या चिन्टूसह आय.सी.यू. वाॅर्डाच्या दिशेनं चालत होती. एका अनामिक भीतीनं तिचा जीव वरखाली होत होता! वाॅर्डाच्या प्रवेशद्वारात तिला अडवण्यात आलं. वाॅचमननं तिला सांगितलं, डॉक्टरांच्या टीमचा वाॅर्डात राऊंड सुरू आहे. तिला आता प्रतीक्षा करण्याशिवाय इलाज नव्हता. ती बाजूच्या एका बाकड्यावर जाऊन बसली. मात्र तिचे डोळे आय.सी.यू.च्या प्रवेशद्वाराकडे लागले होते. काही वेळाने तिनं छोट्या चिन्टूला आपल्या मांडीवर बसवून डोळे मिटून घेतले. मनात ना- ना विचारांनी थैमान घातलं होतं... कसा झाला असेल अपघात? एवढी सावध ड्रायव्हिंग असूनही नेमकं काय चुकलं असणार यांच्या हातून? बसमधील सर्व प्रवाशांच्या जीवाची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे, असं हे कितीदा तरी बोलले असतील! आजपर्यंतच्या आयुष्यात साध्या सायकलचाही अपघात यांच्या हातून झाला नाही. मात्र आजच कसं हे विपरीत घडलं? निरनिराळ्या विचारांनी पल्लवीचं मन कासावीस झालं होतं! तेवढ्यात कुणीतरी बोलत असल्याचा आवाज तिच्या कानावर पडला अन् तिनं डोळे उघडले. आपसात बोलत असलेले पाच सहा डॉक्टर आय.सी.यू. वाॅर्डातून बाहेर पडताना तिला दिसले. ती लगबगीने उठली. छोट्या चिन्टूला तिनं उचलून घेतलं अन् अक्षरश: पळतच ती आय.सी.यू. वाॅर्डाच्या दिशेनं आत गेली. चपला बाहेर काढून ठेवण्याचंही तिला भान नव्हतं. आत गेल्यावर तिथल्या एका सिस्टरनं पल्लवीला चपला बाहेर काढून येण्यास बजावलं. बाहेर चपला काढून ती लगेच आत गेली तेव्हा तिच्या नवर्याचा, संदीपचा बेड तिला डाव्या बाजूला दिसला. 


एका हाताला सलाईनची नळी तर दुसऱ्या हाताला रक्ताच्या बाटलीतून पुरवठा करणारी नळी जोडलेली, कपाळाला विशिष्ट प्रकारचा पट्टा बांधून त्याचं कनेक्शन बाजूला ठेवलेल्या मोठ्या मशीनला जोडलेलं होतं. नाकातोंडावर ऑक्सिजनचा मास्क एवढं सगळं बघून पल्लवी गांगरली आणि ती जागेवरच थबकली! त्याक्षणी तिला वाटलं, आपण आता चक्कर येऊन तर पडणार नाही ना ... पण तिनं स्वतःला कसंबसं सावरलं. तेवढ्यात तिच्याजवळ एक सिस्टर आली अन् तिच्याकडे छोटा कागद देत म्हणाली...

 "तुम्ही यांच्या मिसेस ना... हे बघा, आताच डॉक्टरांनी हे इंजेक्शन्स लिहून दिले आहेत. तुम्ही लगेच बाहेरून घेऊन या."

थरथरत्या हातांनी पल्लवीनं सिस्टरच्या हातातील कागद घेतला. तिच्या डोळ्यात आसवं तरळली. तिनं रडवेल्या स्वरात सिस्टरला विचारलं, 

"ही इंजेक्शन्स इथं मिळणार नाही का सिस्टर? माझ्याकडे जास्त पैसे नाहीत हो!"

"हे बघा, शक्यतो आम्ही इथलीच औषधं वापरत असतो. तुमच्या पेशन्टला आता आवश्यक असणारी ही इन्जेक्शन्स आमच्याकडे नाहीत. कळलं का? तुमच्या परिचितांपैकी कुणाला फोन करून बघा अन् तातडीनं मागवून घ्या... पेशन्टची कंडीशन क्रिटिकल आहे." सिस्टरचं बोलणं ऐकून पल्लवीला धक्काच बसला. तिला काही सुचत नव्हतं. मग विचार करत, आपल्या बाळाला सांभाळत ती बाहेर निघाली. मोबाईल काढून तिनं मगाशी अपघाताचा निरोप मिळालेल्या नंबरवर काॅल लावला. पलीकडून लगेच आवाज आला... 

"हॅलो मी शेवाळे बोलतोय... तुम्ही पोहचलात का ससूनला?"

"हो काका! इथं थोडा प्राॅब्लेम आलाय मला... डॉक्टरांनी त्यांच्या राऊंडच्या वेळी यांच्यासाठी काही इंजेक्शन्स लिहून दिले आहेत. ते बाहेरून घ्यायला सांगितले पण माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत हो!"

"हे बघा काळजी करू नका तुम्ही... आम्ही आताच तिथून परतलो. मगाशी संदीपसाठी तिथं ऑक्सिजनची सोय लावून दिली अन् आमच्या काही बांधवांनी रक्तदानही केलं. मी तुमच्यासाठी मदत म्हणून पैसे पाठवतो. तुम्ही तिथंच आय.सी.यू.च्या गेटजवळ थांबा."

धन्यवाद काका... पण तुम्ही कोण बोलताय..?" पल्लवीनं उत्सुकतेनं विचारलं. 

"मी एसटी आगार प्रमुख शेवाळे! आज संदीपला त्याच्या छोट्याशा चुकीची खूप मोठी किंमत मोजावी लागली... "

"कसली चूक केली त्यांनी? " शेवाळे बोलत असतानाच पल्लवीनं अधीर होत मध्येच विचारलं. 

"नेहमी सेफ ड्रायव्हिंग करणार्या संदीपनं हायवेवरून परत येताना का कुणास ठाऊक एका टेम्पोला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि अचानक समोरून वेगात येणाऱ्या ट्रकला त्याची बस धडकली!"

"अरे देवा! काय करून बसले हे... " पल्लवी कसंतरी एवढंच बोलू शकली आणि थरथरत शेजारच्या बाकड्यावर विसावली मग ती भींतीला टेकून बसली. त्यावेळी ती शेवाळेंचं पुढचं बोलणं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती... तिला वाटलं, आपल्याभोवती अख्खं जग फिरतंय अन् आपण कुठंतरी जोरात आपटणार!


दोन दिवस झाले तरी संदीप शुध्दीवर आला नव्हता. 

डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. एस. टी. चे आगार प्रमुख शेवाळे आणि काही सहकारी तिथं अधूनमधून येऊन जायचे. आदल्या दिवशी पल्लवीचे सासू सासरे पोहोचल्यामुळे तिच्या बाळाला सासूनं आपल्या ताब्यात घेतलं होतं. पल्लवीची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. मागील दोन दिवसापासून ती जागची हलली नव्हती. तिच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. हताशपणे आपल्या नवर्याकडे डोळे लावून बसल्याने तिचा चेहरा सुजला होता, डोळे लालभडक दिसत होते! मग काही वेळाने त्याच संध्याकाळी संदीपच्या आयुष्याचीही संध्याकाळ झाली! शुध्दीवर न येताच त्याची प्राणज्योत मालवली... पल्लवीनं फोडलेला हंबरडा ऐकून अख्ख्या आय.सी.यू. वाॅर्डाचा परिसर न्थरारला! त्यादिवशी दुपारपासून तिला सोबत करणार्या तिच्या आईनं तिला सावरण्याचा प्रयत्न केला. या धक्क्यातून सावरायला पल्लवीला बरेच दिवस लागले. म्हणतात ना... कुठल्याही दु:खावर एकच रामबाण औषध आहे, ते म्हणजे काळ! काही काळ, पुरेसा अवधी लोटला की दु:खाची तीव्रता कमी होते. दु:ख पचवण्याची ताकद आपसूकच माणसात निर्माण होते. पल्लवीच्या बाबतीतही हेच घडलं! 


घरच्या परिस्थितीमुळे पल्लवीला बारावी उत्तीर्ण झाल्यावर आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. नंतर अनुरूप स्थळ चालून आल्यामुळे तिच्या घरच्यांनी तिचं लग्न उरकलं. त्यामुळे काहीतरी करून दाखवण्याच्या पल्लवीच्या इच्छा, आकांक्षा अपुर्याच राहिल्या. तरीही तिनं तक्रार न करता आलेल्या परिस्थितीचा सामना करत आपला संसार फुलवला. सगळ्यांशी जुळवून घेतलं. मात्र संदीपच्या अचानक निघून जाण्यानं आता ती पार खचून गेली होती! सर्व सोपस्कार आटोपल्यानंतर पल्लवी आपल्या दोन वर्षांच्या बाळासह आईकडे राहायला आली. मात्र काही दिवसातच आईसोबत राहत असलेल्या नोकरीपेशा विधवा वहिनीचे टोमणे 

तिच्या कानी पडू लागले. परिस्थिती माणसाला सगळं सहन करायला शिकवते पण पल्लवीचा स्वाभिमान तिला स्वस्थ बसू देत नव्हता. म्हणूनच वास्तवाचं भान ठेवत तिनं आपल्या बाळासाठी, स्वतःसाठी काहीतरी करायचं ठरवलं. आता ती वेळ आली होती! 


राज्य परिवहन महामंडळाचे आगार प्रमुख शेवाळे यांच्या सतत संपर्कात असल्यामुळे पल्लवीला निरनिराळ्या प्रकारच्या नोकऱ्यांबाबत बरीच माहिती मिळाली. मग तिनं काही कंपन्यामध्ये नोकरीसाठी अर्ज केले. केवळ बारावीपर्यंतचं जुजबी शिक्षण आणि कॉम्प्युटर किंवा आय.टी.आय.सारखं औद्योगिक शिक्षण नसल्यानं तिला नकार मिळू लागले. तरीही तिचे प्रयत्न सुरूच होते. नंतर काही दिवसांनी राज्य परिवहन महामंडळात कंडक्टरच्या जागा निघाल्याचं तिला शेवाळे यांच्याकडून कळलं. त्यात महिलांसाठीही काही जागा राखीव होत्या. पल्लवीनं लगेच त्यांची भेट घेतली आणि आवश्यक ते फाॅर्म्स भरून कंडक्टरच्या जागेसाठी अर्ज दाखल केला. दोन महिने उलटल्यावर तिला मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं. त्यादरम्यान पल्लवीला आगार प्रमुख शेवाळेंचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. परिणामी तिची मुलाखत छान पार पडली. तिनं हजरजवाबीपणे दिलेल्या उत्तरांनी परीक्षक चांगलेच प्रभावित झाले. त्यांच्या शेऱ्यामुळे तिची कंडक्टर पदासाठी निवड करण्यात आली. 


आनंदातच पल्लवी घरी परतली. तिनं महिला कंडक्टरच्या पदासाठी आपण सिलेक्ट झाल्याची बातमी आईला दिली. मात्र तिला ती तितकीशी रूचली नाही. संध्याकाळी तिची वहिनी घरी आल्यावर आईनं आपली चिंता व्यक्त केली... 

"त्या एसटी खात्यात सगळे पुरूषच नोकरी करताना दिसतात गं! खरंच तुला झेपणार का ही नोकरी? पल्लू जरा विचार करून बघ बाई..!"

मग संधी मिळताच वहिनी तिला म्हणाली... 

"बसमध्ये अनेक प्रकारचे लोक प्रवास करत असतात. त्यात कधीकधी व्यसनी आणि बेवडे सुध्दा असतात. त्यांच्यासमोर तुझा निभाव लागणं अवघड आहे!"

दोघींचं बोलणं पल्लवीनं शांतपणे ऐकून घेतलं. ती अजिबात नाउमेद झाली नाही. उलट आव्हान म्हणून ही नोकरी करायचीच असा दृढ निश्चय तिनं मनोमन करून टाकला. नंतर दोघींकडे पाहत ती ठामपणे म्हणाली... 

"मला वाटतं, तुम्ही दोघींनीही डॉ. अब्दुल कलाम यांचं 'अग्निपंख' हे आत्मचरित्र वाचलं नाही. ते म्हणतात... 'सतत सक्रिय रहा. जबाबदारी स्वीकारा. नाविन्याची कास धरा. आपल्या कामावर विश्वास ठेवून नेहमी कार्यरत रहा!' आई तुला सांगते, मी ही नोकरी आव्हान म्हणून स्वीकारणार आहे. मी तसं ठरवलंच आहे. तू माझी अजिबात काळजी करू नकोस!" 


काही दिवसातच पल्लवी तिच्या कामावर रूजू झाली. मग प्रशिक्षण कालावधीही तिनं व्यवस्थितपणे पूर्ण केला. तिथं दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून प्रामाणिकपणे आपली नोकरी करायची हे तिनं निश्चित करून टाकलं. कधी एकदा आपण स्वतंत्रपणे कंडक्टर म्हणून बस हाताळणार असं तिला झालं होतं. सुरूवातीला जवळपासच्या फेऱ्यासाठी तिला पाठवलं जायचं. अशातच एकदा बसमध्ये असताना तिचा मोबाईल वाजला. पलीकडून शेवाळे बोलत होते... 

"काय म्हणतेस पल्लवी, कशी सुरू आहे नोकरी?"

"सर एकदम मस्त! खूप भारी वाटतंय... आता बसमध्येच आहे. तुम्ही कसे आहात?"

"मी ठीक आहे. तुझा हा सकारात्मक दृष्टीकोन खूप छान वाटला. एक नेहमी लक्षात ठेव... आपली नोकरी आपल्यालाच करायची आहे. त्यामुळे ती रडत कुढत न करता हसत खेळत कशी करता येईल हाच आपला प्रयत्न ठेवायचा, एवढंच तुला सांगायचं होतं!" 

"हो सर! तुम्ही सांगितलेलं नक्कीच ध्यानात ठेवणार मी."

"तू मला आधीसारखंच काका म्हटलं तरी चालेल! आणि हो, नोकरी करताना काही अडचण आल्यास कसलाही संकोच न बाळगता मला सांगायचं." शेवाळे म्हणाले. त्यावर पल्लवी हसतच म्हणाली... 

"तुम्ही आता माझे अधिकारी आहात सर... अन् मी यावेळी नोकरीवर असल्यानं तुम्हाला सरच म्हणणार ... सध्या मला इथं कसलीही अडचण नाही आणि मला वाटतं, ती पुढेही येणार नाही. कारण कंडक्टरची ही नोकरी मला आवडली आहे अन् माझ्या नोकरीचा मला अभिमान वाटतो सर!"

"व्वा पल्लवी... व्हेरी गुड! तुझ्या आयुष्यात तू नक्कीच खूप प्रगती करणार! माझा आशीर्वाद आहे तुला... चल मी ठेवतो फोन, काळजी घे."

"खूप खूप धन्यवाद सर!" पल्लवी म्हणाली. मग मोबाईल खाकी शर्टच्या खिशात सरकवत ती खिडकीतून बाहेर बघायला लागली... 


आपल्याच विचारात मग्न असलेली पल्लवी बसचालक शिंदेच्या आवाजानं भानावर आली... 

"पल्लवी सगळे पॅसेंजर आले असतील तर दरवाजा लावून घे ना!"

"हो, हो शिंदे काका! वाहतूक सुरळीत झालेली दिसतेय." समोरून येणारी वाहने बघत पल्लवी म्हणाली अन् बसमधील प्रवाशांची खात्री करण्यासाठी तिनं सर्वत्र नजर फिरवली. मग दरवाजा लावून घेत तिनं डबलबेल वाजवली ... शिंदेंनी बस सुरू केली. थोड्याच वेळात बस भरधाव वेगात धावू लागली. त्यामुळे आता हवेत गारवा जाणवत होता. पल्लवीनं खिडकी लावून घेतली आणि आपल्या अडीच - तीन वर्षाच्या बाळाकडे पाहत त्याच्या भविष्याचं नियोजन करण्यात मश्गुल झाली! 


पोलिसांच्या समस्या आणि त्यांची मानसिकता

 

पोलिसांच्या समस्या आणि त्यांची मानसिकता

प्रसंग पहिला...

"मॅडम तुम्हाला कळत नाही का, आपलं खातंं हे शिस्तीचं खातं आहे... इट्स डिसीप्लीन फोर्स! तुम्ही दोन दिवसांची रजा घेऊन गेल्यानंतर आज चौथ्या दिवशी अन् तेही आत्ता यावेळी उगवता. खरंतर कालच सकाळी दहा वाजेपर्यंत तुमचं हजर होणं अपेक्षित होतं. तरीही चक्क दीड दिवस उशिरा इथं पोहोचता... हा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. हवालदार शिंदे या महिन्यात यांचा एक दिवसाचा पगार कपात करायचा, नोंद करून ठेवा.. " ठाणेदार रुबाबात म्हणाले.
"सर असं करू नका हो. माझं ऐकून तरी घ्या... मी... " महिला पोलीस काॅन्स्टेबल रागिणी मध्येच बोलली.
"काय ऐकून घ्यायचं? मागच्याच वर्षी तुम्हाला लांबलचक प्रसुती रजा मिळाली होती... आणि अजूनही अधूनमधून तुम्हाला रजा हव्या असतात."
"सर मी काल पहाटेलाच गावाहून निघाले होते पण थोडक्यात बस चुकली. मग नंतर सायंकाळचीच बस असते... आणि माझं सहा महिन्याचं बाळ सोबत घेऊन प्रवास करायचा होता. म्हणून आज पहाटे लवकर निघाले. सर, यावेळी थोडं समजून घ्या. यापुढे असं होणार नाही". गयावया करत रागिणी म्हणाली.
" ते काही नाही... तुमच्यासारख्या महिला पोलीसांना फक्त सवलती तेवढ्या पाहिजे असतात. आणि कामाचं म्हटलं तर सगळा आनंदीआनंद असतो! " ठाणेदारांचं कुत्सित वक्तव्य ऐकून रागिणीचा स्वाभिमान दुखावला. ती लगेच म्हणाली...
"सर रागावू नका पण आता स्पष्टच बोलते... आपल्या ठाण्यात महिला पोलीसांकरीता साधी बाथरूमची सोय नाही हे तुम्हांलाही माहिती आहे. मग त्यासाठी आम्ही थोडा वेळ काढून समोरच असलेल्या आमच्या क्वार्टरमध्ये जाऊन आलं तर त्याला सवलत म्हणायची का? आता राहिला प्रश्न कामाचा... सर, माझी वायरलेस ड्यूटी असताना किंवा कुठलाही बंदोबस्त असताना मी कधीही ड्यूटी सोडून जात नाही, हे तुम्हांला पण माहिती आहे."
रागिणीचे सडेतोड बोल ऐकल्यानंतर ठाणेदार थोडे वरमले आणि म्हणाले,
"हे बघा, आम्हालाही तुमच्यासाठी सेपरेट बाथरूम व्हावं असंच वाटतं. म्हणूनच डीएसपी कार्यालयाला त्याविषयीचा प्रस्ताव पाठवला आहे. तो मंजूर झाला की लवकरच तुमची सोय होईल. आणि आपल्या वरिष्ठांशी बोलताना आवाज वाढणार नाही याचं भान ठेवत चला. आता या तुम्ही ! "

प्रसंग दुसरा...
गडचिरोली जिल्ह्यातील एक अतिदुर्गम आऊट पोस्ट. तेथील पोलीस कर्मचार्यांना राहण्यासाठी, खरंतर दिवस ढकलण्यासाठी तात्पुरतं तयार केलेलं
पत्र्याचं शेड! तिथला हा मार्मिक संवाद...
"यार महेश, यावेळी मी गावी गेलो नाही तर खूप मोठा प्राॅब्लेम होणार रे! " सतीशनं आपली चिंता व्यक्त केली.
"का? काय झालं? तिकडे कोणी सिरियस आहे का? की पैशाचा वगैरे प्राॅब्लेम आहे ?" आपला सरकारी गणवेश हॅंगरला अडकवत महेशनं त्याला विचारलं.
"तसं काहीच नाही. तुला माहीतच आहे धाकट्या बहिणीचं लग्न जमलंय... साखरपुडा होऊन सहा सात महिने पण उलटले. अरे चार महिन्यापूर्वी लग्नाचा मुहूर्तही काढला होता. मात्र तो नाईलाजानं पुढे ढकलावा लागला. त्याचं कारण माहिती तुला?... त्यावेळी आपण नुकतेच या नक्षलग्रस्त भागात बंदोबस्तासाठी आलो होतो म्हणून मला रजा मिळणार नव्हती." सतीशनं आपलं मन मित्रासमोर मोकळं केलं.
"अरे मग आता काय अडचण आहे? तू रजेचा अर्ज पाठवला होतास ना..? " महेशनं विचारलं
"हो रे! १५ दिवसाच्या रजेचा अर्ज दिला होता. मग आपल्या विभाग प्रमुखांनाही भेटलो तेव्हा ते म्हणाले, '१५ दिवस कशाला हवेत, दोन तीन दिवसासाठी जाऊन ये'. आता तूच सांग, सगळं कसं शक्य होणार? तुला माहिती आहे... इथून गावी पोहोचायचं म्हटलं तर प्रवासात अख्खा दिवस जाणार..! "
"एक काम कर, तू सरळ आपल्या एस. पी. साहेबांना भेटण्यासाठी अर्ज कर आणि त्यांना भेटून  आपली रजा मंजूर करून घे." महेशनं सुचवलं.
"तेही माझ्या मनात आलं होतं रे. तुला त्या अजयचा किस्सा लक्षात आहे का? त्याची आई गंभीर आजारी असतानाही त्याला रजा मिळाली नव्हती. मग त्यानं एस.पी. साहेबांना भेटण्यासाठी अर्ज केला होता मात्र आपल्या विभाग प्रमुखांनी तो पुढे पाठवलाच नव्हता. बिचारा अजय शेवटपर्यंत आपल्या आईला भेटायला जाऊ शकला नाही. नंतर तिच्या निधनाची बातमी आल्यावरच त्याला रजा मिळाली होती! " सतीश बोलता बोलता गंभीर झाला.
"हे बघ मित्रा, आता जास्त विचार करू नकोस. तू असं कर... सर तुला दोन तीन दिवस सोडायला तयार आहेत ना, मग तू लगेच निघ आणि नंतर गावाहून रजा वाढवण्यासाठी डायरेक्ट एस. पी. साहेबांना टेलिग्राम करून टाक! " महेशनं नामी युक्ती सुचवली.
"तू म्हणतोस ते पटतंय मला. पण तुला माहिती आहे, याचे परिणाम नंतर मलाच भोगावे लागणार. सर मलाच टार्गेट करतील रे!" सतीश त्याच्याकडे बघत निराशपणे म्हणाला.

प्रसंग तिसरा...
अतिवरिष्ठ पोलीस अधिकारी यांचा प्रशस्त कक्ष. वातानुकूलित यंत्रणा असलेल्या त्या कक्षात आपल्या अत्याधुनिक आसनावर वरिष्ठ अधिकारी विराजमान झाले होते. समोरच्या भल्यामोठ्या टेबलावर हाॅटलाईन टेलिफोन, ब्राॅडबॅन्ड सुविधा असलेले काही फोन तसेच अद्ययावत बिनतारी संदेश यंत्रणा सुसज्ज होती. शेजारीच काही फाईल्स आणि कागदपत्रे ठेवण्यात आली होती. त्यातील एक फाईल उचलून ती चाळण्यात अधिकारी महोदय व्यग्र होते. त्यांच्या आदेशाची तत्परतेने अंमलबजावणी करण्यासाठी समोर उभ्या असलेल्या आपल्या रिडरला त्यांनी अचानक आदेश दिला...
"हे कोण सदानंद सातपुते, बोलवा त्यांना ताबडतोब आत... अजून बरीच सेवा शिल्लक असताना स्वेच्छा निवृत्ती का मागताहेत हे..?"
"येस सर, लगेच बोलावून घेतो" रिडर अदबीनं म्हणाले आणि लगेच कक्षाबाहेर पडले. बाहेरील व्हरांड्यात साहेबांना भेटण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या आणि त्यासाठी ताटकळत थांबलेल्या कनिष्ठ अधिकारी, कर्मचार्यांची गर्दी जमली होती. त्यातील हवालदार सदानंद सातपुतेंना निरोप मिळताच ते तातडीनं पुढं आले आणि रिडरसोबत अधिकारी कक्षाकडे वळले. स्वच्छ गणवेश परिधान केलेल्या सातपुतेंनी चालता चालता खिशातून रूमाल काढून आपल्या चेहर्यावरचा घाम पुसला.

"सर, आत येऊ का?" सदानंद सातपुतेंनी कक्षामध्ये प्रवेश करताच नम्रतेनं विचारलं. वरिष्ठ अधिकार्यांनी काही न बोलता त्यांना मानेनंच होकार दिला. रिडरच्या सूचनेनुसार शिस्तीत टेबलासमोर आल्यावर सातपुतेंनी अधिकारी महोदयांना कडक सॅल्यूट ठोकला आणि ते 'सावधान' पोझिशनमध्ये त्यांच्याकडे बघत उभे राहिले. मग काही वेळानंतर आपल्या आरामदायी आसनावर पाठीमागे टेकत अधिकार्यांनी प्रश्न केला...
"सदानंद सातपुते, कुठल्या पोलीस ठाण्यात नेमणूक आहे तुमची?"
"सर, शहापूर पोलीस ठाणे." सातपुतेंनी नम्रपणे उत्तर दिलं.
"बरं! तुमचा आतापर्यंतचा कार्यकाळ तसा बरा दिसतो आणि अजूनही आठ-नऊ वर्षे सेवा बाकी आहे. मग स्वेच्छा सेवानिवृत्ती का मागताय तुम्ही?" त्यांच्याकडे रोखून बघत अधिकार्यांनी विचारलं. 'सावधान'मध्ये शिस्तीत उभे असलेले सातपुते अदबीनं हळू आवाजात म्हणाले...
"सर, मला दोन तीन वर्षापासून मधुमेहाचा आणि बीपीचा सारखा त्रास जाणवतो आहे आणि... " सातपुतेंचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच अधिकारी गरजले,
"अहो मग व्यवस्थित ट्रीटमेंट घेऊ शकता ना... आपल्यासाठी शासनानं वैद्यकीय सेवा पुरवल्या आहेत की..! "
"हो सर, ट्रीटमेंट सुरूच आहे... पण घरी बायकोही सारखी आजारी असते आणि मुलांकडेही लक्ष देता येत नाही. म्हणून खूप टेन्शन येत असतं सर.." कसं तरी धैर्य एकवटून सातपुतेंनी आपली अडचण बोलून दाखवली.
"टेन्शन? कसलं टेन्शन घेता तुम्ही? तुम्ही काय मुख्यमंत्री, पंतप्रधानापेक्षा मोठे झालात का टेन्शन घ्यायला? टेन्शनचं तर मला सांगूच नका. हवं तर त्यासाठी नियमितपणे प्राणायाम करा."
"सर, सततच्या बंदोबस्त ड्यूटीमुळे नियमित व्यायामासाठी वेळ काढणं जमत नाही." सातपुते दबक्या सुरात म्हणाले.
"बंदोबस्ताचं कारण तुम्ही मला सांगू नका. बंदोबस्त काय तुम्हाला एकट्यालाच आहेत का? हे बघा, आपल्या खात्यात बंदोबस्त ड्यूटी हे रूटिन वर्क आहे... समजलं? "
"सर, सेवानिवृत्ती मागण्यामागचं एक अजून कारण आहे. कृपया राग मानू नका, आता स्पष्टच बोलतो... खूप गरज असल्यावरही साधी साप्ताहिक सुट्टी मिळत नाही. तसंच ज्यावेळी हव्या होत्या त्यावेळी रजाही आजपर्यंत मला मिळाल्या नाहीत. सारखा  दबावतंत्राचा सामना करावा लागतो आणि सर ... "
"कुठल्या दबावतंत्राची भाषा करता तुम्ही? आपल्या वरिष्ठ अधिकार् यासमोर बोलत आहात तुम्ही याचं भान ठेवा! " अधिकारी जवळजवळ ओरडलेच.
"हेच ते! सर, तुम्ही आमचे अतिवरिष्ठ अधिकारी आहात याचा आम्ही नेहमी मान राखतोच पण इतका वेळ झाला... मी इथं आल्यापासून याठिकाणी तुमच्या चेंबरमध्ये तुमच्यासमोर 'सावधान' पोझिशनमध्ये उभा आहे. तुम्हाला मी मगाशी सांगितलंही, मला मधुमेहाचा आणि बीपीचा त्रास आहे. तरीही तुम्ही मला या इथं इतक्या रिकाम्या खुर्च्या असूनही साधं बसायला सांगितलं नाही. जरा आमच्या भावनाही समजून घ्यायला हव्यात तुम्ही... बस्स एवढीच अपेक्षा होती. असू द्या, माझ्या मनातलं बोलून दाखवलं. काही चुकलं असेल तर माफ करा. आता मी आपल्या खात्यात आणखी नोकरी करू शकणार नाही. कृपया मला स्वेच्छा सेवानिवृत्ती देऊन मुक्त करावं हीच नम्र विनंती आहे..!" बोलता बोलता सातपुतेंना गहिवरून आलं.

वरील काही प्रसंगांवरून पोलीस खात्यातील दबावतंत्राचा आणि मुस्कटदाबीचा अंदाज वाचकांना आला असेलच. इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्षांपेक्षाही जास्त काळ राज्य केलं. त्यांची त्या काळातील दंडुकेशाही पोलीस खात्यात आजही कायम आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आपल्या हाताखालच्या कर्मचार्यांना मन मानेल तसं वागवणं या इंग्लिश पोलीस अधिकार्यांपासून वारसात मिळालेल्या हुकूमशाहीचा कित्ता गिरवणं आजही काही वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना भूषणावह वाटतं! कनिष्ठ कर्मचार्यांना ते जणू आपल्या घरचे नोकर समजतात आणि सर्रासपणे तशीच वागणूक देताना दिसतात. भाजी किंवा किराणा माल आणणं, स्वतःच्या मुलांना शाळेत पोहोचवणं आणि परत घरी आणून सोडणं, कुटुंबियांना फिरायला नेणं इत्यादी कामासाठी काही वरिष्ठ अधिकारी हाताखालील कर्मचार्यांना वापरून घेतात. यावर कडी म्हणजे या सर्व प्रकारच्या खासगी कामासाठी हे अधिकारी बिनदिक्कतपणे सरकारी वाहनं वापरताना दिसतात. नव्हे तो स्वतःचा हक्कच समजतात! अशावेळी कोणी  धाडस दाखवून त्यांचा विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्याची एकतर अतिदुर्गम भागात बदली करण्यात येते...किंवा त्या कनिष्ठ अधिकारी, कर्मचार्यांवर काहीबाही सबबींचा ठपका ठेवून खातेनिहाय चौकशीचा ससेमिरा लावण्यात येतो.

गोंदियासारख्या दुर्गम जिल्ह्यातील एका कनिष्ठ अधिकार्याची ह्रदयस्पर्शी व्यथा येथे जशीच्या तशी मांडण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे या खात्यातील दाहकता आणि वरिष्ठ अधिकार्यांची भावनाशुन्यता सहज लक्षात येईल... गोंदिया येथे श्वान पथकाचं कार्य सांभाळणारे पी.एस.आय. दर्जाचे एक कनिष्ठ अधिकारी कार्यरत होते. त्यांचं मुख्य कार्य म्हणजे नुकत्याच या जगात आलेल्या कुत्र्याच्या पिलांचं अतिशय काळजीपूर्वक लालनपालन करणं आणि नंतर ते पिल्लू जसजसं मोठं होईल तसतसं त्याला पोलीस तपासायोग्य प्रशिक्षण देऊन तयार करणं! तसंच कालांतरानं त्यांच्या मदतीनं विविध ठिकाणी घडणाऱ्या चोरी, दरोडे, खून इत्यादीसारख्या घटनांचा माग काढणं! हे काम ते आपल्या सहकार्यांसह अगदी मन लावून समर्पित भावनेनं करायचे. प्रसंगी काही अडचणी आल्यास कसलीही तक्रार न करता त्या त्यांच्या लेव्हलवर निस्तरायचे.
गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे नक्षलग्रस्त असल्याने सरकारी नियमानुसार दोन ते तीन वर्षांत ऐच्छिक ठिकाणी त्यांची बदली होणं अपेक्षित होतं. त्यासाठी त्यांनी त्यांचे कुटुंबिय राहत असलेल्या नागपूरला बदलीही मागितली होती. त्याचं मुख्य कारण म्हणजे स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी स्थळ  बघणं! गोंदिया जिल्ह्यात चार वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतरही त्यांची बदली होऊ शकली नाही. काही दिवसांनी मुलीचं लग्न जमलं आणि त्यांची बदलीही झाली मात्र ती नागपूरला नव्हे तर गडचिरोली या अतिदुर्गम जिल्ह्यात! मग ते तिथल्या चक्रव्यूहात असे काही अडकले की स्वतःच्या पोटच्या पोरीच्या लग्नाच्या वेळी सुध्दा हजर राहू शकले नाही. आपल्या श्वान पथकातील अनेक श्वानांना ज्यांनी जीव लावून लहानाचं मोठं केलं, त्यांना पोलीस तपासासाठी प्रशिक्षण देऊन तयार केलं, खात्याची इमानेइतबारे सेवा केली... अशा कर्तव्यदक्ष सह्रदयी माणसाला शेवटी काय मिळालं? आपल्या स्वतःच्या पिलासाठी... पोटच्या पोरीच्या लग्नासाठी, तिच्या डोक्यावर अक्षता टाकायलाही त्यांना हजर राहता आलं नाही हा केवढा दैवदुर्विलास!!
काही दिवसांनी या प्रामाणिक आणि सच्च्या अधिकार्याला कळलं... मुंबईला जाऊन जर आधीच 'सेटींग' केली तर पाहिजे त्या ठिकाणी लगेच बदली मिळवता येते. मात्र त्या वाटेला न जाता ताठ मानेनं या माणसानं आपली उर्वरित नोकरी पार पाडली आणि नंतर सन्मानानं सेवानिवृत्त झाले. तरीही त्यांच्या मनात एक शल्य मात्र कायम होतंच... स्वतःच्या मुलीच्या डोक्यावर अक्षता न टाकता आल्याचं!
याउलट प्रचंड विरोधाभास दर्शवणारी पुढील घटना बघा... काही दिवसानंतर याच गोंदिया जिल्ह्यात देशाच्या माननीय पंतप्रधानांचा दौरा असल्यानं अतिमहत्त्वाचा बंदोबस्त होता. त्यामुळे सर्व प्रकारच्या रजा बंद करण्यात आल्या होत्या. बंदोबस्ताची पूर्वतयारी सुरू झाली. अनेक ठिकाणी बिनतारी यंत्रणा उभारण्यात आल्या. पंतप्रधानांसोबत असणाऱ्या कडक सुरक्षेच्या ताफ्याची रंगीत तालीमही सुरू होती. बंदोबस्ताचा दिवस अवघ्या दोन दिवसांवर आला असताना वरिष्ठांच्या खास मर्जीतील एका पीएसआय दर्ज्याच्या कनिष्ठ अधिकार्याला त्याच्या भाचीच्या लग्नासाठी बाहेरगावी जायला लगेच सोडण्यात आले... आता बोला! वरिष्ठांची हांजी हांजी करणारे अगदी सहजतेनं बिनदिक्कतपणे येथे नोकरी करू शकतात मात्र स्वतःचा स्वाभिमान विकून!

महाराष्ट्र पोलीस दल हे आपल्या देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलापैकी एक आहे. महाराष्ट्र राज्यातील मोठ्या शहरात पोलीसांच्या कामकाजासाठी आयुक्तालये निर्माण केली आहेत. सध्या एकूण अकरा पोलीस आयुक्तालये आणि ३६ जिल्हा पोलीस दले राज्यात कार्यरत आहेत. त्यासाठी महाराष्ट्र पोलीसांचे मनुष्य बळ सुमारे एक लक्ष ऐंशी हजार इतके आहे. म्हणजेच जवळपास बारा कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या आपल्या प्रगत महाराष्ट्रात तब्बल ६६७ व्यक्तीमागे एक पोलीस असे प्रमाण आहे! त्यामुळे साहजिकच पोलीसांवरचा कामाचा ताण वाढून जास्त वेळ ड्यूटी करण्याचा प्रसंग त्यांच्यावर अनेकदा येत असतो.

दररोज बारा ते चौदा तास किंवा कधीकधी त्यापेक्षाही जास्त ड्यूटी करणार्या काही पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना साहजिकच आरोग्याच्या निरनिराळ्या समस्या उद्भवताना आढळतात. मग अशावेळी 'पोलीस कुटुंब आरोग्य योजने' मार्फत दिलेल्या कार्डच्या मदतीने नेमून दिलेल्या विशिष्ट दवाखान्याच्या फेर् या सुरू होतात. मात्र तेव्हा कळते... त्या दवाखान्यात 'एक्स रे' मशीन पासून बरीचशी चाचणी उपकरणं निकामी आहेत. तेव्हा मात्र पेशन्टच्या जवळच्या नातेवाईकांना आपल्यालाच 'हार्ट अटॅक' येतो की काय असं वाटल्याशिवाय राहत नाही! जिथं सर्व सोयीसुविधा आहेत, अत्याधुनिक चाचणी उपकरणं आहेत अशा रूग्णालयात या 'पोलीस कुटुंब आरोग्य योजनेचे' कार्ड स्वीकारले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणजेच पोलीस कर्मचारी या अत्याधुनिक रूग्णालयात उपचार घेण्यास लायक नसतात. सरतेशेवटी कंटाळून पोलीस बांधव जवळपासच्या खासगी रुग्णालयात उपचार घेताना दिसतात. मग अशावेळी नाईलाजानं त्यानं आजारपणाची रजा घेतली तर कधीकधी ती रजा बिनपगारी गणण्यात येते.
समजा शहरात एखादा मोठा व्हीआयपी किंवा व्हीव्हीआयपी बंदोबस्त आहे. त्यावेळी त्याची पूर्वतयारी करत असताना एखाद्या कनिष्ठ अधिकार्याला किंवा कर्मचार्याला अचानक ह्रदय विकाराचा अथवा मधुमेहाचा त्रास उद्भवला तर तो नाईलाजानं आजारपणाची रजा घेतो.( कारण व्हीआयपी बंदोबस्त असला की वरिष्ठांच्या आदेशानुसार सर्व प्रकारच्या रजा बंद केलेल्या असतात) मात्र अशाप्रसंगी काही वरिष्ठ अधिकारी 'बंदोबस्त ड्यूटी टाळण्यासाठी जाणूनबुजून आजारपणाची रजा घेतली' असा त्या संबंधित अधिकारी/कर्मचार्यावर ठपका ठेवतात आणि सरळसोट बिनपगारी रजेचा आदेश काढतात. त्यावेळी त्या कर्मचारी/अधिकार्याची मानसिक अवस्था कशी आहे किंवा तो खरंच तो आजारी आहे की नाही याची खातरजमा करणं गरजेचं असतं. मात्र तसं अगदी क्वचितप्रसंगीच होताना दिसून येतं.

यावरही कडी म्हणजे काही ठिकाणच्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी आपल्या कनिष्ठ अधिकारी/कर्मचार्यांच्या मजबुरीचा फायदा उचलतानाही आढळतात. अगदीच स्पष्ट सांगायचं तर ....
'माझ्यासाठी इंग्लिश खंबा घेऊन ये आणि तू रजेचा अर्ज ठेवून बिनधास्त निघून जा. मग परत येताना काहीतरी गिफ्ट घेऊन ये आणि रजेचा अर्ज फाडून टाक!' अशाप्रकारचे वक्तव्य करणारे आणि कर्मचार्यांच्या विवशतेचा फायदा घेऊन विकृत आनंद मिळवणारेही काही 'लालची' अधिकारी या खात्यात आहेत. अशा बोटांवर मोजण्याएवढ्या नालायक अधिकार्यांमुळे अख्खं पोलीस खातं बदनाम होताना दिसतं. त्याचबरोबर लक्ष्मीनारायण, अरविंद इनामदार यांच्यासारखे आपल्या स्टाफचे हित जपणारे, कर्तव्य दक्ष आणि सक्षम अधिकारीही या खात्यात होऊन गेले आहेत ... ज्यांनी खर्या अर्थानं पोलीस खात्याची शान वाढवली आहे.

या खात्यातील महिला पोलीसांच्या सुद्धा अनेक गंभीर समस्या आहेत. ग्रामीण भागातील तसेच अतिदुर्गम भागात असलेल्या बर्याच पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचार्यांसाठी प्रसाधन गृहाची मोठी समस्या आहेच. मात्र शहर विभागात देखील अशा समस्या भेडसावताना दिसतात. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरातील पोलीस मुख्यालयात काही वर्षापूर्वी तिथल्या सर्वोच्चपदी असलेल्या महिला अधिकार्यांनी पोलीस दरबार भरवला होता... हेतू हा की पोलीसांच्या समस्यांचं निराकरण करणं! त्यावेळी बर्याच पोलीस कर्मचार्यांनी धैर्य एकवटून तेथील प्रसाधन गृहाच्या समस्या त्या अधिकार्यांसमोर प्रकर्षानं मांडल्या. त्याप्रसंगी त्या महिला अधिकार्यांनी 'तुमची समस्या तुम्ही आपल्या प्रभागातील नगरसेवकाकडे का मांडत नाही? ते तुम्हांला नक्की मदत करतील' अशाप्रकारचं दिलेलं उत्तर गंभीरपणे विचार करायला लावणारं आहे! कारण वास्तविक पाहता पोलीस कल्याण निधीसाठी सामान्य पोलीस शिपायापासून ते अधिकार्यांपर्यंत सर्वांकडून ठराविक रकमेची कपात होत असते. ही जमा झालेली रक्कम कुठे आणि कशासाठी वापरली जाते हा संशोधनाचा विषय ठरेल! बरेच वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या आधिपत्याखालील कर्मचार्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलीस दरबार घेत असतात. पण त्यामुळे नेमकं काय साध्य होतं हे त्यांनाच माहीत! अशाप्रकारच्या दरबारात कितीही इच्छा असली तरी बरेच कर्मचारी आपल्या समस्या बिनधोकपणे मांडताना दिसत नाहीत. कारण त्यांना माहिती असतं... जर आपले प्रश्न वरिष्ठांसमोर मांडले तर ते आपल्या विभाग  प्रमुखांविरूध्द तक्रार केल्यासारखंच होणार... आणि मग पुढे नोकरी करताना आपल्याला त्यांचा रोष पत्करावा लागणार!

वाहतूक पोलिसांच्या समस्या मात्र वेगळ्याच प्रकारच्या आहेत. त्यांना कधी कुठल्या प्रसंगांना सामोरं जावं लागणार हे त्यांनाही ठाऊक नसतं. एकतर उन्हापावसाची तमा न बाळगता सतत उभं राहून चौकातील रस्त्यावर ड्यूटी करत असताना रोज नवीन प्रसंगाशी तोंड देण्याची मानसिकताही त्यांना ठेवावी लागते. हल्ली बर्याच शहरात वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकार वाढले आहेत. अशावेळी पोलिसांवर हल्ला झाल्याच्या घटना पण घडतात. तसंच महिला वाहतूक पोलिसांचा विनयभंग करण्यापर्यंतही काही विकृत मनोवृत्तीच्या लोकांची मजल गेली आहे. तर कधीकधी राजकीय दबावाखाली काम करण्याचे प्रसंग देखील वाहतूक पोलिसांवर ओढवतात. अशावेळी मग नाहक कुचंबणा आणि अपमान सहन करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नसते! कारण काही तथाकथित राजकारणी नेत्यांचे थेट गृह मंत्रालयापर्यंत संबंध असतात. मग त्यांचे चेले नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन वाहतूक पोलिसांवर दबाव आणण्याचा अनेकदा प्रयत्न करतात. अशाप्रसंगी यांना कोणी पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी धैर्य एकवटून नडला तर त्याचा बळीचा बकरा झालाच म्हणून समजा!

आणखी एका महत्त्वाच्या विषयाचा उहापोह करण्याचं याठिकाणी गरजेचं आहे. आपण दरवर्षी १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीच्या वृत्तपत्रात राष्ट्रपती पोलीस पदक विजेत्यांची नावे आणि फोटो बघत असतो. त्यांचा आपल्याला अभिमानही वाटतो. मात्र सरसकट सगळेच अधिकारी/कर्मचारी या राष्ट्रपती पदकांसाठी लायक असतात असं नाही. आपल्या हाताखालच्या कर्मचार्यांना हवं तसं राबवून आपलं इप्सित साध्य करून त्याचं श्रेय स्वतः घ्यायचं म्हणजेच स्वतःचं नाव पुढे करायचं... असले प्रकार येथे सर्रासपणे चालतात. मग प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणारे आणि खरोखरच जे राष्ट्रपती पदकांसाठी लायक असतात अशा कितीतरी कर्मचार्यांची नावे मागे पडतात... आणि ज्यांना अगदी वरच्या लेव्हलपर्यंत जाऊन सेटींग जमलेलं असतं त्यांची नावे पुढं येतात. तसंच काही मर्जीतल्या कर्मचार्यांच्या डोक्यावर 'साहेबांचा' कायम वरदहस्त असतो... अशांचीही या पदकांसाठी वर्णी लागते! आणि जे बिचारे प्रसंगी कुठल्याही प्रकारची रजा न घेता 'आपलं काम भलं नि आपण भलं' अशा पद्धतीनं कुठलीही अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करतात त्यांना पदक तर सोडाच नियमानुसार देय असलेली पदोन्नती सुध्दा त्यांची सेवानिवृत्ती जवळ येऊन ठेपल्यावर मिळते! बरं आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी... समाजाचं रक्षण करायला सदैव कटिबद्ध असलेल्या या पोलिसांची साधी संघटना देखील नाही. नव्हे तशी संघटना काढायला सरकारची परवानगीच नाही. मात्र अतिवरिष्ठ ( आय. पी. एस. लेव्हलच्या ) अधिकार्यांची संघटना अस्तित्वात आहे. का? तर म्हणे, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध ते आवाज उठवू शकतात. हा दुजाभाव का व कशासाठी? याचं उत्तर आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त होऊन पाऊण शतक होण्याच्या मार्गावर आहे तरीही अद्यापपर्यंत सापडलेलं नाही!

हल्ली कोरोनानं घातलेल्या जीवघेण्या थैमानामुळे तर सर्वसामान्य पोलीस अधिकारी/कर्मचार्यांचं जिणं फारच जिकिरीचे झालं आहे. सततच्या 'पब्लिक काॅन्टॅक्ट'मुळे आणि वेगवेगळ्या भूमिका निभवाव्या लागत असल्याने कोरोनाच्या संसर्गाची टांगती तलवार त्यांच्यावर असतेच. शिवाय घरी परतल्यावर आपल्या कुटुंबियांना संसर्ग होऊ नये म्हणून सतत खबरदारीही त्यांना घ्यावी लागते. पोलीस खात्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि चोवीस तास सेवा बजावत असलेले विभाग म्हणजे बिनतारी संदेश विभाग आणि मोटार परिवहन विभाग!  अतिशय कमी स्टाफच्या (४० टक्क्यापेक्षा कमी) जिवावर, चोवीस तास कार्यरत असणारी अत्याधुनिक बिनतारी संदेश यंत्रणा अखंडपणे सुरू राहावी म्हणून या विभागातील तांत्रिक अधिकारी/कर्मचारी सतत झटत असतात. दुर्दैवानं यंत्रणेत काही बिघाड झाल्यास त्याची दुरूस्ती करून यंत्रणा अद्ययावत करण्याचं अत्यंत क्लिष्ट कार्य बिनतारी विभागातील कर्मचारी डोळ्यात तेल घालून करत असतात. तसंच पोलीस मोटार परिवहन विभागातील वाहनं सतत कार्यान्वित ठेवण्याचं महत्त्वाचं कार्य तेथील अधिकारी/कर्मचारी तत्परतेनं करत असतात. अशावेळी पोलीस बिनतारी विभागातील आणि मोटार परिवहन विभागातील कर्मचार्यांना यंत्रणेची नियमित देखभाल करण्यासाठी सतत निरनिराळ्या पोलीस ठाण्यात जाणं गरजेचं असतं. चोवीस तास इमर्जन्सी सेवा असल्यानं या कर्मचार्यांना सततच्या जागरणाच्या आणि तणावाच्या समस्या नेहमी उद्भवताना दिसतात. तसंच कोरोनाच्या संसर्गाचा संभाव्य धोका सोबतीला आहेच!

या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं मागच्या वर्षी ५५ वर्षावरील वयाच्या पोलीसांना लोकसंपर्क असलेल्या ठिकाणी ड्यूटी देऊ नये असा जीआर काढला होता. मात्र आधीच अतिशय अपुर्या असलेल्या स्टाफच्या समस्येमुळे नाईलाजानं ५५ वर्षे ओलांडलेले कितीतरी पोलीस अधिकारी/कर्मचारी त्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या आदेशानुसार ड्यूटी बजावत होते आणि आजही बजावत आहेत. परिणामी महाराष्ट्र राज्यातील कित्येक पोलीस बांधव कोरोनाचे शिकार होऊन शहीद झाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे कितीतरी हसत्या खेळत्या संसारांचं होत्याचं नव्हतं झालं हे वेगळं सांगण्याची गरज नाही! हल्लीच्या कोरोना संसर्गाच्या काळात काही पोलीस बांधव कधी नव्हे इतक्या द्विधा मनस्थितीत असल्याचं आढळून येत आहे. तरीही बरेचसे बांधव आपल्या कर्तव्यालाच प्राधान्य देताना दिसतात आणि आपली मानसिकता सातत्यानं सकारात्मक ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना आढळतात. स्मशान भूमीतील सेवाकार्य असो की व्हीआयपी बंदोबस्त असो... ते सारख्याच क्षमतेनं आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या चौफेर कर्तृत्वाला हजारो सलाम!!

याठिकाणी विनोद पितांबर अहिरे (पोलीस नाईक, पोलीस मुख्यालय, जळगाव) या पोलीस बांधवाचा  अंगावर शहारे आणणारा 'मृत्यूघराचा पहारा करताना' हा बोलका लेख जसाचा तसा नमूद करण्याचा मोह आवरला नाही. त्यावरून सद्यस्थितीची भीषणता आणि पोलीसांची मानसिकता वाचकांच्या निश्चितच लक्षात येईल!

"मृत्यूघराचा पहारा करताना"
      
         मी, पोलीस नाईक, विनोद पितांबर अहिरे, पोलीस मुख्यालय जळगाव. गेली तेरा दिवसांपासून या कोरोना कक्षाच्या इमारतीला  पहारा(गार्ड ड्युटी) करीत आहे. पण मी आज या कक्षाला "मृत्य घर" संबोधतो आहे. आणि होय हे मृत्यु घरच आहे तथा मृत्यूपेक्षा ही भयंकर आहे. कारण मी आतापर्यंत अनेक बंदोबस्त, पहारे केले आहेत.अनेकदा तर आत्महत्या खून  यासारख्या क्लिष्ट प्रकरणांमध्ये "व्हिसेरा"राखीव ठेवण्याची विनंती करून स्वतः शवविच्छेदन गृहात उपस्थित राहून जेव्हा डॉक्टर त्या मृत मानवी देहाचे  वेगवेगळे अवयव परीक्षणासाठी बाहेर काढतात.तेव्हा मात्र मलाही आणि डॉक्टरांनाही भीतीचा लवलेश सुद्धा शिवत नव्हता.परंतु आज मात्र त्यांनाही या "कोरोना कक्षात" रुग्णसेवा देताना आणि मलाही पहारा देतांना मृत्यूच्या एका अनामिक भीतीने पछाडले आहे. मला या मृत्यु घराच्या फाटकावर पहारा देताना  मला एका बाजूला माझा तीन वर्षाचा बंडू (माझा लहान मुलगा)  बोबड्या स्वरात पप्पा पप्पा म्हणत  दिसत आहे. आणि दुसर्‍या बाजूला  माझी मातृभूमी दिसत आहे. या क्षणाला प्रचंड घालमेल माझ्या जीवाची झाली आहे. पण क्षणात माझ्या मनात असाही विचार येतो की,  अशी द्विधा मनस्थिती करून कशी चालेल.  ही मातृभूमी  आपल्याला का सहजासहजी थोडीच मिळाली आहे. माझ्या अनेक शूर वीर बांधवांनी  या स्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्निकुंडात  आपल्या प्राणांची आहुती दिली.  तेव्हा कुठे हे स्वातंत्र्य आपणास उपभोगण्यास मिळालं आहे.  जर स्वातंत्र्यच नसतं तर आपण पोलीस तरी झालो असतो का?  मिसरूड फुटण्याच्या वयातच  भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, अशपाक यांचाही तर परिवार असेलच ना  मग त्यांनी तर एका क्षणाचा विचारही न करता "वंदे मातरम" म्हणत म्हणत ते फासावर चढले  आणि या मातृभूमीला आलिंगन दिले. होय मीही तयार आहे.  माझ्या मातृभूमीसाठी इथला मृत्यू स्वीकारायला, पण.... इथला मृत्यू आपल्या पुरता मर्यादित नसून तो आपल्या अनेक आप्तस्वकीयांना आपल्या "कवेत"घेत असतो. आणि  अप्रत्यक्षपणे माझ्या  "मातृभूमीवर" पुन्हा हल्ला चढवत असतो. म्हणूनच की काय या "कोरोना कक्षाच्या"  इमारतीला  पहारा करताना  मला भय वाटत आहे.म्हणूनच मी याला आज मृत्यू घर संबोधतो आहे.जेव्हा जेव्हा माझा येथे पहारा सुरू असताना येथील एखाद्या रुग्णाचा मृत्यू होतो, तेव्हा तेव्हा त्या मृत व्यक्तीच्या घरातील रक्ताच्या लोकांना आपल्या आईच्या,बापाच्या,मृत शरीराला स्पर्श तर सोडाच,पण त्याला जवळ देखील येऊ दिले जात नाही. ते बिचारे कुठेतरी, कोपऱ्यात  हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश करीत असतात. त्यावेळेला त्यांचं मी एक माणूस म्हणून त्यांचा हात माझ्या हातात घेऊन त्यांचं साधं सात्वन देखील करायला जाऊ शकत नाही.फक्त लांबूनच त्यांच्या दुःख वेदना माझ्या या उघड्या डोळ्यांनी मी पहात असतो. म्हणूनच मी आज या "कोरोना कक्षाला" "मृत्यू घर" संबोधतो आहे. आणि होय हे मृत्यूचे घरच आहे.या कक्षाच्या आत असलेले "देवदूत" (डॉक्टर) आपल्या एका हातात मृत्यू आणि दुसऱ्या हातात मेडिसीन रुपी शस्त्र घेऊन या कोरोना नामक राक्षसाचा मुकाबला करीत आहेत. पण तो दिवसेंदिवस त्यांच्यावर वरचढ होताना दिसत आहे. कारण आतापर्यंत अनेक देवदूत (डॉक्टर), माझे सहकारी या राक्षसाची लढताना धारातीर्थी पडत आहेत. आणि मला या क्षणाला एकाच गोष्टीचं शल्य वाटतं की, मी त्यांना काही मदत करू शकत नाही काही संरक्षण देऊ शकत नाही. कारण आतापर्यंत या "मातृभूमीवर" जेव्हा जेव्हा अंतर्गत संकट आलीत तेव्हा तेव्हा केंद्रस्थानी मीच होतो (म्हणजे सर्व पोलीस) आणि याच निधड्या छातीने त्या संकटांचा मुकाबला करण्याची ताकत माझ्या "वीर बाहू" मध्ये होती. पण आता मात्र माझ्या सहकाऱ्यांचे आणि माझ्या मायबाप जनतेचे या कोरोना नामक राक्षसाच्या हातून धडाधड मुडदे पडत असतांना मला मात्र सुन्न होऊ़न पहावं लागत आहे. आणि हो "जनता" माझ्यासाठी माय बापच आहे. कारण त्यांच्याच पैशातून मला पगार मिळतो आणि माझे कुटुंब चालते, त्याच माझ्या मायबाप जनतेचं या "कोरोना" नामक राक्षसापासून मी त्यांचे रक्षण करू शकत नाही. यासारखे दैवदुर्विलास जीवनात कोणते असू शकते.भलेही आज माझी मायबाप जनता माझ्यावर फुलांचा वर्षाव करीत आहे. मला योद्धा म्हणून संबोधते आहे. पण तुम्हाला सांगतो माझ्या मनातल्या मनात मला करंटेपणा चा भास होत आहे. कारण मी इतका हताश आणि भयगंडीत होऊन, बंदोबस्त, पहारा, कर्तव्य कधीच केले नव्हते. आणि कर्तव्य पार पाडीत असताना मला माझ्या मृत्यूची भीतीही कधीच वाटली नव्हती. पण आता मला स्वतःला सुरक्षित ठेवून मला ड्युटी करावी लागत आहे. कारण तसं केलं नाही तर मीही या राक्षसाच्या तावडीत सापडेल आणि माझी आई-वडील, कुटुंब सहकारी, शेजारी माझ्यासकट आपसूकच या राक्षसाच्या "गुहेत" जातील त्यानंतर मात्र हा राक्षस असुरी आनंद घेत घेत त्यांचे एकेक करून धडाधड मुडदे पाडिल आणि तेव्हाही मी काहीच करू शकणार नाही फक्त हतबल होऊन माझ्या नातेवाईकांचे आणि जनतेचे मृत्यू माझ्या या उघड्या डोळ्यांनी मला पाहावे लागतील. आणि जेव्हा आपल्या डोळ्यादेखत आपल्या आईचा, बापाचा, मुलाचा, पत्नीचा, सहकाऱ्यांचा,मृत्यू होतो तेव्हा, आपण काहीच करू शकत नाही तेव्हा "करंटे" पणाची जाणीव होणार नाही तर काय गर्वाने छाती फुगेल? आणि म्हणूनच मी आज या "कोरोना कक्षाला" मृत्यूचे घर संबोधतो आहे.
आतापर्यंत खूप बंदोबस्त केलेत. पहारे केले, मंत्री, आमदार, मोठे अधिकारी,यांचे अंगरक्षक ड्युटी केली तेव्हा मी असताना ते माझ्या भरोशावर ते आणि तुम्हीही मुक्तपणे संचार करीत असत. आणि आलाच जर कोणी एखादा शत्रू समोर तर माझ्या नाईन एम एम पिस्टल मधील गोळीने त्याला क्षणात कंठस्नान घालण्याची ताकद माझ्या भूजांमध्ये मध्ये नक्कीच होती. पण आता मात्र शत्रु अदृश्य असल्यामुळे मी काहीच करू शकत नाही.आता माझी शस्त्रंही बदललेली आहेत. आणि ड्युटी चे स्वरुपही बदलले आहे. मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की, माझी पिस्टल, माझी रायफल, माझी अश्रुधुराच्या नळकांड्या यासारखे शस्त्र सोडून मला शस्त्र म्हणून सँनीटायझर, ग्लोज, मास्क,फेसगार्ड अशी वापरावी लागतील आणि माझी अवस्था एका पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होऊन मला पहारा, कर्तव्य करावे लागेल आणि अजून किती मृत्यू बघावे लागतील म्हणून मी आतुर होऊन माझ्या त्या शास्त्रज्ञ बांधवांची वाट बघतो आहे. की जे आज जीवाचे रान करून या राक्षसाचा मुडदा पाडण्यासाठी आपले शस्त्र परजत आहेत.पण दुर्दैवाने अजूनही त्यांची शस्त्रे पूर्णपणे परजली गेली नाहीत. जोपर्यंत ते शास्त्रज्ञ बांधव आपली शस्त्र परजून या कोरोना नामक राक्षसाचा खात्मा करीत नाही. तोपर्यंत तुम्ही फक्त घरातच बसा....
म्हणजे तुमचा मृत्यू आम्हाला हताश होऊन उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ न येऊ देता आणि आम्हाला तुमचे संरक्षण करता येत नाही म्हणून करंटेपणाची जाणीव न होऊ द्यायची असेल तर अपण विनाकारण घराबाहेर पडून त्या मृत्यू घराच्या दिशेने न जाता आपण घरातच सुरक्षित रहा आणि त्या "मृत्यू घराला" कायमचे टाळे लावा......
जय हिंद! जय महाराष्ट्र!
        आपला
विनोद पितांबर अहिरे, दक्षता नगर,
पोलीस मुख्यालय जळगाव

टीप.. : हा लेख कोणावरील आकसापोटी अथवा द्वेषापोटी लिहिलेला नसून या लेखात पोलीसांच्या समस्या आणि त्यांची मानसिकता मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

... विनोद श्रा.पंचभाई
     भ्र. क्र. ९९२३७९७७२५