Thursday, September 30, 2021

दहा वर्षानंतरच्या शाळा

   दहा वर्षानंतरच्या शाळा


 इंग्रजांच्या काळात आपल्या कडे शाळा खूपच कमी प्रमाणात होत्या. तेव्हा ज्या शाळा होत्या त्या सुध्दा इंग्रजांच्या अमलाखाली होत्या. कालांतराने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. त्यानंतर त्यांनी मागासवर्गीय मुलांसाठी ही विनामूल्य शाळा सुरू केल्या आणि शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. मग देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अगदी खेड्यापाड्यात सुध्दा विनामूल्य शाळा सुरू करण्यात आल्या. त्यामुळे सर्वसामान्यांना शिक्षणाची सोय झाली. त्याकाळात शाळेतील शिक्षक मन लावून शिकवायचे. आपले विद्यार्थी चांगले घडावेत हाच ध्यास त्यांनी घेतला होता. 


मात्र आज परिस्थिती अशी आहे की आता आपल्याकडे शाळा, काॅलेजची कमतरता नाही. अगदी छोट्या छोट्या शहरात सुध्दा इंग्रजी काॅन्व्हेन्टच्या सोयी झाल्या आहेत. परंतु आजचे शिक्षण खूप महागडे आहे. अॅडमिशन मिळवण्यासाठी अव्वाच्या सव्वा फी नाइलाजाने द्यावी लागते. तसेच शाळेत शिकवायला शिक्षक असूनही शिकवणी वर्ग लावणे अत्यावश्यक झाले आहे. साने गुरुजींसारखे आदर्श शिक्षक आज नाहीत. त्यामुळे आर्थिक कमकुवत पण कुशाग्र बुद्धिची मुले शिक्षणापासून वंचित राहणार की काय अशी भीती वाटते! 


भविष्यात म्हणजे साधारणपणे दहा वर्षांनंतर आपल्याला शाळा, महाविद्यालये कमी झालेली दिसू शकतात. कारण पुढे संगणकीय पध्दतीने घरी बसून शिक्षण घेणे सहज शक्य होणार आहे. सध्याच्या 'कोरोना' परिस्थितीत त्याचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतोच आहोत. त्यामुळे येणाऱ्या काळात म्हणजे दहा वर्षांनंतरच्या शाळा कशा प्रकारच्या असणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. परदेशात जशी संगणकीय शिक्षणपध्दती सुरू आहे, तशा प्रकारची शिक्षणप्रणाली आपल्याकडील शाळांमध्ये सुरू झाली असेल. त्यामुळे येत्या काळात अशाप्रकारच्या संगणकीय शिक्षण प्रणालीसाठी विशेष प्रशिक्षित शिक्षकांची गरज भासणार हे ओघाने आलेच. 


  तब्बल ३४ वर्षानंतर आपल्याकडील शिक्षण पध्दतीत आमुलाग्र बदल होणार आहे. सकारात्मक दृष्टिने विचार केला तर हा होणारा बदल विद्यार्थ्यांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून करण्यात आल्याचं आपल्या लक्षात येईल. कारण या शिक्षण पध्दतीत व्यवसायाभिमुख शिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कलाने पुढील शिक्षणासाठी आपल्या आवडत्या शाखा निवडण्याला भरपूर वाव आहे. मात्र शिक्षकांनी सकारात्मक विचार करून चांगले विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टिने हे आव्हान स्वीकारणे अपेक्षित आहे. 

 

येणाऱ्या दहा वर्षांनंतरच्या शाळांमधून अत्याधुनिक सोयी, सुविधा उपलब्ध असल्या तरी शिक्षण घेणे अतिशय खर्चिक ठरणार आहे. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये आजही दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती हलाखीची असणाऱ्या गोरगरिबांच्या मुलांना येणाऱ्या काळात शिक्षणापासून वंचित राहावे लागणार की काय ही भीती कायमस्वरूपी आहेच! अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी नाममात्र शुल्क आकारून सर्व सोयींनी युक्त अनुदानित शाळा सुरू करण्यावर सरकारने भर द्यावा. तसेच या शाळा व्यवस्थितरित्या चालवण्यासाठी नियमावली करून त्याची कडक अंमलबजावणी करणे महत्त्वाचे ठरेल. त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीसारख्या सरकारी योजना काटेकोरपणे राबवणेही गरजेचे असे वाटते. कारण देशातील प्रत्येक व्यक्ती साक्षर होणे ही काळाची गरज आहे. 


... विनोद श्रा. पंचभाई, पुणे

भ्र.क्र. ९९२३७९७७२५



Tuesday, September 21, 2021

लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव


लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव


स्वातंत्र्य पूर्व काळात लोकमान्य टिळक यांनी खऱ्या अर्थाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले. मात्र त्यापूर्वी सुद्धा सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होत होते. टिळकांनी या उत्सवाला राष्ट्रीय स्वरूप दिले हे जास्त महत्त्वाचे! त्यामागे त्यांचा उद्देश अतिशय व्यापक होता. पारतंत्र्यात असलेल्या आपल्या देशातील सामान्य लोकांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आणून त्यांच्यात जनजागृती करणे हा त्यांचा मुख्य हेतू होता. म्हणजेच पर्यायाने जनजागृती करण्यात यशस्वी झाल्यावर इंग्रजांविरुध्द चळवळ सुरू करणे शक्य होणार होते. त्यामुळे समाजाला एकसंध करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केले. 

इंग्रजांच्या काळात आपल्या देशात जातीपातीच्या प्रथा, रूढी, परंपरा, जुन्या चालीरिती आवर्जून पाळल्या जायच्या. लोक आपसात भेदभावही करायचे. काही जातीतील लोकांना तर मंदिराच्या समोरून जायला पण मनाई होती. त्यावेळी मंदिरातील देवालाच म्हणजे गणपतीलाच बाहेर काढून त्याला सार्वजनिक स्वरूप टिळकांनी बहाल करून देण्याचे अत्यंत विधायक कार्य त्याकाळात केले. त्यामुळे समाजातील सर्वच स्तरातील लोकांना या सार्वजनिक उत्सवात सहभागी होता येऊ लागले. 

लोकमान्य टिळक पूर्वी विंचुरकरांच्या वाड्यात राहत असत. तिथे १८९४ मध्ये गणेशोत्सवाला सुरुवात झाली. या उत्सवाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना प्रबोधन करणे हा टिळकांचा मुख्य हेतू असल्याने या गणपती उत्सवात प्रबोधनात्मक व्याख्यानांवर अधिक भर दिला जात असे. स्वतः टिळकांचेही व्याख्यान त्यात होई. १८९५ मध्ये विंचुरकरांच्या वाड्यात लोकमान्यांचे 'महाभारतातील दोन महापुरुष' या विषयावर व्याख्यान झाले. 'श्रीकृष्ण आणि भीष्माचार्य हे दोन प्रमुख राजकारणी होते,' असे प्रतिपादन त्यांनी केले. विंचुरकर वाड्यातील गणेशोत्सवात पांगारकर, प्रा. जिनसीवाले, शिवरामपंत परांजपे, तात्यासाहेब केळकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर आदी वक्त्यांची भाषणे होत. १९०५ पासून केसरी संस्थेचा गणपती उत्सव गायकवाड वाड्यात (केसरीवाड्यात) होऊ लागला.

केसरीवाडा गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रबोधनात्मक कार्यक्रम व व्याख्यानांवर असलेला भर. अगदी प्रारंभापासून येथे जी व्याख्याने झाली, त्याचे विषय लोकजागृती व प्रबोधन करणारे होते. १९०५ च्या उत्सवात लोकमान्य टिळकांनी 'देह आणि आत्मा' या विषयावर व्याख्यान दिले. १९०७ मध्ये सीताराम केशव दामले यांचे 'राष्ट्रीय शिक्षण' या विषयावर व्याख्यान झाले. १९०८ मध्ये महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली रा. ब. गणेश व्यंकटेश जोशी यांचे 'लोकशिक्षण' या विषयावर व्याख्यान झाले. १९०९ मध्ये 'धर्म आणि शास्त्र' या विषयावर व्याख्यान झाले. गणेशोत्सवात प्रबोधनावर भर असावा, हा लोकमान्यांचा हेतू असल्याचे त्यांनी वेळोवेळी केलेल्या भाषणातून स्पष्ट होते. 

या उत्सवातील दहा दिवस होणाऱ्या व्याख्यानांनी आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून बरीच मोलाची माहिती आणि ज्ञान मिळते याची प्रचिती लोकांना येऊ लागली. त्यामुळे टिळकांनी सुरू केलेल्या या सार्वजनिक गणेशोत्सवाला कमालीची लोकप्रियता लाभली. यावरून लोकमान्य टिळकांची दूरदृष्टी आपल्याला दिसून येते. 

. लोकमान्य टिळक यांच्या केसरी व मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून गणेशोत्सवाचा प्रचार आणि प्रसार सुरू झाला. 'केसरी-मराठा' ट्रस्ट म्हणजेच 'केसरी'ची, संस्थेने १८९४ मध्ये गणेशोत्सवाला सुरुवात केली. पुण्यातील मानाचा पाचवा गणपती म्हणून केसरी वाड्यातील गणेशोत्सव आजही उत्साहात साजरा करण्यात येतो. या सार्वजनिक गणेशोत्सवाने वैचारिक व्याख्याने, विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम अशी परंपरा अजूनही कायम ठेवली आहे.
... विनोद श्रा. पंचभाई, पुणे
    भ्र. क्र. ९९२३७९७७२५