लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव
स्वातंत्र्य पूर्व काळात लोकमान्य टिळक यांनी खऱ्या अर्थाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले. मात्र त्यापूर्वी सुद्धा सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होत होते. टिळकांनी या उत्सवाला राष्ट्रीय स्वरूप दिले हे जास्त महत्त्वाचे! त्यामागे त्यांचा उद्देश अतिशय व्यापक होता. पारतंत्र्यात असलेल्या आपल्या देशातील सामान्य लोकांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आणून त्यांच्यात जनजागृती करणे हा त्यांचा मुख्य हेतू होता. म्हणजेच पर्यायाने जनजागृती करण्यात यशस्वी झाल्यावर इंग्रजांविरुध्द चळवळ सुरू करणे शक्य होणार होते. त्यामुळे समाजाला एकसंध करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केले.
इंग्रजांच्या काळात आपल्या देशात जातीपातीच्या प्रथा, रूढी, परंपरा, जुन्या चालीरिती आवर्जून पाळल्या जायच्या. लोक आपसात भेदभावही करायचे. काही जातीतील लोकांना तर मंदिराच्या समोरून जायला पण मनाई होती. त्यावेळी मंदिरातील देवालाच म्हणजे गणपतीलाच बाहेर काढून त्याला सार्वजनिक स्वरूप टिळकांनी बहाल करून देण्याचे अत्यंत विधायक कार्य त्याकाळात केले. त्यामुळे समाजातील सर्वच स्तरातील लोकांना या सार्वजनिक उत्सवात सहभागी होता येऊ लागले.
लोकमान्य टिळक पूर्वी विंचुरकरांच्या वाड्यात राहत असत. तिथे १८९४ मध्ये गणेशोत्सवाला सुरुवात झाली. या उत्सवाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना प्रबोधन करणे हा टिळकांचा मुख्य हेतू असल्याने या गणपती उत्सवात प्रबोधनात्मक व्याख्यानांवर अधिक भर दिला जात असे. स्वतः टिळकांचेही व्याख्यान त्यात होई. १८९५ मध्ये विंचुरकरांच्या वाड्यात लोकमान्यांचे 'महाभारतातील दोन महापुरुष' या विषयावर व्याख्यान झाले. 'श्रीकृष्ण आणि भीष्माचार्य हे दोन प्रमुख राजकारणी होते,' असे प्रतिपादन त्यांनी केले. विंचुरकर वाड्यातील गणेशोत्सवात पांगारकर, प्रा. जिनसीवाले, शिवरामपंत परांजपे, तात्यासाहेब केळकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर आदी वक्त्यांची भाषणे होत. १९०५ पासून केसरी संस्थेचा गणपती उत्सव गायकवाड वाड्यात (केसरीवाड्यात) होऊ लागला.
केसरीवाडा गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रबोधनात्मक कार्यक्रम व व्याख्यानांवर असलेला भर. अगदी प्रारंभापासून येथे जी व्याख्याने झाली, त्याचे विषय लोकजागृती व प्रबोधन करणारे होते. १९०५ च्या उत्सवात लोकमान्य टिळकांनी 'देह आणि आत्मा' या विषयावर व्याख्यान दिले. १९०७ मध्ये सीताराम केशव दामले यांचे 'राष्ट्रीय शिक्षण' या विषयावर व्याख्यान झाले. १९०८ मध्ये महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली रा. ब. गणेश व्यंकटेश जोशी यांचे 'लोकशिक्षण' या विषयावर व्याख्यान झाले. १९०९ मध्ये 'धर्म आणि शास्त्र' या विषयावर व्याख्यान झाले. गणेशोत्सवात प्रबोधनावर भर असावा, हा लोकमान्यांचा हेतू असल्याचे त्यांनी वेळोवेळी केलेल्या भाषणातून स्पष्ट होते.
या उत्सवातील दहा दिवस होणाऱ्या व्याख्यानांनी आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून बरीच मोलाची माहिती आणि ज्ञान मिळते याची प्रचिती लोकांना येऊ लागली. त्यामुळे टिळकांनी सुरू केलेल्या या सार्वजनिक गणेशोत्सवाला कमालीची लोकप्रियता लाभली. यावरून लोकमान्य टिळकांची दूरदृष्टी आपल्याला दिसून येते.
. लोकमान्य टिळक यांच्या केसरी व मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून गणेशोत्सवाचा प्रचार आणि प्रसार सुरू झाला. 'केसरी-मराठा' ट्रस्ट म्हणजेच 'केसरी'ची, संस्थेने १८९४ मध्ये गणेशोत्सवाला सुरुवात केली. पुण्यातील मानाचा पाचवा गणपती म्हणून केसरी वाड्यातील गणेशोत्सव आजही उत्साहात साजरा करण्यात येतो. या सार्वजनिक गणेशोत्सवाने वैचारिक व्याख्याने, विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम अशी परंपरा अजूनही कायम ठेवली आहे.
... विनोद श्रा. पंचभाई, पुणे
भ्र. क्र. ९९२३७९७७२५
No comments:
Post a Comment