Thursday, June 25, 2020

मेवाडनरेश महाराणा प्रताप

पुण्यातील "चपराक प्रकाशन" तर्फे लवकरच प्रकाशित होणाऱ्या माझ्या "मेवाडनरेश महाराणाप्रताप" या लघु कादंबरीतील काही रोमहर्षक अंश नक्की वाचा .....

चिरपरिचित सुमधुर स्वर सर्वांच्या कानावर पडला ...
                       "जागो हे मेवाड मनस्वी!
                        समय नही है अब सोने का
                        उठ, रण - साज सजा ले !
                        सीमाएँ है सुलग रही जब
                         तू भी शस्त्र उठा ले !!
                         सजा आरती तलवारों की
                         ओ! स्वातंत्र्य तपस्वी... !"
तो आवाज एका चारणीचा ( गायिकेचा ) होता. आपल्या गाण्याच्या माध्यमातून ती जनजागृती तर करायचीच, त्याचप्रमाणे वेळप्रसंगी राणाप्रतापांसाठी हेरगिरीचं काम सुद्धा अगदी बेमालूमपणे करायची.
"मेवाडच्या गौरव गायिकेचा हार्दिक प्रणाम स्वीकारावा महाराणाजी!" राणांना अभिवादन करत चारणी म्हणाली.
"ये, तुझं स्वागत आहे. तुझे मधुर स्वर कानी पडले की झोपलेला आत्माही खडबडून जागा होतो! तू इथं आमचीच नाही तर संपूर्ण मेवाड प्रान्ताची प्रेरणा आहेस. चेतनाशक्ती आहेस. तुझ्या रूपानं चित्तोडची महाशक्ती माता अंबाभवानीच मेवाडच्या उद्धारासाठी अवतरित झाल्याचा आम्हाला भास होतो!" स्तुतिसुमने उधळत राणाप्रतापांनी चारणीचा गौरव केला.

              उदयपूर मधील उदयसागर तलावाचा काठ! सुंदर नक्षीदार शामियाना सजलेला. अकबर बादशहाचा सेनापती राजा मानसिंहाची सर्वाना प्रतीक्षा होती. कुँवर अमरसिंह व इतर सरदार स्वागतासाठी तयारच होते. तेवढयात महाराणा प्रतापसिंहांसोबत राजा मानसिंह शामियान्याकडे येताना दिसले. सर्वांनी त्यांचे स्वागत केले ...
"महाराणांचा विजय असो! मानसिंह राजांचे स्वागत अाहे."
"यावे राजाजी! विराजमान व्हावे!" शामियान्यात प्रवेश करताच राणाप्रताप उद्गारले.
"आप भी पधारिये महाराणाजी!" मानसिंह त्यांना म्हणाला.
"आपल्याकडे सर्व कुशलमंगल आहे ना राजाजी" औपचारिकता म्हणून राणांनी विचारलं.
"सध्यातरी सर्व क्षेमकुशल आहे. फक्त एका खासगी कौटुंबिक अडचणींची चिंता आहे. आमची धाकटी बहीण मानाबाई, ती उपवर झाल्यामुळे सुयोग्य वराच्या शोधात आहोत आम्ही." बोलताना मानसिंहने महाराणांवर अर्थपूर्ण दृष्टिक्षेप टाकला. मात्र राणाप्रताप काहीच बोलले नाहीत. मग न राहवून काही वेळानं मानसिंहानं राणांना प्रश्न केला,
"सक्ती नाही महाराणाजी पण एक विचारू का?"
"विचारा ना राजाजी! " राणाप्रताप सहजपणे म्हणाले.
"आपले ज्येष्ठ कुँवर अमरसिंह यांच्यासाठी आपण आमच्या मानाबाईचा संबंध स्वीकारला तर आम्ही कृतार्थ होऊ!" मानसिंह स्पष्ट शब्दात बोलला.
"आम्हाला आपला प्रस्ताव स्वीकारण्यात आनंदच झाला असता पण मेवाडचे महाराणापद ग्रहण करताना आम्ही काही प्रतिज्ञा केल्या होत्या. त्यातील एक प्रतिज्ञा आहे... जोपर्यंत चित्तोडसह संपूर्ण मेवाड प्रान्त मोगलांच्या राजवटीतून मुक्त होत नाही तोपर्यंत कुँवर अमरसिंहचा विवाह केला जाणार नाही! " राणाप्रतापांनी आपला निर्धार व्यक्त केला.
"महाराणाजी! ही प्रतिज्ञा अंमलात आणणं खूपच अवघड आहे असं तुम्हाला नाही वाटत? " मानसिंहानं विचारलं.
"कशाला वाटावं? आमच्या पूर्वजांनी यवनांना हिन्दुस्थानातून बाहेरच काढलं नाही तर थेट इराणपर्यंत त्यांना पिटाळून लावलं. मग आता देशातल्या देशात त्यांना मेवाडमधून घालवणं काहीच अवघड नाही! " राणाप्रताप त्वेषानं बोलले. तरीही मानसिंह संयम बाळगत शांततेनं त्यांना म्हणाला, "एक लक्षात घ्या राणाजी! मोगल आज हिन्दुस्थानचे राज्यकर्ते आहेत. त्यांचं सामर्थ्य प्रचंड आहे. म्हणून त्यांच्याशी संघर्षाचा मार्ग स्वीकारण्यापेक्षा आपसात सलोखा करणं जास्त हितावह ठरेल. थोडा विचार करावा आपण!"
"माफ करा राजाजी! मोगलांचं सामर्थ्य म्हणजे काय, तर तुम्ही आम्ही लोकच ना! आपली राजपूतांची शक्ती जर वजा केली तर बादशहा जवळ काय शिल्लक राहणार? " राणाप्रताप नेमकेपणानं निर्वाणीचं  बोलले.
"पण राणाजी, आजच्या परिस्थितीत सलोख्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आम्ही बादशहा सोबत सलोखा केला म्हणूनच आज अंबर प्रान्ताचं आमचं राज्य आणि आम्ही सुरक्षित आहोत!" मानसिंहांच्या या लाचारीच्या बोलण्यावर चांगलं सणसणीत उत्तर द्यावं असं राणाप्रतापांच्या मनात आलं होतं पण त्यांनी स्वतःला वेळीच सावरलं, अन् संयम राखत धारदार आवाजात म्हणाले ...
"संघर्ष कोणी सुरू केला राजाजी? मेवाडच्या किंवा इतर राजपूत राजांनी कधीतरी आग्र्यावर आक्रमण करण्याचा मनसुबा केला का? इतिहासात अशी एक तरी नोंद आहे का? नाही ना! उलट प्रत्येक मोगल बादशहाने साम्राज्य विस्तारासाठी कित्येक वेळा कुरापती काढण्याचंच काम केलं. या बादशहाला तर राजपूती रक्ताची चटक लागली आहे जणू! त्या चित्तोडवर तीस हजार निरपराध राजपूतांची कत्तल केल्यावरही त्याची तहान भागली नाही. म्हणूनच तो सारखा राजपूत राजांवर स्वाऱ्या   करून त्यांची राज्ये अंकित करत सुटला आहे.जोधपूर, बिकानेर, बुंदी किंवा तुमच्यासारख्या अंबरच्या राजपूत राजाला सैन्यासह त्या बादशाहाच्या खिदमतीत हजर राहावं लागतं! राजपूत राजे आज आपला स्वाभिमानच गमावून बसले आहेत असं वाटत नाही का तुम्हाला राजाजी ?"
 महाराणांचे सडेतोड बोल ऐकूनही थोडं सामोपचारानं प्रयत्न करावा म्हणून मानसिंह शांतपणे म्हणाला, "महाराणाजी! राजपूतांचा रक्तपात टळावा असंच आम्हाला वाटतं. म्हणूनच तर तुम्हाला तडजोडीचा सल्ला द्यायला आलो आम्ही! तुम्हाला काय वाटतं ..?"
"तडजोड होऊ शकते राजाजी ... ती केवळ एका अटीवरच.
बादशहाने मेवाड प्रान्तातून त्याचे सर्व सैन्य काढून घेऊन आमची मातृभूमी स्वतंत्र करावी. स्वतंत्र सार्वभौम राज्य म्हणून मेवाडला मान्यता द्यावी, आणि आपण वाईट वाटून घेऊ नये पण इतर मांडलिक राजांप्रमाणे आम्ही बादशाहाच्या दरबारात हजेरी लावायला येणार नाही!" महाराणा आत्मविश्वासानं बोलत होते. ते पुढं म्हणाले,
"आमच्या सिसोदिया पूर्वजांनी आजपर्यंत अपमानास्पद तडजोडी करण्याऐवजी जोहार आणि केसरियाचा अवलंब केला. हा इतिहास वाचताना कोणाही राजपूताची छाती अभिमानाने फुलून जाईल. याउलट मांडलिक राजांनी आपली इज्जतच मोगलांकडे गहाण टाकली. भविष्यात तुमचे वंशज हा इतिहास वाचताना शरमेनं माना खाली घालतील...!" राणाप्रतापांचे हे बोलणे मानसिंहाला चांगलंच झोंबलं. मध्येच उसळून रागानं तो म्हणाला,
"महाराणाजी , आपण आम्हाला सिसोदियाबद्दल एवढं गर्वानं सांगता मात्र एक गोष्ट विसरता... तुमच्याच महान वंशातले तुमचे सावत्रभाऊ सागरसिंह आज स्वतःच्या स्वार्थासाठी बादशहाचे तळवे चाटत आहेत."
"राजाजी! आपण आमचे सन्माननीय अतिथी आहात. आमच्या मनात आपल्याबद्दल आदराची भावना आहे. मात्र आपण आमच्यावर हा कठोर आघात केलाच आहे तर आम्हालाही एका कटुसत्याची आठवण करून द्यावी लागेल. ऐका राजाजी, सागरसिंहाची वर्तणूक आमच्यासाठी पीडादायक आणि लांच्छनास्पद बाब आहे! तरीही त्याच्यामुळे आमच्या इज्जतीचे धिंडवडे उठवण्याची हिंमत कोणी करणार नाही. मात्र एक कटुसत्य आपण लक्षात घ्यावे, इतर राजपूत राजांप्रमाणे आजपर्यंत एकही सिसोदिया राजपूत रमणी मोगल बादशहाचं शय्यागार सजवायला गेलेली नाही!" राणाप्रतापांचं हे घणाघाती सत्य कानावर पडताच मानसिंहांची तळपायाची आग मस्तकात गेली! तो मोठ्यानं ओरडला ... "राणाजी S S !" संतापानं त्याचा हात तलवारीच्या मुठीवर गेला.
    थोड्या वेळानं मानसिंहाला शांत करत राणाप्रताप म्हणाले,
"आपण शांत व्हावे राजाजी! अजूनही वेळ गेली नाही. वेळीच सावध व्हा. आपण कछवाह आणि आम्ही सिसोदिया एक होऊन संयुक्तपणे मोगलांवर तुटून पडलो तर त्यांना पळता भुई थोडी होईल. त्यानंतर आपण संपूर्ण राजस्थानचे महाराजे बना. आम्ही आपले मेवाड सांभाळू. आपण यावर निश्चित विचार करावा."
"आम्ही येतो राणाजी! " आपल्या जागेवरून उठत मानसिंह गुर्मीतच पुढं म्हणाला, "आता आपली भेट रणभूमीवरच होईल. आज ना उद्या बादशहा आपल्या पारिपत्यासाठी सैन्य पाठवणारच. तेव्हा सेनापती म्हणून मलाच आपल्याविरूध्द चालून यावं लागेल! "
"त्याही परिस्थितीत आम्ही आपले खंबीरपणे स्वागत करू! " राणाप्रताप निग्रहानं म्हणाले..

No comments:

Post a Comment