Monday, February 1, 2021

काळीज गोंदण'... काळजातून उमटलेलं वास्तव

 

'काळीज गोंदण'...
काळजातून उमटलेलं वास्तव!

"मुखवट्याच्या जगात वावरताना कितीतरी नागडी माणसं आपल्याला भेटतात. अंगावर भरजरी कापडं ल्यालेली नागडी माणसं! कधीकधी तर असं वाटतं, या नागड्यांच्या जगात आपण एकटे कसे अपवाद राहावे...?
किती लावावीत दारे?
सारे उघडे उघडे!
कसे झाकावे कशाला?
सारे नागडे नागडे...! "
अशाप्रकारचं विदारक वास्तव मांडलंय लेखक किरण लोखंडे यांनी आपल्या 'काळीज गोंदण' या आजच्या तथाकथित विचारवंतांनाही विचारात पाडणार्या आपल्या अनोख्या पुस्तकातून... अनोख्या शैलीतून!

काळीज पिळवटून टाकावे असे दाहक प्रसंग, पांढरपेशा समाजाचं वास्तववादी चित्रण या पुस्तकाच्या पानापानातून लेखकानं रेखाटलं आहे. 'कौलातून सांडलेल्या कवडशाचा काजळव्रण' या पहिल्याच लेखातून त्यांच्या ठसठसत्या अपमानाचा चिरंजीवी दाह आणि भोगलेल्या गरिबीच्या अक्षय वेदना वाचताना वाचक नखशिखांत हादरल्याशिवाय राहत नाही! 'माणूस जन्माला का येतो आणि जगतो कशासाठी? ' असा रोखठोक सवाल त्यांनी 'अंतिम सत्याच्या शोधात हरवलेलं ब्रह्म' या लेखातून विचारला आहे. तसंच 'वंशवृद्धीच्या आम्हीला धुंडाळताना... ' या लेखातून नुकतेच लग्न झालेल्या लेखकाची जीवघेणी तगमग प्रकर्षाने जाणवते!

'फुई' म्हणजे लेखकाची मोठी बहीण. तिचं हात माथ्यावरून फिरवून स्वतःच्या कानशिलाजवळ नेऊन बोटं मोडून दृष्ट काढणं, 'आला बाई माझा नन्न्या' असं म्हणून कौतुक करणं... अशी नितांत माया करणारी फुई अचानक हे नश्वर जग सोडून जाते! हे 'नन्नाच्या चेहर्यावरले फुईचे सायीचे हात'मधील वर्णन वाचताना वाचकांच्या ह्रदयाचा ठोका चुकवते! त्याचप्रमाणे 'सूर्याच्या सातव्या घोड्याची नाल' या लेखातून पूजा घालणार्या भगताची विकृती वाचताना मन सुन्न होते.

'पदरातल्या आभाळातला उष्टा चांदाचा तुकडा' मधून मुंबईच्या कामाठीपुर्यातील जळजळीत वास्तव लेखकानं या पुस्तकाच्या माध्यमातून रेखाटलं आहे...
"पदर लहान लहान होत गेला
ती मोठी मोठी होत गेली!
अंग झाकायच्या पदराची
गोधडी अपुरी पडत गेली!
डोक्यावरचा पदर फाटत गेला
अन् तिला मात्र पदर आला!
वासनेचा साप पदरात
गरळ ओकत गेला!
कुंवारपणातच पदर गर्भार राहिला
लाचार पदराशी कोणी गाठ बांधली नाही!
पदर लाचार झाला होता
पदराचा तिरंगा
कामाठीपुर्यात डोलू लागला होता!
आता पदरानं पदराला जन्म दिला आहे
वासनेच्या सापाला
आणखी एक पदर मिळाला आहे! "

'घरात माय अन् दारात गाय जिथं असेल तिथं खरंच गोकुळ असतं' अशी लेखाची सुरुवात करून 'शेवरी' गायीसोबतचं आपलं अल्लड बालपण लेखकानं अशा काही आगळ्यावेगळ्या शैलीत मांडलंय की वाचकांचं मन हेलावल्याशिवाय राहत नाही! या लेखात शेवटी ते म्हणतात... ''शेवरी गेली... मायचे डोळे धुरात वाहून गेले! कुडाचं घर पाडून सिमेंटचं घर बांधलं गेलं. पण शेवरी नसल्यानं नव्या घराचं गोकुळ काही झालंच नाही! "

''साकी तेरा मयखाना
जरा खोल के रखना
शायद जन्नत की हवा
हमें रास न आए.... "
'आयुष्याचं ओझं मनावर चढलं की मग पायात ठसठशीत साखळदंड बांधल्याचा जो भास होतो त्यातून सुटका व्हावी म्हणून मग जे मार्ग आपण शोधतो त्यात मद्यानं बेहोष होण्याची दीर्घ नव्हे प्रदीर्घ अशी एक अवस्था असते!' या प्रदीर्घ वाक्यानं सुरूवात केलेला 'साकीच्या प्याल्यातील भान' हा लेख लेखकाचं निराळंच भावविश्व उलगडत जातं. त्यांना बरेच अनुभव आल्यानंतर शेवटी काय दिसावं... त्या दारूच्या ग्लासात होते आईचे व्याकूळ डोळे... हादरलेल्या बापाचं काळीज, कोलमडून पडणार्या घराच्या भिंती, वादळानं उडालेलं छप्पर, दारुड्या नवर्याला वैतागून गल्लीतल्या बाईनं घेतलेला गळफास अन् तडफडणारी पिलं! मी तो प्याला बाजूला सारला. काय करीत होतो मी? घरातून जे औदासीन्य घालवायचं त्यालाच कवटाळत बसलो. साकीच्या त्या प्याल्याचं मला भान आलं! आजपासून दारूला स्पर्श करायचा नाही असं म्हणत तेथून उठलो." हे सगळं वाचताना वाचकांची मती गुंग होते आणि हे लिहिताना लेखकाच्या त्यावेळच्या अवस्थेची कल्पना येते.

'पच्चास पैसा जब पेटसे गाना गाए' या लेखातून रेल्वेच्या डब्यात गाणी गात आपला चरितार्थ चालवणार्या कलाकारांच्या व्यथा, वेदना वाचताना मन विदीर्ण होतं! 'पाऊस असा कोसळला' मधील लेखकाची भावावस्था कळते तर 'माझा हरवलेला पाऊस' या लेखातून ते आपल्या अंतरीच्या वेदना मांडताना दिसतात! 'नासवलेली बाय अन् आभाळाची माय' मधील थरकाप उडवणारं वर्णन, 'भिंतीवर चिकटलेली स्वप्नांची लक्तरं' लेखातील दाहक अनुभव, 'चांदणसखी' च्या माध्यमातून व्यक्त केलेली विफल प्रेमाची अभिव्यक्ती, 'बाप्पाबरोबर विरघळलेला देह' मधून मांडलेले बोलके संवाद, 'गोदामाई'चं अप्रतिम वर्णन वाचताना खर्या अर्थानं 'काळीज गोंदण' ची उंची जाणवते..!

'काळीज गोंदण' पुस्तकातील एकूण तेवीस लेख अतिशय मर्मभेदी आणि पाषाणह्रदयी माणसालाही निश्चितच पाझर फोडणारे आहेत. या सर्वच लेखातून प्रकटलेली भाषा अत्यंत प्रवाही असून अधूनमधून पेरलेल्या समर्पक अशा काव्यपंक्ती लेखनाचं सौंदर्य वाढवतं. एकंदरीतच हे पुस्तक एक संग्राह्य कलाकृती ठरणार यात शंकाच नाही. त्यामुळे रसिक वाचकांनी 'काळीज गोंदण'च्या वाचनाचा अवश्य लाभ घ्यावा असं आवर्जून म्हणावसं वाटते. एवढी अप्रतिम कलाकृती प्रकाशित करून वाचकांसाठी उपलब्ध करून दिली त्याबद्दल 'चपराक प्रकाशनचे' घनश्याम पाटील यांना तहे दिलसे शुक्रिया! तसेच लेखक किरण लोखंडे यांचं मन:पूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील लेखनकार्यास अनेक अनेक शुभेच्छा!!

विनोद श्रा. पंचभाई, वारजे, पुणे.
भ्र.क्र.९९२३७९७७२५ 

No comments:

Post a Comment