"टुट सकते है, मगर झुक नहीं सकते!"
एका गावात एक म्हातारी तिच्या झोपडीत राहत होती. तिच्याजवळ एक कुत्रा होता. रात्रीच्या वेळी अचानकपणे काही चोर त्या झोपडीत शिरले. त्याबरोबर कुत्रा जोरजोरात भुंकू लागला. त्यामुळे आजूबाजूचे लोक जागे झाले आणि त्यांनी चोरांना पकडले. ही सर्व वस्तुस्थिती न्यायनिवाड्यासाठी राणीच्या समोर आली. राणीने कुत्र्याला कारागृहात ठेवण्याचा आदेश दिला आणि चोरांना सोडून दिले. अशा या विचित्र न्यायनिवाड्याने अचंबित झालेल्या म्हातारीने राणीला विचारलं, "कुत्र्याला कारागृहात का टाकले? आणि चोरांना का सोडले? " त्यावर राणीने उत्तर दिलं, "या राज्यात कोणीही आवाज, गोंधळ, आरडाओरडा करता कामा नये. या आदेशाचे पालन कुत्र्याने न केल्याने त्याला जेलमध्ये टाकले आहे. आणि चोरांनी मात्र कोणताही आवाज न करता आपले काम केलेले असल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले आहे."
त्यावर नाराज होत म्हातारी म्हणाली, "कुत्र्याने भुंकणे, इतरांना जागे करणे हे तर त्याचे कर्तव्यच आहे."
"माझ्या राज्यात कुत्र्यांना भुंकण्याची परवानगी नाही. त्याने केवळ शेपटी हलवत, गोंडा घोळवत मालकाची सेवा करावी हेच अपेक्षित आहे." राणी म्हणाली.
वरील संवाद कुण्या कथा, कादंबरीतील नाहीत तर आपल्याच स्वतंत्र वैभवशाली देशात क्रौर्याची परिसीमा गाठणार्या अणीबाणीच्या काळात मुंबईत ठिकठिकाणी रूपकात्मक सादर केलेल्या पथनाट्यातील आहेत... आणि हे जळजळीत वास्तव 'अणीबाणी लोकशाहीला कलंक' या आपल्या पुस्तकातून मांडलंय त्याकाळी 'मिसा' कायद्यान्वये तुरूंगवास भोगलेल्या लेखक विजय जोशी यांनी! अणीबाणीच्या काळात त्यांना आलेल्या थरारक अनुभवावर त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून लेखन केलं आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालानुसार श्रीमती इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये लढवलेली लोकसभा निवडणुक अवैध ठरवली गेली होती. तसेच पुढील सहा वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नसल्याने पंतप्रधानपदी राहताच येणार नव्हतं. त्यामुळे इंदिरा गांधींनी ताबडतोब राजीनामा देणे हेच सर्वसामान्य जनतेला अपेक्षित होतं. मात्र आपले पद कुठल्याही परिस्थितीत जाऊ द्यायचे नाही ही ठाम भूमिका घेऊन त्यांनी २५ जून १९७५ च्या मध्यरात्री अणीबाणीच्या प्रस्तावावर राष्ट्रपतींची सही घेऊन आपल्या देशावर अणीबाणी लादली! त्यानंतर २६ जूनच्या पहाटेपासूनच जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, मोरारजी देसाई, मधु दंडवते इत्यादी विरोधी पक्षनेत्यांची धरपकड सुरू करून त्यांना अटक करण्यात आली. खर्या अर्थाने हा स्वातंत्र्यावरच घाला होता. वृत्तपत्रे, विरोधी पक्ष, न्यायसंस्था, संघ संस्था, विद्यार्थी, मजूर आदी सर्वांचेच स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले. सर्वसामान्य लोकांनाही हळूहळू एकंदरीत परिस्थितीची कल्पना येऊ लागली. काही दिवसातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली. मग 'मिसा' या जुलमी कायद्याअंतर्गत अणीबाणीचा विरोध करणार्यांवर बडगा उभारणे सुरू झाले. कसलीही चौकशी न करता कित्येक निरपराध लोकांना पकडून तुरुंगात डांबण्यात आले. ं
अचानक सुरू झालेल्या या मुस्कटदाबीच्या विरोधात लोक संघटित होऊ लागले. या पुस्तकातील 'दमनचक्राचा प्रभाव' या प्रकरणात लेखकांनी त्याकाळी उद् भवलेल्या परिस्थितीचे प्रभावीपणे वर्णन केले आहे. गुप्त पत्रके काढणे, पोस्टर्स तयार करणे, रूपक कथा सांगून जनजागृती करणे, मंदिरामंदिरातून महाआरत्यांच्या निमित्ताने लोकांना संघटित करणे असे कितीतरी प्रयोग सातत्याने केले जात होते. या प्रकरणातील 'एसेम' यांचे पुढील बोल पुरेसे बोलके आहेत... नागपूर येथे साने गुरुजी कथामालेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात एस. एम. जोशी यांनी हा विषय प्रभावीपणे मांडला होता. त्यांनी भरगच्च सभागृहात आपल्या भाषणातून सांगितले, "हुकूमशाहीच्या पहिल्या आघातानं लोकशाहीशक्ती नामोहरम झाल्यासारख्या होतात हा जगातला सर्व ठिकाणचा अनुभव आहे. पण एकदा का लोकशक्ती जागृत झाली की हुकूमशाहीची जबरदस्त आणि जुलमी ताकतही या जागृत लोकशक्तीपुढे टिकाव धरू शकत नाही. म्हणून आजच्या परिस्थितीत सर्वांनी निर्भय राहण्याची गरज आहे."
'युवकांचा सहभाग' या प्रकरणातील शैक्षणिक क्षेत्रातील दहशत, 'निर्भय बनो'चा आधार, सत्याग्रहाचा देशभर वणवा इत्यादींचं वर्णन तर आजच्या युवावर्गानं वाचलंच पाहिजे...जेणेकरून त्यांना त्याकाळच्या परिस्थितीची जाणीव करता येईल. तसंच 'अनन्वित अत्याचार' या प्रकरणात नमूद केलेल्या घटना वाचताना अक्षरश: अंगावर काटा उभा राहतो! जुलमी इंग्रजांनाही लाजवतील असे अनन्वित अत्याचार निरपराध सत्याग्रहींवर अणीबाणीच्या काळात करण्यात आल्याचा आवर्जून उल्लेख लेखकांनी या पुस्तकात केला आहे. विवस्त्र करून यातना देणे, उपाशी ठेवणे, सिगारेटचे चटके देणे, उलटे लटकावणे, गुप्तांगात दंडा घुसवणे डोळ्यात आणि गुप्तांगात लाल मिरची पावडर टाकून छळ करणे, हातापायाची नखं उपटून काढणे, विजेचे शाॅक देणे, विवस्त्र करून बूटाने तुडवणे इत्यादी अघोरी प्रकार तुरूंगातील पोलीस बिनदिक्कतपणे करायचे. या स्वकियांपेक्षा इंग्रज तरी बरे होते असं म्हणण्याची पाळी त्यावेळी सत्याग्रहींवर आली होती. त्याचवेळी दिल्लीच्या आयुर्विज्ञान संस्थेत उपचार घेत पडून असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी सर्वांना उद्देशून तुरुंगात पत्र पाठवल्याचा उल्लेख या पुस्तकात केला आहे. पत्रासोबत अटलजींची मनोधैर्य वाढवणारी पुढील प्रभावी कविताही होती ...
"दांवपर सबकुछ लगा है, रूक नही सकते...
टुट सकते है मगर, झुक नहीं सकते!!"
बीड, परभणी, नांदेड, सोलापूर, कुलाबा, ठाणे, पुणे, जळगाव, नागपूर, कोल्हापूर अशा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी होत असलेल्या सत्याग्रहाचं व त्याठिकाणच्या तुरुंगातील ह्रदय द्रावक प्रसंगांचं वर्णन लेखकांनी या प्रकरणात रेखाटलं आहे. तसंच काही ठिकाणी पोलिसातील माणुसकीचा प्रत्यय आल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलं आहे. अणीबाणीच्या काळात देशभरात सुमारे दोन लाखाहून जास्त सत्याग्रहींना स्थानबद्ध करण्यात आलं होतं! या सगळ्यांना कारागृहात खितपत ठेवून 'मिसा' चा वापर करण्यात आला. खरंतर त्यावेळची परिस्थिती अत्यंत खडतर होती. काही सत्याग्रही अन्नपाणी आणि औषधोपचार वेळेवर न मिळाल्याने मृत्यू पावले होते!
'लेखनावर एकदा बंधन आलं की लेखन मरतं. लेखन मेलं की विचार मरतात आणि विचार मेले की संस्कृती धोक्यात येते आणि विकृतीस प्रारंभ होतो!' हे विधान आहे दिनांक ६ ते ८ डिसेंबर १९७५ रोजी कराड येथे पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा दुर्गाबाई भागवत यांचे! वृत्तपत्रांवर लादलेली सेन्साॅरशिप , नागरिकांच्या सप्त स्वातंत्र्याचा गळा घोटल्यामुळे साहित्य संमेलनात काय होणार ही उत्सुकता, अणीबाणीच्या काळात जनजागृती करण्याबाबत साहित्यिकांची भूमिका हे सगळं 'दुर्गाबाईचा दुर्गावतार' या हटके प्रकरणात आपल्याला वाचायला मिळतं.
लेखक विजय जोशी यांनी अणीबाणीच्या कटु आठवणींना उजाळा का दिला असा प्रश्न सामान्य जनांना पडू शकतो. त्याचं अतिशय चपखल उत्तर हवं असल्यास आजच्या पिढीतील प्रत्येकानं 'अणीबाणी लोकशाहीला कलंक' हे पुस्तक वाचायलाच पाहिजे. सरळसाधी, सोपी, प्रवाही भाषा हे या पुस्तकाचं बलस्थान आहे. त्यामुळे वाचताना कुठेही कंटाळवाणं होत नाही. उलट लेखकांनी रेखाटलेले अनुभव वाचताना 'आपल्या देशात असंही घडलं होतं!' हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. अणीबाणी म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणारं काळंकुट्ट पर्व होतं असंच म्हणावं लागेल! आता तो इतिहास झाला तरी दुर्लक्षित करता येणार नाही!
चपराक प्रकाशनचे जिंदादिल प्रकाशक, संपादक घनश्याम पाटील यांच्या आग्रहानं आणि पुढाकारानं 'अणीबाणी लोकशाहीचा कलंक'ची निर्मिती झाल्याचं लेखकांनी त्यांच्या मनोगतात आवर्जून सांगितलं आहे. तसंच या पुस्तकाला घनश्याम पाटील यांचीच प्रभावी, परखड अशी प्रस्तावना लाभली आहे. चित्रकार संतोष घोंगडे यांनी अतिशय समर्पक व आकर्षक मुखपृष्ठ चितारलं आहे. एकंदरीतच हे पुस्तक, वाचकांनी अमूल्य ठेवा समजून जपून ठेवावा असंच झालं आहे... जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला सुध्दा देशात घडलेल्या काळ्या कुट्ट पर्वाची जाणीव होईल. लेखक विजय जोशी यांना पुढील लेखनासाठी मनापासून शुभेच्छा!!
विनोद श्रा. पंचभाई
वारजे, पुणे
भ्र. क्र. ९९२३७९७७२५
No comments:
Post a Comment