Thursday, September 28, 2023

मोगरा... प्रस्तावना

 प्रस्तावना...


पु. ल. देशपांडे यांनी म्हटलं आहे... 'प्रॉब्लेम कुणाला नसतात, ते अगदी शेवटपर्यंत असतात पण प्रत्येक प्रॉब्लेमवर तोडगा हा असतोच. तो सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं हवी असतात. या तिन्ही गोष्टीपलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो !'


तसंच आपल्या आयुष्यात येणारे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स किंवा गुंते देखील प्रयत्न केल्यास सुटू शकतात. ते कधीही सुटणार नाहीत असा आपण उगाच समज करून घेतो. मात्र आयुष्यातील प्रॉब्लेम किंवा गुंता सोडवण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो, अशावेळी पेशन्स महत्वाचे ठरतात! असे हे न सुटणारे गुंते कधी नातेसंबंधातले असतात तर कधी मैत्रीमुळे निर्माण झालेल्या ऋणानुबंधामधील किंवा प्रेमसंबंधातील असतात. बरेचदा नातेसंबंधांमधील गुंता हा अगदी क्षुल्लक कारणावरून किंवा गैरसमजातून निर्माण होताना दिसून येतो. गैरसमज वाढले की जिवाभावाची घट्ट मैत्री सुद्धा क्षणात तुटताना आपण पाहतो. तसेच आपसातील निस्सीम प्रेमातही कमालीचा दुरावा वाढतो.


लेखक दत्तात्रय वायचळ यांनी त्यांच्या 'मोगरा' या कादंबरीच्या माध्यमातून अतूट मैत्रीतून निर्माण झालेले ऋणानुबंध आणि त्यानंतर त्यातून अंकुरत गेलेल्या प्रेमभावना यांचा विलक्षण आविष्कार संवादशैलीतून सादर केला आहे. कुठेही बोजड, क्लिष्ट शब्द तसंच अलंकारिक भाषा न वापरता सहजसोप्या भाषेत त्यांनी मांडणी केली आहे. त्यामुळे ही कादंबरी वाचनीयझाली आहे. या 'मोगरा' कादंबरीपूर्वी त्यांची 'गजरा' आणि 'स्वप्नातलं पुणं' ही दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. या दोन्ही पुस्तकांना रसिक वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.


कुण्यातरी विचारवंताने म्हटलंच आहे, 'अमुक एका व्यक्तीशिवाय आपण जगूच शकत नाही असे वाटणे हे उत्तुंग प्रेम नाही. स्वतःचे अस्तित्व, आपले कुटुंबातील तसेच समाजातील स्थान यांची जर निश्चित जाणीव असेल तर तुमचे कोणाशिवाय काहीही अडणार नाही. दुसऱ्यांवर प्रेम जरूर करा मात्र त्याआधी स्वतःवर प्रेम करायला शिका !' प्रेम आणि मैत्री या जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या विषयावर अनेक लेखकांनी कथा, कविता, कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. मात्र लेखक दत्तात्रय वायचळ यांनी त्यांच्या 'मोगरा' या कादंबरीत प्रेम आणि मैत्री या मानवी भावना परिणामकारकरित्या अधोरेखित केलेल्या आहेत. तसे पाहता या कादंबरीत मुख्य पात्र चारच आहेत... अनिता, विद्या, सुरेश आणि सुशांत! अनिता, विद्या आणि सुरेश हे तिघे बालपणीचे जिवाभावाचे मित्र. कालांतराने तारुण्यसुलभ वयात आल्यावर त्यांच्यात नैसर्गिकरित्या एकमेकांविषयी ओढ निर्माण होते, आपुलकी वाढते. एकमेकांप्रती वाटणारा कमालीचा जिव्हाळा, प्रेम वाढीस लागते. या वयात एकमेकांबद्दल एकप्रकारची ओढ वाटणे स्वाभाविकच असते. आणि मग एक दिवस अनिताच्या आयुष्यात अचानक सुशांतचा प्रवेश होतो. खरंतर सुशांत हा सुरेशचा जिगरी दोस्त असतो. मात्र त्याबाबत अनिता आणि विद्या पूर्णतः अनभिज्ञ असतात. मग अशा दोलायमान अवस्थेत सुरू होते अनिताच्या मनाची जीवघेणी घालमेल... बालपणीचा मित्र सुरेश की कॉलेजच्या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने अचानक भेटलेला सुशांत! त्यावर काहीतरी तोडगा काढता यावा म्हणून ती तिची जिवलग मैत्रीण विद्याजवळ आपलं मन मोकळं करण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात पुण्यात असलेला सुरेश नेहमीसाठी सुशांतकडे मुंबईला येणार असतो. त्यावेळी सुशांतला आपल्या खास मित्राला एक खास सरप्राईज द्यायचं असतं!


काय असतं सुशांतचं सरप्राईज ? सुरेश, अनिता आणि सुशांत यांच्या प्रेमाच्या ट्रॅगलमध्ये कोण जिंकतं? तसंच सुरेशवर मनापासून प्रेम करणाऱ्या विद्याचं काय होतं? सुरेश आणि सुशांत यांच्या घट्ट मैत्रीचं शेवटी कायहोतं? विलक्षण प्रेमाचा आणि अतूट मैत्रीचा गुंता शेवटी कशाप्रकारे उलगडला जातो ? अशा स्वाभाविकपणे उद्भणाऱ्या प्रश्नांची उत्तरे रसिक वाचकांना या कादंबरीतील प्रभावी संवादातून मिळतात. 'मोगरा' मधील सरळसाधी, प्रवाही भाषा आणि संवादशैली लेखक दत्तात्रय वायचळ यांची खासियत आहे हे येथे आवर्जून नमूद करावे लागेल. त्यामुळेच ही कादंबरी वाचकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. 'मोगरा' कादंबरीसाठी लेखकाचं आणि प्रकाशक मित्र विलास पायगुडे यांचं मनापासून अभिनंदन ! पुढील लेखनप्रवासाठी खूप खूप शुभेच्छा !


विनोद श्रा. पंचभाई लेखक, पुणे


९९२३७९७७२५

No comments:

Post a Comment