शब्दांमधून क्रांती घडवणारा लोकशाहीर अण्णा भाऊ
*सर्वार्थाने उपेक्षित... दुर्लक्षित!*
‘दर्द है जहां… गीत है वही..!’ या गाण्याप्रमाणे अण्णा भाऊंच्या आयुष्यात अगदी त्यांच्या न कळत्या वयापासून दर्द म्हणजे दुःख, वेदना, अवहेलना त्यांच्या वाट्याला आल्या. मात्र अण्णांनी त्याचा उगाच बाऊ न करता, कुठलंही भांडवल न करता… या दुःखालाच आपलं सामर्थ्य बनवलं, मग त्याचं गाण्यामध्ये रूपांतर केलं… आणि अंतर्मनाचा ठाव घेणाऱ्या अनेक रचना लिहिल्या. त्यात झंझावाती पोवाडे होते, अतिशय अर्थपूर्ण अशा गवळणी, छक्कड, गाणी सगळं सगळं काही होतं! सर्व सामान्य लोकांचं हृदय पिळवटून निघेल एवढं सामर्थ्य अण्णांच्या गीत रचनेत असायचं! त्यांचं प्रभावी सादरीकरण ऐकून महाराष्ट्रातीलच नव्हे तर रशियातील लोकही डोलू लागले होते!
‘प्यासा’ चित्रपटातील लेखक असलेल्या नायकाच्या गजल, कविता इत्यादी साहित्य … तो हे जग सोडून गेला असं समजून लोक डोक्यावर घेतात. मात्र अभिजात आणि विपुल साहित्य निर्मिती करूनही अण्णांना ठराविक वाचक वर्ग मिळाला हे आपल्या पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचं दुर्दैवच! अण्णा भाऊंनी लिहिलेल्या अनेक कथा, कादंबऱ्या यांची खरी कदर परदेशात झाली, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही! खरं तर त्याला आपल्या मराठी मनाची संकुचित वृत्तीच कारणीभूत आहे. कारण तामिळनाडू राज्यात जन्मलेल्या जयकांतन दंडपाणी या तमिळ लेखकाच्या साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळू शकतो आणि अण्णा भाऊंसारख्या संवेदनशील लेखकाचं साहित्य दुर्लक्षित, उपेक्षित ठरतं यातच सगळं आलं! खरं तर जयकांतन दंडपाणी हे अण्णा भाऊंपेक्षा वयाने लहान होते आणि ते सुद्धा अण्णाप्रमाणेच आपलं गाव सोडून मद्राससारख्या मोठ्या शहरातील कम्युनिस्ट पार्टीच्या प्रेसमध्ये काम करण्यासाठी आले होते. त्यावेळेस त्यांना अगदी नाममात्र अक्षर ओळख होती… मात्र नंतर त्यांनी लेखन, वाचन करण्यासाठी प्रयत्नपूर्वक प्रगती केली. मग तिथल्या स्थानिक साहित्यिक मंडळीनी त्यांच्यातील प्रतिभा ओळखून त्यांना लिहिण्यासाठीही प्रवृत्त केलं. त्यानंतर काही दिवसातच जयकांतन यांच्या साहित्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळू लागली. त्यांच्या साहित्याची सकारात्मक दृष्टीने समीक्षा होऊ लागली. म्हणूनच दक्षिणेतल्या वाचकांनी त्यांचं साहित्य उचलून धरलं त्यामुळे त्यांना मान सन्मान, पुरस्कार प्राप्त होऊ लागले. त्या मानाने अण्णा भाऊंच्या साहित्याची म्हणावी तशी दखल आपल्या महाराष्ट्रातील ना राज्यकर्त्यांनी घेतली ना साहित्यिकांनी घेतली. त्यांचं दुर्दैव असं की… एक आचार्य अत्रे सोडले तर त्या काळच्या बाकीच्या थोर म्हणून गणल्या जाणाऱ्या साहित्यिकांनी, समीक्षकांनी आणि हो, पांढरपेशा वाचकांनी सुद्धा अण्णांच्या मर्मभेदी साहित्याची कदर केली नाही… मग मान सन्मान, पुरस्कार तर दूरच राहिले!
अंतर्मनाचा ठाव घेणाऱ्या कथा, हृदय पिळवटून काढणाऱ्या गीत रचना, खोल विचार करायला भाग पाडणाऱ्या कादंबऱ्या एवढं विपुल साहित्य लिहूनही शेवटी अण्णांना काय मिळालं? विवंचना, उपेक्षा, हेटाळणी, अवहेलना इत्यादी गोष्टींचा आयुष्यभर सामना करत अण्णा उपेक्षित जीवन जगत राहिले! नाही म्हणायला त्यांना सोव्हिएत रशियातून निमंत्रण आल्यामुळे तिथं तरी त्यांच्या साहित्याचा यथायोग्य सन्मान झाला… त्यांचा सत्कार वगैरे झाला! मात्र इकडे भारतात परतल्यावर त्यांना काय मिळालं? एक तर अण्णा कम्युनिस्ट पार्टीचं प्रचार कार्य करायचे… त्यामुळे इतर पक्षाचे संधीसाधू नेते वरून तोंड देखलेपणा दाखवत आतून मात्र त्यांचा द्वेषच करायचे! दुसरं असं की अण्णांच्या साहित्याची सततच इतर लेखकांच्या साहित्याशी तुलना केली जायची! त्यामुळे ते न वाचताच दुर्लक्षित, उपेक्षित ठरवलं जायचं… खरं तर हा इथल्या पांढरपेशा मराठी माणसांचा कोतेपणा अन् करंटेपणाच म्हणावा लागेल! त्याचप्रमाणे अण्णा भाऊंचा अनेक साहित्यकृतींवर चित्रपट देखील काढण्यात आले. मात्र त्यावर इतरांनीच स्वतःचा फायदा करून घेतला… त्यावेळी अण्णांना कर्जबाजारी करून त्यांच्या साधेपणाचा गैरफायदा घेऊन मलिदा खाणाऱ्यांना थोडी सुद्धा शरम वाटली नाही!
अण्णांच्या आयुष्याच्या शेवटी का होईना, महाराष्ट्र शासनाने त्यांना मुंबईतील गोरेगाव मध्ये राहायला घर आणि तीनशे रुपये मानधन मंजूर केलं. मात्र त्याचा पुरेपूर लाभ घेणंही अण्णांच्या नशिबी नव्हतं! कारण गोरेगावला राहायला गेल्यावर केवळ वर्षभरातच अण्णा भाऊ हे मतलबी आणि स्वार्थाने बरबटलेलं जग सोडून कायमचे निघून गेले होते!
त्याचप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या प्रसंगी आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी, कॉम्रेड एस. ए. डांगे यांच्यासोबत अण्णा भाऊ, शाहीर अमर शेख, गव्हाणकर हे सगळे अग्रक्रमाने सतत अग्रेसर होते, हे अख्ख्या महाराष्ट्रातील आबालवृद्ध जाणतात. त्यानंतरच्या १०६ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबईसह महाराष्ट्र वेगळा झाल्यावर मात्र त्याचं श्रेय कोणाला मिळालं तर ते सत्तेसाठी लोभी असणाऱ्या पुढाऱ्यांनाच! त्यावेळी शाहीर अण्णा भाऊ, शाहीर अमर शेख आणि शाहीर गव्हाणकर यांची साधी दखल सुद्धा घेण्यात आली नव्हती… मग श्रेय प्रदान करणं तर दूरच!
अण्णा भाऊ यांची खरी कदर केली ती केवळ साहित्य सम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनीच! कारण केवळ त्यांनी अण्णांना अगदी जवळून ओळखलं होतं! त्यांना माहिती होतं… अण्णा भाऊंचं साहित्य म्हणजे इथल्या अस्सल मातीशी इमान राखून लिहिलेली अक्षरं आहेत, ते अगदी आतून, अंतर्मनातून आलेले शब्द आहेत… त्या शब्दाशब्दांमध्ये क्रांती घडवण्याची विलक्षण ताकद आहे! त्यांना अण्णांच्या एकूण एक साहित्य कलाकृतीच्या दर्जेदारपणाची जाणीव होती. जुगारात सर्व काही गमावलेल्या भिडूसारखी ज्यावेळी अण्णांची अवस्था झाली होती…त्यावेळी त्या अतिशय बेचैनीच्या काळात आचार्य अत्रे यांनी त्यांचं योग्य ते समुपदेशन केलं होतं. मग त्यातून सावरल्यानंतर त्यांनी अण्णा भाऊंना त्यांचं आत्मचरित्र लिहीण्यासाठीही उद्युक्त केलं होतं. त्यामुळेच अण्णा भाऊंच्या अलौकिक साहित्य कलाकृती ज्ञानपीठ पुरस्कारच काय तर सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराच्या तोडीच्या आहेत असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही!
No comments:
Post a Comment