जीवन चलने का नाम…
‘चालणे' हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार आहे असं आपण अगदी शालेय विद्यार्थी असल्यापासून ऐकत आलोय. त्याचप्रमाणे 'थांबला तो संपला' ही म्हणसुद्धा सर्वश्रुत आहे! आता साहजिकच एक प्रश्न डोक्यात येतो की सकाळी व्यायाम म्हणून चालणे एक वेळ ठीक आहे पण काही कारण नसताना कधीही नुसतंच निरर्थक चालणाऱ्याला काय म्हणावं ?
बस किंवा रिक्षासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे आपल्या इच्छितस्थळी पोहचण्यासाठी चालणे, एखादी चालण्याची स्पर्धा आयोजित केली असेल तर त्यात चालण्यासाठी भाग घेणे, पंढरपूरची वारी किंवा दिंडीसोबत स्वयंस्फूर्तिने चालणे, ठराविक प्रभातफेरीमध्ये चालणे, कधीतरी 'बंद' काळात आपल्या कामावर जाण्यासाठी नाइलाजाने चालणे असे चालण्याचे विविध प्रकार आपण नेहमीच अनुभवत असतो! मात्र आपल्या निश्चित ध्येयप्राप्तीसाठी न थांबता, न थकता अविरत चालत राहणे हेच खरे जीवन! 'जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम!' हे गाणं नेमकं हेच सुचित करते.
मांजर आडवी गेली म्हणून चालता चालता थांबणारे लोक कधीच कुणासाठी आदर्श ठरू शकत नाही! तसेच एखाद्या व्यक्तीचा रस्त्यावर अपघात झाला असल्यास त्याला मदत करायला न थांबता बेडरपणे दुर्लक्ष करून पुढे चालत निघून जाणारे सुद्धा आपल्या समाजात कमी नाहीत ! याउलट आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गनिमी काव्याने शत्रूवर चाल करणारे छत्रपती शिवाजी महाराज, इंग्रजाविरुद्ध आझाद हिंद सेनेची स्थापना करून 'चलो दिल्ली' अशी ललकारी देणारे सुभाषचंद्र बोस किंवा स्वातंत्र्यासाठी 'चले जाव' ची गर्जना करणारे महात्मा गांधी हे खरे युगपुरुष ठरतात!
आपण कितीही सरळ मार्गाने चालत असलो तरी कुठल्यातरी वळणावर आपल्याला वळण घ्यावंच लागतं! कधीकधी अगदी नाईलाजाने नको त्या वळणावरून चालावं लागतं! अशावेळी कुणी सोबतीला असो अथवा नसो आपल्याला एकट्यालाच चालणे क्रमप्राप्त असते! अशावेळी 'संग चलनेको तेरे कोई हो ना हो तय्यार, हिंमत ना हार! चल चला चल अकेला चल चला चल!' हे अतिशय लोकप्रिय गाणं आठवलं की तुम्हाला नक्कीच खूप प्रेरणा मिळते आणि तुम्ही अधिक उत्साहाने चालू लागता!
नेहमी चालणाऱ्या माणसाचं आरोग्य व्यवस्थित राहतं. तसेच त्यामुळे त्याचा आत्मविश्वासही वाढतो! चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे असं म्हणतात ते उगीच नव्हे ! काहीतरी ध्येय आपल्या नजरेसमोर ठेवून चालणे व नुसतेच चालत राहणे यात खूप फरक आहे ! कधीकधी आपल्या बघण्यात येतं काही लोक केवळ छंद म्हणून कित्येक मैल चालून नवनवीन विक्रम प्रस्थापित करतात. त्यासाठी त्यांना मिळणारं समाधान वेगळंच असतं! काही व्यक्ती आपल्या लक्ष्यप्राप्तीसाठी किंवा केवळ छंद जोपासण्यासाठी डोंगरदऱ्यातून, काट्याकुट्यातून, खाचखळग्यातून तसेच जीवघेण्या अडथळ्यातून चालताना दिसतात! उदा. गिर्यारोहण करणे, माउंट एवरेस्ट सारखी अतिशय उंच शिखरे सर करणे, जंगल भटकंती इत्यादी इत्यादी... प्राचीन काळी युद्धाच्या प्रसंगी रणांगणात राजे महाराजे किंवा सरदार, मनसबदार त्यांच्या रथ, हत्ती किंवा घोड्यावर स्वार होऊन रणांगणात जायचे पण सर्वात जास्त संख्येनं असलेले सामान्य सैनिक मात्र दूर दूरपर्यंत चालतच जायचे! तेव्हा चालणे हाच त्यांचा परिपाठ असायचा, युद्ध जिंकण्याच्या इर्षेने चालणे हेच जणू त्यांच्या जीवनाचा एक भाग असायचा. अलीकडच्या म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात महात्मा गांधींनी लाखो लोकांच्या साक्षीने ‘दांडी यात्रा’ यशस्वी करून ब्रिटिश सत्तेला जबरदस्त हादरा दिला तोही कित्येक मैल पायी चालत जाऊनच!
आज मात्र, सकाळी सकाळी जवळच्याच दुकानातून साधी दुधाची पिशवी आणायला बऱ्याच लोकांना वाहनाची गरज भासते. अशा लोकांना जवळ कुठंही जायचं म्हटलं तरी स्कुटर किंवा रिक्षाशिवाय त्यांचं भागातच नाही. आजकालच्या ऐशोआरामाच्या सवयीमुळे पायी चालणे त्यांच्या अगदी जीवावर येते!
आपल्या मुलाच्या बालपणी त्याच्या वयाचं वर्ष पूर्ण व्हायच्या आतच 'अरे तो बघ चालायला लागला' असं आपण मोठ्या कौतुकाने सगळ्यांना सांगतोच ना! त्यावेळी सगळे जण त्याचे कौतुकच करताना दिसतात! मात्र काही महिन्याने किंवा दोन तीन वर्षातच तो इतका चालायला लागतो की त्याला पळता भुई थोडी होते! मग शाळा किंवा महाविद्यालयात जायला लागला की चालताना त्याचे पाय जमिनीवर थांबत नाहीत हेही आपण बघतोच! म्हणजेच चालणे ही प्रक्रिया आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भागच बनलेली असते.
चालताना कितीतरी महाभाग इकडे बघणार, तिकडे चालणार असेही भेटतात! त्यामुळे अशा लोकांचा कधी धक्का लागून आपण पडणार हे कुणी सांगू शकत नाही. यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या 'ग्रामगीता' या ग्रंथात खूपच मार्मिक भाष्य केलेलं आहे...
“चालताना शिस्त नाही। जनलोकांची अजब घाई।
कोणाचाही पायपोस नाही। पायी कोणाच्या ।।
कोणी कोणाचे ऐकेना। पुढे धसावयासि करी धिंगाणा।
याचे शिक्षणही नाही कोणा। कैसे चालावे मार्गाने?
नाही चालणारांसि शिस्त। चालती जैसी जनावरे समस्त।
माणसाचे चालणेचि स्वस्थ। विसरले लोक ।।”
'चल मुसाफिर तेरी मंझिल दूर है तो क्या हुआ' या गाण्यात आपल्याला एक दुर्दम्य आशावाद असल्याचं दिसून येतं! पुढे चालताना… “आपले ध्येय अगदी पक्के आणि इरादे अटळ असले की मग जगातील कुणीही तुम्हाला तुमच्या ध्येयप्राप्तीपर्यंत पोहचण्यास रोखू शकणार नाही! तुम्ही कुठेही जा पण आपले प्रयत्न कधी सोडू नका. एक ना एक दिवस यश नक्कीच तुमच्या गळ्यात माळ घालणार हे निश्चित!” हे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांचं वक्तव्य आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरते. त्यामुळे नुसतं बसून निष्क्रीय राहण्यापेक्षा आपलं ध्येय नजरेसमोर ठेवून दोन पावलं पुढं चालणं, चालायला सुरूवात करणं कधीही श्रेयस्कर!
*दो कदम बढ़ाकर तो देखो… कभी ना कभी मंझिल तक पहुचेंगे जरूर!*
... विनोद श्रा. पंचभाई, पुणे
9923797725
No comments:
Post a Comment