Monday, December 15, 2025

जीवन मे तू डरना नही...

 


 जीवन मे तू डरना नहीं!

   अचानक येणारी संकटं किंवा अपरिमित आर्थिक नुकसान आणि मग त्यातून येणारी आत्यंतिक निराशा अशा गोष्टींचा समर्थपणे सामना करणे सहसा सगळ्यांनाच जमत नाही. अशावेळी आपलं मन अगदी समतोल ठेवून आनंदी राहणं हे धाडसी माणसांशिवाय अन्य कोणाला साधता येत नाही. या जगात जे जे थोर महापुरुष होऊन गेलेत, त्यांच्या मोठेपणामागे त्यांची धाडसी मनोवृत्तीच कारणीभूत होती यात शंकाच नाही! अतिशय सामान्य प्रकारचे लोक कुठलंही संकट समोर दिसताक्षणीच डगमगतात आणि त्यामुळे अगदी थोड्या प्रमाणात नुकसान झालं तरी त्याप्रसंगी पुढचं पाऊल मागे घ्यायला कमी करत नाही. त्यांच्या अंगी धाडसी वृत्ती नसल्यामुळे ते त्यावेळी लगेच अधीर होतात. मात्र मनानं खंबीर असणारे लोक खरेखुरे धाडसी आणि निधड्या छातीचे असतात. ते अशा प्रकारच्या गोष्टींची, छोट्या मोठ्या संकटांची मुळीच पर्वा करत नाही. ते कुठल्याही प्रकारच्या बिकट प्रसंगी आपल्या मनाची समतोल बुद्धी, कणखरपणा जरा सुद्धा ढळू देत नाहीत. उलट आलेल्या प्रसंगाचे टेन्शन न घेता, धैर्याने त्याचा सामना करतात आणि आनंदी वृत्तीने आपले म चालू ठेवतात. खरंतर शौर्य, धैर्य म्हणजेच धाडसीपणा, निधडेपणा त्याचप्रमाणे थोडी फार बेफिकीरी इत्यादी गुण अंगी असल्याशिवाय मनुष्याची वृत्ती आनंदी किंवा प्रफुल्लित राहूच शकत नाही !

    मनुष्य हा नेहमीच आशेकडे आपले डोळे लावून पाहत बसणारा प्राणी आहे. असे असले तरी त्याच्यात हा आशावाद निर्माण होण्यासाठी त्याच्या मनाचा कणखरपणाच कारणीभूत ठरतो यात वाद नाही. ज्याच्याजवळ आशा आहे, म्हणजे आपलं इच्छित कार्य करण्यासाठी ज्याची दिवस रात्र अखंडपणे मनापासून धडपड चाललेली असते, त्याच्याकडे निराशा कधीच चालून येत नाही. आज समोर मिट्ट काळोख, अंधःकार दिसत असला तरी तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे, याची त्याला जाणीव असते आणि त्या काळोखानंतर उद्याचा सूर्य आपलाच असणार हेही त्याला पक्के ठाऊक असते !

       असं म्हणतात दुःख, संकटे, त्रास, नुकसान इत्यादि गोष्टी कधीही कोणाच्या वाट्याला येऊ नयेत... हे जरी खरं असलं तरी त्याप्रसंगी आपलं धैर्य गमावून खचून जाणं शहाणपणाचं ठरणार नाही. तर अशा प्रकारच्या दिव्यातून जो तावूनसुलाखून बाहेर पडतो, त्याला वरील गोष्टीपैकी कशाचीही झळ लागत नाही! कारण त्याची धाडसी मनोवृत्ती समोर येणाऱ्या संकटासोबत सामना करण्यासाठी तयार होऊन त्याचे स्वागत करावयास ती सज्ज झालेली असते. खरं बघितलं तर संकटाचा प्रतिकार करायला काही फारशी साधनसामुग्री लागत नाही. थोडा फार बेफिकिरपणा, कमालीचा कणखरपणा आणि मनाचा समतोल या गोष्टी जवळ असल्या की तुमचे कोणीही वाकडे करू शकत नाही मात्र त्यासाठी हाच ठाम विश्वास नित्य मनी बाळगणं तितकंच गरजेचं असतं !


   भय, भीती ही अशी गोष्ट आहे, ती एकदा मनात ठाण मांडून बसली की मग कुठलंच काम व्यवस्थित होत नाही. मग ही सतत वाटणारी भीती विनाकारण टेन्शन वाढवते आणि मनाचा समतोल बिघडवण्यासही कारणीभूत ठरते... माणसामधील आत्मविश्वास कमी करते ! 'ज्याला कर नाही, त्याला डर कशाला' हे ज्याला ठाऊक असतं ना, तो कशालाही घाबरत नसतो. त्याला माहिती असतं आपण कुठलंही खोटंनाटं काम कधी केलं नाही, करत नाही आणि करणारही नाही तर उगाच घाबरायचं कशाला? आपण कुणाचे मिंधे नाही, कुणाचं लांगुलचालन करत नाही, कुणाच्या दबावाखाली काम करत नाही तर भीती कशासाठी

बाळगायची? मग कुणापुढे विनाकारण झुकायचं तरी कशासाठी? अशा प्रकारच्या धाडसी स्वभावाच्या माणसाला चांगलंच ठाऊक असतं... "जीवन मे तू डरना नही, सर निचा कभी करना नहीं!"

 विनोद श्रा. पंचभाई, पुणे 9

923797725

No comments:

Post a Comment