मनोगत...
अठरा विश्व दारिद्र्य काय असतं... रोजच्या जगण्यासाठी करावा लागणारा आटापिटा, उपासमार, फरफट याचा विदारक अनुभव अण्णा भाऊंनी त्यांच्या अगदी बालपणापासूनच घेतला! त्यामुळे त्यांच्या न कळत्या वयापासून अतोनात दुःख, वेदना, हेटाळणी, अवहेलना त्यांच्या वाट्याला पदोपदी आल्या. मात्र अण्णांनी त्याचा उगाच बाऊ न करता, कुठलंही भांडवल न करता… या दुःखालाच आपलं सामर्थ्य बनवलं आणि येणाऱ्या बिकट परिस्थितीचा त्यांनी अतिशय धैर्याने सामना केला.
आपला देश पारतंत्र्यात असताना अण्णांनी त्यांच्या कुटुंबीयांसह वाटेगाव पासून मुंबई पर्यंत केलेला प्रवास अंगावर काटे आणणारा आहे! मुंबई मायानगरीत जगण्यासाठी हातावर पोट असल्यामुळे... त्याकाळात गरिबी, हालअपेष्टा यांचा सामना करत त्यांनी काढलेले हलाखीचे दिवस, केलेली पायपीट खूपच अंतर्मुख करणारी आहे. हे सगळे प्रसंग, घटना 'शब्दांमधून क्रांती घडवणारा लोकशाहीर' या चरित्र कादंबरीत वाचताना सर्व सामान्य माणसाचं मन विदीर्ण झाल्याशिवाय राहणार नाही!
अण्णा भाऊंना अवघ्या दीड दिवसातच शाळा सोडणं भाग पडलं! शिक्षण घेण्यासाठी त्या काळच्या समाज व्यवस्थेनं झिडकारलं तरी नंतर अण्णा भाऊ प्रयत्न पूर्वक लिहिणं, वाचणं शिकले. पुढे गाणंही लिहू लागले... आणि मग कालांतराने त्यांनी काळजाचा ठाव घेणाऱ्या अनेक गीत रचना लिहिल्या. त्यात झंझावाती पोवाडे होते, अतिशय अर्थपूर्ण अशा गवळणी, छक्कड, गाणी सगळं सगळं काही होतं! सर्वसामान्य लोकांचं हृदय पिळवटून निघेल एवढं सामर्थ्य अण्णांच्या गीत रचनेत असायचं! त्यांचं प्रभावी सादरीकरण ऐकून त्याकाळी आपल्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर सोव्हिएत रशियातील लोकही डोलू लागले होते!
त्यानंतर अण्णा भाऊंनी अनेक कथा, कादंबऱ्या, नाटके, पथनाट्यं इत्यादी प्रकार हाताळून विपुल साहित्य निर्मिती केली. त्यांचं साहित्य चांगलंच लोकप्रिय ठरू लागलं. मात्र तरीही अण्णा भाऊंच्या साहित्याची त्या काळातील समीक्षकांनी म्हणावी तशी दखल घेतली नसल्याने त्यांच्या साहित्याचा यथोचित सन्मान होऊ शकला नाही... तसेच अण्णांना इतर साहित्यिकांप्रमाणे मान सन्मानही मिळाला नाही हे आपल्या पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचं दुर्दैवच! त्यांनी लिहिलेल्या अनेक कथा, कादंबऱ्या यांची खरी कदर परदेशातच झाली, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही! खरं तर त्याला आपल्या मराठी मनाची संकुचित वृत्तीच कारणीभूत आहे, हेही तितकंच खरं!
अंतर्मनाचा ठाव घेणाऱ्या कथा, हृदय पिळवटून टाकणाऱ्या गीत रचना, विचार करायला भाग पाडणाऱ्या कादंबऱ्या एवढं विपुल साहित्य लिहूनही शेवटी अण्णांना काय मिळालं? विवंचना, उपेक्षा, हेटाळणी, अवहेलना इत्यादी गोष्टींचा आयुष्यभर सामना करत शेवटी अण्णा उपेक्षित आणि दुर्लक्षित जीवन जगत राहिले! पुढे सोव्हिएत रशियातून निमंत्रण आल्यामुळे तिथं तरी त्यांच्या साहित्याचा यथायोग्य सन्मान झाला. तिथं त्यांचा सत्कार झाला, अनेक प्रकारचे उत्तम अनुभव मिळाले. मात्र इकडे भारतात परतल्यावर त्यांना काय मिळालं? एक तर अण्णा कम्युनिस्ट पार्टीचं प्रचार कार्य करायचे… त्यामुळे इतर पक्षाचे संधीसाधू नेते वरून तोंड देखलेपणा दाखवत आतून मात्र त्यांचा द्वेषच करायचे! दुसरं असं की अण्णांच्या साहित्याची सततच इतर लेखकांच्या साहित्याशी तुलना केली जायची! त्यामुळे ते ठराविक वर्गाकडून न वाचताच दुर्लक्षित, उपेक्षित ठरवलं जायचं… खरं तर हा आपल्या महाराष्ट्रातील पांढरपेशा मराठी माणसांचा कोतेपणा अन् करंटेपणाच म्हणावा लागेल!
अण्णा भाऊंना दलित साहित्याचे संस्थापक म्हणूनही श्रेय दिले जाते. मात्र त्यांना कथाकार, कादंबरीकार मानायला त्यांच्या काळातील काही विद्वान तयार नव्हते… तरीही त्यांचं साहित्य हे वाचकप्रिय ठरलं होतं. अण्णांच्या कादंबऱ्यांवर तब्बल आठ सिनेमे निघाले… तर त्यांच्या अनेक कथांवर लघुपट आणि मालिका सुद्धा निघाल्या. मात्र केवळ ‘फकिरा’ या कादंबरीला महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन, १९६१ सालचा 'उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार' अण्णा भाऊंना प्रदान करण्यात आला. अण्णांनी मराठी भाषेत जवळपास ३५ कादंबऱ्या लिहिल्या. तसंच त्यांच्या नावावर पंधरा लघुकथांचा संग्रह आहे… त्यातील मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि तब्बल सत्तावीस विदेशी भाषांमध्ये अनुवादित करण्यात आल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्या व्यतिरिक्त अण्णांनी नाटके, रशियातील प्रवास वर्णन, बारा पटकथा, अनेक अजरामर पोवाडे, गाणी इत्यादी विपुल लेखन केलं आहे.
त्याकाळात शाहीर अण्णा भाऊ यांचं साहित्य हे परिवर्तनाला दिशा आणि चालना देणारं ठरलं. संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या आंदोलनाच्या वेळी त्यांचे पोवाडे दुमदुमले... सर्व सामान्य लोकांनी ते डोक्यावर घेतले! महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात साहित्याचं योगदान हे महत्त्वपूर्ण मानलं जातं. खरं तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत अण्णा भाऊ यांचं अविस्मरणीय योगदान आणि साहित्य क्षेत्रातील अष्टपैलू कर्तृत्व 'भारत रत्न' पुरस्काराच्या तोडीचं आहे. त्यांच्या साहित्याच्या शब्दाशब्दांमध्ये क्रांती घडवण्याचं सामर्थ्य आहे मात्र तरीही अण्णा भाऊंचं साहित्य आपल्या प्रगत महाराष्ट्रात उपेक्षित, दुर्लक्षित ठरावं यासारखं दुर्दैव नाही!
पुण्यातील 'दुर्वा एजन्सीज्' या प्रकाशन संस्थेचे सतत कार्यरत राहणारे प्रयोगशील प्रकाशक शैलेंद्र कदम यांनी *शब्दांमधून क्रांती घडवणारा लोकशाहीर* या चरित्र कादंबरीच्या निर्मितीसाठी सतत पाठपुरावा केला... त्यामुळेच ही साहित्यकृती लिहू शकलो हे मी याठिकाणी नम्रपणे नमूद करतो. त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार! या चरित्र कादंबरीसाठी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिणारे डॉ. भगवान लोखंडे यांच्याप्रती धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आकर्षक मुखपृष्ठ रेखाटणारे चित्रकार प्रशांत भारताल आणि अतिशय सुबक लेआऊट, अक्षर जुळवणी करणाऱ्या संगीता जावळकर यांनाही अनेक अनेक धन्यवाद!
... विनोद श्रा. पंचभाई, पुणे
भ्र. क्र. ९९२३७९७७२५
No comments:
Post a Comment