Friday, March 19, 2021

संस्काराचे विचारदुर्ग...

 

संस्काराचे विचारदुर्ग...

"जाति न पुछो साधू की
पूछ लिजिए ज्ञान।
मोल करो तलवार का
पडी रहेन दो म्यान ।।"
या संत कबीर महाराजांच्या दोह्यानुसार संतांना वेगवेगळ्या जातीपातीत न अडकवता त्यांनी अखिल मानवजातीसाठी दिलेला एकात्मतेचा संदेश युवा कीर्तनकार असलेले लेखक रमेश वाघ यांनी 'महाराष्ट्राचे विचारदुर्ग' या आपल्या पहिल्यावहिल्या दर्जेदार पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवला आहे. 'ज्ञानियांचा राजा' ज्ञानोबा माउलीपासून ते समर्थ रामदास स्वामी यांच्यापर्यंत एकूण दहा थोर संतांच्या अलौकिक कार्याचा आढावा घेणारे हे पुस्तक नुकतेच पुण्यातील ख्यातनाम प्रकाशन संस्था 'चपराक' तर्फे प्रकाशित करण्यात आले आहे.
जगाच्या पाठीवर आजपावेतो कितीतरी बलशाली राजे-महाराजे, सम्राट, सुलतान, हुकूमशहा आले आणि गेले. त्यांची कायम न टिकणारी सत्ता देखील धुळीला मिळाली. अख्खं जग जिंकण्याची ईर्षा बाळगून अनेक राज्ये पादाक्रांत करत रुबाबात निघालेला सिकंदरही शेवटी त्याच्या मनसुब्यात अयशस्वी ठरल्यानंतर रिकाम्या हातानंच हे जग सोडून गेला, हा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे. मात्र या अखिल विश्वावर एकछत्री अंमल कायम टिकून राहिला तो संतांच्या अनमोल विचारांचाच... हे त्रिकालाबाधित सत्य कोणीही नाकारू शकत नाही! लौकिकार्थानं अजूनही संतांचंच राज्य या भूतलावर असल्यानं ही चराचर सृष्टी, मानवजात अस्तित्वात आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 'ग्रामगीता' या ग्रंथातील पुढील समर्पक ओव्या वाचल्यावर त्याची साक्ष पटते ...
"राजे किती आले, गेले। त्यांचे कायदे नष्ट झाले।
सत्तेचे दरबार उजाडले। परि राज्य चाले संतांचे।।
संतांचा तो प्रचार अमर। अजूनिही लोक-मनावर।
राज्य चालवोनि निरंतर। लाखो जीवां उद्धरितो।।
न लगे सत्तेचा बडगा। नको भयभीतीहि सन्मार्गा।
आपापले कर्तव्य जगा। प्रचारसूर्यचि दाखवी।।"

लेखक रमेश वाघ हे पेशाने शिक्षक असून त्यांचं विद्यार्थी घडवण्याचं निरंतर कार्य अभिमानास्पद आहेच. आता 'महाराष्ट्राचे विचारदुर्ग' या संतांची मांदियाळी असलेल्या त्यांच्या अनोख्या पुस्तकातून, त्यातील संतांच्या अमूल्य विचारांच्या माध्यमातून संस्कारक्षम 'माणूस' घडवण्याचं कार्यही निश्चितच स्वागतार्ह आणि अभिनंदनीय आहे. तरीही ते त्यांच्या मनोगतातून "आपुलिया बळे नाही मी बोलत। सखा कृपावंत वाचा त्याची।।" अशाप्रकारच्या प्रामाणिक भावना व्यक्त करतात.

या विचारदुर्गात ज्ञानोबा माउली, नामदेव महाराज, सावता महाराज, गोरोबाकाका, नरहरी सोनार, सेना महाराज, चोखामेळा, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी अशा एकूण दहा महनीय संतांच्या चरित्रांची अतिशय साध्या,सोप्या आणि ओघवत्या भाषेत मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे पुस्तकाचे प्रत्येक पान वाचताना वाचक 'भावविभोर' होऊन जातो आणि त्याचं अंत:करण हेलावल्याशिवाय राहत नाही! अनेक मार्मिक आणि भावस्पर्शी प्रसंग, त्यांना अनुसरून लिहिलेली प्रभावी संवादशैली ही 'महाराष्ट्राचे विचारदुर्ग' ची खासियतच म्हणावी लागेल. या पुस्तकातील एकच प्रसंग याठिकाणी नमूद करतो...
एकनाथ महाराज एकेदिवशी गोदावरीवरुन स्नान करून येत होते. रस्त्यामध्ये एक माडी होती. तिथे एक यवन पान खाऊन खिडकीमध्ये बसलेला होता.
तो नाथांच्या अंगावर थुंकला. नाथ पुन्हा गोदावरीवर गेले. आंघोळ करून परतले. पुन्हा तो थुंकला! असं एकशे आठ वेळा घडलं. नाथ काहीच बोलले नाहीत. त्यानंतर तो यवन नाथांना शरण आला व म्हणाला, "माझं चुकलं महाराज, मला क्षमा करा."
नाथ म्हणाले, "तुझं काहीच चुकलं नाही. उलट तुझ्यामुळे मला गोदावरीचं एकशे आठ वेळा स्नान घडलं त्यासाठी मीच तुझे आभार मानावयास हवेत."
काहीही झालं तरी कुणावर रागवायचं नाही हे नाथांचं ठरलेलं होतं. किती सहनशीलता... केवढा मोठा मनाचा संयम! हल्ली आपण बघतो, अगदी क्षुल्लक गोष्टींवरून सुध्दा आपल्याला राग येतो. मनाचा संयम, सहनशीलता जणू लुप्त होत चाललीय! या पुस्तकातील महान संतांच्या चरित्रांचे वाचन केल्यानंतर त्यांच्या अलौकिक विचारांचं निदान काही अंशी तरी आपण सामान्य जणांनी आचरण केलं तरी हे अनोखं पुस्तक लिहिण्याचं सार्थक होईल असं वाटतं.
'महाराष्ट्राचे विचारदुर्ग' हे खरंतर संस्कारांचं विचारदुर्ग आहे असंच म्हणावं लागेल. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येक पालकानं आपल्या मुलांसाठी आवर्जून संग्रही ठेवावं असं सुचवावसं वाटतं.
एक दोन नव्हे तब्बल दहा संतांच्या चरित्रांना पुस्तक रूप बहाल करणार्या अवलिया संपादक, प्रकाशकाचं, घनश्याम पाटील यांचं विशेष कौतुक आणि जोरदार अभिनंदन करायलाच हवं. तसेच विषयाला अनुसरून अप्रतिम मुखपृष्ठ साकारणारे चित्रकार संतोष घोंगडे यांचंही अभिनंदन! या 'विचारदुर्ग'चे विचारवंत लेखक रमेश वाघ यांच्याकडून आणखी बर्याच चिंतनशील, वैचारिक कलाकृतींची अपेक्षा करायला हरकत नाही. त्यांना त्यांच्या भावी लेखनकार्यास मनापासून शुभेच्छा!!

विनोद श्रा.पंचभाई, पुणे
भ्र.क्र. ९९२३७९७७२५

No comments:

Post a Comment