Thursday, March 6, 2025

मनोगत... 'कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी'

 मनोगत... 'कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी'


       आपल्या खंडप्राय भारत देशाला संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, संत कबीर महाराज, संत तुलसीदास, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज अशा कितीतरी असंख्य संतांची परंपरा लाभली आहे. या सर्वच महान संतांनी सर्वसामान्य लोकांना जगण्याची योग्य दिशा दाखवण्याचं मोलाचं कार्य केलं आहे. त्याचप्रमाणे अतिशय प्रभावीपणे समाज प्रबोधन करून वेळोवेळी मार्गदर्शनही केलं आहे. समाजातील विविध जातिधर्माच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रसंगी अनेक हालअपेष्टांचा सामना देखील कित्येक संतांना करावा लागला.

    आपल्या समाजातील अज्ञान, अनिष्ट रूढी, बुरसटलेल्या चालीरिती, परंपरा, अंधश्रद्धा यांना दूर करण्यासाठी संतांनीच पुढाकार घेतल्याचा इतिहास आहे. याच संत परंपरेतील आधुनिक समाज सुधारक संत वैराग्यमूर्ती कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या प्रभावी वाणीने समाजात बोकाळलेल्या अंधश्रद्धेवर, अस्पृश्यतेवर तसंच जुनाट रूढी, परंपरेवर कठोर प्रहार केले आहेत. खेडेगावात पसरलेली कमालीची अस्वच्छता, निरक्षरता आणि अंधश्रद्धा या कारणांनी सामाजिक आरोग्य दूषित होत असल्याचं कर्मयोगी गाडगेबाबा यांनी ओळखलं होतं. त्यामुळे त्यांनी स्वतः हातात खराटा घेऊन लोकांना 'आपलं घरदार, परिसर स्वच्छ असेल तर मनही स्वच्छ राहतं!’ असा स्वच्छतेचा मंत्र दिला आणि विशेष परिणाम साधणाऱ्या आपल्या कीर्तनातून शिक्षणाच्या प्रसारावरही भर दिला. “शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. शिक्षणामुळे मनुष्याच्या अंगी शहाणपणा येतो, तो स्वतंत्रपणे विचार करायला शिकतो. शिक्षणामुळे त्याची प्रगती होते आणि त्यामुळे त्याची जगाच्या व्यवहारात फसवणूक होऊ शकत नाही. शिक्षणाविना माणूस म्हणजे निव्वळ धोंडा असतो!” अशाप्रकारचे विचार ते अत्यंत कळकळीनं आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर बिंबवायचे. त्याचप्रमाणे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेतील ओव्यांचा दाखला देत समाजात बोकाळलेल्या अंधश्रद्धेवर कठोर प्रहार करायलाही गाडगेबाबा डगमगले नाही.

''अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ!

त्याचे गळा माळ असो नसो!"... या तुकाराम महाराजांच्या वचनानुसार अंतःकरणानं निर्मळ असलेला आणि ज्याचं बोलणं ऐकायला छान वाटतं, त्याला गळ्यात कुठलीही माळ घालायची गरज नाही. याप्रमाणे सांगत असतानाच ... 'नवसे पुत्र होती, मग का करणे लागे पती?' असा रोकडा सवाल सुद्धा गाडगेबाबा जनसमुदायासमोर विचारायला कमी करत नव्हते. ‘देव दगडात नसून तो माणसांत आहे’ हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसवण्याचा मनापासून प्रयत्न केला. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी गाडगेबाबांनी आपलं अख्खं आयुष्य वेचलं! 

ज्याप्रमाणे कर्मयोगी गाडगेबाबा यांची समाजाला प्रबोधन करण्याची विशिष्ट पद्धत होती, तशीच आपल्या खंजरी भजनाच्या माध्यमातून जमलेल्या जनतेच्या मनावर पकड घेण्याची राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची खास शैली होती. वंदनीय राष्ट्रसंत हे वर्तमान परिस्थितीचं भान ठेवून भविष्याचा वेध घेणारे आदर्श दिशादर्शक होते. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशभक्तीनं ओतप्रोत अशा भजनांच्या माध्यमातून गावागावातील सर्वसामान्य जनतेमध्ये देशप्रेम जागवणारे आणि आपल्या देशासाठी तुरूंगवास भोगणारे ते एकमेव क्रांतिकारी संत होते.


   राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या प्रेरणादायी आणि परिणामकारक साहित्यातून सर्वसामान्य लोकांसाठी प्रभावीपणे प्रबोधन केलं आहे. इतर तथाकथित साहित्यिकांप्रमाणे उगाच कुठल्याही बोजड आणि अलंकारिक शब्दांचा वापर न करता त्यांनी त्यांच्या मराठीतील साहित्यासोबत हिंदी भाषेतील भजनातूनही सहज, साध्या शब्दांनी अत्यंत सोप्या भाषेत योग्य तो परिणाम साधला आहे. राष्ट्रसंत त्यांच्या ‘ग्रामगीता’ या अदभूत ग्रंथात म्हणतात…

''मंदिरी बैसोनि नाक दाबावे, त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे! 

दुःखितासि प्रेमे पाणी पाजावे, हे श्रेष्ठ तीर्थस्नानाहूनि!!''


राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची साहित्यसंपदा खूप मोठी आहे. त्यात असलेला मराठी आणि हिंदी भाषेतील विपुल ठेवा चिरकाल प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यांच्या अनमोल कार्याचा वारसा आणि वसा जपत आजही हजारो कार्यकर्ते समाज प्रबोधनाच्या कार्यात सहभागी होत असतात. राष्ट्रसंतांच्या साहित्यावर, त्यांच्या समाजोपयोगी कार्यावर असंख्य व्यक्तींनी पीएचडी संपादन केली आहे. 


       विदर्भातल्या या दोन महान संतांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने 'ग्राम स्वच्छता अभियान' सर्व जिल्ह्यातील गावागावात राबवून त्यांच्या कार्याचा उचित गौरव केला आहे. त्याचप्रमाणे अमरावती विद्यापीठाला वैराग्यमूर्ती गाडगेबाबांचं आणि नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव देऊन दोन्ही विद्यापीठांना शैक्षणिक कार्याची नवी दिशा देण्याचं कार्यही शासनानं केलं आहे.


*कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी* या पुस्तकासाठी डॉ. शांतिदास लुंगे दादा यांनी त्यांच्या प्रभावी शैलीत अप्रतिम प्रस्तावना लिहिली आहे. तसेच श्री.दिलीप गाडगे दादा यांनी या पुस्तकासाठी सुंदर अशी पाठराखण शब्दबद्ध केली. माझ्यासाठी हे आराध्यस्वरूप असलेलं पुस्तक लिहायला सतत प्रेरणा देणारे आदरणीय बाळकृष्ण पाचभाई दादा आणि ऍड. कृपालदादा भोयर यांनी या साहित्य कृतीसाठी ओघवत्या भाषेत त्यांचे मर्मस्पर्शी असे शुभेच्छा संदेश दिले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे आभार न मानता या सर्वांच्या ऋणातच राहू इच्छितो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राला सुपरिचित असलेले चित्रकार मित्र संतोष घोंगडे यांनी 'कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी' या साहित्य कृतीसाठी अप्रतिम असं बोलकं मुखपृष्ठ चितारलं आहे. दुर्वा एजन्सीज् प्रकाशन संस्थेचे सर्वेसर्वा शैलेंद्र कदम यांनी सतत पाठपुरावा करत हे चरित्रात्मक पुस्तक माझ्याकडून पूर्ण करून घेतलं... त्यांनी प्रकाशित केलेली ही माझी दहावी साहित्यकृती! या पुस्तकाची अप्रतिम मांडणी आणि अक्षर जुळवणी संगीताताई जावळकर यांनी केली आहे. या सर्वांचेच मनापासून आभार! धन्यवाद!

... विनोद श्रा. पंचभाई 

मोबाईल क्र.९९२३७९७७२५

No comments:

Post a Comment