जगण्याचा आधार... 'आनंदयात्री'
नुकताच म्हणजे परवाच्या रविवारी जागतिक मातृदिन सर्वत्र साजरा करण्यात आला आणि योगायोग म्हणजे त्याच दिवशी मी आमचे ज्येष्ठ लेखक मित्र श्री. जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेलं 'आनंदयात्री' हे सुंदर पुस्तक वाचायला हाती घेतलं. त्यातील 'वात्सल्यसिंधू आई' हा अतिशय भावस्पर्शी लेख वाचताना नकळतपणे डोळे भरून आले! या लेखात लेखकाने आपल्या आईबद्दलच्या अत्यंत तरल भावना प्रकट केल्या आहेत. ते लिहितात... आईचा स्वभाव आनंदी असल्यामुळे तिच्याबरोबर राहणं हा आनंद सोहळा असायचा! लोकांना खाऊ पिऊ घालण्यात, मदत करण्यात तिला अपार आनंद मिळायचा. स्वतःसाठी म्हणून ती जगलीच नाही, पाणी जसं कोणत्याही रंगात मिसळून जातं, अगदी तसंच तिचं होतं!
जयंत शंकर कुलकर्णी यांची गजानन महाराज
यांच्यावरील "श्री गजानन कथासागर", "स्वातंत्र्याचे शिल्पकार भाग -१, २, ३ तसेच "लहानपण वाचव रे देवा!" अशी एकूण पाच पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या एवढ्यातच प्रकाशित झालेल्या 'आनंदयात्री' या पुस्तकात लहान मोठे असे एकूण तीस लेख आहेत. सगळे लेख वेगवेगळ्या विषयांवरील असल्याने ते वैविध्यपूर्ण झाल्याचे आढळून येतात, त्यामुळेच ते वाचनीय झाले आहेत. या लेख संग्रहातील 'रांगेतला मी' या पहिल्या खुमासदार लेखापासून सुरुवात करून लेखक जयंत कुलकर्णी यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून 'अंदमानची सफर' करत असताना पार देश विदेशाच्या विलक्षण सफरी देखील घडवल्या आहेत. त्यात 'विलोभनीय युरोपची रोमहर्षक सफर' तसेच 'छोटा तरी प्रभावी देश कुवेत' यांचाही समावेश आहे.
'आनंदयात्री'चे खास वैशिष्ट्य म्हणजे यातील काही लेखांच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे व्यक्तीचित्रणही रेखाटण्यात आलं आहे. त्यात प्रामुख्याने 'भावगीत गायक : गजाननराव वाटवे', 'राजा माणूस : विनय लक्ष्मण करमरकर, 'वात्सल्यसिंधू आई' या सोबतच 'संत श्री गजानन महाराज महात्म्य', 'गुरुवीण नाही दुजा आधार' हे लेख वैशिष्ट्यपूर्ण झालेले आहेत. त्याचप्रमाणे 'आठवणीतील गाणी, सांगतील जीवन कहाणी..!' या लेखात अनेक कलाकारांचं केलेलं वर्णन खूपच वाचनीय झालं आहे. मुळात हे सगळे लेख वाचायलाच हवेत एवढे सर्वांगसुंदर झाले आहेत. या संग्रहाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की... लेखकाने काही लेखातून अधूनमधून समर्पक अशा सुंदर गाण्यांची पखरण केली आहे. त्यामुळे योग्य तो परिणाम साधण्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत. 'जीवन गाणे होऊ दे..!' आणि 'जिवलगा कधी रे येशील तू?' हे लेख वाचताना ते प्रकर्षाने जाणवतं!
'आनंदयात्री' मधील 'स्त्री शिवाय विकास? केवळ अशक्य!', 'स्वान्त सुखाय' तसेच 'औदार्य, आत्मसन्मान आणि आनंदी आयुष्य - ज्येष्ठाचे!' हे लेख सामान्य वाचकांना विचार करायला भाग पाडणारे आहेत. तर 'योद्धा' मधला सर्वांना मनापासून मदत करणारा हरहुन्नरी महेश कमालीची चुटपुट लावून जातो! या संग्रहातील निरनिराळ्या प्रसंगावर बेतलेले लेख काही ना काही संदेश देऊन जातात हे मात्र निश्चित! त्यामुळे वाचकांनी ते प्रत्यक्ष वाचूनच त्याचा आनंद घ्यायला हवा असं वाटतं.
पुण्यातील 'नरवीर प्रकाशन'तर्फे प्रकाशित झालेला 'आनंदयात्री' हा लेखसंग्रह म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यातील धडपड आहे, तळमळ आहे तसाच तो आनंददायी, ऊर्जादायी सुद्धा आहे. तसंच सर्वसामान्य वाचकांना जगण्याची दिशा देणाराही आहे. म्हणूनच 'आनंदयात्री' प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवा असं मनापासून वाटतं! इतरांना भेट देण्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा 'आनंदयात्री' लेखसंग्रह लिहिल्याबद्दल लेखक जयंत कुलकर्णी यांचं मनस्वी अभिनंदन आणि त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा! धन्यवाद!
विनोद श्रा. पंचभाई, पुणे
मोबाईल क्रमांक ९९२३७९७७२५
पुस्तकाचे नाव... 'आनंदयात्री' (लेखसंग्रह )
पाने... १६२
किंमत.... ₹ २६०/-
संपर्क... 9923797725, 9423434156
No comments:
Post a Comment