Thursday, May 22, 2025

कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी.


कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी.


'आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी...

देशी विदेशीयों को मंदिर यह हमारा!' अशी सर्वव्यापक ललकारी देणारे तुकडोजी महाराज यांना त्यांचं अलौकिक कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी 'राष्ट्रसंत' ही समर्पक उपाधी दिली. त्यांनी लिहिलेल्या 'ग्रामगीता' या ग्रंथाने इतिहास घडवला. त्याबाबत कर्मयोगी गाडगेबाबा यांचं वक्तव्य पुरेसं बोलकं आहे... "तुकडोजी बाबांची 'ग्रामगीता' ही आज गीता-ज्ञानेश्वरीप्रमाणं जनतेला खरं ज्ञान देऊन खेड्यापाड्यात, झोपडी-झोपडीत सुख समाधान पैदा करील असा भरवसा वाटतो. आज अशा ग्रंथाची गावोगावी गरज आहे. भगवंताच्या गीतेचं खरं मर्म 'सर्व जीव देवता समजून सेवा करा' हे या ग्रंथाच्या रुपात आज पाहिजे तशा तऱ्हेनं प्रकट झालं आहे. तुकडोजी बाबांचा बहुमोल प्रसाद सर्वांना ती सुख-शांती देवो, हीच सदिच्छा!"

    समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी कर्मयोगी गाडगेबाबांनी आपलं अख्खं आयुष्य वेचलं! त्यासाठी आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून द्यायचे. त्यांचे उपदेशही साधे, सोपे पण परिणाम साधणारे असायचे. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून परोपरीने सांगायचे. ‘देव दगडात नसून तो माणसांत आहे’ हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसवण्याचा मनापासून प्रयत्न केला. 

     कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांनीही त्यांच्या अभिनव कार्यातून, कीर्तन आणि प्रभावी भजनांच्या माध्यमातून बुरसटलेल्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धेवर कठोर प्रहार केले आहेत. निद्रिस्त समाजाला जागृत करण्यासाठी दोघांनीही त्यांच्या अमोघ वाणीने प्रभावीपणे समाजप्रबोधन केलं आहे. 'कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी' या पुस्तकात दोन्ही आधुनिक संतांच्या अलौकिक कार्याचा सहजसोप्या भाषेत आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाचकांनाही हे पुस्तक नक्कीच आपलेसे करणार असा विश्वास आहे. 

No comments:

Post a Comment