पॅकेजच्या विळख्यात .....
"का रे सतीश, तुला बरं नाही का? तुझे डोळे का असे लालभडक दिसतात अन् चेहराही आकसलेला!"
"काही नाही काका. हल्ली नाईट ड्युटी असते ना, त्यामुळे सतत जागरण होत असतं. खूप कामं असतात."
"अरे मग दिवस पाळीची ड्यूटी का घेत नाहीस? किती रोडावलास रे!"
" अहो काका, आमच्या कंपनीत दिवसा ना फक्त कार्यालयीन स्टाफ असतो. चार महिन्यापूर्वी माझं ट्रेनिंग असल्याने तेव्हा दिवसा जात होतो. आता मात्र माझी रात्रपाळीच असते."
"अशी कुठली जगावेगळी कंपनी आहे तुझी? फक्त रात्रपाळी करायला सांगते."
"काका, कसं आहे ना ती युरोपियन कंपनी असल्याने तिकडे जेव्हा दिवस असतो त्यावेळी आपल्याकडे रात्र असते. मग ती कंपनी सुरू असतानाच कामं करावी लागतात आम्हाला!" सतीश जांभई देत म्हणाला.
"म्हणजे त्या विदेशी कंपनीच्या सेवेसाठी आपण आपली रात्र - रात्र जागून काढायची असंच ना! अरे किती हा आटापिटा! सतीश काय ही अवस्था करून घेतलीस स्वतःची. अरे नोकरीसाठी आपली एखादी भारतीय कंपनी का बघत नाहीस? "
"कसं आहे काका! आपल्या अनेक भारतीय कंपन्यांनी विदेशी कंपन्यांसोबत 'टाय अप' करून घेतलेलं असतं. म्हणून मग त्यांच्यासाठी कामं करावी लागतात. शिवाय भरपूर पॅकेजची आँफर असल्याने त्यांना माणसंही सहज मिळतात."
"ते ठीक आहे रे! पण मग आपल्या झोपेचं खोबरं करून, प्रकृतीची हेळसांड करून त्या कंपन्यांसाठी आपण कामं करायची ... का तर म्हणे पैसे भरपूर मिळतात. ते काय तुमचं पॅकेज भरघोस मिळतं म्हणून त्यासाठी आपलं अमूल्य आयुष्य पणाला लावायचं! काय ही जिंदगी आहे ... व्व्व्वा! "
"अहो काका, दिवसाला झोप काढतोच ना! आणि कुठलीही आय.टी. कंपनी, मग ती भारतीय असो की विदेशी असो कामं ही असणारच!" सतीश म्हणाला.
नंतर मनात विचार आला, आता कोण सांगणार या सतीशला, रात्रीची झोप ही रात्रीच काढायची असते. किती बदलली आज याची जीवनशैली! नकळत जुने दिवस आठवले... शाळेत असताना सतीश सांस्कृतिक कार्यक्रमात उत्साहानं भाग घ्यायचा. निबंध स्पर्धेत तर त्याचा पहिला नंबर ठरलेला असायचा. मग कालांतरानं महाविद्यालयातही त्यानं आपला छंद जोपासला होता. शिवाय महाविद्यालयाच्या क्रिकेट संघातर्फे सतीश खेळायचा. कितीतरी क्रिकेटच्या सामन्यात त्यानं मैदान गाजवलं होतं. अष्टपैलू म्हणून बरीच बक्षीसं त्यानं मिळवली होती. अन् आज बघतो तर जाड भिंगाचा चष्मा लावून सतत आपला लॅपटाॅप घेऊन बसलेला! किती बदलला हा सतीश! कधीकधी उगाच शंका येते, खरंच हाच तो आधीचा सतीश आहे ना. सदैव हसतमुख असलेला बोलघेवडा सतीश सतत डोळ्यापुढं येतो... त्यावेळी त्याच्या सोबत असण्यामुळे, त्याच्या बडबडीमुळे तो सगळ्यांना हवाहवासा वाटायचा. एक दिवस जर का नजरेस पडला नाही तर त्याचं नसणं लगेच जाणवायचं!
या आय.टी. क्षेत्रातल्या पॅकेजच्या नोकर्यामुळे उत्पन्न वाढलं, राहणीमान उंचावलं पण जीवनशैली मात्र कधी नव्हे इतकी विस्कळीत झाली आहे, हे विदारक सत्य मान्य करावंच लागेल! दैनंदिन वेळापत्रक बदलल्याने लोकांचं खासगी जीवन खूपच बदललं आहे. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांनाही नाइलाजानं त्याचा त्रास सहन करण्यावाचून पर्याय नसतो. आज आपण बघतो, सतीशसारखे कितीतरी युवक, युवती या आयटी पॅकेजच्या विळख्यात गुरफटून गेले आहेत! त्याचा मोबदला म्हणून भरपूर उत्पन्न मिळणार हे मान्य, परंतु या युवावर्गाच्या मानसिक स्थितीत झपाट्यानं बदल होत आहे ही आजची वस्तुस्थिती आहे. यावर सकारात्मक पद्धतीनं चिंतन होण्याची गरज आहे, जेणेकरून पुढे येणाऱ्या परिस्थितीवर सहजपणे मात करणे शक्य होऊ शकते! बाकी सुज्ञास सांगणे न लगे!!
विनोद श्रा. पंचभाई, पुणे
भ्र. क्र.९९२३७९७७२५.
No comments:
Post a Comment