Tuesday, December 24, 2024

एक पर्व संपले..!

 एक पर्व संपले..!

   
   मुक्काम पोस्ट : तपोवन सोसायटी, वारजे... 
आमची तपोवन सोसायटी म्हणजे एक भलं मोठं आदर्श कुटुंबच! एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे सदस्य, आपसात असणारी आपलेपणाची भावना, गरजवंतांना नेहमी मदत करण्याची भावना ही येथील ठळक वैशिष्ट्यं! महत्वाचं म्हणजे तपोवनमध्ये वावरणारी ज्येष्ठ मंडळी म्हणजे सगळ्यासाठी आधारस्तंभ, जणू प्रत्येकाच्या मायेचा आधार! त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीतून बहुतेकांना काही ना काही शिकता आलं... बरेचदा त्यांचं मोलाचं मार्गदर्शनही लाभलं. माझं म्हणालं तर मागील जवळपास वीस वर्षांत मला आपल्या तपोवनमधील या ज्येष्ठ, श्रेष्ठ मंडळीकडून बरंच काही शिकता आलं. त्यांच्या अनुभवसंपन्न खजिन्यातून काही ना काही मिळवता आलं, त्याबाबतीत मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो. 

     मात्र गेल्या काही वर्षात, मोठमोठे वृक्ष उन्मळून पडावे तसे एका पाठोपाठ एक, तपोवनला अभिमान वाटावा अशी आधारस्तंभ असलेली ज्येष्ठ, श्रेष्ठ मंडळी हळूहळू गळून पडायला सुरुवात झाली! इथं मला लिहिताना यातना होत आहेत... पण केवळ आपल्या भावना व्यक्त करण्याशिवाय आता पर्याय उरला नाही. केळकरकाका, देशपांडेकाका, चितळेकाका यांच्यासोबत बरेचदा साहित्यविषयक चर्चा व्हायच्या. तसेच उत्तमराव जोशीकाका त्यांच्या पोलीस खात्यातील रोमहर्षक अनुभव त्यांच्या शैलीत सांगायचे. तर खाजगीवालेकाका मुंबईच्या गमतीजमती सांगायचे. सडेतोड बोलणारे उकिडवे आजोबा त्यांच्या मिश्किल गप्पामधून कुठल्यातरी गंभीर मुद्द्यावरही चर्चा करायचे. त्याचप्रमाणे आगरकर काकू त्यांच्या सेंट्रल गव्हर्नमेन्ट खात्यातील किस्से मस्त रंगवून वर्णन करायच्या. आता ही सर्व आदरणीय मंडळी काळाच्या पडद्याआड विसावली आहे, चिरविश्रांती घेत आहेत! 

     केळकर काकांकडे अनेक लेखकांच्या साहित्यकृतींचा मोठा खजिनाच होता. त्यामार्फतच मला माहिती नसलेल्या काही दिग्गज साहित्यिकांची ओळख झाली. काकांचं वाचन किती अफाट आहे, हे त्यावरून जाणवलं. सुप्रसिद्ध लेखक विश्राम बेडेकर आणि मुंबईच्या इतर साहित्यिकांविषयी केळकर काका भरभरून बोलायचे... त्यावेळी त्यांनी बोलत राहावं आणि आपण नुसतं ऐकत राहावं असंच वाटायचं! ते ऐकून, कानात साठवून आपण खरंच साहित्यसंपन्न झाल्याचा खूप अभिमान वाटतो. विश्राम बेडेकर यांचं ‘एक झाड, दोन पक्षी’ हे आत्मचरित्र केळकर काकांनी मला आवर्जून वाचायला दिलं होतं…त्याबद्दल मी त्यांचा आजन्म ऋणी राहील!

     पुणे शहरात प्रसिद्ध असलेल्या 'ब्रिटिश लायब्ररी'चे सभासद असणारे आणि तेथील पुस्तकं नियमितपणे वाचणारे तसंच त्यावर नेहमी चर्चा करणारे चितळे काका म्हणजे तपोवनमधील प्रसन्न व्यक्तीमत्व! त्यांच्याशी बोलताना आपण किती सामान्य आहोत याची प्रचिती त्यावेळी यायची, एवढं त्यांचं अफाट विश्व अनुभवसंपन्न होतं! मला आठवतं... 'महानायक' कादंबरीच्या निमित्ताने बोलताना चितळे काकांनी नेताजी सुभाषचंद्र बोस या अतुलनीय महापुरुषाबद्दल आगळीवेगळी आणि बारीकसारीक माहिती सांगितली होती. त्यांची ते वर्णन करण्याची शैली खरंच अदभूत होती. आता मात्र फक्त आठवणी उरल्या आहेत! 

      उत्तमराव जोशी काका म्हणजे पोलीस खात्यातून निवृत्त झालेले रुबाबदार व्यक्तीमत्व! ते पुण्यातील महत्वाच्या आणि संवेदनशील असलेल्या डेक्कन पोलीस स्टेशनला नेमणूकीला होते. तिथं कार्यरत असताना त्यांच्या कारकिर्दीत घडलेले अनेक किस्से आणि घटना जोशीकाका त्यांच्या विशिष्ट शैलीत सांगायचे. त्यावेळी ते किस्से ऐकणारे भान हरपून जायचे आणि काका पुढं काय बोलतात, त्यासाठी सगळे सावरून बसायचे. काही काही आरोपीबाबतचे विलक्षण प्रसंग तर उत्सुकता आणि उत्कंठा वाढवणारे असायचे... दुर्दैवाने आता जोशी काका नसल्यामुळे ते किस्से निश्चितच कायम स्मृतीत बंदिस्त राहतील यात शंका नाही!

      त्याचप्रमाणे आमच्या शेजारीच राहणारे उकिडवे आजोबा घरी आले की आमची मस्त गप्पांची महफिल रंगायची. आमच्या त्या गप्पांमध्ये कधीकधी वर राहणाऱ्या आगरकर काकू देखील सहभागी व्हायच्या. उकिडवे आजोबा यांची बोलण्याची लकब मजेशीर पण सडेतोड होती. कोणाचा मुलाहिजा न बाळगता ते स्पष्ट आणि रोखठोक बोलायचे. आगरकर काकू त्यांच्या ऑफिसमधील लोकांच्या वागणुकीच्या करामती छानपैकी रंगवून सांगायच्या. दोघांसोबत होणाऱ्या सविस्तर चर्चेतून त्यावेळी आम्हाला बरंच काही शिकता आलं. त्त्यांच्या अनुभवांचे बोल आताही मार्गदर्शक ठरतात हे विशेष! 

       आपल्या मिश्किल बोलण्यातून अधूनमधून कोपरखळ्या करणारे आणि समोरच्याचा गमतीने हळूच चिमटा काढणारे देशपांडे काका मला खरंतर तपोवनचे पु. लं. (देशपांडे ) वाटायचे! त्यामुळे त्यांचा सहवास नेहमीच हवाहवासा वाटायचा. त्यांच्या सानिध्यातले तास दोन तास जगण्यासाठी अनोखी ऊर्जा देऊन जायचे. देशपांडे काकांना वाचनाची प्रचंड आवड होती, तसंच त्यांची संगीताची जाणही विलक्षण होती. ते पेटी ( हार्मोनियम ) अप्रतिमरित्या वाजवायचे... आयुष्याच्या शेवटपर्यंत हार्मोनियमने त्यांना साथ दिली असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही! एक आवर्जून सांगावंस वाटतं, देशपांडे काकांकडे गेल्यावर त्यांचा पहिला प्रश्न असायचा... "आता कुठल्या विषयावर लिहितोस?      तसंच मी लिहिलेल्या पुस्तकातील त्यांना काय काय आवडलं, ते छान वर्णन करून काका आवर्जून सांगायचे. त्यावेळी त्यांची ती मिळालेली पावती म्हणजे माझ्यासाठी मोठा पुरस्कारच वाटायचा! कधीकधी तर पाच सहा दिवसात भेट झाली नाही तरी काका अधिकारवाणीने विचारायचे, "अरे कुठे होतास इतके दिवस? मला भेटायला आला नाहीस!" 

        हे नश्वर जग सोडायच्या आधी देशपांडे काका भेटले ते दीनानाथ हॉस्पिटलच्या बेडवरच! त्यावेळी त्यांच्या शरीरात विविध प्रकारच्या नळ्या जोडलेल्या दिसल्या. आयसीयूमध्ये भेटायला आत गेलो तेव्हा ते जागेच होते. मी जवळ पोहचल्याची चाहूल त्यांना लागली असावी. ते बहुधा बोलायच्या प्रयत्नात होते, मात्र ते शक्य नसल्यामुळे मी लगेच त्यांना शांत राहण्याचा इशारा केला. आयसीयूमध्ये जास्त वेळ थांबता येत नसल्याने बाहेर जाताना मी काकांना नमस्कार केला, त्यांनी माझ्याकडे बघितलं. दुसऱ्याच दिवशी काका व्हेंटिलेटरवर असल्याचं समजलं... आणि लगेच काही दिवसातच ते आपल्याला सोडून गेल्याचा निरोप मिळाला! त्यादिवशी आयसीयूमधून बाहेर पडताना काकांना केलेला नमस्कार, 'अखेरचा दंडवत' ठरेल असा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. एक पर्व संपलं होतं! 

        या ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि परम आदरणीय असलेल्या वरील मंडळीनी तपोवनला खऱ्या अर्थाने समृद्ध केलं. त्यांच्या नित्य सहवासामुळे, त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याने वैयक्तिकरित्या मी श्रीमंत झालो हे इथं नम्रपणे नमूद करतो. मात्र आता ते देदिप्यमान पर्व संपल्याने एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे... हे आपल्या तपोवनचं दुर्दैवच म्हणावं लागेल!
        सोडून गेलेल्या पण आशीर्वादरूपाने कायम आपल्यासोबत असलेल्या आधारस्तंभांना 
भावपूर्ण विनम्र आदरांजली!

… विनोद श्रा. पंचभाई,

No comments:

Post a Comment