Tuesday, December 24, 2024

ज्येष्ठ नागरिक म्हणजे महातारे...

 ज्येष्ठ नागरिक म्हणजे महातारे...

      या लेखाच्या निमित्ताने सुरुवातीला आपल्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ लोकप्रिय साहित्यिक पु.ल.देशपांडे यांच्या बाबतीत घडलेला किस्सा येथे आवर्जून नमूद करणं माझं कर्तव्य समजतो...
पु. ल. म्हणतात, वय हे मनाला असतं... शरीराला वय असतं असं मला वाटत नाही. मी आपल्याला एक उदाहरण सांगतो. विख्यात पंडित सातवळेकर होते, ज्यांनी वेदांचं भाषांतर केलं. त्यांना जेंव्हा शंभरावं वर्ष लागलं तेंव्हा मला असंच मनात आलं की ह्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे तर आपण त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करुन यावं. म्हणून मी पंडित सातवळेकरांकडे गेलो. शंभरावं वर्ष लागलेल्या माणसाला भेटायला जायचं आहे म्हणून मनाची तयारी करुन गेलो. विचार केला, आजारी असतील, आपण दोन मिनिटात नमस्कार करावा, बरं वाटतंय ना, काळजी घ्या वगैरे सांगावं आणि परतावं अशा विचाराने गेलो होतो. पण मी ज्यावेळेला त्यांच्याकडे गेलो त्या वेळेला बघतो तर ते तिथे त्यांच्या छापखान्यामध्ये वेदांच्या शेवटल्या खंडाच्या पुस्तकाची प्रुफं
तपासत बसले होते. तुमच्यापैकी जे कोणी लेखक असतील त्यांना प्रुफं तपासणं म्हणजे काय आणि तीसुध्दा संस्कृतची म्हणजे काय ते कळेल. ते काळजीपूर्वक तपासत बसले होते.
       मी त्यांना नमस्कार वगैरे केला. अचानक मला ते म्हणाले, "मी वाचलं आहे तुमचं साहित्य!"
मी घाबरलोच एकदम. त्यावेळी 'असलं काही लिहिण्यापेक्षा बरं
लिहा' असा शाप देतात की काय असं मला वाटलं. पंडित 
सातवळेकर हे माझं साहित्य वाचत असतील असं मला कधीही
वाटलं नव्हतं. ते वाचत असल्यामुळे त्यांना विनोदबुध्दी आहे,
म्हणजे तारुण्य आहे हेही माझ्या ध्यानात आलं.
 नंतर ते म्हणाले "आता काय आहे, ही प्रुफं करेक्ट करत आहे. हे काम
एकदा झालं (हे शंभराव्या वर्षी) की वेदातले सुंदर वेचे आपल्या
तरुण पोरांना माहीत नाहीत ते मी निवडून काढणार आहे
आणि या निवडक वेच्यांचा एक ग्रंथ तयार करणार आहे. त्यात
पुढली आठ-दहा वर्ष जातील".

    त्यावेळी तब्बल शंभराव्या वर्षी सुद्धा पुढील आठ-दहा वर्षांचं नियोजन पंडित सातवळेकर यांच्याकडे होतं. बरेचदा ज्येष्ठ नागरिक म्हातारे अशासाठी होतात... आपण जगतोय कशासाठी? या साध्या 
प्रश्नाचं उत्तर देखील त्यांना देता यायचं नाही. केवळ आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी किंवा महिना संपल्यावर पेन्शन अथवा नोकरी करत असल्यास पगारासाठी हे यावरचं उत्तर होऊ शकणार नाही.
आपण कशासाठी जगतोय? हा प्रश्न ज्येष्ठ नागरिकाला पडला की 
एक उदात्त अशा प्रकारचं काहीतरी प्रयोजन डोळयांसमोर यायला हवं! आता कुणी म्हणेल, सर्वसामान्य मध्यमवर्गीय ज्येष्ठ नागरिकाला बऱ्याच बाबतीत आर्थिक विवंचना तसेच अनेक प्रकारच्या समस्या भेडसावत असतात. अशावेळी त्याच्या डोळ्यासमोर उदात्त प्रयोजन येणं तरी शक्य होईल का? मान्य आहे, सगळेच पंडित किंवा विद्वान नसतात! मात्र काही प्रमाणात तरी समाधान, शांती मिळेल असं जगणं आपल्या नशिबी यावं एवढी रास्त अपेक्षा सर्वांचीच असते. त्यासाठीच साधंसं का असेना, जीवनात निदान कुठलं तरी नियोजन नजरेसमोर असावं असं वाटतं. मग अशा प्रकारच्या नियोजनासाठी वाचन करणं, संगीत शिकणं, पेंटिंग करणं इत्यादी अनेक कलांचा आधार सामान्य ज्येष्ठ नागरिक घेऊ शकतात. आपल्या आवडीच्या क्षेत्रात ते बरंच काही करू शकतात. उदाहरणार्थ... शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक गरजवंतांना ज्ञानदान करू शकतात. तसेच इतर मंडळी आपली शारीरिक आणि आर्थिक क्षमता पाहून विधायक समाज कार्याचं उद्दिष्टही ठरवू शकतात... जेणेकरून सतत कार्यरत राहिल्याने म्हातारपण नावालाही जाणवणार नाही आणि खऱ्या अर्थाने ज्येष्ठ नागरिक महातारे ठरतील यात शंकाच नाही!
     साधारणपणे ज्येष्ठ नागरिकांची मूळ समस्या आहे एकटेपणाची! एकत्रित कुटुंबात राहूनही आपली उपेक्षा होत असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होते आणि ते स्वत:ला एकटे समजतात, असे 'एज वेल फाऊंडेशन'ने केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. आणखी एक ठळक बाब या सर्वेक्षणाच्या निमित्ताने समोर आली... ती म्हणजे काही दशकापूर्वी ज्येष्ठांच्या ज्या समस्या होत्या, त्यात आता आमूलाग्र बदल झालेले आहेत. कारण काही वर्षांपूर्वी मोठ्या संख्येने आपल्या देशातील युवक नोकरीच्या शोधात परदेशात गेले आणि लग्न वगैरे करून तेथेच स्थायिक झालेत. मग काही लोकांनी आपल्या वृद्ध आईवडिलांना आपल्यासोबत राहण्यासाठी परदेशात बोलावून घेतले. तर काही वृद्ध दांपत्य स्वतःच्या मिळकतीतून मोठे घर बांधून आपली मुलं कधी तरी परत येतील या आशेवर पुढची स्वप्ने रंगवत भारतातच राहिले!
       परदेशी जाणाऱ्या काही ज्येष्ठांनी आपली गावातील सर्व संपत्ती विकून टाकली. उर्वरित आयुष्य परदेशात मुलांसोबत चांगल्या प्रकारे व्यतीत करू असा विचार त्यांनी त्यावेळी केला असावा. मात्र तिकडे गेल्यावर त्यांचा लवकरच भ्रमनिरास झाला! एक तर अनोळखी प्रदेशात कोणी बोलायला नाही. मग दिवसभर नातवांची देखभाल करायची आणि कसेतरी दिवस ढकलायचे हे जिणं त्यांच्या नशिबी आलं... कालांतराने एकटेपणाचं दुःखही त्यांच्या वाट्याला आलं! थोड्या फार प्रमाणात हीच समस्या भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांची देखील आहे. 
     बऱ्याच मध्यमवर्गीय कुटुंबातील युवक, युवती रोजगाराच्या शोधात शहरात जातात. महागाईमुळे पती, पत्नी दोघांनाही नोकरी करावी लागते. मग ते आपल्या वृद्ध आईवडिलांना आपल्यासोबत राहण्यासाठी गावाकडून शहरात बोलावून घेतात. मात्र शहरातील 'फास्ट लाईफ'मुळे आपल्या आईवडिलांच्या नेमक्या काय समस्या आहेत, हे जाणून घ्यायला त्यांना सवड नसते! आपल्या मुलांसोबत त्यांनी वेळ घालवावा, त्यांची काळजी घ्यावी ही अपेक्षा ते करतात. मात्र वृद्ध सासू सासऱ्यांनी नातवावर गावाकडील संस्कार करण्याचा प्रयत्न केला तर ते सुनांना आवडत नाही. काही ठिकाणी तर अशी परिस्थिती असते... ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाने व सुनेने त्यांच्याकडे फक्त नातवंडांना सांभाळणारा सेवक म्हणूनच पाहिलेले असते!
       जे ज्येष्ठ नागरिक शहरात किंवा गावात एकटेच राहतात, त्यांना हल्ली कमालीचा एकटेपणा अनुभवायला येतो. त्यांच्यापेक्षा कमी वयाचे लोक सुद्धा त्यांच्यासोबत बोलायला तयार नसतात मग ज्येष्ठासोबत मिळून मिसळून राहणे तर दूरच! कारण ज्येष्ठ लोक आपल्याला एखादे काम सांगेल, अशी भीती त्यांना असते.
       परदेशात राहणाऱ्या मुलांच्या आईवडिलांपैकी कुणीतरी एक अस्वस्थ असेल तर परिस्थिती खूपच बिकट होऊन बसते. नाईलाजाने अशा वृद्ध जोडप्यास घरात एकटेच राहून जीवन व्यतीत करावे लागते. आपल्या मुलांशी, नातवाशी ते फक्त फोनवरच बोलू शकतात. फार तर व्हिडीओ कॉल करूनच त्यांना पाहू शकतात. दुर्दैवाने मग ते तशा परिस्थितीत फक्त मरणाचीच वाट पाहत असतात! 
     या सगळ्या समस्या कमी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच सकारात्मक विचार करून त्यावर तोडगा काढण्याचा मनापासून प्रयत्न करायला हवा असे वाटते. आणि ते तशा प्रकारचा प्रयत्न निश्चितच करू शकतात. त्यासाठी आपलं आता वय झालं आहे, आपण म्हातारे झालो आहोत हा विचार मनातून समूळ काढून टाकायला हवा. आपण म्हातारे नव्हे तर महातारे आहोत हेच मनावर बिंबवायला हवं!
     एका विचारवंतानं म्हटलं आहे... "प्रॉब्लेम कुणाला नसतात, ते अगदी शेवटपर्यंत असतात पण प्रत्येक प्रॉब्लेमवर तोडगा हा असतोच. तो सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा हवा असतो तर कधी माणसं हवी असतात. या तिन्ही गोष्टीपलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो!"
तसंच आपल्या आयुष्यात येणारे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम किंवा समस्या देखील प्रयत्न केल्यास सुटू शकतात. ते कधीही सुटणार नाहीत असा आपण उगाच समज करून घेतो. मात्र या समस्या सोडवण्यासाठी थोडे पेशन्स महत्वाचे ठरतात. त्यासाठी वर सांगितल्यानुसार आपल्या आवडीचे कुठलेही छंद जोपासायला सुरुवात तरी करावी. मित्र परिवार वाढवावा, त्यांच्यात मिसळून मनसोक्त गप्पा माराव्यात. एखादा हास्य क्लब जॉईन करावा. व्यायाम, प्राणायाम, मेडिटेशनची सवय लावून घ्यायला हवी. वाचनीय पुस्तकं वाचावीत किंवा एखाद्या वाचनालयात फेरफटका मारून मासिके तरी चाळावीत. जीवनात पुष्कळ काही करण्यासारखं आहे... आपण उगाच बाऊ करून घेतो, मला हे जमणार नाही किंवा मी हे कसं करू, माझ्याच्यानं नक्की होणार का? कधी कधी आपला इगो, स्टेटसही आडवा येतो, मात्र त्याला इलाज नाही! तुम्हाला खूश राहायचं ना... मग त्या इगोला, ऍटिट्यूडला वेळीच मूठमाती द्यायला हवी आणि आपल्या जगण्याला नवी दिशा द्यायला हवी... अगदी आजपासून, नव्हे आत्तापासून!
'दो कदम आगे बढाकर तो देखो!
किसी को जरा हसाकर तो देखो!!'

... विनोद श्रा. पंचभाई 
     मोबाईल क्रमांक : 9923797725

.

No comments:

Post a Comment