सच काम किया जगमे जिसने...
माझा एक 'टीपीकल' मित्र आहे. गजानन त्याचं नाव. सतत बडबडत राहणं, मध्येच एखाद्या गाण्याची ओळ गुणगुणणं हा त्याचा आवडता छंद ! मित्रपरिवारात गप्पा मारताना कधी कधी त्याच्या तोंडून एक प्रार्थना हमखास आमच्या ऐकण्यात येते..." हे ईश्वरा, माझ्या सर्व मित्रांना सुख, शांती, समृद्धी लाभू दे पण सुरुवात मात्र माझ्यापासून कर..!" आता बोला, काय म्हणावं याला ? माझं एक प्रामाणिक मत आहे बघा पटतं का... आपण जेव्हा इतरांसाठी काहीतरी चांगलं काम करीत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठंतरी काहीतरी चांगलंच घडत असतं... तेव्हा काम करताना आपला हेतू शुद्ध अन् निस्वार्थ असावा इतकंच !
आता हेच बघा ना, आपल्या दैनंदिन जीवनात आपण नेहमीच बघतो... परीक्षेला जाणारा विद्यार्थी असो किंवा एखाद्या मुलाखतीला जाणारा युवक असो तो मनोमन हीच प्रार्थना करत असतो... 'देवा आजचा माझा पेपर सोप्पा सुटू दे, सगळं माझ्या मनासारखं होऊ दे' (मग भलेही त्या विद्यार्थ्याने पुरेसा अभ्यास केला नसेल अथवा त्या युवकाने मुलाखतीसाठी विशेष तयारी केली नसेल तरीही!) काय आहे आजकाल सगळ्यांनाच सगळं शॉर्टकट हवं असतं, जणू शॉर्टकटचं व्यसनच जडलंय हल्ली! आता यांना कोण सांगणार... 'जितना तपता है सोना उतना लेता है निखार.!' म्हणजेच तुम्ही जितके प्रामाणिक व सच्चे प्रयत्न करणार तितकं यश तुमच्या गळ्यात माळ घालणार हे निश्चित! मात्र याकडे आजकाल सोयीस्करपणे दुर्लक्षच केलं जातं, सगळ्यांनाच कळतं पण वळत नाही हेच खरं!
श्रावण महिना आला रे आला की आपल्याकडे पूजेची किंवा सत्यनारायण पूजा घालायची लगबग सुरू होताना दिसते. मग गुरुजी किंवा भटजी यांच्याकडे तारखांचे बुकिंग करणे सुरु होते. ठरलेल्या तारखांना मनोभावे पूजा संपन्न होते. तेवढ्यापुरते मनाला समाधानही लाभते पण काही दिवसातच मनाची अवस्था परत 'जैसे थे' होतेच ना! ही झाली सर्व साधारण पापभीरू लोकांची कथा. काही महाभाग मात्र केव्हा एकदाचा श्रावण संपतो आणि कधी आपण 'गटारी' साजरी करतो याचीच वाट बघत असतात. मग असं देव देव करणं, केवळ औपचारिकता म्हणून आपल्या घरी पूजापाठ करणं व अख्ख्या सोसायटीला प्रसादाला बोलावणं याला काही अर्थ तरी उरतो का?
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या एका भजनात खूपच मार्मिक भाष्य केलेलं आहे..
"सच काम किया जग मे जिसने,
प्रभु नाम उसने लिया ना लिया।"
म्हणजेच काय तर आपल्या नियमित दिनक्रमात, आपल्या रोजच्या कार्यात प्रामाणिकपणा असल्यास, आपलं रोजचं कार्य हेच ईश्वराचं कार्य समजून केल्यास मग अशाप्रकारच्या औपचारिकतेची गरज पडणार नाही. आपलं मनापासून केलेलं प्रामाणिक कार्य हीच त्या जगन्नियंत्याची खरी पूजा ठरणार यात शंकाच नाही.
हल्ली मात्र आपल्या असं बघण्यात येतं... खूप गाजावाजा करत बरेच हौशी लोक गणपती बाप्पाची स्थापना करतात. दहा- पाच मिनिटात आरती वगैरे उरकतात अन् मग पुढील दहा दिवस म्हणजे विसर्जनापर्यंत कान अगदी बधीर होईस्तोवर कर्कश्य आवाजातील गाण्यांचा भडिमार... केव्हा एकदाचं हे सगळं संपतं असंच आता सामान्यजनांना वाटायला लागलं आहे ! या दिवसात प्रत्यक्ष गणरायाला सुद्धा जीव अगदी नकोसा होत असणार नाही का? बरं विसर्जनाच्या वेळी 'गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला' म्हणणारे हेच हौशी लोक परतताना मात्र डी. जे. च्या तालावर 'झिंग झिंग झिंगाट' अशा प्रकारची बिभत्स नृत्य करताना सर्वत्र दिसतात. हीच का यांची गणेशभक्ती !!
काही विधायक कार्ये करणारीही गणेश मंडळं आपल्याकडे आहेत, नाही असं नाही; मात्र दुर्दैवानं तीही हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी अत्यल्प ! काही का असेना अशा मंडळांचं कार्य खरोखरंच दखलपात्र ठरतं. गरीब विद्यार्थ्यांना, निराश्रितांना साह्य करणं, निरनिराळ्या वृद्धाश्रमात मदत पोहचवणं इत्यादी कार्य म्हणजे पूजनाहूनही श्रेष्ठ ठरतं ! याप्रकारे तळमळीने कार्य करणाऱ्या अशा मंडळांच्या कार्यकर्त्यांना मग वेगळे पूजेचे अवडंबर करण्याचे काहीच कारण नसते... त्यांना त्यांची योग्य दिशा मिळालेली असते... आपल्या ध्येयप्राप्तीची ! त्यांना प्रत्येक सजीवात आपला जिवाभावाचा परमेश्वर दिसत असतो... मग त्याचे 'नाम' घेतले न घेतले तरी काही फरक पडत नसतो. ते (नाम) कायम मनात कोरलेलेच असते !
विनोद श्रा. पंचभाई, पुणे
मो. 9923797725
No comments:
Post a Comment