Tuesday, April 30, 2024

शब्द की खैरात हूं मै...

 शब्द की खैरात हूं मै...


         वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 'ग्रामगीता' या अदभूत ग्रंथाची रचना करून गुरू, शास्त्र आणि स्वानुभवाचे प्रात्यक्षिकच या नश्वर जगापुढे मांडले आहे. राष्ट्रसंत हे कर्मप्रधान आणि क्रांतिदर्शी 'साहित्यिक' असल्यामुळे त्यांनी लिहिलेली ग्रामगीता ही आजच्या आधुनिक युगातील जणू भगवदगीता असल्याचा अनेकांना प्रत्यय आलेला आहे. अशी ही प्रेरणादायी ग्रामगीता मराठी भाषेसोबत हिंदी, इंग्रजी तसेच इतर अन्य भाषेतही उपलब्ध आहे. ग्रामगीतेतील ग्रंथ महिमा या अध्यायात राष्ट्रसंत सुरुवातीलाच म्हणतात...

"ग्रामगीता शाब्दिक सेवा, परि दृढ करी संस्काराचा ठेवा!

तेणे ईश्वरी राज्य गावा, नांदेल सदा सर्वकाळ!!

ग्रामगीता दुःखाशी नाशवी, ग्रामगीता मृत्यूशी हसवी!

ग्रामगीता सहकारी तत्त्व वाढवी, मानवधर्मा फुलावया!!"

       हा अदभूत ग्रंथ पठन करताना 'ग्रामगीता नोहे पारायणासि' असा इशारा देत राष्ट्रसंत या ग्रंथाचे महत्व स्पष्ट करतात. ग्रामगीता वाचनाने काय काय घडू शकते, सामान्य जणात कुठलं आमुलाग्र परिवर्तन होऊ शकतं याचा वस्तुपाठ त्यांच्या पुढील ओव्यामधून दिसून येईल...

"स्त्रिया-मुले होतील आदर्शपूर्ण, हा ग्रंथ घरी होता पठन!

ग्राम होईल वैकुंठभुवन, वाचता वर्तता ग्रामगीता!

भिकारी, बेकारी गावी राहिना! सत्तेची बंधने नुरतील कोणा!

सर्वचि शिकतील शहाणपणा, ग्रामगीता वाचूनिया!!

ग्राम नांदेल स्वर्गापरी, सुखी होतील नर नारी!

परमार्थाच्या खुलतील घरोघरी, आनंद - लहरी!!"

           राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या प्रेरणादायी आणि परिणामकारक साहित्यातून सर्वसामान्य लोकांसाठी प्रभावीपणे प्रबोधन केले आहे. इतर तथाकथित साहित्यिकांप्रमाणे उगाच कुठल्याही बोजड शब्दांचा वापर न करता त्यांनी त्यांच्या मराठीतील साहित्यासोबत हिंदी भाषेतील भजनातूनही सहजसाध्या शब्दांनी अत्यंत सोप्या भाषेत योग्य तो परिणाम साधला आहे. राष्ट्रसंत म्हणतात...

''मंदिरी बसोनि नाक दाबावे, त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे!

दुःखितासि प्रेमे पाणी पाजावे, हे श्रेष्ठ तीर्थस्नानाहूनि!!'' बघा किती सोप्या, सरळसाध्या शब्दात आपल्याला कर्तव्याची जाणीव करून दिली आहे महाराजांनी!

            तसेच आजच्या युवक, युवतींसाठी राष्ट्रसंतांनी केलेले अमूल्य प्रबोधन जगातील कुठल्याही विद्यापीठात आढळून येणार नाही एवढे परिणामकारक आहे. महाराज ग्रामगीतेतील 'जीवन शिक्षण' या अध्यायात मार्गदर्शन करताना म्हणतात...

'मुलात एखादा तरी असावा गुण, ज्याने पोट भरेल त्यात निपुण! न ये संसारामाजी अडचण, कोणत्याही परि!!'

'मुलगी बहु शिकली शाळेमाझारी, परि स्वयंपाक करता न ये घरी! काय करावी विद्याचातुरी? कामाविण लंगडी ती!!'


           'या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे!

            हे सर्व पंथ, संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे!'  या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ध्येयगीतातून अतिशय साध्या भाषेत महाराजांनी आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेचं परिपूर्ण दर्शनच घडवलं आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रसंतांनी त्यांच्या असंख्य हिंदी रचनेतून अतिशय सोप्या शैलीतून तेवढेच मोलाचे प्रबोधन केले असल्याचे दिसून येईल.

 'हर देश मे तू, हर भेष मे तू, तेरे नाम अनेक तू एकही है!' किती सरळ साधे शब्द... मात्र यात किती गहन अर्थ व्यापला आहे!

तसेच 'ऐ विश्व के चालक प्रभो! मुझको समझ दे विश्व की!' किती ताकद आहे या शब्दात... अगदी कमी शिकलेल्या, रंजल्या गांजलेल्या लोकांना सहज कळेल अशी ही सुंदर वाक्य रचना!

          आपल्या देशातील आजच्या कठीण परिस्थितीत देखील प्रेरणादायी ठरणाऱ्या महाराजांच्या पुढील भजनातील या ओळी पहा...

"दिल - मनसे गाऊंगा तेरा भजन!

उंचा उठा दे मेरा प्यारा वतन!

मेरे वतन की बिछुडी है जनता

किसीका किसीके संग नही बनता!

इसके लिये मैने ठानी है मनता!

सब नेताओ मे कर दे मिलन

तब दूर हो मेरे दिल की जलन!"


'झाड झाडूले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना!

पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी किनारे..!' अशा प्रकारच्या स्फूर्तिदायक गीतांनी स्वातंत्र्यपूर्व काळात नवचेतना निर्माण करण्यात महाराज अग्रेसर होते. यावरून राष्ट्रसंतांची अष्टपैलू भूमिका आपल्याला दिसून येते. शब्दात किती ताकद असू शकते, याचा अनुभव आपण राष्ट्रसंतांच्या 'लहर की बरखा' या ग्रंथातील पुढील काही ओळी वाचून निश्चितपणे घेऊ शकतो...

"मैं शब्द की खैरात हूं, सब शब्द मेरे पास है!

मुर्दे जगा दूं शब्द से, होता अशुभ का ऱ्हास है!

मैं नही किसे पहचानता, मुह देख के नही बोलता!

सत क्या, असत क्या, सोचकर ही बात अपनी खोलता!"

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!🙏🙏

... विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

    9923797725

No comments:

Post a Comment