Tuesday, March 12, 2019

डिजिटल जीवन...


डिजीटल जीवन...

रोज सकाळी उठल्याबरोबर आजकाल बहुतेक जण न चुकता आपला मोबाईल,  Laptop किंवा काँप्युटर उघडून बघतात... माझ्यासाठी कुणाचा, कुठला संदेश तर नाही ना! मग त्यांना कळते, whatsapp वर इतके संदेश आणि माहिती उपलब्ध आहे की ती वाचता वाचता बराच वेळ जाणार. काँप्युटरवरील ईमेल्स तपासण्यात व त्यांचे उत्तर देण्यासाठी तासभर तरी जाणारच. बर्याच लोकांना वाटते, आपण स्वतःला 'अपडेट' ठेवायला हवं. अगदी बरोबर आहे, स्वतःला अपडेट ठेवणं, झपाट्याने बदलणार्या जगाच्या बरोबरीनं चालणं हे एक वेळ ठीक आहे.परंतु नियमित जीवन 'डिस्टर्ब' करून हा सगळा खटाटोप, अन् तोही विकतचा, कशासाठी? आपला अमूल्य वेळ या खटाटोपात खर्च करून काय साधलं जाणार??

   काही लोकांना व्यवसायासाठी, त्यांच्या महत्त्वाच्या नियमित कार्यासाठी वरील गोष्टी आवश्यकही असतात. ती काळाची गरजही आहे. मात्र आजकाल शाळा, महाविद्यालयातील बरेचसे विद्यार्थी, अनेक संस्थांंचे प्रशिक्षणार्थी एवढंच कशाला सरकारी, निमसरकारी तसंच खासगी कार्यालयातील काही कर्मचारी-अधिकारी हेही सध्याच्या परिस्थितीत whatsapp चे जणू शिकारच झाल्याचे दिसून येत आहेत. एखाद्या कार्यालयात जाऊन कधीही बघा... बरेचसे अधिकारी, कर्मचारी तुम्हाला त्यांच्या जागेवर आढळणार नाही. कँन्टीनमधील फक्त चहाचा आस्वाद घेण्यासाठी हे तासभर तरी लावणारच! फार नाही पंधरावीस वर्षापूर्वी कुठल्याही कार्यालयातील कर्मचारी एखाद्या टपरीवर किंवा कँन्टीनमध्ये जमायचे तेव्हा त्यांच्या आपसात गप्पा रंगायच्या. त्यावेळी वातावरण कसं गजबजून गेलेलं असायचं पण आता... आता ज्याला बघावं त्याला... सगळे आपल्याच विश्वात रममाण! प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल अन् सगळ्यांंच्याच त्यात खूपसलेल्या माना! बरं चालताना सुध्दा हे मोबाईलमध्ये चाळे करत खालमानेनेच चालणार... कोणी ताठ मानेनं चालताना दिसला तर शपथ! सगळ्यांचं जगणंच जणू डिजीटल झालंय.

  क्षणाक्षणाला रंग बदलणार्या या दुनियेत सर्वसाधारण माणूस आज आपलं अंतरंग हरवून बसलाय! स्वतःचे विचार तो आज नीटपणे मांडू शकत नाही. स्वतःचे छंद मन लावून जोपासू शकत नाही, कारण मन एकाग्र होऊ शकत नाही ना! आज सामान्य माणसाची जीवनशैलीच पूर्णपणे बदलून गेली आहे. तो एकवेळ वडापाव खाऊन अख्खा दिवस काढणार पण आपला मोबाईल रिचार्ज करण्यासाठी मात्र आवश्यक ती रक्कम वेगळी काढून ठेवणार ही आजची वस्तुस्थिती आहे. तसेच कमी पगारावर काम करणारे किंवा आर्थिक स्थिती यथातथाच असणारे सुद्धा आजकाल अँड्रॉइड मोबाईल बाळगताना दिसतात. मग नेटपँकसाठी लागणारी रक्कमही ते विवंचनेत असतानाही जमवतात. त्यामुळे मग अशाप्रकारच्या काही लोकांना तणावाचा सामना करावा लागतो. कारण अशाप्रकारचं 'डिजीटल' जीवन जगणंच त्यांच्यासाठी सर्वस्व होऊन बसतं!

  पूर्वी कुठल्याही स्तरावरील मानवाच्या आवश्यक गरजा म्हणजे "रोटी-कपडा-मकान" समजल्या जायच्या. त्यासाठी माणूस दिवसभर प्रामाणिकपणे राबून रात्री निवांतपणे निद्रादेवीच्या आधीन व्हायचा. तेव्हा ना कुठला तणाव असायचा, ना पैशाची 'तंगी' असायची! मात्र आजकाल रात्री उशिरापर्यंत जागणं, पार्ट्या झोडणं हे 'स्टेटस सिम्बॉल' झालंय. अशाप्रकारे जीवनशैली झपाट्यानं बदलत गेल्यानेच झोपण्याच्या वेळा कधी बदलल्या हे आपलं आपल्यालाच कळलं नाही. अन् मग पर्यायानं कित्येक मानसिक आजार आपल्याला जणू अहेरात मिळाल्याप्रमाणे चिकटले, अजूनही चिकटत आहेत!

    महासत्ता होण्याच्या नादात आपली डिजीटल प्रगती झाली आणि होते आहे. मात्र सर्वसामान्य माणसाची मानसिकद्रुष्ट्या अधोगतीच होत आहे, हेही मान्य करावंच लागेल. आज चंद्रावर, मंगळावर जाण्याची तयारी जोमात सुरू आहे पण गावाजवळ असलेल्या आपल्या भावाकडे, बहिणीकडे जायला आपल्याला वेळ मिळत नाही हे कशाचं द्योतक आहे? एवढंच कशाला सकाळी घरून आपल्या कामावर निघालेला माणूस सायंकाळी किंवा रात्री वेळेवर घरी परतणारच याचीही आज आपण शाश्वती देऊ शकत नाही! कारण इथं कुणाला कुणासाठी वेळच नाही... जो तो आपल्याच नादात गुंग असल्याचं दिसून येतं, हे आपल्या पुढारलेल्या समाजाचं खरंतर दुर्दैवच म्हणावं लागेल!

  आज आपली जीवनशैलीच 'डिजीटल' झाल्यानं सर्वच स्तरातील लोक कधी नव्हे एवढे आपमतलबी झाल्याचं दिसून येत आहे. स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय नातेवाईक सुद्धा आजकाल मदत करण्यास कचरतात, ही वस्तुस्थिती आहे. समजा आपला अमूल्य वेळ काढून तुम्ही आप्तस्वकीयांकडे गेले तरी तुम्हाला तिथं चित्र वेगळं दिसणार नाही. एकतर टीव्हीवर मालिका बघण्यात ते मग्न दिसतील किंवा त्यांच्या हातात मोबाईल तरी असणार... टीव्ही वर जाहिराती सुरू झाल्या की मग तुम्हाला ते विचारणार, "बोला, कसं काय येणं केलं? कुठलं काम काढलं आज?" म्हणजेच काय नवीन तंत्रज्ञानामुळे डिजीटल यंत्रणा आपण स्विकारली खरी पण दुर्दैवानं आपलं जीवनही आज डिजीटल झालंय..! कालाय तस्मै नमः ... आता दुसरं काय म्हणणार!!
                                   .... विनोद श्रा.पंचभाई
                   1/3B, तपोवन सोसायटी, तपोधाम रोड
                      वारजे, पुणे...411058
                      मो.क्र. 9923797725
                ( पूर्व प्रसिद्धी... पाणिनी मासिक जानेवारी२०१९ , मुंबई)

No comments:

Post a Comment