Wednesday, March 20, 2019

मनाचा ब्रेक... उत्तम ब्रेक



मनाचा ब्रेक... उत्तम ब्रेक
"अहो आमचे 'हे' ना अगदी साधेभोळे! त्यांना कश्शाचं काही कळत नाही. कुण्या मित्राने यांना कुठे चल म्हटलं तर हे लगेच तयार असतात. मग आपल्याला जायचंय कुठं, हेही त्यांना आपल्या मित्रांना विचारावंसं वाटत नाही. आता हेच बघा ना...त्यादिवशी त्यांच्या ऑफिसमध्ये आयोजित केलेल्या पार्टीत केवढा तमाशा झाला, अन् त्याचं खापर मात्र लोकांनी आमच्या ह्यांच्या वर फोडलं..!" अंजूताई तावातावाने बोलत होत्या.
" म्हणजे? अनिल भाऊंनी असं केलं तरी काय हो?..." सविताताईंनी आश्चर्यानं मध्येच विचारलं.
"काय झालं... यांच्या ऑफिसमध्ये एका मित्राच्या बदलीनिमित्त 'सेन्डाँफ पार्टी ठरली होती. तिथं कुणीतरी उत्साही मित्राने यांना खूप आग्रह करून थोडं 'ड्रींक' करायला लावलं. मग काय...आमच्या यांना त्याची सवय नसल्याने अन् हे कधी 'घेत' नसल्याने त्यांना भान राहिलं नाही. यांचा बोलण्यावरचा ताबा सुटला, आपल्या वरिष्ठांना चुकून काही तरी बोलले. आणि मग वाद वाढतच गेला. अशावेळी ऑफिसमधील इतरांनी तरी यांना समजवावं की नाही? समजावणं तर दूरच, उलट बाकीचे कुठल्याही प्रकारची मध्यस्थी न करता बघ्यांची भूमिका घेऊन मजा घेत नुसते तमाशा बघत राहिले. तरी मी यांना सारखं म्हणत होते, तुम्ही त्या पार्टीला जाऊ नका... पण माझं मेलीचं इथं ऐकणार कोण?" बोलता बोलता अंजूताई ना रडू कोसळलं...नंतर अजून बरंच काही बोलत होत्या!
अशाप्रकारचे छोटेमोठे प्रसंग आपल्या बघण्यात नेहमीच येत असतात. कालांतराने ते आपण सहजपणे विसरूनही जातो. यावर गंभीरपणे विचार केला असता एक गोष्ट लक्षात येते... ती ही की, भगवंतानं प्रत्येकाला सारासार  विचार करण्याची शक्ती आणि विवेकबुद्धी दिलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वरील प्रसंगांंना सामोरं जाताना आपल्या मनावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. त्यासाठी गरज आहे प्रबळ इच्छाशक्तीची!! कारण मन मानेल तसं वागण्यानं त्याचे परिणामही भोगावे लागतील हे मात्र निश्चित. त्यामुळे आपल्या मनावर कधी ब्रेक लावायला हवा हे ज्याचं त्यानंच ठरवायला हवं!
अगदी छोट्याछोट्या प्रसंगात सुद्धा लहान मुलांचं तर सोडाच, स्वतःला मोठे समजदार समजणारे पण अनेकदा घायकुतीला येताना आपल्याला दिसतात. तेव्हा तेथे कोणीही सामोपचाराने घ्यायला तयार नसतो. मग कधीकधी त्याचे खूप गंभीर परिणाम ही भोगण्याची परिस्थिती निर्माण होते..!
शांतपणे विचार केला असता असं लक्षात येईल... अशा प्रकारचे प्रसंग किंवा घटना या नक्कीच टाळता येऊ शकतात. त्यासाठी आवश्यक ता आहे... मनावर नियंत्रण ठेवण्याची, प्रसंग बघून यशस्वी माघार घेण्याची!."मनाचा ब्रेक... उत्तम ब्रेक" या उक्तीप्रमाणे मन मानेल तसं न वागता मनाला थोडा ब्रेक लावून, प्रयत्नपूर्वक थोडं वळण देऊन वळविणे हेच केव्हाही श्रेयस्कर..!

              ........... विनोद श्रा.पंचभाई
                       मो. क्र.९९२३७९७७२५

No comments:

Post a Comment