Friday, March 22, 2019

सबसे मीठा बोल रे बाबा....

सबसे मीठा बोल रे बाबा...

"हत्ती बनून चारा खाण्यापेक्षा मुंगी बनून साखर खाणेच इष्ट!" अशा अर्थाची एक म्हण हिंदीमध्ये बरीच प्रचलित आहे. जीवनातील कुठल्याही क्षेत्रात आज आपण बघतो , प्रचंड चढाओढ आहे. कधी कुठल्या प्रकारचा प्रसंग कोणावर ओढवणार हे कोणीच सांगू शकत नाही. हल्ली जिकडे पहावे तिकडे गर्दीच गर्दी दिसते. तेव्हा पायी चालणाऱ्यांंना कधी कुणाचा धक्का लागणार याचा नेम नसतो. अशावेळी त्या प्रसंगाचं थोडं भान ठेवून, गोड बोलून परिस्थिती सहजतेनं हाताळणं कधीही चांगलं... 'टेक इट इझी' म्हणतात ना अगदी तसंच!

आजच्या मायावी जगात आपला कार्यभाग साधायचा असेल तर उगाच वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. जे काम सामंजस्यानं सहजासहजी होत असेल तर तेथे आपला बडेजाव न दाखवता नम्रपणा धारण करणंच रास्त ठरतं. त्यासाठी सौम्य भाषेत प्रसंगी गोड बोलून आपण आपलं कार्य तडीस नेऊ शकतो. आपण कुणीतरी मोठे आहोत असं दाखवत आपली छाप पाडणे कधीकधी घातक ठरतं , त्यामुळे होऊ घातलेलं किरकोळ काम सुद्धा फिस्कटू शकतं!

आजकाल गल्लीबोळात खेळणाऱ्या छोट्या छोट्या मुलांपासून तर नेत्याअभिनेत्यापर्यंत प्रत्येक जण एकमेकांंवर कुरघोडी करताना दिसतो. अगदी किरकोळ कारणही त्यासाठी पुरेसं ठरतं. त्यामुळे होतं काय की आपसात बेबनाव तर निर्माण होतोच शिवाय वातावरण सुद्धा गढूळ बनतं. तेव्हा अशाप्रकारच्या प्रसंगांंना सामोरं जाताना कुणीतरी पुढाकार घेऊन आपसात वाद न घालता संवाद साधणं तितकंच  महत्त्वाचं ठरतं! त्यासाठी कुणी कितीही अरेरावीची भाषा वापरली तरी त्याकडे दुर्लक्ष करून सौम्य भाषेत सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करणे, प्रसंगी गोड बोलणे आपल्यासाठी कसं फायदेशीर आहे हे समजून घ्यायला हवं!

अगदी साधं उदाहरण बघा... एखाद्या प्राथमिक शाळेतील एखाद्या शिक्षकाने हसत खेळत 'आनंदी आनंद गडे' सारखी कविता मुलांना शिकवली तर वर्गातील वातावरण कसं हलकंफुलकं आणि प्रफुल्लित होतं! याउलट विद्यार्थ्यांवर सतत नको त्या प्रश्नांची सरबत्ती सोडणार्या शिक्षकांना मुलं चांगलीच वचकून असतात. वर्गातील वातावरण तणावमुक्त आणि हलकंफुलकं ठेवण्यासाठी काही शिक्षक अधूनमधून प्रासंगिक घटना तसंच छोटे मोठे विनोद विद्यार्थ्यांना सांगत असतात. त्यामुळेच मग साने गुरुजीसारखे मुलांचे मानसशास्त्र जाणणारे शिक्षक सर्वांनाच हवेहवेसे वाटतात... ते त्यांच्या हळुवार आणि संवेदनशील म्रुदु भाषेमुळेच ना !

त्याचप्रमाणें एखाद्या सरकारी किंवा खासगी कार्यालयात तेथील कामाच्या व्यापामुळे तणावग्रस्त वातावरण बघायला मिळते. मग अशावेळी तेथील एखादा सहकारी , त्या परिसरातील वातावरण हसतं खेळतं ठेवण्यासाठी प्रासंगिक विनोद करत असेल किंवा एखादी गाण्याची ओळ गुणगुणत असेल तर त्याचं कुणाला वावगं वाटण्याचं काहीच कारण नाही. उलट त्यामुळे इतर सहकार्यांचा मानसिक ताण कमी होण्यास मदतच होणार हे मात्र नक्की! पर्यायाने कामाची गुणवत्ता सुधारण्यास हातभारही लागेल हे वेगळं सांगायला नको.

मागच्या पिढीतील सदाबहार अभिनेते देव आनंद यांच्या एका चित्रपटातील गाण्याच्या पुढील ओळी आठवून बघा... " लोगोंका दिल अगर हां जितना तुमको है तो बस मीठा मीठा बोलो..." खरंच किती अर्थपूर्ण गाणं आहे नाही? तणावमुक्त जगण्याचं सार भरलं आहे या गाण्याच्या ओळीत! आपल्या जवळच्या मित्रानं किंवा नात्यातील एखाद्या सदस्यानं कुठल्याशा क्षुल्लक कारणावरून अबोला धरला तरी त्याचं मन वळविणं अजिबात अशक्य नाही. गरज आहे फक्त अन् फक्त दोन शब्द गोड बोलून आपण स्वतःच पुढाकार घेण्याची! मग जे काम धाक दपटशा दाखवून होणार नाही तेच काम दोन गोड शब्द बोलून होऊ शकतं याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.

कार्यालयात काम करताना सुद्धा बहुतेकांना अनेक दिव्यांना सामोरं जावं लागतं. अनेकांना तर कधी एकदाची कार्यालयाची वेळ संपते आणि कधी आपण घरी जातो असं होऊन जातं. कधी कधी कामाचे प्रचंड व्याप असतात, नाही असं नाही! अशावेळी जास्तीचं 'टेन्शन' न घेता गोडीगुलाबीनं, आपल्या सहकार्यांंच्या मदतीनं, त्यांच्याशी दोन गोड शब्द बोलून काम करुन घेणं सहज शक्य असतं. नाहीतरी आपल्याला नेमून दिलेली कामे शेवटी आपल्यालाच करायची असतात. मग रडत रखडत, ताणतणावात काम न करता हसत खेळत, मोकळ्या वातावरणात संबंधित कामे करून बघायला हरकत नसावी. त्यामुळे कुठल्याही प्रकारची कामे करताना उत्साह टिकून राहण्यास मदतच होईल. शिवाय सकारात्मकता सुध्दा वाढणार यात शंकाच नाही!

शेवटी काय, दबावाखाली कामे होतीलही... मात्र ती मनासारखी होईलच याची शाश्वती नसते. म्हणून गोड बोलून, मिळूनमिसळून काम करण्यास प्राधान्य दिलं तर एकप्रकारचं समाधान लाभणार हे निश्चित! कुणीतरी जुन्याजाणत्या विचारवंतांने म्हटलंच आहे..."व्यापार करताना किंवा नोकरी सांभाळताना नेहमी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवावी!" आपण निदान तसा प्रयत्न तरी करून बघायला काय हरकत आहे? झाला तर शेवटी फायदा आपलाच होणार ना! बाकी सुज्ञास सांगणे न लगे..!

                               ...... विनोद श्रा.पंचभाई
                                 भ्र.क्र.९९२३७९७७२५

No comments:

Post a Comment