Saturday, March 16, 2019

कोण दिवस येई कसा...


कोण दिवस येई कसा...

" सत्य युगाच्या अखेर झाली
प्रेम, द्वेष यांच्यात लढाई!
द्वेष जाहला विजयी आणिक
प्रेम लपे आईच्या ह्रदयी!!"

ही मर्मस्पर्शी कविता जवळपास पस्तीस,छत्तीस वर्षापूर्वी नववीच्या अभ्यासक्रमाला होती... आता कवींचं नाव आठवत नाही. मात्र या कवितेचा भावार्थ मागच्या पिढीच्या ह्रदयात कायमचा कोरला गेला असणार, हे नक्की. आज आपल्याला बर्यापैकी लोकांमधील संवेदनशीलता, प्रेमभावना कमालीची कमी झाल्याचं पदोपदी अनुभवायला मिळते! कधी नव्हे इतका पराकोटीचा द्वेष उफाळून येताना दिसतो. उपरोक्त कवितेचा खरा अर्थ आजच्या व्यवहारात प्रकर्षांनं जाणवतो आहे! 
      या दुनियेतून 'सत्ययुग' इसवीसनाच्या पूर्वीच हद्दपार झालं आहे. नाही म्हणायला गांधीजींचे "सत्याचे प्रयोग" काही अनुयायांनी अनुसरले असतीलही.पण आता आजच्या यांत्रिक युगात मात्र ते पूर्णपणे दुर्लक्षित झालेलं आहे, असंच दुर्दैवानं म्हणावं लागतं.तसंच आपसातील सामंजस्याची, सलोख्याची प्रेमभावना सुध्दा हळूहळू लोप पावत असल्याचं जाणवत आहे, हे जिवंतपणाचं लक्षण असलेला कुणीही मान्य करणार यात शंका नाही!  कारण एकच आहे...कधी नव्हे इतका आज आपमतलबीपणा बोकाळला आहे, समाजात स्वार्थीपणा पराकोटीचा वाढला आहे!  
"मी आणि माझं... मला काय दुसऱ्याचं"  हीच व्रुत्ती जिकडेतिकडे फोफावताना दिसून येत आहे.त्यामुळेच परस्परांविषयी वाटणारी आत्मियता , सहानुभूती, प्रेम, आपुलकी या मानवाच्या स्वाभाविक भावना पुढच्या पिढीला फक्त कथा कादंबर्यातच वाचायला मिळणार की काय अशी शंका यायला लागली आहे! 

याचं कारण म्हणजे आपल्या समाजात राक्षसी व्रुती वेगानं पसरत असल्याचं चित्र आपण सर्वसामान्य लोक सर्वत्र बघत आहोतच. समाजातील बहुतेक क्षेत्रात राक्षसी महत्वाकांक्षा बाळगणारी मंडळी आपल्याला जिकडेतिकडे आढळतात.उद्योगक्षेत्र तसेच राजकारण क्षेत्रात तर झपाट्यानं अशा प्रकारच्या महाभागांची संख्या वाढत आहे.वैद्यकीय, संशोधन, बांधकाम इत्यादी क्षेत्रंही याला अपवाद नाहीत. दुर्दैवानं ही व्रुत्ती सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या शिक्षणक्षेत्रात तसंच साहित्यिक क्षेत्रात सुध्दा आढळून येत आहे...बरोबरीनं कार्य करणारे, मदतीला धावून जाणारे, जीवाला जीव देणारे एखाद्या क्षुल्लक कारणावरून कधी कधी एकमेकांच्या जीवावर उठतात तेव्हा आपल्यासारख्या अतिसामान्य लोकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. अशा वेळी घोर निराशा होऊन  "किती हे अध:पतन!" असं म्हणण्याची पाळी आपल्यावर येऊन ठेपते! 

आजच्या विभक्त कुटुंब पध्दतीत जगणाऱ्या लोकांचं  चित्र सुध्दा यापेक्षा वेगळं नाही.आजकाल जगण्यात एकप्रकारचा यांत्रिकपणा आला असल्याचं सर्वत्र दिसून येत आहे. एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम, जिव्हाळा कमी होत आहे की काय असं बोलायला नक्कीच वाव आहे. कारण यांत्रिक युगामुळे जो तो नाईलाजानं "डिजिटल लाईफ" च्या आहारी गेला आहे. त्यामुळे होतं काय की, रात्री उशिरापर्यंत जागणं, झोप व्यवस्थित न झाल्यास चिडचिड होणं, पर्यायानं ताणतणाव वाढणं हे ओघानं आलंच. मग घरातील अगदी जवळच्या आपल्या माणसांशी सुध्दा कामापुरतं बोलणं होतं. कालांतरानं त्याचं पर्यावसान कधीकधी तुटक वागण्यात किंवा अबोला धारण करण्यात पण होतं. आपसात कुरबुरी वाढतात. कधीकधी क्षुल्लक कारणावरुन आपसात खटके उडाल्याची बरीचशी उदाहरणं आपल्या बघण्यात येतात.प्रकरण पार टोकाला गेलं की घटस्फोटासारखे प्रकारही होताना दिसतात.

हे नेमकं कशामुळे घडतं याचा विचार जर केला तर आपल्याला असं लक्षात येईल... आज निरनिराळ्या क्षेत्रात कमालीची स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे एकमेकांवर कुरघोडी करणं हेही ओघानं आलंच.याचा दुष्परिणाम आपल्या कुटुंब संस्थेवर सुध्दा होत असल्याचं दिसून येत आहे.आजच्या घडीला बहुतेक घरातील पती पत्नी दोघंही नोकरी करत असल्यानं, कालांतरानं त्यांच्यात एकप्रकारची 'जेलसी' व्रुत्ती निर्माण होत असल्याचं आपल्याला आढळून येईल.'घरातील मी कमावता आहे किंवा मी कमावती आहे, तुझ्या पेक्षा माझा पगार जास्त आहे त्यामुळे सगळं कसं माझ्या म्हणण्याप्रमाणंच व्हायला हवं' हा अहंभाव निर्माण होत असल्यानं साहजिकच आपसात द्वेषभावना वाढत आहे! मग अशा प्रसंगांना वेळोवेळी सामोरं जावं लागल्यानं प्रचंड ताणतणाव,नैराश्य,अस्वस्थता इत्यादी संकटांचा त्यांना सामना करावा लागतो. अशावेळी विभक्त पध्दतीमुळे छोट्या कुटुंबात कुणी जेष्ठ नसल्यानं, त्यांचा आश्वासक आधार किंवा सहानुभूती, प्रेम, जिव्हाळा यापासून त्यांना वंचित राहावं लागतं! त्यांची कमतरता प्रकर्षानं जाणवते पण काही इलाज नसतो. 

आजच्या यांत्रिक प्रणालीमुळे जगण्याची परिभाषा जणू बदलून गेली आहे. निसर्ग नियमानुसार रात्री वेळेवर झोपणं व सकाळी लवकर उठणं ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. मात्र नेमकं हेच आपण विसरून गेलो आहे. रात्री पार्ट्या करणं त्यासाठी उशिरापर्यंत जागणं हे आजकाल 'स्टेटस सिम्बॉल' झालं आहे. मग दिवसा माध्यान्ह होईपर्यंत झोपून राहणे हेही ओघानं आलंच. त्यामुळे आपल्या शारिरीक रचनेत वेगानं बदल होत असल्याचं दिसून येईल. अगदी युवावस्थेपासूनच निरनिराळ्या व्याधींना आपण आपसूकच आमंत्रणं देत आहोत हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा दुर्दैवानं खूप उशीर झालेला असतो! मग आपल्या कर्माची फळं भोगण्यावाचून गत्यंतर नसतं. म्हणूनच हे सर्व टाळण्यासाठी वेळीच सावध होणं किती गरजेचं आहे हे आपलं आपणच कधी ठरवायचं हे विचारायला कुण्या जोतिष्याकडे जाण्याची गरज नाही! 

"कोण दिवस येई कसा कोण जाणतो...."
या राष्ट्रसंतांच्या उक्तीप्रमाणे आपण वेळीच सावध होऊन आपलं एकंदरीत जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करूया. आपापसातील द्वेषभावना विसरून सामंजस्य, सलोखा, आपुलकी निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं ही आजच्या काळाची गरज आहे. त्यानुसार आपलं जगणं तणावमुक्त, निरामय, आरोग्य संपन्न करूया...अगदी आजपासून, आत्तापासून..!
                           .......  विनोद श्रा.पंचभाई
                                      ९९२३७९७७२५


No comments:

Post a Comment