झूठ बोले, कौवा काटे..।
"ऐसी जगह बैठिए, कोई ना बोले ऊठ।
ऐसी बात बोलिए, कोई ना बोले झूठ।।" या अतिशय मार्मिक दोह्याच्या मार्फत क्रांतिकारी संत कबीर महाराज यांनी पंधराव्या शतकात सर्वसामान्य जनतेला उपदेश केला होता. आजची परिस्थिती तेव्हापेक्षा सुधारली आहे असं अजिबात नाही. उलट सत्ता लालसेपोटी चढाओढ आणि खोटारडेपणाला जणू ऊत आला आहे. वरील दोह्याचा मतितार्थ लक्षात घेतला तर तो आज सर्वांसाठी खूपच परिणामकारक ठरु शकतो. कारण सर्रास खोटं बोलून आपला कार्यभाग साधणारे आपल्या समाजात सर्वत्र सर्रासपणे आढळतात. एकदा खोटं बोललं की ते 'खरं' ठरवण्यासाठी त्यांना परत परत खोटं बोलावं लागतं. त्याचाच पाठपुरावा करावा लागतो.
काही काही लोकांना खोटं बोलण्यातच समाधान वाटतं. खोटं बोलल्याशिवाय त्यांना राहवत नाही. आता हेच बघा ना... आपल्या दुकानातील माल खपवण्यासाठी दुकानदार किंवा विक्रेते हमखास खोटं बोलण्याचा आधार घेतात. ते त्यांचं वस्तू विकण्याचं एक प्रकारचं तंत्रच असतं म्हणा! तसंच काही लोकांना नुसत्या थापा मारण्याची सवयच जडली असते. मग थापा मारण्यासाठी, त्या रंगवून सांगण्यासाठी खोटं बोलणं हे ओघानं आलंच..!
तसं बघितलं तर सामान्य पापभिरू माणसाला विनाकारण खोटं बोलणं खूप अवघड जातं. खोटं बोलण्याला धाडसही लागतं. कधी तशी वेळ आलीच तर सामान्य माणसाला खोटं बोलण्यासाठी मनाची तयारी करावी लागते.खोटं बोलायला मानसिकता सुद्धा तशी बनवावी लागते. मग त्या बोलण्यानं समोरच्या व्यक्तीचं समाधान झालं नाही तर त्यांनं विचारलेल्या प्रश्नांना किंवा शंकांना उत्तर देण्यासाठी परत परत नाईलाजानं खोटं बोलावं लागतं. अशावेळी मात्र त्या सामान्य पापभिरू माणसाची भंबेरी उडाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रसंगांंना सामोरं जातेवेळी त्याची पार वाट लागू शकते!
काही व्यक्ती मात्र खोटं बोलण्यात एवढे पटाईत असतात की, "या सम हाच" असं म्हणायची पाळी येते. अगदी शंभर टक्के खोटं बोलण्यात या व्यक्तीची एवढी सुसूत्रता असते की ऐकणारा मंत्रमुग्ध झाल्यावाचून राहत नाही. तो धादांत खोटं बोलत आहे हे ज्याला माहीत असतं ( म्हणजे त्याच्या जवळच्या व्यक्तीला ), त्याला एका क्षणी असंही वाटतं की... याला नक्कीच एखादा पुरस्कार द्यावा ! काही महाभाग बोलताना इतकी 'फेकाफेकी' करतात की ऐकणार्याच्या ते लगेच लक्षात येते. त्यावेळी त्यानं बोलताना अतिशयोक्ती आणि अतिरंजितपणाचा कळस गाठल्यानं लोकांच्या नजरेतूनही तो चटकन उतरतो. मग त्याचे जवळचे मित्र किंवा नातेवाईक सुद्धा त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यास सहसा तयार नसतात. अशा 'फेकाफेकी' करणार्या बोलबच्चन व्यक्तीकडे सगळेच साशंक नजरेने बघतात. मात्र त्याचं त्याला काहीच सोयरसुतक नसतं. खोटं बोलण्याचं, थापा मारण्याचं जणू त्याला व्यसनच जडलं असतं!
काही व्यक्तींंना कारण नसताना, खोटं बोलून दुसऱ्या वर प्रभाव पाडायची सवय असते. तसेच बोलताना इतरांना 'डॉमिनेट' करण्यात ते धन्यता मानतात. आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जातील, हे त्याच्या गावीही नसते. तसंच काही लोक मात्र हेतुपुरस्सर खोटं बोलून आपला कार्यभाग साधून घेताना दिसतात. 'चांगल्या आणि विधायक कारणासाठी खोटं बोलणं गरजेचं असेल तर जरूर खोटं बोलावं' अशाप्रकारचे मत मांडतानाही आपल्या समाजात काही महापुरुष दिसून येतात. नेहमीच सत्य बोलणारा धर्मराज युधिष्ठिर सुद्धा महाभारताच्या रणसंग्रामाच्या वेळी 'अश्वत्थामा मेला... नरोवा कुंजोरवा..!' याप्रमाणे अर्धसत्य बोलला होता. मात्र त्यावेळेस चं त्याचं बोलणं न्यायाच्या, धर्माच्या बाजूंनी होतं. ती एक युध्दनीती होती... विधायक कारणास्तव!
असं म्हणतात... जी व्यक्ती खरोखरच स्वतःशी प्रामाणिक असते, ती सहसा खोटं बोलण्यास धजावत नाही! अशी व्यक्ती समजा जर खोटं बोलत असली तर तिच्या हावभावावरुन जाणकारांच्या लगेच लक्षात येतं की ती खोटं बोलत आहे. त्याचप्रमाणे खोटं बोलण्याचं सर्वात मोठं नुकसान म्हणजे जे काही खोटं बोललं जातं ते सगळं लक्षात ठेवावं लागतं. खरं बोलणार्याला मात्र ती भीती नसते. खरं बोलणारा आनंदी आणि तणावमुक्त असतो तर नेहमी खोटं बोलणारा नेहमीच तणावात वावरताना दिसतो!
"बच्चे मन के सच्चे" म्हणतात ते उगाच नव्हे. लहान मुलांच्या चेहऱ्यावर सदैव निरागसता आणि सच्चे भाव दिसून येतात. ती तणावमुक्त असल्याने त्यांच्या मुखकमलांवर सदानकदा हास्य फुललेलं आढळतं! मग जसजशी मुलं मोठी होऊ लागतात, तशी त्यांना मोठ्यांंच्या सहवासात हळूहळू खोटं बोलण्याची बाधा जडणं सुरू होतं. त्याला बर्याच अंशी पालक म्हणा किंवा घरातील वातावरण म्हणा तसंच काही अंशी शाळेत मिळणारी वागणूकही जबाबदार ठरु शकते. कालांतरानं थोडं मोठं झाल्यावर खोटं बोलणं काही मुलांच्या अंगवळणी पण पडतं! शेवटी सांगायचा मुद्दा असा की, विनाकारण किंवा गरज नसताना उगाच खोटं बोलणं हे कधीकधी खूपच घातक ठरू शकतं! तेव्हा आपण इतरांसोबतच स्वतःशी सुध्दा प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करूया..! बाह्य क्रुत्रिम वस्तुंवर प्रेम करण्यापेक्षा आपल्या माणसांवर प्रेम करुया... स्वतःवर प्रेम करूया... निदान तसा प्रामाणिक प्रयत्न करुया म्हणजे विनाकारण आणि उठसुठ खोटं बोलण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही...
"हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे...!"
..... विनोद श्रा. पंचभाई
भ्र.क्र.९९२३७९७७२५
No comments:
Post a Comment