असे गुरू... असे चेले..!
गोंदिया जिल्ह्यात नोकरी करत असताना बरेच वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले. निरनिराळ्या स्वभावाची माणसे भेटली. काही शहाणे, अतिशहाणे तर कधीकधी माणसातील अनेक प्रकारचे नमुने सुद्धा बघायला मिळाले.
मुळचे नागपूरचे असलेले एक होतकरू शिक्षक गोंदिया जिल्हा परिषदेच्या एका खेडेगावातील शाळेत नोकरी करत होते. त्यामुळे ते त्या शाळेत गोंदिया येथून रोज जाणे येणे करायचे. नंतर आठवड्याच्या शेवटी नागपूरला जायचे. त्यांच्याशी नेहमी भेटीसाठी होत असल्याने परिचय वाढला. मित्रत्वाची भावना निर्माण झाली. त्यांनी सांगितलेला त्यांच्या शाळेतील त्यांच्यावरच ओढवलेला एक प्रसंग येथे नमूद करावासा वाटतो...
शाळेत आठवीचा वर्ग सुरू होणार होता. एक एक विद्यार्थी वर्गात येऊन बसत होता. खेडेगावातील शाळा असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती तशी किरकोळच होती. शिक्षक वर्गात पोहचले. हजेरीपट उघडून त्यांनी एकेकाचे नाव पुकारण्यास सुरुवात केली. अजूनही उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्गात येणे सुरूच होते. नंतर एकदाचं हजेरी घेणं शिक्षकांनी संपवलं आणि गणित विषय शिकवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी दोन विद्यार्थी घाईघाईने वर्गात येण्यासाठी दरवाजाजवळ थांबून म्हणाले... "गुरुजी आत येऊ का..?"
"कारे बाबांनो, एवढ्या उशीरा शाळा असते का...?"
शिक्षकांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच त्यातील एक जण म्हणाला... "गुरुजी, त्या आपल्या डोंगरे गुरुजींंनी आम्हाला एक काम सांगितलं होतं म्हणून उशीर झाला.
"बरं बरं ! जा बसा आपापल्या जागेवर!" त्यांना हाताने इशारा करून परत त्यांनी शिकवण्यास सुरुवात केली. मात्र शिक्षक पाठमोरे झाले की, ते उशीरा आलेले दोन्ही विद्यार्थी आपसात कुजबुज करत होते. बोलताना तोंडात काहीतरी चघळत होते. मग शिक्षकांच्या नकळत वर्गाच्या खिडकीमधून तोंडातून पिचकारी टाकत होते. त्यांचे हे असले 'उद्योग' लक्षात यायला शिक्षकांना फारसा वेळ लागला नाही.
मग शिक्षकांनी त्या दोघांजवळ जाऊन दरडावून विचारलं..."काय रे , काय आहे तुमच्या तोंडात? लवकर बोला."
तोंडात गुटखा असल्याने त्यांना धड बोलताही येईना. शिक्षकांनी त्यांचे खिसे तपासले तेव्हा त्यातून गुटख्याच्या दहा बारा पुड्या निघाल्या. मग मात्र शांत स्वभावाच्या त्या शिक्षकांचा संयम सुटला. त्यांचा संताप अनावर झाला अन् त्यांनी त्या मुलांच्या कानाखाली आवाज काढला. तेव्हा त्यांच्यातील एकाने लगेच उत्तेजित होत, खिडकीतून बाहेर पिचकारी टाकत शिक्षकांना म्हणाला..."ओ गुरुजी... मारू नका मला. या पुड्या त्या डोंगरे गुरुजींंच्या हायेत. आमच्या नाय. त्यांनी मगाशी हेच काम सांगतलं व्हतं."
त्या मुलाचं बोलणं ऐकून शिक्षक हबकूनच गेले आणि सुन्न झाले!
आता सांंगा... हे असे डोंगरे गुरुजी सारखे शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना घडवणार की बिघडवणार? अशाप्रकारचे गुरु लाभले तर त्यात त्या विद्यार्थ्यांचा तरी काय दोष? खेडेगावातील बरेचसे पालक आपापल्या शेतीव्यवसायात सतत कामात असतात. त्यामुळे त्यांना आपल्या मुलांकडे पुरेसा वेळ द्यायला एकप्रकारे दुर्लक्षच होते. हल्लीच्या शहरी पालकांसारखे ते जागरूक नसतात. आपली मुलं शाळेत जातात याचंच त्यांना अप्रुप वाटतं. शहरातील प्रत्येक शाळेत नियमितपणे पालक सभा होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगती बद्दल आणि वागणूकीबाबत पालकांना 'अपडेट' मिळत असते. अशा प्रकारच्या पालकसभा खेडेगावातील शाळांमध्ये अभावानेच होताना दिसतात. नाही म्हणायला, काही धडाडीचे आणि जागरूक शिक्षक खेडेगावातील पालकांच्या घरी जाऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना दिसतात. त्यांना मुलांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या शिक्षणाबद्दल मार्गदर्शन ही करतात. मात्र दुर्दैवानं अशा सेवाभावी, आदर्श शिक्षकांची आपल्या समाजात आजघडीला तरी खूपच वानवा आहे!
खरं सांगायचं तर खेडेगावातील, विशेषतः दुर्गम भागातील शाळेत कार्यरत असणारे बरेच शिक्षक हे सहजपणे व्यसनाधीनतेकडे आक्रुष्ट होताना दिसतात. त्यांना वाटतं, आपल्याकडे अशा दुर्गम भागातील आडवळणाच्या शाळेत कुणाचंच लक्ष नसणार, आपण कसंही वागलो तरी काही फरक पडत नाही, आपलं कुणी काहीच वाकडं करू शकणार नाही. नंतर त्या शाळेच्या वार्षिक निरीक्षणाच्या वेळी अशाप्रकारचे हे महाभाग शिक्षक पध्दतशीरपणे सर्व 'मँनेज' करून व्यवस्थित 'सेटिंग' करण्यात नेहमीच अग्रेसर असतात.
दुर्दैवाची बाब अशी की या व्यसनी शिक्षकांच्या सानिध्यात राहिल्याने काही विद्यार्थ्यांना सुध्दा त्यांच्या नकळत्या वयातच व्यसन जडण्याची दाट शक्यता असते. मग 'जसा गुरु, तसा चेला' व्हायला फारसा वेळ लागत नाही. कारण त्या निरागस मुलांच्या आईवडिलांना वाटतं... आपला मुलगा शाळेत जातो. तो शिकून बाबूसाहेब बनणार! शाळेत मुलाला पाठवलं की आपलं काम संपलं अशीच मानसिकता आजही मागासलेल्या ग्रामीण भागात सर्वत्र आढळते. याच गोष्टीमुळे अशाप्रकारच्या व्यसनी शिक्षकांचे फावते. मग वार्षिक परीक्षा झाल्यावर निकाल लावायचं काम हेच शिक्षक करत असल्याने अगदी 'ढ' विद्यार्थी पण उत्तीर्ण होतात. आपला मुलगा पास झाला म्हणून त्याचे आईवडील सुद्धा खुश असतात. त्यामुळे अशा व्यसनी शिक्षकांविरूद्ध तक्रार देण्यासाठी सहसा कुणी धजावत नाही!
आपल्या देशात गुरुची महती वादातीत आहे. गावातील उदाहरण द्यायचं झाल्यास अगदी सांदिपणी आश्रमातील शाळेपासून ते सानेगुरुजींंच्या शाळेपर्यंत आदर्श गुरुंंची एक थोर परंपरा आपल्याला लाभली आहे. त्यामुळेच एवढ्या तेवढ्या कारणावरून गुर गुर करणाऱ्या गुरुची नव्हे तर सर्वार्थानं निस्वार्थ ज्ञानदान करणाऱ्या गुरुजींंची आज समाजाला नितांत गरज आहे.
"ईश्वराचे जन्म देणे। आईबापासि निमित्त करणे।
विद्या गुरुंचे शिकवणे। भाग्य बने गावाचे।।
या कोवळ्या कळ्यांमाजी।लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी।
विकसता प्रकटतील समाजी।शेकडो महापुरुष।।
आदर्श होतील विद्यार्थीगण।गावाचे पालटेल जीवन।
कोठेच न उरेल गावंढळपण।टिकावूपरिवर्तन यामार्गे।।
विद्यामोले ऐसे चढता। येईल भाग्य गावाचे हाता।
तुकड्यादास म्हणे तत्त्वता।विसरूनका हा मूळमंत्र।। ----- ग्रामगीता
विनोद श्रा. पंचभाई
मो.क्र.९९२३७९७७२५
No comments:
Post a Comment