युवकांचे प्रेरणा स्थान.. डॉ. अब्दुल कलाम
"ज्या व्यक्तीचे विचार उच्च असतात त्या व्यक्ती धर्माचा उपयोग आपल्या मैत्री साठी करून घेतात. नीच विचारांची माणसे मात्र धर्माचा उपयोग एकमेकांवरील द्वेषासाठी करतात." असा मर्मस्पर्शी संदेश देणारे थोर वैज्ञानिक भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी 'इग्नायटेड माईन्डस्' हे अफलातून पुस्तक लिहिले आहे. त्याचा अतिशय सुरेख अनुवाद लेखक चंद्रशेखर मुरगुडकर यांनी करून "प्रज्वलित मने" हे अत्यंत वाचनीय पुस्तक आजच्या युवकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. सन २०२० पर्यंत भारताचं रूपांतर एका विकसित देशामध्ये व्हावं या द्रुष्टिकोनातून भारतातील तरूणांच्या मनात स्फुल्लिंग चेतवावं असा मानस डॉ. अब्दुल कलाम यांनी या पुस्तकातून व्यक्त केला आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आपल्या कार्यासाठी स्वतःला झोकून देण्याची व्रुत्ती या बळावर युवाशक्तीला काहीही अशक्य नाही असा द्रुढविश्वास त्यांना आहे. "माझ्या तंत्रज्ञान आणि त्याच्या नियोजनाच्या कालखंडात मी तरूणांच्या ताकदीवर आणि क्षमतेवर अवलंबून राहिलो. माझे सर्व तरुण सहकारी म्हणजे माझी शक्ती होती, ज्या शक्तीने मला कधीच दगा दिला नाही." असं ते प्रामाणिकपणे विशद करतात.
'भारताच्या आणि भारतीयांच्या क्षमतेविषयी मला वाटणार्या आदराचं प्रकटीकरण म्हणजे हे पुस्तक' ही उदात्त भावना डॉ. कलाम यांनी आपल्या प्रस्तावनेत व्यक्त केली आहे. तसेच आपल्या क्षेत्रात कार्य करत असताना युवकांबरोबर आलेले अनुभव त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने मांडले आहेत. "माझ्या या विकसित भारताच्या स्वप्नात सहभागी व्हा आणि त्या माध्यमातून तुमची स्वतःची व इतरांची स्वप्ने साकार करा. माझा हा प्रयत्न आहे तो केवळ मार्गदर्शनासाठी. माझे विचार दुसऱ्यावर लादण्याचा माझा उद्देश नाही." असं ते परोपरीने सांगतात. या पुस्तकाच्या सर्व च प्रकरणांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयांचा सविस्तर आढावा घेतला आहे. त्यांना भारतभर भेटलेल्या मुलांसोबत घडलेला संवाद तसेच निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्ती, विचारवंत, शास्त्रज्ञ, साधू, मौलवी यांचे विचार या पुस्तकात वाचताना सामान्य वाचक भारावून जातो, अंतर्मुख होतो!
" राष्ट्र प्रेमाचं आणि देशभक्तीचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे जपान. एकता आणि अखंडता या त्यांच्यातल्या सद्गुणांमुळे अत्यंत केविलवाण्या अवस्थेत झालेल्या पराभवाचे रूपांतर त्यांना आर्थिक महाशक्तीमध्ये करता आलं. जे देश आज उच्चस्थानावर पोहचलेले दिसतात, त्यांच्यामध्ये उद्दिष्टांची जाणीव प्रकर्षाने दिसून येते. प्रामुख्याने जपान या देशाचं उदाहरण या बाबतीत देण्यासारखं आहे." अशाप्रकारचे प्रेरणादायी उतारे हे पुस्तक वाचताना आढळतात. तसेच आपल्या ध्येयाप्रती सातत्य आणि सुसूत्रीकरण असे दोन्ही गुण एकत्रितपणे असणारी द्रुष्टी लाभलेले डॉ. विक्रम साराभाई या अद्वितीय शास्त्रज्ञाबरोबर काम करताना आलेले डॉ. कलाम यांचे अनुभव वाचकांच्या ज्ञानात भरच टाकतात.
डॉ. कलाम जवळपास चाळीस हजार विद्यार्थ्यांना भेटले. त्या भेटीमध्ये मुलांनी त्यांना शेकडो प्रश्न विचारले. बहुतेक प्रश्नांमधून मुलांची निष्पाप व्रुत्तीच पाहायला मिळाल्याचं ते आवर्जून नमूद करतात. गुजरात येथील आनंद याठिकाणी ते काही विद्यार्थ्यांना भेटले. तेव्हा एक विलक्षण प्रश्न त्यांना एकाने विचारला... "आपला शत्रू कोण?"
तो प्रश्न त्यांना आवडल्याने , त्याबद्दल विद्यार्थ्यांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडूनच उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला. मग त्यांना वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं मिळाली. नंतर एका निरागस मुलीकडून उत्तर आलं... " आपला खरा शत्रू आहे गरीबी!" खरंच किती विचारपूर्वक आणि मार्मिक उत्तर दिलं त्या मुलीनं! मुलांच्या भावना जपणारे, त्यांचे प्रश्न मनापासून ऐकून घेणारे आणि त्यांचे समर्पक उत्तर देऊन समाधान करणारे डॉ. कलाम यांनी हे पुस्तक त्या निरागस मुलीलाच अर्पण केल्याचा येथे आवर्जून उल्लेख केला आहे.
अशाच एका प्रसंगात एका मुलाने डॉ. कलाम यांना बेधडक प्रश्न विचारला..."मला एक सांगा सर, पाकिस्तानची शस्त्रास्त्रे भारतीय शस्त्रास्त्रापेक्षा अधिक प्रभावी आहेत का?"
त्यावर हा प्रश्न त्या मुलाच्या मनात कसा काय आला याबाबत डॉ. कलाम यांनी त्याला विचारले असता, आपल्या प्रसार माध्यमातून त्याला जे वाचायला मिळालं त्यातून त्याला हा प्रश्न पडला होता.
"आपल्याकडे कितीही बलाढ्य ताकद असली तरी तिला कमी लेखायची प्रव्रुत्ती आपल्या देशात आढळते. कुठल्याही प्रकारचे क्षेपणास्त्र किंवा कुठल्याही प्रकारचे अण्वस्त्र विकसित करून पुढे त्यांचे उत्पादन करण्याची क्षमता भारताकडे आहे. या प्रकारची क्षमता अख्ख्या जगात फक्त चारच देशांकडे आहे. तू तुझ्या मनातली ही शंका काढून टाक." डॉ. कलाम यांचे हे देशाभिमानाने ओतप्रोत असलेले उत्तर ऐकून त्या मुलाचे पूर्ण समाधान झाले.
डॉ. अब्दुल कलाम एका ठिकाणी म्हणतात..."माझ्या लहानपणापासून आज वयाच्या सत्तरीपर्यंत देशातील अनेक धर्मांचा अभ्यास करण्याची संधी मला लाभली. याबाबतीत मी स्वतःला सुदैवी समजतो. सगळे धर्म एकाच मध्यावधी कल्पनेची महती सांगताना मला दिसले, आणि ती कल्पना म्हणजे आत्मिक समाधानाची! भारतामध्ये जी धर्मनिरपेक्षता आहे तिचा पाया हा आत्मिक समाधानाच्या तत्वावरच रचलेला आहे. आपल्याकडे फक्त उद्दिष्टांच्या जाणीवांचा पूर्णपणे अभाव असल्यामुळे आपण आपल्या संस्कृतीशी प्रामाणिक राहू शकत नाही आणि स्वतःशी देखील नाही."
त्याचप्रमाणे "अपयशामध्ये यश दडलेले आहे. विस्कळीत आणि गोंधळात पडलेल्या परिस्थितीमध्ये उद्याची आशा लपली आहे, तर सगळ्या अडचणींमध्ये त्यांची उत्तरे लपलेली आहेत. विविध श्रद्धास्थाने आणि आदर्श असलेले आपण एक अब्ज नागरिक आहोत. जोपर्यंत एक ठोस असा सार्वत्रिक द्रुष्टिकोन आपण अंगीकारत नाही तोपर्यंत देशाची ही 'शिवण' उसवतच राहणार आहे आणि जातीजमाती मधले भेद अधिक रूंदावत जाणार आहेत. सतत उसवत जाणारी आणि भेगाळणारी ही शिवण आपण घट्ट करण्याची, सशक्त करण्याची आज नितांत गरज भासते आहे. ज्यातून एकसंध भारताची निर्मिती होऊ शकेल." असा प्रखर आशावाद डॉ. अब्दुल कलाम व्यक्त करतात. शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्याबरोबर अध्यात्माची सांगड घालणे आजच्या काळाची गरज आहे असे त्यांचे प्रामाणिक मत त्यांनी मांडले आहे. ते म्हणतात..."सर्वात सुंदर क्रुती कोणती आहे, तर समोरच्या माणसाला मन:शांती लाभेल असे वागणे, भुकेलेल्या माणसाला अन्न देणे, अडचणीत सापडलेल्यांना मदतीचा हात देणे, काळजीत पडलेल्या माणसाला आधार देणे आणि जखमी लोकांच्या वेदनांवर फुंकर घालणे!"
"विद्यार्थ्यांनी या देशाला एक 'विकसित देश' म्हणून पुढे आणण्यासाठी तयारीत राहिले पाहिजे. आपली मने प्रज्वलित करून विचारांचा आवाका वाढवला पाहिजे. युवाशक्ती ही देशाची खरी संपत्ती आहे. ते मोठे होतील तेव्हा त्यांच्या समोर आपण कोणाला उभे करणार आहोत? आई वडील आणि प्राथमिक शिक्षक हे मुलांचे चांगले आदर्श होऊ शकतात. जेव्हा मुलं मोठी होतील तेव्हा उच्च दर्जाचे व सचोटीने वागणारे, तंत्रज्ञान, विज्ञान, राजकारण आणि उद्योग यासारख्या सर्वच क्षेत्रातील राष्ट्रीय नेते त्यांच्या समोर आदर्श म्हणून आपण उभे करायला हवेत" असे आपले प्रांजळ मत आणि विद्यार्थ्यांविषयी त्यांना वाटणारी विलक्षण तळमळ या पुस्तकातून डॉ. कलाम यांनी व्यक्त केली आहे!
'चिनार पब्लिशर्स' यांनी प्रकाशित केलेले तसेच लेखक चंद्रशेखर मुरगुडकर यांनी अनुवादित केलेले "प्रज्वलित मने" हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याने, युवापिढी ने तसेच सर्व वयोगटातील वाचकांनी आवर्जून वाचायलाच हवे इतके प्रेरणादायी आहे. सहज सोपी भाषाशैली आणि मुद्देसुद मांडणी यामुळे हे पुस्तक अतिशय वाचनीय ठरले आहे. स्वतः डॉ. अब्दुल कलाम यांची प्रस्तावना आणि चित्रकार के. सय्यद यांचे आकर्षक मुखपृष्ठ "प्रज्वलित मने" ला लाभले आहे. असे हे सर्वांसाठी प्रेरणादायी आणि वाचनीय पुस्तक आपल्या संग्रही असायलाच हवे. लेखक चंद्रशेखर मुरगुडकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
... विनोद श्रा. पंचभाई
प्रकाशक....सौ.सुषमा नहार
पाने.... १४४
किंमत...१५०रु.
👍👍💐
ReplyDelete